माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जागल्या, दर्याखोर्यांतील शिळा
असे गौरव उद्गार आपल्या काव्यातून मराठी भाषेविषयी व्यक्त करणारे कवी कुसुमाग्रज अर्थात विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांमध्ये अत्यंत मोठ्या उत्सहात साजरा केला जातो. जागतिक मराठी अकादमीने याकामी पुढाकार असून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, हि समस्त मराठीजनाची मागणी आहे.
मराठी भाषा जरी समृद्ध व गौरवशाली परंपरा असलेली असली तरी मराठी भाषा टिकली पाहिजे, हि काळाची गरज आहे. आजकाल इंग्रजी माध्यमात शिक्षण हे वेड मराठी भाषेसाठी मारक असल्याच आपल्याला दिसून येत आहे. आई, बाबा या तसेच अशा अनेक तत्सम परंपरागत बोलल्या जाणार्या शब्दांची जागा इंग्रजीतील शब्दांनी घेतल्याचे आपल्या लक्षात येते. यापुढे मुलांना जाणीवपूर्वक मराठी माध्यमांच्या शाळेत शिक्षण दिले पाहिजे आणि तसे शक्य झाले नाही, तरी मुलांना घरीदारी मराठी बोलण्यासाठी प्रवृत्त करणे, हे पालकांचे आद्य कर्तव्यच आहे. शिक्षण कोणत्याही माध्यमाच्या शाळेत घेतले तरी आपल्या मातृभाषेचा अभ्यास प्रत्येक मुलाने सखोल केला तरी मराठी भाषेसाठी तो पूरक होईल. अभ्यास करतांना सोपी भाषा म्हणून मराठी भाषेकडे दुर्लक्ष्य कधीही केले जावू नये. यासाठी शिक्षक व पालकांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. सर्वच भाषा महत्वाच्या असल्या तरी आपली मराठी भाषा आपल्यासाठी अमृतासमान असून जन्मापासून मराठी भाषेने आपल्याला जोजवले आहे. हे आपण विसरून चालणार नाही. यासाठी प्रयत्नपूर्वक अबालवृद्ध, तरुण तसेच मुलांना मराठी ग्रंथ, वर्तमानपत्रे, कविता, कथा, कादंबरी, नाटके इत्यादी वाचनाची आवड तसेच मराठी लिहण्याची सवय जोपासणे गरजेचे आहे. मराठी भाषा गौरवदिन एका दिवसाचा उत्सव न राहता वर्षभर मराठी भाषा जोपासण्याचा आपण सारे मिळून संकल्प करूया.
इये मऱ्हाटिचीया नगरी ब्रह्म विद्येचा सुकाळू करी l
अशा शब्दांतून श्री ज्ञानदेवानी मराठीचा उल्लेख करता, करता ब्रम्हविध्या, शब्दब्रह्मह असा केला आहे. याची यथार्थता आज मराठी भाषा गौरव दिनी प्रकर्षाने पटते.
अमृतातेही पैजासी जिंकणाऱ्या या माय मराठीचा आपल्याला सार्थ अभिमान वाटतो.
आपल्यासाठी गर्वाची बाब म्हणजे हा दिन आपल्या नाशिकचे कवी कुसुमाग्रजांचा जन्मदिवस आहे. आपल्या मातृभाषेचा गौरव तसेच कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय दिनांक २१ जानेवारी इ.स. २०१३ रोजी घेण्यात आला.
कुसुमाग्रजांचा जन्म २७ फेब्रुवारी १९१२ रोजी झाला असून कुसुमाग्रज या टोपण नावाने त्यांनी काव्यलेखन केले आहे. त्यांना आत्मनिष्ठ तसेच समाजनिष्ठ जाणीव असणारे साहित्यिक मानले जाते. कुसुमाग्रज हे एक महान मराठी कवी, नाटककार, उपसंपादक आणि कथालेखक सुद्धा होते,
त्यांना महान मराठी साहित्यक म्हणून ओळखले जाते. मराठी भाषेच्या जडण घडणीत या महान व्यक्तीमत्वाचा मोठा हातभार आहे. कुसुमाग्रजांच्या पाच दशकांच्या कारकीर्दीत त्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून अनेक कविता, लघुकथा, निबंध, नाटकं आणि कादंबर्या लिहल्या केल्या. जीवनलहरी, किनारा, मराठी माती, वादळवेल इत्यादी त्याचे प्रकाशित काव्यसंग्रह, १९४२ मध्ये भारतीय स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देणारा कवितासंग्रह, विशाखा, आधुनिक मराठी काव्याचे एक कायमचे भूषण आहे. दुसरा पेशवा, वीज म्हणाली धरतीला, नटसम्राट, राजमुकुट इत्यादी गाजलेली नाटके. वैष्णव, जान्हवी, कल्पनेच्या तीरावर ह्या त्याच्या प्रसिद्ध कादंबर्या.
1964 साली संपन्न झालेल्या मडगाव, गोव्या येथील साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. तसेच कोल्हापूर येथे संपन्न झालेले नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष, मुंबईतील जागतिक मराठी परिषदेचे अध्यक्ष, हि पदे त्यांनी भूषविली आहेत.
पद्म भूषण (1991), मराठीतील थोर साहित्यिक वि. स. खांडेकर यांचे नंतर मराठी साहित्यात 1987 मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यक तर यासह मराठीतील 1974 मध्ये नटसम्राट ह्या नाटकाला साहित्य अकादमी पुरस्कार असे अनेक राज्य पुरस्कार आणि राष्ट्रीय पुरस्कारांचे ते प्राप्तकर्ते होते.
या कविश्रेष्टांचे १० मार्च १९९९ रोजी नाशिक येथे निधन झाले.
मराठी भाषेचा थोडक्यात इतिहास
मराठी हि जगभरात बोलली जाणारी तसेच भारतातील तिसर्या क्रमांकाची सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे. असे मानले जाते की, मराठी भाषेचा उदय संस्कृतचा प्रभावाखाली निर्माण झालेल्या प्राकृत भाषेचा 'महाराष्ट्री' या बोलीभाषेपासून झ़ाला. सर्वप्रथम पैठण (प्रतिष्ठान) येथील सातवाहन साम्राज्याने प्रशासनात महाराष्ट्री भाषेचा वापर केला. त्यानंतर देवगिरीच्या यादवांच्या काळात मराठी भाषेची भरभराट झाली. मराठी ही भाषा देवनागरी लिपी मधुन लिहिली जाते. इ.स. 1278 मध्ये म्हाइंभट यांनी ‘लीळा चरित्र’ लिहिले. इ.स. 1290 मध्ये ‘ज्ञानेश्वरी’ या ग्रंथाची रचना संत ज्ञानेश्वरांनी केली. महानुभाव संप्रदायाने मराठी साहित्यात मोलाची भर घातली. संत एकनाथ यांनी या भाषेत भारुडे लिहिली आणि एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आदि ग्रंथांची भर घातली. स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि पेशव्यांनी या साम्राज्याच़ा विस्तार केला. त्यानंतर मराठी भाषेस राजाश्रय मिळाला. इ.स. 1947 नंतर स्वतंत्र भारत देशाने मराठीला अधिकृत राज्य भाषेचा दर्जा दिला. इ.स. 1960 मध्ये मराठी भाषिकांच्या महाराष्ट्र राज्यास मान्यता मिळाली आणि मराठीस राजभाषेचा मुकुट प्राप्त झाला.
मराठी भाषा दिवस साजरा करण्यासाठी महाराष्ट्र भर विविध सांस्कृतिक, शैक्षणिक, भाषिक, कार्यक्रम शाळा आणि इतर संस्थां मध्ये आयोजित केले जातात.
या मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने माझी एक कविता
अष्टाक्षरी :- आई आमची मराठी
आई आमची मराठी
हिंदी आमची मावशी
इंग्रजीचे बोट हाती
सूर जुळले जगाशी ll१ll
छाती मराठी निधडी
कांती इंग्रजी गव्हाळी
हिंदी सिंधुतील मोती
गाठ जुळली लव्हाळी II२II
बोलू अमृताची बोली
जिला समुद्राची खोली
सूर्य जोडी हात दोन्ही
गाली पश्चिमेच्या लाली ll३ll
नभी फडके गर्वाने
झेंडा माझ्या मराठीचा
साता समुद्रापारही
ताज शोभे संस्काराचा ll४ll
पक्का निर्धार मनाशी
मराठीच्या जतनाचा
अभिमान ह्या उराशी
मराठीच्या वतनाचा ll५ll
जशी प्रेमळ, मधाळ
भाषा होठावं मराठी
बोट धरुनी वाढलो
विश्व शांतीचाच साठी ll६ll
ज्ञानदेव, तुकाराम
परंपरेचा आदर
सोमनाथा मुखी गोड
माय मराठी जागर ll७ll
सोमनाथ पगार, नाशिक, गितकार/कवी, (MSRA, MABMCM) मो.9273357159. Blog:- https://somnathpagar.blogspot.com.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा