Its all about my Compositions/ Creation i.e. Poems, Songs, Stories etc.
▼
मंगळवार, १७ डिसेंबर, २०२४
अस्मिता- सकारात्मकतेचे पंख देणारी कविता
ll साहित्य तीर्थ ll
पुस्तक परिचय
*अस्मिता – सकारात्मकतेचे पंख देणारी कविता*
सोमनाथ पगार
संपर्क क्र.:- ९२७३३५७१५९.
महात्मा ज्योतिबा फुले व त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी १८४८ मध्ये पुण्यात मुलींसाठी शाळा सुरु करून स्त्री शिक्षणाची मुहर्तमेढ रोवली त्यामुळे स्त्रियांसाठी शिक्षणाची कवाडे खुली झाल्याने ‘स्त्री म्हणजे चूल आणि मुल’ अशी असलेली ओळख पुसली जाऊन आज स्त्रियांनी विविध क्षेत्रे आपल्या कार्य व कर्तुत्वाच्या बळावर पादाक्रांत केलेली आहेत. साहित्य क्षेत्रही त्याला अपवाद नाही. आपल्या साहित्यातून वेगळेपणाची प्रकर्षाने जाणीव व्यक्त करत व तसेच स्वत्वाचा शोध घेऊ पाहणारे साहित्य अर्थात कथा, कविता सहज वाचायला मिळतात. साहित्य क्षेत्रातील असेच एक नाव महत्वाचे नाव म्हणजे शिक्षिका, कवयित्री सौ. आशा विनोद पाटील होय.
त्यांचा ‘अस्मिता’ कवितासंग्रह वाचण्यात आल्याने हितगुज साधावी म्हणून हा प्रपंच...
मुलींसाठी काढून पहिली शाळा
विद्या दानाने फुलवला मळा...
मर्म जाणिले स्त्री स्वातंत्र्याचे
माणूस म्हणून घडविले आम्हाला
ज्या काळी स्त्रीयांना शिक्षण घेण्यास बंदी होती, त्याकाळची परिस्थितीची कल्पना न केलेली बरी. अशावेळी समाजाचा विरोध झुगारून प्रयत्नांची पराकाष्टा करत प्रसंगी हाल अपेष्टा सहन करून महात्मा ज्योतिबा फुले व त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाची ज्ञानगंगा प्रवाहित करून दिली. शिक्षणाचा कानमंत्र मिळाल्यामुळेच आज महिला सक्षम होऊ शकल्या. हे सत्य कुणीही नाकारू शकत नाही. त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे ऋण कधीही फेडले जाऊ शकत नाही.
खरं तर गृहिणी ते शक्षिका असा सावित्रीबाई यांचा समाजव्यवस्था प्रतिकूल असतानाही खडतर प्रवास होता, तोच सावित्रीचा वसा आजकालच्या स्त्री शिक्षिका आपल्या खांद्यावर घेऊन पुढे नेत आहेत, असे म्हणायला हरकत नाही. कारण आजकालची स्त्री घरातील सर्व जबाबदाऱ्या उत्तमरीत्या सांभाळून आपली व्यावसायिक कारकीर्द यशस्वी पणे सांभाळताना आपण पाहतो. काळाच्या भाळावर आपल्या कार्तुत्वाच्गा ठसा स्पष्टपणे उमटवत आहे. असं आपण म्हणू शकतो.
नारी तू नारायणी
कर्तुत्व, मातृत्व हिरकणी
झेप उतुंग घे गगनी
साप्त्सुरातील तूच बंदिनी
आपली समाजव्यवस्था स्त्रीला दुय्यम स्थान देत असल्याचे बोलले जाते, तशा पाऊलखुणा जाणवतातही. जर स्त्रीच या भूतलावर नसती तर ? कल्पना तशी भयावह आहे. स्त्री शिवाय माणूस अपूर्ण आहे, स्त्रीच्या उदरातून जन्म घेवून, आईच्या दुधावर पालनपोषण होऊन मग माणूस पराक्रम करायला सज्ज होतो. असे असले तरी समाजात स्त्रियांवर होणारे अन्याय, अत्याचार थांबत नाही. अशा या नारीचा, स्त्रीचा नेहमी सन्मान झाला पाहिजे.
‘मैत्री’ या कवितेत कवयित्रीने मैत्रीचे सहज साध्या शब्दात महत्व अधोरेखित केल्याचे जाणवते. मैत्री दोन अक्षरं असलेला शब्द असला तरी मैत्रीच्या नात्यामुळे माणसाचा जीवन प्रवास सुखकर होतो, हे नक्की. कुणीतरी स्नेहाचे, आपुलकीचे, हक्काचे आपल्या सुखदु:खात आधार असे मैत्रीच्या अंगणात हवे असते. ज्यात आपुलकी, माया असते क्षणभर मन मोकळं करण्यासाठी.
मैत्री, पहाटेच्या दवासारखी
थंडगार स्पर्श करणारी
मैत्री असते सुर्योद्यासारखी
मनाला चैतन्य देणारी
कृष्ण, सुदामाच्या मैत्रीसारखी मैत्रीची पखरण करत शब्दांचे शब्ददीप प्रज्वलित होत, विचारधारांची ही काव्यरुपी दीपमाळ मनात आनंदाचे तरंग निर्माण करते.
वलयांकित शब्दात माणूस वाचते मी, प्रकाशद्विपात अंधार मालवते मी, भविष्यात प्रकाशाचे स्वप्न विणते मी, अज्ञानाच्या प्रज्वलून ज्योती,, आसमंतात जुळून नाती, शब्दात शोधते मी, माणसात दरवळते मी, सुगंधात गुलाब गंध शोधते मी... अशा आशयाच्या सकारात्मक भाव पेरणाऱ्या रचना या कवितासंग्रहात भेटतात.
आता मी पुस्तके कमी
माणसे अधिक वाचू लागली
मुखवट्या मागचा चेहरा
चेहऱ्या मागचा मुखवटा बघू लागली
आयुष्याच्या या प्रवासात बरेवाईट अनुभव येत राहतात, माणूस त्यातून आपले मार्गक्रमण करत असतो. सत्य परेशानच नाही तर पराजित झालेलं पाहून कवयित्री व्यथित होते. आणि त्यामुळेच कदाचित चेहऱ्या मागचे मुखवटे वाचून सावधपणे वागलं पाहिजे हा मौलिक सल्ला वाचकांना मिळतो. मीच माझी हिम्मत म्हणून डगमगून न जाता जीवनप्रवास सुरु ठेवला पाहिजे असा सडेतोड सल्ला महत्वाचा ठरतो.
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी असे म्हटले जाते, आणि ते खरेही आहे. आईचे स्मरण होताच मन माहेरी घुटमळू लागते. भर उन्हात सुखद गारवा देणाऱ्या सावलीसारखी आई सुखदुखात साथ देत असते. अंधारात काजव्याने प्रकाशून वाट दाखवावी तशीच महत्वाची व्यक्ती ही प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात आईच असते. पण हीच आई कितीही अश्रूंची लाखोली वाहिली तरी पुन्हा नेत्रास दिसत नाही. त्यामुळे जग दाखवणाऱ्या आईवडीलांना आपण जपलं पाहिजे. हे सत्य असे वास्तव आई या कवितेत अधोरेखित झाले आहे.
बाप... कुटुंबाचा आधार
मायेचा सागर
प्रकाशाचा जागर
कष्टाचा पाझर
प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात आईवडील हेच पहिला आधार व गुरु असतात. बाप प्रेरणा देणारा, अस्मिता जपणारा, विचार पेरणारा आधारवड असतो. बाप दीपस्तंभ असतो खरं तर मुलांसाठी. अनुभवाचं पाहिलं विद्यापीठ बापच असतो. कुटुंबाची ढाल असतो. असा हा वादळातील खंबीर बेट बाप आपल्या लाडाच्या लेकीचं कन्यादान करून आपलं धन परक्याच्या हवाली करतो. तोच बाप आपल्या लाडाच्या लेकीला पुढे आयुष्यभर मोरपिसासारखा काळजात जपत असतो.
जीवनाला वेदनेची किनार असली तरीही सुखद रेशमी तलम वस्त्रासारखी हवीहवीशी कविता जीवनात आल्यावर कळतनकळतपणे शब्दांचा उत्सव कधी बनून जाते. कारण शब्दात सौंदर्य असते. शब्दच मशाल होऊन वाट दाखवतात. अशाच कवितेच्या माध्यमातून किल्ल्याविषयी वर्णन करताना कवयित्रीच्या शब्दांतून किल्ला बोलू लागतो की, ‘रात्रीच्या गर्भात उष:काल, मी नव्हे किल्ला’ केवळ, मी प्रेरणास्थान, मी स्फूर्तीस्थान...’
संकटे तर मानवाच्या पाचवीलाच पुजलेली असतात. त्यातच कोरोना महामारीने जगभर धुमाकूळ घातला होता, अशा वेळी गुरु करोना, मास्क अशा रचनांमधून कवयित्रीने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली असल्याचे लक्षात येते.
सावित्री, मातृत्व, मैत्री, पुस्तक, विद्यार्थी, आई, जिद्द, महामानव, शिक्षक, संधी अशा विविध ४२ कविता या संग्रहात वाचकांना वाचायला भेटतात. ‘उत्कृष्ट व उत्स्फूर्त रचना म्हणजे काव्य’ असे वर्डस्वर्थने म्हटले आहे. असे असले तरी या संग्रहात काही उणीवा जरूर आहेत. त्यांचा स्वतंत्रपणे उहापोह करता येईल. कवयित्री सौ. आशा पाटील ह्या एक कवयित्री असून त्या शैक्षणिक क्षेत्रात एक विद्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणून रसिकांना ज्ञात आहेच
या कवितासंग्रहाचे समर्पक आणि बोलके मुखपृष्ठ वाचकाला पाने पालटून कविता वाचायला प्रेरित करते. तसेच गिरणा गौरव प्रतिष्टानचे अध्यक्ष सुरेश पवार यांच्या समर्पक प्रस्तावना तसेच ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भास्कर ढोके यांची पाठराखण यामुळे कवितासंग्रहाचा एकूण आवाका सहज लक्षात येतो. तसेच भारतीय संस्कृती महिलांना देवतासमान मानते पण साहित्याने महिलांना माणूसपण दिले. स्त्री शिक्षण, साहित्य, माणूसपण व अस्मिता जपणाऱ्या सर्व स्त्रीयांना शब्दसुमनांची ही ओंजळ त्यांनी समर्पित केली आहे.
हे सर्व लिहिण्याचे कारण म्हणजे मंगळवार, दि. १७ डिसेंबर, २०२४ रोजी हुतात्मा स्मारक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, नाशिक येथे गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष माणूसमित्र सुरेश पवार यांनी आयोजित केलेल्या ‘पुस्तकावर बोलू काही...’ या सदरात कवयित्री सौ. आशा पाटील यांच्या ‘अस्मिता’ या कवितासंग्रहावर आधारित ऐसपैस गप्पांच्या कार्यक्रमाची मेजवानी नाशिकमधील रसिकवाचक तसेच साहित्यिकांसाठी उपलब्ध झाली आहे. दि. ५ मार्च, २०२४ ते दि.२८ फेब्रुवारी, २०२५ दरम्यान दर मंगळवारी आणि शुक्रवारी हा उपक्रम संपन्न होणार आहे. अशा प्रकारचा बहुधा हा साहित्य क्षेत्रातील पहिलाच अभिनव उपक्रम असावा. यामध्ये नवोदित तसेच प्रस्थापित साहित्यिकांना व्यक्त होण्यासाठी हक्काचं व्यासपीठ उपलब्ध झालं आहे.
याहीपुढे, त्यांची लेखणी अशीच तळपत रहावी. त्यांच्या हातून सर्व प्रकारचे साहित्यिक लिखाण व्हावे, हीच सदिच्छा! सन्मानीय कवयित्री सौ. आशा पाटील मॅडम यांना गिरणा गौरव प्रतिष्ठान आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ या सदरात संपन्न होणाऱ्या व्याख्यानास आभाळभर शुभेच्छा !
पुस्तकाचे नाव :- अस्मिता
कवयित्री :- सौ. आशा विनोद पाटील , संवाद क्र. ९८२२७२१८६३
प्रकाशक :- गिरणादूत प्रकाशन, नाशिक
प्रस्तावना :- माणूसमित्र सुरेश पवार
पाठराखण :- डॉ. भास्कर ढोके
स्वागत मूल्य :- ₹ १२०/- मात्र (सवलतमूल्य, टपाल खर्च आणि अधिक माहितीसाठी कृपया, संबंधितांशी संपर्क साधावा.)
*सोमनाथ आवडाजी पगार* (सॅप)
(महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेत प्रकाशनार्थ अनुदान प्राप्त साहित्यिक)
संपर्क क्र.:- ९२७३३५७१५९, Email:- sahityatirthasp@gmail.com / somnathpagar@yahoo.co.in
गीतकार/ कवी, कथा, पटकथा, संवाद लेखक, युसमीक्षक, ट्युबर, ब्लॉगर, टेक्नोक्रॅट,, इंग्लिश लँग्वेज ट्रेनर, ऑनलाईन डॉक्युमेंट्स ऍडव्हायझर.ट,, इंग्लिश लँग्वेज ट्रेनर, ऑनलाईन डॉक्युमेंट्स ऍडव्हायझर.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा