Its all about my Compositions/ Creation i.e. Poems, Songs, Stories etc.
▼
मंगळवार, १ ऑक्टोबर, २०२४
काळजातला लामणदिवा - वैश्विक व वैचारिक साहित्यकृती
ll साहित्य तीर्थ ll
पुस्तक परिचय
काळजातला लामणदिवा – वैश्विक व वैचारिक साहित्यकृतीा
सोमनाथ पगार
संपर्क क्र.:- ९२७३३५७१५९.
पाणी प्रवाही राहिलं तर जीवनदान देतं, जिथं जाईल तिथ समृद्धी बहाल करतं, स्वर्ग निर्माण करतं आणि हेच पाणी जर तुंबलं, साचलं तर ते सडतं, त्याची दुर्गंधी निर्माण होते. त्यामुळे आजूबाजुच्या परिसरात रोगराई पसरून जनारोग्य धोक्यात येते. तशीच गत माणसाची असते. मनातल्या मनात भावनांचा कोंडमारा झाला तर मनाचे आरोग्य बिघडू शकते. म्हणून प्रवाही राहणे कधीही चांगलेच. म्हणूनच मला ऍरिस्टोटलने मांडलेली कथार्सिस ही संकल्पना आवर्जून आठवली.
हे आठवण्याचे कारण म्हणजे सुप्रसिद्ध लेखिका व कवयित्री सौ. सविता दरेकर यांची वाचनात आलेली कादंबरी काळजातला लामणदिवा होय. चित्तवेधक मुखपृष्ठ पाहिल्यावर आपोआपच पाठराखण वाचली आणि आनंदाने मन बहरून गेले कारण चांदवड सारख्या ग्रामीण भागात रुग्णसेवा करणारे माझ्यासह आपले सर्वांचे मार्गदर्शक, सुप्रसिद्ध लेखक डॉ. राजेंद्र मलोसे सरांची पाठराखण म्हणजे या पुस्तकाच्या आत डोकावून अंदाज देणारा आरसा होय.
डॉ. राजेंद्र मलोसे सर लिहतात, तुम्ही जेवढं वैयक्तिक लिहाल तेवढं ते वैश्विक होईल असे मी कुठेतरी वाचलं आहे. हे जे काही आठवणींचा लामणदिवा लिहलं आहे, मला असं वाटतं, हे पण वैयक्तिक आणि वैश्विक दोन्ही आहे. त्याचं कारण असं; सई आणि लेखिका या कधी दोन वाटतात तर कधी एकच वाटतात. ही सईची सय आहे आणि म्हटलं तर दुधावर आलेली साय आहे. सईवर साय येते पण मध्ये दुध खळखळत राहतं, उकळत राहतं. सई आपल्या लहानपणापासूनच्या आठवणी सांगते आणि जसं तिचे वडील तिला सांगतात की, ‘ओढ्यातलं पाणी बघ, दगड, धोंड्यांना टाळून खळखळत पुढे वाहत राहते’ तसेच हे लिखाण आहे.
वडिलांवर खूप प्रेम असणाऱ्या एका सईची ही गोष्ट आहे. असंच लिहित राहावं या लेखिकेने! कुठलाही बंध अनुबंध पाळू नये. आपल्याला जे समोर दिसतं ते लिहित रहावं. म्हणून तर म्हणतो की, जे वैयक्तिक असतं ते वैश्विक असतं. ते अपोआप वैचारिक होतं.
आणि त्यामुळेच हितगुज साधावी म्हणून हा प्रपंच...
आपल्या कुटुंबासोबत हिरव्यागार रानमळ्यात राहणारी, सर्वांच्या लाडात वाढणारी, निखळ जगणारी, बांधावरती कधी पाऊलवाटांवर विहरणारी, सिताफळं, बोरीभोवती मुक्त उधळणारी, नदीच्या झुळझुळ पाण्यासोबत, पक्ष्यांच्या किलबिलाटात उमलत्या कळीची अर्थात सईची ही कथा आहे.
या जगात एखाद्या मुलीचे तिच्या वडिलांशी तिचे सर्वात जवळचे नाते असते. बालवयात वडिलांसाठी त्यांची मुलगी म्हणजे जीव कि प्राण... समजायला लागल्यावर, दुडूदुडू चालायला लागल्यापासून एक आदर्श व्यक्ती म्हणून मुलीसाठी तिचे वडीलच हेच एकमेव आदर्शस्थानी असतात. काळजातला लामणदिवामध्ये आपल्याला पहिल्याच प्रकरणात या कथेची नायिका सई भेटते. शाळेत जाऊ इच्छिणारी म्हणजेच या व्यवहारी जगाचा सामना करायला सईचे वडील तिला हात धरून सुसज्ज करत असल्याचे लक्षात येते. तर “हे बघ सई, हे पाणी कसे वाहते आहे. त्यात दगड-गोटे खडक आहेत. तरीही ते पाणी रस्ता शोधत पुढे पळतंय...” असे बालवयात आपल्या लेकीवर चांगले संस्कार करणारे वडील वसंता वाचकाला भेटतात.
दरम्यान अनेक चांगले वाईट प्रसंग तिच्या वाटेला येतात. वडिलाचे अकाली निधन झाल्यावर तिला भावनिक संघर्षाचा सामना करावा लागतो. फिनिक्स पक्ष्याप्रमाणे प्रत्येक प्रसंगातून ती स्वतःला सावरत भरारी घेते. यासाठी तिच्या वडिलांचे संस्कार तिला लाखमोलाचे ठरतात. सईचं अस्तित्व, ओळख, धडपड, घुसमट याचबरोबर तिच्या अंतर्मनातले हुंदके यावर मात करत मार्ग काढत जाणारी सई नावाची नायिका काळजातला लामणदिवा होऊन जाते. प्रत्येक हळव्या बापाला आणि स्त्रीमनाला स्पर्शून जाणारी अशी ही कथा आहे.
सोप्प, सरळ, साध जीवन जगणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबाची ही कथा असून एका नोकरी करणाऱ्या मात्र शेतकरी कुटुंबातील सई नावाच्या मुलीचं स्त्रीमध्ये होणारं रुपांतर या कथेत उलगडत जातं. सईचे बालपण, तिची शाळा, पाटी, पुस्तक, वाहणारी झुळझुळ नदी, पानफुले, पाखरे हे सारे ओघाने आलेच.
वडिलांनी सईला ‘दिल्या घरी सुखी रहा’ हा दिलेला कानमंत्र म्हणजे अख्या बापवर्गाच्या मानसिकतेचे उदाहरण आहे.
शेवटी सईचे बाबा वसंता, यांचा धगधगत्या ज्वालासह धरतीवरचा प्रवास संपल्याने ती आता पोरकी होते. बाबांचे धरलेले बोट सुटल्याने,आयुष्याची वाट दाखवायला तिला हक्काचे कोणी नसल्याने ती एकाकी झाल्याने वाचकाचे डोळे वाचता वाचता पाणावल्याशिवाय राहत नाही. मात्र आयुष्य थांबत नाही हेच खरे, कारण अजूनही सईची झेप उंचावर जायची बाकी आहे. वडील वसंताचे स्वप्न ‘सई, खूप मोठी हो, नावारूपाला ये.’ असे होते आणि तिचे स्वप्न तिला पूर्ण करायाचे आहे. हा प्रवास न संपणारा, शेवटच्या श्वासापर्यंत नेणारा आहे.आयुष्य न संपणारा अखंड प्रवास आहे. हे वाचकाला उमगत जाते.
या कादंबरीची भाषा तशी सर्वसामान्य कुटुंबात बोलली जाणारी, वाचकाला सहज समजणारी आहे, सर्वसामान्य माणसाचे भावविश्व या कथेत गुंफले असून वडिलांना खूप जीव लावणाऱ्या नायिकेची ही गोष्ट वाचकांना खिळवून ठेवणारी आहे.
या कादंबरीस अरविंद शेलार यांनी रेखाटलेले समर्पक आणि बोलके मुखपृष्ठ वाचकाला पाने पालटून वाचायला प्रेरित करते. तसेच डॉ. राजेंद्र मलोसे यांची समर्पक प्रस्थावना व पाठराखणीमुळे कादंबरीचा एकूण आवाका सहज लक्षात येतो. तसेच आयुष्यात प्रत्येक प्रयत्नात पहिलं पाऊल टाकताना शब्द उर्जेतून पाठींबा देत सत्याच्याच मार्गाने चालायला शिकवले, यश अपयश पचवत ध्येय, चिकाटी, मेहनत यांची साथ करत स्वप्न पाहायला शिकवले... असे त्यांचे वडील कै. आनंदा बाबुराव बच्छाव यांना ही साहित्यकृती लेखिकेने अर्पण केली आहे.
सौ. सविता दरेकर ह्या कवयित्री, लेखिका म्हणून प्रसिद्ध असून छंद, वाचन, लेखन, निसर्ग पर्यटन यात रमणारं हे व्यक्तिमत्व आहे. मालेगाव येथून प्रकशित होणाऱ्या नगारा साप्ताहिकात वर्षभर लिहलेल्या लेखमालेचे फलित म्हणजेच काळजातील लामणदिवा होय. तसेच ‘माझ्या शब्दांच्या गर्भात’ हा त्यांचा काव्यसंग्रहही प्रकाशित झाला असून आजवर त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.
पुस्तकाची मांडणी व बांधणी उत्तम आहे. या कादंबरीचे मुखपृष्ठ अतिशय समर्पक असून चित्रकाराने रेखाटलेला, उगवत्या सूर्याकडे मार्गक्रमण करणारा बाप म्हणजे आपल्या पाल्यासाठी मार्ग दाखविणारा दीपस्तंभ असतो. असे म्हटलं जातं की, जोवर बाप आहे तोवर माहेर आहे. आणि ते खरंही आहे. बालपणापासून बोट धरून शिकविणारा बाप मुलांसाठी प्रिय असणे, यात नवल ते काय?
लेखिका ह्या उत्तम कवयित्री असून या कादंबरीत असलेल्या कविता या कादंबरीचे विशेष आकर्षण म्हणावे लागेल. एकूण तेहतीस प्रकरणांचा यात समावेश असून ‘काळजातला लामणदिवा ‘ ही कादंबरी अतिशय वाचनीय असून वाचकांनी आवर्जून वाचावी, असे मला वाटते.
हे सर्व लिहिण्याचे कारण म्हणजे मंगळवार, दि. १ ऑक्टोबर,, २०२४ रोजी हुतात्मा स्मारक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, नाशिक येथे गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष माणूसमित्र सुरेश पवार यांनी आयोजित केलेल्या ‘पुस्तकावर बोलू काही...’ या सदरात लेखिका सविता दरेकर यांच्या ‘काळजातला लामणदिवा’ या कादंबरीवर आधारित ऐसपैस गप्पांच्या कार्यक्रमाची मेजवानी नाशिकमधील रसिकवाचक तसेच साहित्यिकांसाठी उपलब्ध झाली आहे. दि. ५ मार्च, २०२४ ते दि.२८ फेब्रुवारी, २०२५ दरम्यान दर मंगळवारी आणि शुक्रवारी हा उपक्रम संपन्न होणार आहे. अशा प्रकारचा बहुधा हा साहित्य क्षेत्रातील पहिलाच अभिनव उपक्रम असावा. यामध्ये नवोदित तसेच प्रस्थापित साहित्यिकांना व्यक्त होण्यासाठी हक्काचं व्यासपीठ उपलब्ध झालं आहे.
याहीपुढे, त्यांची लेखणी अशीच तळपत रहावी. त्यांच्या हातून सर्व प्रकारचे साहित्यिक लिखाण व्हावे, हीच सदिच्छा! सन्माननीय सौ. सविता दरेकर मॅडम यांना गिरणा गौरव प्रतिष्ठान आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ या सदरात संपन्न होणाऱ्या व्याख्यानास आभाळभर शुभेच्छा!
पुस्तकाचे नाव :- काळजातला लामणदिवा
ISBN :- 978-93-9178२2-97-9
कवी :- लेखिका सौ. सविता दरेकर, संवाद क्र. ८९५६१८९१९५.
प्रकाशक :- परिस पब्लिकेशन, पुणे
प्रस्तावना :- डॉ. राजेंद्र मलोसे
स्वागत मूल्य :- ₹ ३००/- मात्र (सवलतमूल्य, टपाल खर्च आणि अधिक माहितीसाठी कृपया, संबंधितांशी संपर्क साधावा.)
सोमनाथ आवडाजी पगार (सॅप)
(महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेत प्रकाशनार्थ अनुदान प्राप्त साहित्यिक)
संपर्क क्र.:- ९२७३३५७१५९, Email:- somnathpagar@yahoo.co.in
गीतकार/ कवी, कथा, पटकथा, संवाद लेखक, युसमीक्षक, ट्युबर, ब्लॉगर, टेक्नोक्रॅट,, इंग्लिश लँग्वेज ट्रेनर, ऑनलाईन डॉक्युमेंट्स ऍडव्हायझर.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा