शनिवार, २० जून, २०२०

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी ऑनलाईन व्यवहार हाच पर्याय

कोरोना नावाच्या व्हायरसने जगभर पसरायला सुरवात केली. आणि काही कालावधीतच भारतीय उपखंडात सुद्धा कोरोनाचा संसर्ग पसरू लागला. संसर्गाला आळा घालण्यासाठी शासनाने लॉकडाऊनची घोषणा केली. हातावर पोट असणारे गोरगरीब, मजुरांचा रोजगार थांबला. त्यांची उपासमार होऊ नये म्हणून लोककल्याणकारी शासनाने रेशनमध्ये स्वस्त दरात रेशन तसेच जनधन योजने अंतर्गत उघडण्यात आलेल्या बँक खात्यावर प्रत्येकी पाचशे रुपये असे तीन महिन्यात दरमहा जमा करणार असल्याची घोषणा केली.
 घोषणा केल्याप्रमाणे नागरिकांच्या जनधन खात्यांमध्ये पाचशे रुपये रक्कम जमा झाली. रुपया सुद्धा गाडीच्या चाकाप्रमाणे वाटणाऱ्या गरीब जनतेला तो फार मोठा आधार ठरला. मग काय लोकांनी बँकांसमोर रक्कम काढण्यासाठी सकाळपासून मोठ्या मोठया रांगा लावल्या असल्याचे दूरचित्रवाहिन्यांवर दाखवले गेले. यातून बेरोजगारी व गरिबीचे धक्कादायक चित्र समोर आले. हा प्रकार अतिशय धोकादायक असून कोरोना व्हायरसला आयतच निमंत्रण ठरू शकणारा आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर असावे, प्रत्येकाने तोंडावर मास्क किंवा स्वच्छ रुमाल बांधावा. मात्र सहजपणे ऐकतील ते  लोकं कसले. शिवाय कमी शिक्षण, आडमुठेपणा या प्रमुख अडचणी आहेतच. नाहक बाहेर पडून गर्दी करण्यात सुद्धा काही आडदांड समाजकंठकांना थ्रिल वाटत असावी.
 बँकांसमोरील गर्दी, लांबच लांब रांगा दुरचित्रवाहिन्यांवर पाहून पोटात कालवा कालव झाली. यावर उपाय योजला पाहिजे असे वाटू लागले. जर दुर्दैवाने कोरोना प्रादुर्भाव वाढला तर आपण नियंत्रित करू शकू काएकसे तीस करोड जनतेसाठी पुरेशी वैद्यकीय व्यवस्था उपलब्ध करणे शक्य आहे का? प्रशासन, पोलीस, कर्मचारी, डॉक्टर, सिस्टर सुद्धा मानवच आहे. ते तरी स्वतःचा जीव धोक्यात घालून किती दिवस सेवेस तत्पर असणार?
 मग या लांबच लांब रांगा टाळ्यायच्या कशा? तर ते अगदी सहज शक्य आहे. मागच्या काही वर्षात शासनाने सर्वच नागरिकांचे आधार  काढले असून ते बऱ्याच प्रमाणात त्यांच्या बँक खात्यांशी लिंक सुद्धा आहेत. तसेच ऑनलाइन व्यवहारांसाठी UPI व्यवस्था सुद्धा विकसित करण्यात आली आहे. तुलनेत ऑनलाइन व्यवहार वाढल्याचे दिसून येते. मात्र बरेच वयस्कर, गरीब तथा कमी शिक्षण असलेले नागरिक  ऑनलाइन व्यवहार करण्यास घाबरत असल्याने धजावत नाही. त्यांना आपल्या खात्यावरील रक्कम चोरीला जाईल की काय, आपण फसविले जातो की काय? अशी भीती सतावते.
बरं ही बाब आजवर दुर्लक्षित होती मात्र अशा अडचणीच्या वेळी तरी लोकांनी ऑनलाईन सेवेचा वापर केला पाहिजे. जेणेकरून संसर्ग टाळण्यासाठी मदत होईल. यासाठी संबंधित बँकांचे ऍप, गुगल पे, पेटीएम, अमेझॉन पे, फोन पे असे विविध ऍप अतिशय उपयुक्त व सुरक्षित असल्याचे पटवून दिले पाहिजे. इतर वेळी राजकारण असू शकतं मात्र आता आशा वेळी समाजपयोगी समाजकारण  करायला पुढाकार घेणे आपले आद्य कर्तव्यच आहे.
आपल्या आजूबाजूच्या अशा लोकांना सुरक्षिततेची काळजी घेऊन ऍप इंस्टोल करून देणे. बँक अकाउंट, बेनीफिशअरी ऍड करून देणे यासाठी ज्यांना माहीत आहे त्यांनी पुढाकार घेऊन लांबलचक रांगा कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी हे महत्वाचे काम करणे आवश्यक आहे. मात्र बऱ्याच खातेधारकांकडे एटीएम नसल्याने अडचण येऊ शकते, यावर खाते क्रमांक, शाखा, IFSC कोड टाकून सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधीत बँकांनी उपाययोजना केली पाहिजे. 
नुसताच व्हाट्सप, फेसबुकवर वेळ घालवण्यापेक्षा असं काही समाजासाठी योगदान देण्यासाठी तरुणांना तयार केले पाहिजे.
तसेच यापुढे जनधन खाते किंवा इतर कुठल्याही खात्यातून रक्कम काढण्यासाठी गर्दी होऊ नये. ग्राहक खातेधारकांनी आपल्या खात्यातील रक्कम परस्पर खरेदीसाठी वापरावी, यासाठी जास्तीत जास्त खातेधारकांनी ऑनलाईन सेवेचा वापर करण्याबाबतचे आवाहन तथा माहिती दूरचित्रवाहिन्यावर दाखवण्यात यावी. तसेच वर्तमानपत्र आणि शासन स्तरावर नागरिकांचे प्रबोधन करणे महत्वाचे ठरेल. असे मला वाटते.
सोमनाथ आवडाजी पगार, नाशिक
गीतकार/कवी, लेखक  (MSRA, MABMCM) Mb.9273357159
Email-somnathapagar@gmail.com  somnathpagar@yahoo.co.in
Blog: https://somnathpagar.blogspot.com
Follow me on my Blog, Facebook, whatsapp, You Tube, Twitter, Linked in, Instagram.
सभासद:
१.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
२.स्क्रीन राइटर्स असोसियशन
३.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
४.मराठी साहित्य परिषद


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा