शनिवार, ६ जून, २०२०

कथा लेखन कसे करावे?


आपण लहानपणी अगदी उत्सुकतेने आपले आजी, आजोबा किंवा आई, वडीलांकडून सांगितल्या गेलेल्या कथा ऐकल्या आहेत. एवढेच नाही तर शालेय क्रमिक पुस्तकांतील कथा अगदी आनंदाने आपल्या आवडत्या शिक्षकांकडून ऐकल्या आहेत किंवा रमत-गमत वाचल्या आहेत. खरं तर आपल्याला वाचायला लिहायला गोडी, आवड निर्माण होण्यामागे त्या कथांचा मोलाचा वाटा असतो, असं मला वाटतं. प्रभू श्री. रामचंद्र, श्री. कृष्ण, भक्त प्रल्हाद, श्रावण बाळ, शिवाजी महाराज  यांचे  कार्य, कर्तुत्व व पराक्रम वर्णन करणाऱ्या तसेच तहानलेल्या कावळ्याची, भोपळ्याची, कासव व सश्याची शर्यत अशा अनेक कथांनी तर आपल्या अनेक पिढ्यांवर एक प्रकारचे संस्कार केले आहेत. असे म्हणायला हरकत नसावी. इतकी महत्वपूर्ण भूमिका आपल्या जीवनात या कथांची आहे. खरं तर या अशा संस्कारक्षम कथा या आपल्यासाठी महत्वपूर्ण ऐवज असून अनेक नामवंत कथा लेखकांनी यामध्ये आपल्या सिद्धहस्त लेखणीने भर घालण्याचे काम करून हा ठेवा जतन करण्यासाठी हातभार लावला आहे.
मुद्रण तंत्रज्ञानाचा शोध लागण्यापूर्वी एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे मौखिक स्वरुपात हा ठेवा पिढ्यानपिढ्या हस्तांतरीत होत राहिला. मग काळाच्या ओघात यात काही बदलही झालेला असू शकतो. मात्र या कथांमागचा मुळ हेतू मनोरंजन, शिक्षण तथा संस्कार असणार यात तिळमात्र शंका नाही. आता आपल्याकडे दूरदर्शन, चित्रपट, नाटक आदी मनोरंजनाची साधनं आहेत. आपल्याला हवं तेव्हा आपण या साधनांचा वापर करू शकतो. मात्र पूर्वी अशी मनोरंजनाची साधनं नसल्याने पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या कथांसारख्या मनोरंजनात्मक साधनांचा एकमात्र सहारा वाचकांना किंवा त्यावेळच्या नागरिकांना होता. असे म्हणायला हरकत नाही.  आता तर युट्यूब, व्हाट्सऍप, फेसबुकसारख्या नव तंत्रज्ञानामुळे तर क्रांतीच झाली असल्याचं आपण अनुभवतो आहोत.
कथा हि आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. याबद्दल आपले कुणाचे दुमत असू शकत नाही. कथा ऐकून, वाचून आपले मनोरंजन तर होतेच मात्र आपल्या ज्ञानातही भर पडते. तर मग कथा म्हणजे नेमकं काय? व कथा कशी असावी? किंवा कशी लिहावी? याबद्दल आपण चर्चा करणार आहोत.
एका विशिष्ट स्थळकाळी पात्रांच्या परस्पर संबंधातून घडलेल्या घटनांचे वास्तवदर्शी केलेले चित्रण म्हणजे कथा होय.
मग हे चित्रण कधी वास्तवदर्शी तर कधी कल्पनावादी असू शकते. बऱ्याचवेळी कथा या काल्पनिक असतात. मात्र त्या आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांशी साम्य दाखवत असल्याने आपल्याला त्या खऱ्या खुऱ्या वाटतात. त्यामुळे आपण त्या कथांचा सबंध आपल्या दैनंदिन जीवनाशी लावून आनंदी किंवा दु:खी होतो. मनोरंजन हाच मुख्य उद्देश बऱ्याचवेळा कथा लिखाणामागे असतो. तसेच कथा लिहून लेखक आपल्या भावनांचा एक प्रकारे निचरा करून आनंद उपभोगत असतो. ऍरीस्टॉटल या ग्रीक तत्वज्ञाने नमूद केल्याप्रमाणे प्रेक्षक  कलांचा उपभोग घेतांना वर्णन केल्या गेलेल्या पात्रांबरोबर हसतात, रडतात म्हणजे ते एकप्रकारे आपल्या भावनांचा निचराच करत असतात.  यालाच ऍरीस्टॉटलने कथारसीस (Catharsis)  असे म्हटले आहे. आणि असा निचरा झाल्याने प्रेक्षकांच्या मनातील भावनांचे संतुलन घडून येते. त्यामुळे माणसाला सुखी होण्यास एकप्रकारे मदतच होते.
कथा हा एक साहित्याचा प्रकार असून कथा म्हणजे काय? हे आपण पहिले. आता कथा कशी बनते? अथवा कशी लिहली जाते? याबद्दल आपण पाहूया. वर नमूद केल्याप्रमाणे कथा या सत्य किंवा कल्पोकल्पित अशा घटना व पात्रांचा वापर करून लिहलेल्या असतात.
कथेचे प्रामुख्याने खालील घटक असतात
१.पात्र (Character): वैशिष्ट्यपूर्ण वृत्ती व स्वभावाचे, आपले शील, चारित्र्य यात विविधता असणारे, कीर्ती, प्रसिद्धी जपणारे,  मिळवू पाहणारे असे विविध पात्र कथेत जीव आणतात.
२.नेपथ्य (Setting): विशिष्ट ठिकाण, स्थळ विचारात घेऊन कथा आकारास येते.
३.संघर्ष (Conflict): पात्रांमधील झगडा, त्यांच्या भावना, एकमेकांना विरोध तसेच संघर्षामुळे वाचकांची कथा वाचण्यास उत्कंठा वाढते.
४.कथानक (Plot): कथेत जे काही घडणार आहे त्याला कथानक म्हणावे. कथेचे कथानक हा आत्मा असतो. थोडक्यात कथानक म्हणजे जे लेखकाला सांगायचं. कथानकाशिवाय कथा अशक्य आहे. उदा. माणसाची जिद्द, चिकित्सक वृत्ती, बुद्धिमत्ता यामुळे मानवाची प्रगती झाली.
५.विषय (Theme-Subject): कथा लेखकाला सुचलेल्या विषयावर लेखक आपले कौशल्य पणाला लावून वैशिष्यपूर्ण कथा लिहतो.
ज्याला वरील घटकांचा फरक समजला त्याला कथा सहज कळू शकते.
कोणतीही कथा लिहण्यास सर्व प्रथम एखादी कल्पना मनात असावी लागते. किंवा तसे पूरक अनुभव आलेले असावे लागतात.  चांगले वाचन व पुरेशा शब्दसाठ्याच्या बळावर एक उत्कृष्ट कथा सहज निर्माण होऊ शकते.  चांगली कथा लिहावयाची असेल तर सर्वप्रथम चांगल्या कथा वाचल्या पाहिजे. कधी कधी कथेचे शीर्षक मनात येते व त्या अनुशंगाने कथानक सुचत जाते अथवा विकसित होत जाते. किंवा कथेचे शीर्षक कथा विकसित होत जातांना, कथेचा विकास करतांना सुचू शकते. महत्वाचं म्हणजे कथा बीज व त्यासबंधित कथा लिहून पूर्ण करणे. हे एक प्रकारे अवघड काम असते. अशा कितीतरी कथा वा कल्पना मनात येतात मात्र सर्वच कागदावर उतरत नाहीत. त्यासाठी विचारांची, कल्पकतेची एक बैठक आवश्यक असते.
कथा लेखकाला कधीही सुचू शकते. म्हणून सोबत पेन व कागद ठेवावा व त्वरित सुचलेले विचार नोंद करून ठेवणे केव्हाही उत्तम. हल्ली तर प्रत्येकाकडे मोबाईल असतो. त्यातील नोट  पॅडचा उपयोग यासाठी करता येऊ शकतो.  पुढे आपोआप स्थळ, काळ, वेळ, पात्र यांचा विकास सहज व सोपा होतो. सुचलेली कथा आपल्या कुटुंबातील सदस्यांना, मित्रांना ऐकवून त्यांचा अभिप्राय निच्छितच मार्गदर्शक ठरतो. कथेचा विकास करतांना त्यातील घटना, पात्र वगैरे यांत तार्किक सुसबंध असावेत.
कथांचे प्रकार
कथांचे आशय, विषय, स्थळ, काळ. कथानक, पात्र यांचा विचार करता ढोबळपणे खालीलप्रमाणे कथांचे प्रकार लक्षात येतात.
१.दैवी कथा : देव, दानव, धार्मिक रूढी, परंपरा या विषयी या कथा असतात.
२. वैज्ञानिक कथा: वैज्ञानिक शोध, संशोधन  या विषयांवर बेतलेल्या या कथा असतात.
३. ग्रामीण कथा : ग्रामीण भागातील जीवनमान, चाली रीती, घडा मोडी यावर आधारित या कथा असतात.
४. विनोदी कथा: कथेचे कथानक विनोदात्मक वर्णन केलेले असून  वाचक रमत, गमत या कथांचा आस्वाद घेतो.
५. लोककथा: पारंपारिक परंपरा, सांस्कृतिक आशय असलेल्या व मौखिक परंपरेने पिढ्यान पिढ्या जतन केल्या गेलेल्या कथा म्हणजे लोककथा होय. या उपदेशपर किंवा धार्मिक असतात.
६. हेरकथा: हा एक लोकप्रिय रंजनप्रधान कथा प्रकार असून एखाद्या घटनेचा मागोवा घेऊन घटनेच्या मुळ कारणांचा /रहस्यांचा शोध अशा कथांमधून मांडला जातो.
७. परीकथा: काल्पनिक पऱ्यांचे कल्पना विश्व ज्या कथांमध्ये वर्णन केलेले असते अशा कथांना परीकथा म्हटले जाते.
८. बोधकथा: हा एक बोधात्मक वर्णन करणारा कथा प्रकार असून अशा कथांमधून वाचक आपल्या जीवनाविषयी बोध घेतो.
९. मिथ्यकथा: कलात्मक सत्याचा अंतर्भाव असलेला कथा प्रकार.
१०. रूपककथा: (Allegory): दृष्टांतांचे वर्णन करून अशा कथा लिहल्या  जातात.
११. भय कथा : अशा कथांमधून भूत, प्रेत, जादूटोणा, गंडे, दोरे, अंगारे, धुपारे या  
१२. पुराणकथा: आदिम व प्रगत स्वरुपाचे वर्णन करणाऱ्या या कथा धर्मिक ग्रंथातील घटनांवर आधारित परंतु नाविन्य रेखाटणाऱ्या असतात.
प्रत्यक्ष कथा लिखाणास सुरवात:  
१.कथा बीजाची /विषयाची जुळवाजुळाव
कधी कधी अगदी शुल्लक कल्पना सुचते किंवा भावते. मग आपण/लेखक त्या सबंधित कल्पना, विचार करू लागतो. आणि एका छोट्याशा कल्पनेचे रुपांतर चुटकीसरशी चांगल्या कथेत करू शकतो. सुदैवाने काही क्षणात एखादी कथा आकारास येते किंवा काही कथा आकारास येण्यास कितीही कालावधी लागू शकतो. डोक्याला भरपूर ताण देऊनही काही वेळा काहीच सुचत नाही. अशा वेळी आपले मित्र, नातेवाईक आजूबाजूच्या घटना याकडे जाणीवपूर्वक पहिले तर आपोआप प्रेरणा मिळून कथा बीज घावते. आपल्याला यापूर्वी आलेले अनुभव बऱ्याच वेळेला कथा लिखाणास पूरक ठरतात. आपण लहानपणी ऐकलेल्या किंवा शाळेत वाचलेल्या कथा आपल्या मदतीला धावून येतात. कधी कधी माहित असलेल्या अनेक कथांमधून नवीन कथा सुचू शकते.
कथा बीज सुचल्यावर वास्तवाशी  कल्पनांची सांगड जरूर घालावी मात्र सदर भाषा हि साहित्यिक असावी. उपमा, अलंकार, म्हणी, वाक्यप्रचार यांची पुरेपूर पेरणी करावी. समजा दरवाजाविषयी वर्णन असेल तर तो दरवाजा स्वर्गासारख्या घरात जाण्याचा मार्ग आहे, किंवा एखाद्या पोर्टलमुळे संधीची द्वारे उघडली गेली. असं काहीतरी असावं. वेगवेगळ्या अंगाने विचार करून कथा लिहली तर नाविन्यपूर्ण व वाचकाच्या भावनांना हात घालणारी कथा निच्छितच निर्माण होऊ शकते.
२.कथेच्या मुलभूत घटकांनी कथेला सुरवात करावी,
कथा बीज अर्थात कथेच्या कल्पनेची निवड झाल्यावर कथा लिहायला सुरुवात करतांना कथेच्या मुलभूत घटकांचा विचार करणे आवश्यक असते. चांगल्या कथेचे खालीलप्रमाणे तंत्र असावे,
पूर्व दृश्य (Flashback) तंत्र: मुख्य कथेची सुरवात पुर्वी घडलेल्या एखाद्या घटनेने प्रभावी ठरू शकते. मात्र सदर घटना मुल कथानकाशी एकजीव असावी.
संवाद (Dialogue):   कथेतील पात्रांच्या मुखातील संभाषण किंवा एखाद्या पात्राच्या मुखीचे मनोगत कथानक प्रभावीपणे पुढे सरकवण्यास हातभार लावतात. पात्रांमधील संवादामुळे कथेला वेग येतो, गती प्राप्त होते. मोजक्या शब्दात प्रसंग व पात्रांमधील संवाद लिहून कथा वाचकांपर्यंत पोहचविणे आवश्यक असते.
सुरुवात: कथेतील पात्र, स्थळ, काळ, हवामान याबद्दल सविस्तर माहितीने कथेची सुरवात करता येते.
घटना/दृश्य: सुरवात साधारण घटनांनी करून कथेचा परीणामकता  साधावी. यानंतर घटना, पात्र यांचा संघर्ष  एका परमोच्च बिंदूपर्यंत वाढत जावा. तदनंतर घटनांचा आलेख ढासळता असावा, आणि शेवटी कथेच्या शेवटाकडे जाणाऱ्या घटनांचे वर्णन करावे. कथेतील  पात्र काहीतरी क्रिया करत आहेत किंवा काहीतरी घडतंय अशा रीतीने घटना व दृश्यांचा पुरेपूर वापर चांगल्या कथेत करता येतो.
शेवट: कथा पूर्ण करू नये किंवा शेवट काय झाला? हे नमूद करू नये. वाचकांना कथेच्या शेवटाची कल्पना करण्यास भाग पाडून बुचकळ्यात पाडावे. म्हणजेच कथेचा शेवट वाचकांना विचार करायला लावून कथेची शेवट करावी.
वाचकांचे समाधान व्हावे, त्यांना आनंद मिळावा, यासाठी समाधानकारक शेवट अवश्य करावा. कथेतील मध्यवर्ती संघर्ष संपला किंवा नाही? हे कळत नकळत वाचकांच्या लक्षात आणून द्यावे. एक मात्र लक्षात असू द्यावे कि कथा म्हणजे फक्त एकापाठोपाठ घटीत होणारे घटनाक्रम नव्हेत. तुमच्या डोक्यात काही मोठी कल्पना असेल किंवा कथेच्या शेवटाविषयी काही नमूद करावयाचे असेल तर अवश्य शेवटी वर्णन करावे. मागे, पुढे हालचाल करणाऱ्या घटीत होणाऱ्या घटनांचे प्रभावी वर्णन करूत कथा पुढे, पुढे नेण्यास प्रयत्न करावा. आणि वेळोवेळी मागे काय घडले? आणि पुढे काय घडणार आहे? वा घडू शकते? असे वारंवार स्वतःला प्रश्न विचारत कथा लेखन पूर्ण करावे.
३.कथेतील पात्रांना समजावून घ्या,
कथा वाचकांना आवडावी, समजावी यासाठी कथेतील पात्र खरे खुरे वाटतील असेच योजावेत. खरे आणि प्रभावी पात्र निर्माण करणे एक अवघड कला असते. आपली कथा वाचकप्रिय होण्यासाठी वास्तव जीवनातील पात्रांची यादी करावी, त्यांचे वागणे, बोलणे, राहणीमान, खानपान याविषयी यादी करावी. म्हणजे कथा लिहतांना जसेच्या तसे न लिहता आवश्यकतेनुसार बदल करून लिखाणासाठी या यादीचा उपयोग होऊ शकेल. ज्यामुळे खरे खुरे पात्र आपल्या कथेत जिवंत होतील. आपल्या कथेतील पात्र परिपूर्ण कधीही दाखवू नका. गुण दोष हा मानवाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असतो. म्हणून कथेतील पात्रांनाही समस्या असतात, त्यांना असुरक्षित वाटू शकते. थोडक्यात वास्तव जीवनातील पात्र रेखाटण्याचा प्रयत्न करावा. अतीरंजीतही पात्र नसावेत याची काळजी गरजेची आहे.  वाचक आपल्या समस्या किंवा स्वतःला कथेतील पात्रांच्या जागी समजून वाचनाचा आनंद घेतात किंवा दुःखी होतात. तुम्हाला माहित असलेल्या व्यक्तिरेखा कथा वाचणास वेग वाढवितात. जसे, एखाद्या व्यक्तीला शुल्लक कारणाने राग येत असेल. कुणाला पाण्याची भीती वाटत असेल. कोणी मोठ्याने बोलतो, ओरडतो. काहींना नेहमी चहा हवा असतो. कित्येकांना एकटेपणा जाणवतो. किंवा काही लोकं जास्त प्रमाणात धुम्रपान करतात. अशा प्रकारे विविध रंजक पात्र समजावून घेवून त्यांचे व्यवसाय, उद्योग धंदे समजावून घे आपल्या कथेत योजावेत. आपल्या आजूबाजुला घडणाऱ्या घटना, सबंधित पात्रांबाबत नेहमीच जागृत असावे. म्हणजे कथा लिहितांना सदर पात्र मदतीला धावून येतात.
कथेची मर्यादा,     
कथेतील मध्यवर्ती घटनाक्रम मर्यादित काळात म्हणजे काही दिवस किंवा मिनिटात घडणारे असावेत.  शक्यतो, एकच कथानक दोन, तीन मुख्य पात्रांसह असावे. फार लांबलचक, जास्त गुंतागुंतीचे जास्त कथानक असलेली कथा नसावी.
कथा कोण सांगणार हे ठरवा: 
कथा लिहतांना कथा कोण सांगणार हे निच्छित करा. कथाकथन हे तीन प्रकारे शक्य असते.
 १. प्रथम पुरुषी कथन  (I- First Person): या प्रकारात कथेतील मुख्य पात्र कथा कथन करते. प्रथम पुरुषी कथा कथनात त्याला माहित असलेली माहितीच किंवा कोणी सांगितलेली माहितीच कथेत सांगू शकतो. आपल्या हे पक्के लक्षात असू द्यावे.  
२. द्वितीय पुरुषी कथन (You- Second Person): या प्रकारात वाचकाला कथेतील पात्र समजून कथा वाचली जाते, लिहली जाते. हा प्रकार शक्यतो वापरला जात नाही.   
३. तृतीय पुरुषी कथन (He/She- Third Person): या प्रकारात तिऱ्हाईक व्यक्ती कथा सांगत असतो.  या प्रकारात तिऱ्हाईक व्यक्तीला सर्व काही माहित असते. तो सर्व पात्रांचे आचार विचार, घटनाक्रम सविस्तर वर्णन करू शकतो. किंवा त्याला माहित असेल तेवढीच माहिती तो नमूद करू शकतो. असेही आपण म्हणू शकतो.
वरील कथाकथनाचे प्रकार मिश्रितही असू शकतात.जसे, तुम्ही एका प्रकरणात प्रथम पुरुषी कथन तर दुसऱ्या प्रकरणात वा कथेत तृतीय पुरुषी कथनाचा प्रभावी वापर करू शकतात.
लिखाणास सुरुवात करा,  
सुरुवातीला कथा लिखाणास सुरुवात करायला जड जाईल मात्र एकदा लिहायला सुरवात केली कि हळू हळू कथाबीज विकसित होत जाते. कथेसाठी आवश्यक पात्र, स्थळ, काळ यांना चालना मिळून कथानक पुढे सरकत जाते. अर्थात कथेचे पात्रच आता काय आवश्यक आहे?  हे लेखकाला सुचवितात असे  म्हंटले तरी  अतिशयोक्ती होणार नाही. म्हणजेच कथा अपोआप वेग घेते. हवा तर तसा प्रयत्न करून पहा. शक्यतो कथेचे पहिले वाक्य वेधक योजावे. आजूबाजूचा परिसर, पात्र यांचे  फार रटाळ वर्णन करत बसू नये.
लिहत रहा         
खरं तर साहित्य हि एक पवित्र सेवा आहे. ती कधीतरी करण्याची बाब निच्छितच नाही. त्यामुळे आपले हात नेहमी लिहते ठेवावे आणि मन विचार मग्न. आपल्या साहित्यिक कारकिर्दीला वळण देणारं एखादं चांगलं कथा बीज कधीही स्फुरू शकतं. दररोजच्या आपल्या व्यस्त दिनक्रमात ठराविक वेळ लिखाणासाठी राखून ठेवावा. आणि आपले निच्छित  केलेले ध्येय पूर्ण करावे. रोज एखादं पान तरी लिहलं तर आपल्या लिखाणात सातत्य राहून लेखणीला धार येईल. कदाचित काहीवेळा तुम्ही लिहलेलं तुम्हालाच न आवडल्याने तुम्ही सारं लिहलेलं फेकून द्याल. तरी हरकत नाही. फिनिक्स पक्ष्याप्रमाणे परत दुसऱ्या दिवशी नव्याने भरारी घ्यायची.
वेळोवेळी संपन्न होणाऱ्या साहित्यिक कार्यशाळा, साहित्य संमेलनामध्ये सक्रीय सहभाग घ्यावा. अनेकानेक साहित्यिकांच्या संपर्कात राहून त्याचे वेळोवेळी मार्गदर्शन घेण्यासाठी प्रयत्नशील रहा. आणि महत्वाचं म्हणजे, हो भरपूर वाचन करा. यश तुमच्या हातात आहे. तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही.
सोमनाथ पगार, नाशिक, गीतकार/कवी, लेखक  (MSRA, MABMCM)
मो.९२७३३५७१५९. Blog:- https://somnathpagar.blogspot.com
E-mail: somnathapagar@gmail.com / somnathpagar@yahoo.co.in   
©®सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक
Follow me on my Blog, Whatsapp, Facebook, Twitter, Linkedin, Instagram, Youtube. Udemy.
Padlet: https://padlet.com/somnathpagar