रविवार, २४ मार्च, २०२४

पुस्तक परिचय - कृतज्ञ मी, कृतार्थ मी – भावी पिढ्यांसाठी प्रेरक आत्मचरित्र (लेखक: डॉ.बी.जी.वाघ)

आस्वाद:-सोमनाथ पगार (सॅप), नाशिक (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेत प्रकाशनार्थ अनुदान प्राप्त साहित्यिक) संपर्क क्र.:- ९२७३३५७१५९, Email:- somnathpagar@yahoo.co.in गीतकार/ कवी, कथा, पटकथा, संवाद लेखक, समीक्षक, युट्युबर, ब्लॉगर, टेक्नोक्रॅट, ऑनलाईन डॉक्युमेंट्स ऍडव्हायझर, इंग्लिश लँग्वेज ट्रेनर. जगातील सर्वात पवित्र पेशा कोणता असेल तर तो म्हणजे शिक्षकी पेशा होय. आपल्या ज्ञानाच्या बळावर कित्येक विद्यार्थ्यांचे आयुष्य घडविणारे शिक्षक मला या समाजाचे भाग्यविधाते भासतात. शिक्षकच जर नसते तर... कदाचित आज जागतिक पातळीवर वेगळे चित्र दिसले असते. मीही तुमच्याशी आजचा हा संवाद साधू शकलो नसतो. आपल्या पूर्वजांनी अज्ञानाचे चटके कित्येक पिढ्या सोसले आहेत. लहान मुलांच्या जीवनात आदरणीय व अनुकरणीय असे आई वडिलांनंतर लाभतात ते फक्त शिक्षक. मातीच्या गोळ्याला जसा कुंभार आकार देतो तसेच शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना ज्ञान देवून त्यांचे जीवन प्रकाशमान करतात. ज्याप्रमाणे नदी आपल्या वाटेत येणाऱ्या किनाऱ्याला समृद्ध करून सोडते. त्यात तिचा स्वत:चा काहीही फायदा नसून वेळप्रसंगी स्वत:ला झिजावं लागतं. तशीच गत शिक्षकांची असते. हे सर्व आठवण्याचं कारण म्हणजे माजी प्राचार्य डॉ.बी.जी.वाघ सरांचे माझ्या वाचनात आलेले ‘कृतज्ञ मी कृतार्थ मी’ हे भावी पिढ्यांसाठी प्रेरक ठरावे असे आत्मचरित्र होय. कारण ज्ञानार्जनाचे फलित हे सुखमय व यशस्वी जीवन, असे हे पुस्तक वाचतांना स्पष्ट होते. सुरवातीलाच लेखक लिहतात कि, वाघळे गावाच्या शिवारात एक चिंचेचे झाड पिढ्यांपिढ्या उभे आहे. यातून लेखक वाचकांना या पिढ्यांपिढ्या असलेल्या वारसाबाबत जणू अप्रत्यक्षपणे सुचवत असावे, असे वाटून जाते. खरे तर आत्मचरित्र या साहित्य प्रकारात लेखक बोलतो आणि वाचकांना उलगडत जातो. असेच हे आत्मचरित्र आहे. शैक्षणिक क्षेत्रात अव्याहतपणे ज्ञानदान करून मैलाचा दगड ठरलेल्या एका प्राध्यापकाचे हे प्रेरणादायी आत्मचरित्र आहे. धन्य ते मातापिता ज्यांनी अशा गुणी मुलाला जन्म दिला व शिक्षणाची गोडी लावून या अफाट विश्वाच्या पसाऱ्याची ओळख करून दिली. महत्वाचं म्हणजे वाघ सरांनी आपल्या जन्मदात्यांना हे आत्मचरित्र अर्पण केले आहे. जन्म आणि मृत्यू या दरम्यानचा प्रवास म्हणजे जीवन अस मला वाटतं. या प्रवासात प्रवाशी कसा जगतो, वागतो, किती यशस्वी होतो. हे महत्वाचे असते. या भूतलावर असंख्य मानव जन्माला येतात, त्यातले काही आपले कार्य आणि कर्तुत्वामुळे अजरामर होऊन जातात, पुढील कित्येक पिढ्यांना आपल्या कार्याचा वारसा सोडून जातात. त्याच प्रकारातील हे पुस्तक आहे, असे मला वाचतांना जाणवले. अध्ययन, अध्यापन, प्रशासन आणि शास्त्रज्ञ/ संशोधन असा हा जीवनप्रवास प्रेरणा देवून थक्क करणारा तर आहेच त्यासोबत शैक्षणिक, सामाजिक व कौटुंबिक तसेच त्यांच्या विद्यार्थ्यांसह स्वतःच्या मुलांचे शिक्षण व करिअर असा हा कॅनव्हास आहे. लोकल ते ग्लोबल असा व्यापक पट घेवून आयुष्याची सुविहित मांडणी करणाऱ्या शास्त्रप्रिय शिक्षकाची ही एक उतुंग कथा, असे रास्त वर्णन या आत्मचरित्राचे आपण करू शकतो. हे आत्मचरित्र जेव्हा वाचायला घेतले तेव्हा मंत्रमुग्ध होऊन वाचत राहिलो. वाचता वाचता आपणही आपल्या बालपणात डोकवू लागतो. त्यांच्या आयुष्यात आलेले अनुभव अतिशय बोलके, वाचकाला प्रेरणा देणारे व महत्वपूर्ण आहेत. सरळ, साधे, सोपे असे हे परिणामकारक कथानक आहे. आपल्या गावाशी जिव्हाळा नाही अशी व्यक्ती शोधून सापडणार नाही. त्यामुळे त्यांच्या गावापासून सुरु होणारा हा प्रवास शाळा, महाविद्यालय, आकाशवाणीतील नोकरी त्यानंतर प्राध्यापक, प्राचार्य, परदेश प्रवास, भेटलेले शास्रज्ञ, आपलेसे होऊन गेलेले एक ना अनेक व्यक्ती, संस्था, नातलग, मित्रमंडळी अशा अनेक व्यक्तीच्या सोबतीचा असा हा प्रवास आहे. या प्रवासात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हाच त्यांचा ध्यास असल्याचे लक्षात येते. हे आत्मचरित्र वाचतांना ‘शिक्षण हे वाघिणीचे दुध असते’ हे प्राशन केल्याने जीवनाचा कायापालट होऊ शकतो, हे जाणवल्याशिवाय राहत नाही. सर हे सेवानिवृत्त प्राचार्य असून आजवर विज्ञान क्षेत्रातील भैतिक शास्त्राचे त्यांचे जवळपास अठरा पुस्तके प्रकाशित आहेत. त्याचबरोबर त्यांनी एम.फिल व पी.एच.डी. साठी रिसोर्स मटेरीअल लिहलेले आहे. एवढेच नव्हे तर अनेक विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनाखाली एम.फिल व पी.एच.डी. उतीर्ण झालेले आहेत. अशा या यशस्वी व लोकप्रिय प्राध्यापकाचे हे आत्मचरित्र आहे. बालपण, शिक्षण, नोकरी, सेवानिवृत्तीनंतर नवे पर्व, वटवृक्षाच्या शीतल छायेत, जगाची सफर अशा भागात या पुस्तकाची विभागणी केलेली आहे. जन्म, बालपण, विद्यार्थी ते प्राचार्य हा सगळाच जीवनप्रवास छायाचित्रांमुळे सहज समजायला सोपा जावून वाचतांना जीवनपट उलगडला जातो. या जीवनपटात वळणवाटांवर भेटलेली अनेक माणसं व त्या माणसांमुळे अनेकविध अनुभव आले, काही नव्याने नाते निर्माण करून जीवन समृद्ध व सुखकर करून गेले, त्याचाच गुंफलेला शेला म्हणजे हे आत्मचरित्र असावं. वाचतांना चलतचित्रपटाप्रमाणे घटना समजायला लागून वाचकांच्या मनात पुढे काय असा कुतूहल निर्माण होतो. खरं तर अशा यशस्वी व्यक्तींचे कार्य पुढील पिढ्यांना माहित होणे गरजेचे असते. आज जर आपण कुणाला आपल्या पूर्वजांची नावे विचारली तर चारदोन नावेच आठवतात. त्यामुळे अशा ग्रंथांची निर्मिती ही काळाची गरज असते. हे सर्व लिहण्याचे कारण म्हणजे शुक्रवार, दि. २२ मार्च २०२४ रोजी हुतात्मा स्मारकात, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, नाशिक येथे गिरणा गौरव प्रतिष्टान आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ या सदरात माजी प्राचार्य डॉ.बी.जी.वाघ सरांचे ‘कृतज्ञ मी कृतार्थ मी’ या आत्मचरित्रावर ऐसपैस गप्पांच्या कार्यक्रमाची मेजवानी नाशिकमधील रसिक वाचक तसेच साहित्यिकांसाठी उपलब्ध झाली आहे. दि. ५ मार्च २०२४ ते दि. २८ फेब्रुवारी २०२५ दरम्यान दर मंगळवारी व दर शुक्रवारी हा उपक्रम संपन्न होणार आहे. अशा प्रकारचा बहुधा हा साहित्य क्षेत्रातील पहिलाच अभिनव उपक्रम असावा. यामध्ये नवोदित तसेच प्रस्थापित साहित्यिकांना व्यक्त होण्यासठी हक्काचं व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. कृतज्ञ असल्याशिवाय कृतार्थतेकडे वाटचाल होऊ शकत नाही. ही कृतज्ञता गाव, व्यक्ती, कुटुंब, देश अशा सर्वांबद्दल लेखकाला वाटते. माणसांबद्दलची कृतज्ञता आणि आयुष्याबद्दलची कृतार्थता हे आत्मचरित्र वाचतांना पानोपानी जाणवते आणि त्यामुळेच या आत्मचरित्राचे नाव ‘कृतज्ञ मी कृतार्थ मी’ असे सार्थ ठरते. हे प्रांजळ आत्मकथन वाचकांनी आवर्जून वाचावे असेच आहे. याहीपुढे, त्यांची लेखणी तळपत रहावी, त्यांच्या हातून साहित्यिक, वैज्ञानिक लिखाण व्हावे तसेच त्यांना उत्तम आरोग्य लाभावे, हिच सदिच्छा! आदरणीय वाघ सरांना गिरणा गौरव प्रतिष्टान आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ या सदरात संपन्न होणाऱ्या व्याख्यानास आभाळभर शुभेच्छा! पुस्तकाचे नाव :- कृतज्ञ मी कृतार्थ मी लेखक :- माजी प्राचार्य, प्रा. डॉ.बी.जी.वाघ, संवाद क्र. ९४२२२४७०६ प्रकाशक :- शब्दमल्हार प्रकाशन, नाशिक पाठराखण :- डॉ. पंडित विद्यासागर स्वागत मूल्य :- ₹ २५०/- मात्र (सवलत मूल्यासाठी कृपया, संबंधितांशी संपर्क साधावा)