गुरुवार, ४ जुलै, २०२४

जगणं वाचणं: जिद्द, दूर्दम्य अशावादाची कहाणी

ll साहित्य तीर्थ ll पुस्तक परिचय *जगणं वाचणं- जिद्द, दुर्दम्य आशावादाची कहाणी* सोमनाथ पगार संपर्क क्र.:- ९२७३३५७१५९. आजकालच्या इंटरनेटच्या युगात पुस्तके वाचनाचे महत्व कमी होत चालले असतांना काही साहित्यिक मंडळी आपली साहित्य निर्मिती मोठ्या जोमाने करत आहेत. एक काळ होता कि, ज्याच्या घरी जास्त पुस्तके ती व्यक्ती बौद्धिक श्रीमंत, आणि अशा व्यक्तीला एक प्रकारचा मान सन्मान असायचा. मात्र काळाच्या ओघात परिमाणे बदलत जातात हेही नाकारून चालत नाही. ज्या व्यक्तीकडे महागडा मोबाईल, स्मार्ट टेलेव्हिजन तसेच इतर मनोरंजनाची साधने उपलब्ध असतात. अशा व्यक्तीला वाचनापेक्षा सहज मनोरंजन उपलब्ध होत असल्याने त्याचे पुस्तके वाचनाचे प्रमाण अपोआप कमी होते. पूर्वी मनोरंजनाची साधने नसल्याने नवनवीन पुस्तके वाचली जायची. परिणामी अधिकाधिक लिखाण होऊन पुस्तके प्रकाशित व्हायची. साहित्यिक मंडळींनाही लाभ मिळायचा. मात्र आजकाल फारसा फायदा नसूनही साहित्य निर्मिती करून साहित्य सेवा अविरत करणारे काही साहित्यिक आहेत. हीच एक जमेची बाजू. साहित्य हा समाजाचा आरसा असतो, आपल्या आजूबाजूला घडणारे घटनाक्रम प्रकर्षाने साहित्यात आढळत असल्याने वाचक साहित्याशी एकरूप होऊन जातो. अरिस्टटलची कथारसीस ही संकल्पना याठिकाणी तंतोतंत लागू पडते. आपलंच ‘जगणं वाचणं’- जिद्द, दुर्दम्य आशावादाची कहाणी वाचायला मिळाल्याने एक प्रकारचा आनंद वाचनाने वाचकाला मिळून एक प्रकारची तृप्ती मिळते. त्यामुळेच कथा, कविता, कादंबरी, नाटके वाचन करणारा वाचक वर्ग आजही टिकून आहे. हे सर्व लिहण्याचे कारण म्हणजे चांदवड सारख्या तालुक्याच्या ठिकाणी, ग्रामीण, दुष्काळग्रस्त भागात गोरगरीबांची रुग्णसेवा करणारे साक्षात धन्वंतरी लोकप्रिय डॉ. राजेंद्र मलोसे यांची ‘जगणं वाचणं’ ही संकटाला तोंड दिलेल्या जिद्दीची, दुर्दम्य आशावादी कहाणी सांगणारी कादंबरी वाचली असता मी मंत्रमुग्ध होऊन भारावून गेलो. आपण सर्वांनी ही कादंबरी वाचावी असं मला सर्वाना आवर्जून सांगावसं वाटतं. कादंबरी या साहित्य प्रकाराविषयी थोडं सांगावसं वाटते आहे; यमुनापर्यटन (इ.स.१८५७), ही लेखक - बाबा पदमनजी. यांनी लिहलेली आधुनिक भारतीय भाषेतील पहिली कादंबरी समजली जाते. साधारणत: अधिक लांबीच्या काल्पनिक, वास्तव किंवा मिश्र कथा असलेल्या गद्य लेखनास कादंबरी असे संबोधले जाते. मराठी भाषेतील कादंबऱ्यांनी मराठी साहित्याचा ठेवा समृद्ध केला आहे. असे मानले जाते कि, कादंबरी हा शब्द भारतात सातव्या शतकात होऊन गेलेल्या बाणभट्ट नामक कवीने लिहिलेल्या ’कादंबरी’ या ग्रंथनामावरून आला. कथानात्मक या साहित्याच्या मूलभूत प्रवृत्तीत ‘कादंबरी’ हा प्रकार मोडतो. यातून कादंबरीकार त्याने अनुभवलेल्या जीवनाचे त्रयस्थपणे कथन करत असतो. म्हणून या प्रकाराला आत्मनिष्ठ म्हणता येत नाही. कादंबरीत येणारा जीवनपट एका विशिष्ट काळाचे दर्शन घडवत असतो. कादंबरीत येणारा हा ‘काळ’ भूतकाळ असतो. कादंबरी ही कथनात्मक स्वरूपाची असल्याने कादंबरीकार त्यातील व्यक्तिरेखांविषयी सांगत असतो. हे सारं ही कादंबरी वाचतांना वाचकाच्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही. काही लोक वाचत असतात. एखादा राजाविज्या फक्त वाचतच सुटला तर? वाचणं आपल्याला काय देते? राजाविज्या वाचनाकडून काहीही न मागता, वाचत सुटला तर? ह्या वाचनवेड्यावर प्रेम करणारं कुणी भेटलं तर? ही कविकल्पना वाटते पण कधीतरी कुणाच्यातरी जगण्यात असं घडतं. आणि कुणी पुस्तकाचं घर बांधून त्यात राहायला जातं. फिरदोसला पाहिजे असतं वाचनबीज. ह्या कविकल्पना वाटतात. अशी मानसं असतात. परग्रहावरची वाटावीत अशी मानसं भेटतात. आताच माझ्या एका मित्राने वाचण्यासाठी नोकरी सोडली. एका माझ्या मित्राने कविता वाचून त्या मुलीशी लग्न केलं. असतं कुठेतरी म्हणून तर ते येतं माझ्या लिखाणात. असे हे ‘लेखकाचं ‘जगणं वाचणं’ मधील मनोगत वाचून कादंबरीविषयी उत्सुकता वाढून आपोआपच वाचक पाने पालटून वाचू लागतो. एकाच ध्यासाने पछाडलेल्या राजाविज्याच्या ध्यासाला फुलवत जाणारे कथानक... अर्थात विजय यशवंतराव नळे उर्फ राजाविज्या व जागृती पाटील उर्फ गती प्रगती जागृती, या दोघांच्या नात्याचे पदर उलगडत जातात. फिरदोस, रणधरे सर, दाई, केशवराव जेधे इत्यादी विविध पात्रे, स्थळे ही कादंबरीतील प्रतीके आहेत. बालपणीच पोरके होऊन अनाथ झालेल्या, आश्रिताचे जीवन व्यतीत करणाऱ्या विजय यशवंतराव नळे उर्फ राजाविज्याला पुस्तके वाचनाचा छंद लागतो. हा छंद ध्यास बनतो आणि पुढे तर चक्क वेड लागण्याच्या पातळीपर्यंत हा छंद वाढत जातो. वेळप्रसंगी पुस्तकाचं वेड त्याला सावरत, तारून नेते. माणूस जगतो म्हणजे काय करतो? तर तो उरात काहीतरी ध्यास, खूळ घेऊन उगवत्या सूर्याशी दोन हात करत असतो. त्याची झुंज अविरत शेवटच्या श्वासापर्यंत सुरु असते. आलेल्या प्रत्येक वादळाशी झुंज देत कधी जिंकतो तर कधी हारतो मात्र विझला तरी आतून संपलेला कधीच नसतो. परत नव्याने सुरवात करत असतो, उद्यासाठी, उगवत्या सूर्याच्या साक्षीने. ‘सूर्य लपला होता त्या दिशेला त्याला जायचं होतं. निश्चयाचा पक्का, राजाविज्या पुहा खुटीजवळ गेला. त्याने शबनम पिशवी खाली उतरवली, ती खांद्यावर घेतली, आणि वाट धरली.’ सूर्य लपला होता त्या दिशेला म्हणजे कुठेतरी अंधारातून प्रकाशाच्या दिशेने होणारा प्रवास या ठिकाणी लेखकाला अधोरेखित करायचा असावा. तसेच कादंबरीतील नायकाचा प्रवासा जिद्द, दुर्दम्य आशावाद या ठिकाणी वाचकांना प्रेरित करत असल्याची जाणीव मला वाचनाची सुरवात करतानाच झाली. विजय यशवंतराव नळे उर्फ राजाविज्याची अशीच ही झुंज आहे, काव्यात्मक लयीत ‘जगणं वाचणं’ ही कादंबरी लेखकाने वाचकांसमोर मांडली आहे. साहित्यिक प्रांतात डॉ. राजेंद्र मलोसे यांनी एक वेगळी उंची गाठली असल्याने त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झालेली आहे. एक स्वतंत्र शैली असलेल्या दर्जेदार लिखाण करणाऱ्या लेखकांमध्ये त्यांची गणना होते, याचा परिचय ही कादंबरी वाचल्यावर आपणास येईलच. वाचता वाचता वाचक मंत्रमुग्ध होतोच, मात्र वाचून झाल्यावर काहीतरी घावलं असल्याची अनुभूती निच्छितच आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे, कादंबरी वाचून झाल्यावरही आपल्याला त्यातील प्रसंग, पात्रे साद घालतात, आठवतात. आजकालच्या दृकश्राव्य युगातही अशी पुस्तके वाचकांना साद घालतात. यातच या कादंबरीचे यश सामावलेले आहे. आजकालच्या स्पर्धेच्या युगात डॉ. राजेंद्र मलोसे यांच्या सारखा देवदूत अविरतपणे गेल्या चाळीस वर्षांपासून नाशिक जिल्ह्यातील दुष्कळग्रस्त ग्रामीण भागात फिजिशियन म्हणून आपल्या डॉक्टर पत्नीसोबत वैद्यकीय सेवा करता करता साहित्याची सेवा करत आहे. गोरगरिबांसाठी एक आशेचा किरण आजही टिकून आहे. माझ्यासारख्या अनेक लिह्त्या हाताला बळ देण्याचे व मार्गदर्शन करण्याचे काम ते अविरतपणे करत आहे. दिवसातील पंधरा ते सोळा तास, शिवाय रात्री अपरात्रीही रुग्ण सेवा करत वैद्यकीय व्यवसायातील दैनदिन ताणतणावांना तोंड देत ते आपले लिखाण करतात. महत्वाचे म्हणजे त्यांचे आजवरचे सर्व लेखन हे त्यांनी पूर्णपणे रुग्ण तपासणी दालनात बसूनच मधल्या वेळेत केलेले आहे. ही बाब केवळ अचंबित करणारी आहे. खरं तर माता सरस्वतीची ही देण म्हणता येईल. ते वैद्यकीय व्यवसाय हे एक व्रत समजून व निष्टापूर्वक चांदवड सारख्या लहान गावात करत असून त्यांची ओळख एक उत्तम वक्ता आहे. आरोग्यपूर्ण सवयी व इतर प्रबोधनपर विषयांवर ते शक्य त्या त्या ठिकाणी, जसे शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्थांचे कार्यक्रम वगैरे ... कुमारवयीन आणि तरुण मुलामुलींशी आपल्या सरळसोप्या आणि मिश्कील शैलीत ते संवाद साधत असतात. स्वप्नपंख, गाथासप्तपदी, नखपुराण, बखर आणि तुझं माझं घर, मोबाईलपुराण, तू चालत राहा, महात्मा गांधी दगड दवाखाना, अंघोळ पुराण, आहेच वेगळी, सांगड व ‘जगणं वाचणं’ अशा आजवर एकूण त्यांच्या अकरा साहित्यिक ग्रंथसंपदा नामवंत अशा प्रकाशन संस्थांनी प्रकशित केलेल्या आहेत. या कादंबरीस सुप्रसिद्ध चित्रकार धनंजय गोवर्धने यांनी रेखाटलेले समर्पक आणि बोलके मुखपृष्ठ वाचकाला पाने पालटून पुस्तक वाचायला प्रेरित करते. गावातील युवकांना प्रकाशमय करणारी पुस्तके शेजारी खुटीला टांगलेल्या शबनममध्ये असावीत, अशी ही भन्नाट कल्पना आहे. अंधारात असलेलं गाव, अशा गावाला प्रतीक्षा सूर्योदय होण्याची असावी कारण मग धरा प्रकाशमय होणार हे नक्की असतं. त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रकाश देणाऱ्या सूर्याऐवजी पुस्तक दिसत आहे. ज्याला पुस्तके वाचता आली, सुशिक्षित होता आलं, त्याच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश पडून तो सुखी होणार हे निच्छित असतं. आपण जसे बालपणी गाव, सूर्य, डोंगर यांचे चित्रे रंगवायचो, अगदी तशीच मांडणी या मुखपृष्टाची आहे. वाचन वाचकाला समृद्ध केल्याशिवाय राहत नाही. हेच या ठिकाणी वाचकांना लेखक व चित्रकार सांगू इच्छित असावेत. लिहिणाऱ्यावर खूप प्रेम, माया करणाऱ्या ... अशा वाचनवेड्या महान माणसाच्या, म्हणजेच गुरुवर्य श्री. भालचंद्र नेमाडे सरांच्या चरणी सविनय ही कादंबरी अर्पण करण्यात आली आहे. हे सर्व लिहण्याचे कारण म्हणजे शुक्रवार, दि. २ जुलै २०२४ रोजी हुतात्मा स्मारकात, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, नाशिक येथे गिरणा गौरव प्रतिष्टान आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ या सदरात लेखक डॉ. राजेंद्र मलोसे यांच्या ‘जगणं वाचणं’ या कादंबरीवर ऐसपैस गप्पांच्या कार्यक्रमाची मेजवानी नाशिकमधील रसिक वाचक तसेच साहित्यिकांसाठी उपलब्ध झाली आहे. दि. ५ मार्च २०२४ ते दि. २८ फेब्रुवारी २०२५ दरम्यान दर मंगळवारी व दर शुक्रवारी हा उपक्रम संपन्न होणार आहे. अशा प्रकारचा बहुधा हा साहित्य क्षेत्रातील पहिलाच अभिनव उपक्रम असावा. यामध्ये नवोदित तसेच प्रस्थापित साहित्यिकांना व्यक्त होण्यासठी हक्काचं व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. डॉ. राजेंद्र मलोसे यांची ‘जगणं वाचणं’ ही कादंबरी मी वाचली, मला आवडली, भावली म्हणूनच तुम्हीही वाचावी म्हणून हा सारा प्रपंच. अनोख्या वाचनवेड्या माणसाची/ नायकाची ही कथा वाचून एक अनोखी अनुभूती, एक वेगळा आनंद व तृप्तीचा ढेकर वाचकांना आल्याशिवाय राहणार नाही. याची मला खात्री आहे. याहीपुढे, त्यांची लेखणी तळपत रहावी, त्यांच्या हातून साहित्यिक, वैद्यकीय, वैज्ञानिक लिखाण व्हावे, हिच सदिच्छा! सन्माननीय डॉ. राजेंद्र मलोसे सरांना गिरणा गौरव प्रतिष्टान आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ या सदरात संपन्न होणाऱ्या व्याख्यानास आभाळभर शुभेच्छा! पुस्तकाचे नाव :- ‘जगणं वाचणं’ लेखक :- डॉ. राजेंद्र मलोसे प्रकाशक :- वर्णमुद्रा पब्लिशर्स, शेगाव, जि. बुलढाणा स्वागत मूल्य :- ₹ ४४४ /- मात्र (सवलत मूल्यासाठी कृपया, संबंधितांशी संपर्क साधावा) आस्वादक: सोमनाथ आवडाजी पगार (सॅप) (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेत प्रकाशनार्थ अनुदान प्राप्त साहित्यिक) संपर्क क्र.:- ९२७३३५७१५९, Email:- somnathpagar@yahoo.co.in गीतकार/ कवी, कथा, पटकथा, संवाद लेखक, युट्युबर, ब्लॉगर, टेक्नोक्रॅट, ऑनलाईन डॉक्युमेंट्स ऍडव्हायझर, इंग्लिश लँग्वेज ट्रेनर.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा