मंगळवार, ११ जून, २०२४

कोरडे नक्षत्र- ग्रामीण जीवनाचं वास्तव मांडणारी कविता

ll साहित्य तीर्थ ll पुस्तक परिचय *कोरडे नक्षत्र – ग्रामीण जीवनाचं वास्तव मांडणारी कविता* सोमनाथ पगार संपर्क क्र.:- ९२७३३५७१५९. माझे आभाळ तुला घे तुझे आभाळ मला आठवांच्या पारंबीला बांधू एक झुला ... माझा शेला तुला घे तुझा शेला मला माझे आभाळ तुला घे तुझे आभाळ तुला ... या ओळी आहेत नाशिक जिल्ह्याचे भूषण, लासलगाव येथील जेष्ठ कवी तसेच चित्रपट क्षेत्रात गीतकार म्हणून प्रशिद्ध असलेले प्रकाश होळकर यांच्या ‘कोरडे नक्षत्र’ या कवितासंग्रहातील कवितेच्या अर्थात टिंग्या या मराठी चित्रपटातील गीताच्या. या कवितासंग्रहाचं गारुड साहित्य क्षेत्रात रसिक वाचकांच्या तसेच विद्यार्थ्यांच्या मनावर गेल्या दोन, अडीच दशकांपासून विराजमान असल्याचं आपणास ठाव आहेच. विंदा करंदीकर यांनी आपल्या कवितेत म्हटले आहेच कि, ‘देणार्‍याने देत जावे, घेणार्‍याने घेत जावे, घेता घेता एक दिवस, देणार्‍याचे हात घ्यावे.’ कविता जगणे सुसह्य करते अन जीवनातले नवे अर्थ नव्या संदर्भाने समोर मांडते. अगदी उदात्त आशयाची ही कविता वाचकाला समृद्ध करून जाते यात संदेह नाही... त्याचप्रमाणे कवितेच्या वरील ओळी कवीच्या उत्तुंग प्रतिभेची साक्ष देतात. ही कविता मरगळलेल्या मनाला उभारी देते, पिचलेल्या मनगटात जोश भरते आणि अनेकविध प्रश्न माथी मिरवत जगण्याचे अर्थ हुडकत फिरणाऱ्या संभ्रमित मनाला उत्तुंग अशी झेप घेण्यास प्रेरित करते. खरं तर कवीची भाषा एकमेकांना सहकार्य करून, अडीअडचणीत साथ देवून प्रगतीपथावर नेण्याची आहे, यासाठी आपलं आभाळ म्हणजे सर्वकाही सर्वस्व देण्याची कवीची तयारी आहे. आजवर अनेक प्रतिभावान कवींनी उत्तोमोत्तम कवितांची देणगी देऊन मराठी साहित्याला समृद्ध बनविण्यात आपले योगदान दिलेले आहे. यात विवेक सिंधूपासून आजवरच्या प्रस्थापित कवींपर्यंतची यादी बनविली जाऊ शकते. अशाच कवींपैकी एक नाव म्हणजे कवी/ गीतकार प्रकाश होळकर होय ... आपल्या अनुभव विश्वाचं प्रतिबिंब कवीच्या कवितेत प्रतिबिंबित होत असते. कवी ग्रामीण भागात राहत असल्याने आपल्या भोवताली घडणाऱ्या घटना, निसर्गाचं उलटसुलट चक्र, अस्मानी संकटे, त्यात शेतकरी, कष्टकरी वर्गाच्या पाचवीला पुजलेले काबाडकष्ट, दारिद्रय, दैना, हालअपेष्टा, शोषण करणारी व्यवस्था यामुळे कवीचे हृदय हेलावून जाते. भावनांचा बांध फुटल्यावर कवितेच्या रुपात कवी आपल्या भावनांना वाट मोकळी करून देत व्यक्त होत असल्याचं आपल्या सहज लक्षात आल्यावाचून राहत नाही. आणि यामुळेच कविता हीच कवीचं विश्व बनून कवीला व्यापून टाकते. कळतनकळत कवी आपल्या अवतीभोवतीच्या व्यथा, वेदना मांडून सामान्य जणांचे जीवनमान सुखकर होण्यास मदतच करत असतो. कविता असते तरी काय ‘अनुभवाची शिदोरी, करपलेली भाकरी, परिस्थितीची चाकरी, सुखस्वप्नांची टोकरी’ असे मी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेत प्रकाशनार्थ अनुदान प्राप्त होऊन प्रकाशित झालेल्या माझ्या ‘वेदनेचे काटे’ या कवितासंग्रहातील मनोगतात कवितेचे वर्णन केले असल्याचे मला यावेळी ‘कोरडे नक्षत्र’ या कवितासंग्रहातील कविता वाचून आठवण झाली. ‘जे मनाला भिडते, हलविते, फुलविते, मनाला तृप्त करते ते काव्य.’ ग्रामीण जीवनाचे वास्तव रूप काव्यात्मक रुपात ‘कोरडे नक्षत्र’ या कवितासंग्रहात वाचकांच्या काळजाला हात घालते. कितीही प्रगती झाली तरी मुठभर लोकं सोडता इतर सर्वसामान्य लोकांपर्यंत विकासाचे वारे अद्याप शिवले नसून पाचवीला पुजलेला दुष्काळ, अनियमित पडणारा पाऊस यामुळे नदी नाले दुथड्या भरून वाहत नाही. कोरड्या नद्या, आटलेल्या विहिरी, पाणी मिळवण्याच्या हव्यासापोठी जमिनीत ठिकठिकाणी खोलवर केलेले बोअरवेल यामुळे जमिनीतले पाणी खोलखोल जात असल्याने अजूनच ग्रामीण भागातील परिस्थिती खडतर, भयावह बनत चालली आहे. उन्हाळ्यात तसेच अवकाळी दुष्काळात पाणीच नसल्याने माणसांसह बैलं, गुरं-ढोरं, पाखरं यांची अवस्था बिकट, दयनीय होते आहे. कवी जन्माने शेतकरी असल्याने ‘इथे रात्र येते कोरीत दु:खाला’ याची जाणीव झाल्याने त्यांची कविता दु:ख, वेदनांवर फुंकर घालत ‘भरू दे यंदा मृगाचं आभाळ, नावाचा तुझा यळकोट करील’ असं म्हणत सांत्वनाला धावून येते. आणि यामुळेच "कोरडे नक्षत्र" या कवितासंग्रहातून ग्रामीण जीवनाचे एक वेगळे रुप वाचकांपुढे येते. खालील ओळी पाहू, आला दिस गेला दिस उन्हाळा उन्हाळा मुकाट्यानं सोसायच्या मरणाच्या झळा उन्हाच्या झळांनी रान व्यापलं असून मातीसह जनमन तसेच पशुपक्षी व्याकुळ होऊन पावसाची वाट पाहत आहे. उगवणारा रोजचा दिवस कोरडाठाक भासत आहे, पाखरे सैरभैर झाली आहेत. गर्भारलेली मातीतील कोंब फुटून बाहेर येण्यास आतुरला असला तरी उन्हामुळे कोंब मातीतच जळत आहे, मरत आहे. जीवनात सारा अंधार झाला आहे, घरादारात दुःखाची वरात जणू दाखल झाली असून पदराला कितीही गाठी मारल्या तरी सारं काही असह्य होऊ पाहत आहे. दुष्काळाचं जिवंत चित्र उभं करण्यात कवी यशस्वी झाल्याचे आपल्या लक्षात येते. दुष्काळामुळे ग्रामीण भागातील आयाबहिणींना रानोमाळ वणवण करत, भटकंती करत पिण्यासाठी पाणी आणावं लागतं, हा एक मोठा जीवघेणा संघर्ष असतो. कधीकधी तर जीवघेणा असा बाका प्रसंगसुद्धा उद्भवतो. अशा भीषण परिस्थितीत पाऊस बरसण्याचे चिन्हे दिसत तर नाहीच, उलट रोज नभ कोरडे, कोरडे असतात. पाणी मागावे नभाला नभ कोरडे कोरडे डोईपोटावर भार आणि घागरीला तडे कितीही भीषण दुष्काळ असला तरी शेतकऱ्याला आज न उद्या पाऊस पडेल याची शास्वती असते, त्यामुळे तो खचून जात नाही. डोईपोटावर घागरीचा भार घेऊन आयाबहिणींचा पाण्याचा शोध घेतांना जीव घाबरून जातो. गाईगुरे सांजच्याला तहानेने हंबरू लागतात. कुठंतरी पाणझरा असला तरी तिथपर्यंत पोहचण्याची वाट म्हणजे ‘पायी इखाराचा काटा’ अशीच बिकट अवस्था असते. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात BA, Bed च्या मराठी विषयाच्या अभ्यासक्रमात समावेश असलेल्या ‘ज्योतिबा खूप लिहून झालं’ या कवितेतील ओळी पाहू, पेरलं ते उगवेल का अन पिकलं ते विकेल का? ___ सांगता येत नाही ! आमच्या मालाची आम्हाला चोरी पावलावर देव आणि रोजचीच वारी ; असं असूनही आमच्या हातांना अजून मातीचं मोल आहे साध्यासोप्या शब्दात वाचकाला आत्मपरीक्षण करायला लावणाऱ्या या ओळी आहेत. कविता असते उस्फूर्त … भावनांचा उद्रेक, वेदनेची जखम असते … कविता. असं यथार्थ वर्णन ज्येष्ठ ग्रामीण कवी लक्ष्मण महाडिक यांनी या कवितासंग्रहाविषयी केले आहे. आणि हे समर्पकही आहे. जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकरी राजाला आपण घाम गाळून कमवलेल्या उत्पन्नाचा भाव ठरविता येत नाही, ही मोठी शोकांतिका आहे. जे पेरलं ते उगवेल का? याची शास्वती नाही, कारण उगवणे हे पावसाच्या मनमानी बरसण्यावर अवलंबून असतं. आणि पिकवलं ते विकलं जाईलच याचाही काही नेम नसतो. पावलोपावली देव असून, त्यांची पुजाअर्चा करूनही कुणब्याला, शेतकऱ्याला ना देव पावतो ना शासन. ही खरी पिढीजात जहरी व्यथा आहे. काहीही झालं तरी शेतकरी हार मानत नाही. मातीला कसण्याचे कसब पोटापाण्यासाठी सोडता येत नाही. खरं तर आमच्या आतड्यांचा पीळ कोणी मोकळा केला नाही. ही मनातील खदखद कवी इथं व्यक्त करत आहे. आणि शेवटी आशावाद व्यक्त करतांना, काटा गोंदून पायात पोरी मागतात पाणी येती ओठांवर आता भिजपावसाची गाणी पायात काटा जरी भरला तरी पोरी पाऊस पडावा म्हणून भीजपावसाची गाणी गात असतात. यातून कवीचा दुर्दम्य आशावाद व इच्छाशक्ती दिसून येते. कवी भिजपावसाची म्हणजेच समृद्धीची, आनंदाची गाणी गाऊ पाहत आहे. एक प्रकारचा आनंद अशा कविता, कथा वाचून वाचतांना वाचकांना मिळत असतो. याचे कारण म्हणजे वाचक आपले भावविश्व त्या ठिकाणी ताडून पाहत असतो. तसेच साहित्याची, कवितेची भाषा सहज समजणारी मात्र काव्यात्मक, चमत्कारिक, ताल, लय, सूर यांच्याशी ताळमेळ साधणारी असल्याने कवितेतील विचार प्रभावी ठरतात. ‘कोरडे नक्षत्र’ या कवितासंग्रहातील कविता छोट्या छोट्या, काही अल्पाक्षरी मात्र आशयगर्भ असून ग्रामीण भागातील भीषण वास्तव मांडणाऱ्या आहेत. ग्रामीण बोली भाषेतील शब्द ही एक या कवितासंग्रहातील जमेची बाजू म्हणता येईल. शहरीकरणाचा ग्रामीण भागावर वाढता प्रभाव, तसेच विस्तारणारी शहरे यामुळे ग्रामीण बोलीभाषेवर एक प्रकारे अतिक्रमण होत असल्याचे आपल्याला दिसून येते. झळा, वहळनाले, खंडीभर, मुठभर, पाचोळा, सुडी, उकिर, कुसळ, मिरुग, वल, पायखुटी, कवतिक, वावर, लाहीलाही, कोळपी, भेरुड, करपा, पखवळ, चीनचीन, पाणकळा, तुंबारा, डहाळ्या, पहाळ्या,गढूळ, फुलोरा, चघळचावळी, गंगथडी, किरड, भुईफोड, उंबरा, चुलांगण, ढपली, आवकल, पांडभर, नाडगं, न्हाऊन, कूस, थारोळं, नितळ, डघळे, पानदेव, नुस्ता, टिचणे, इसरला, पोपडे, कवड्या, अवस, खिंदळल्या , शितरशितऱ्या, मोघ्यानं, काजळी, निळावल्ला, बोराटी, मेढ, घाट्याघुंगरं, शिवळ, आऱ्या, अनेशा, सर्वा असे एक ना अनेक ग्रामीण भाषा समृद्ध करणारे शब्द या कवितासंग्रहात आहेत. हे सर्व लिहण्याचे कारण म्हणजे नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथील ज्येष्ठ कवी/ गीतकार, मार्गदर्शक प्रकाश होळकर यांचा साहित्य जगतातील प्रसिध्द अशा पॉप्युलर प्रकाशनाने प्रकाशित केलेला ‘कोरडे नक्षत्र’ हा कवितासंग्रह नुकताच माझ्या वाचण्यात आला. कवितेची जाण आल्यापासून या कवितासंग्रहाबद्द्ल ऐकून होतो, लासलगाव येथील प्रसिध्द युट्युबर तथा कविमित्र शिवाजी विसपुते यांनी ‘वाङ्मय सेवा, लासलगाव’ या व्हाट्सएपच्या ग्रुपवर कविवर्य/ "गीतकार प्रकाश होळकर यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना काळात आयोजित केलेल्या काव्यलेखन स्पर्ध्येत मी विजेता ठरल्याने मला ‘कोरडे नक्षत्र’ हा कविता संग्रह प्राप्त झाल्याने संग्रह हाती पडताच सर्वच कविता वाचत कवितासंग्रह पूर्ण वाचूनच पुस्तक हातातून खाली ठेवले. जवळपास सतावीस वर्षाचा काळ लोटला तरीही या कविता ग्रामीण भागातील वर्तमानाशी नाळ जोडून आहेत. विकास व आधुनिकीकरणाच्या आक्रमणात बदलणारी ग्रामसंस्कृती, कृषिसंस्कृती तसेच गावाचं दर्शन या कवितांमधून होते. कदाचित यामुळेच या कविता वैश्विक व आपल्या जगण्याशी सबंधित वाटू लागतात. ‘कोरडे नक्षत्र’ नंतर कवी प्रकाश होळकर यांचा ‘मृगाच्या कविता’ हा कवितासंग्रह प्रकशित झाला असून टिंग्या, बाबू बेंड बाजा या चित्रपटांतील गीत लेखनासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार प्राप्त आहेत. महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांमध्ये या कवितासंग्रहातील कवितांचा समावेश अभ्यासक्रमात झाला असून अनेक मानाचे नामवंत पुरस्कार या कवितासंग्रहाला प्राप्त झालेले आहेत. यातच या कवीचे व कवितासंग्रहाचे मोठेपण आपल्या लक्षात येते. या कविता संग्रहातील सर्वच कविता अप्रतिम, उत्कृष्ट आहेत. कवी/ गीतकार प्रकाश होळकर हे एक ज्येष्ठ, नामवंत कवी असून साहित्य तसेच चित्रपट क्षेत्राला एक परिचित असलेलं नाव. त्यांचा हा पहिलावहिला कवितासंग्रह असून तसेच १९८५ ते १९९७ हा असा दीर्घकाळ या संग्रहाने व्यापला आहे. त्यांनी साहित्य क्षेत्रात कवी तर चित्रपट क्षेत्रात उत्तम गीतकार म्हणून नावलौकिक मिळवलेला आहे. अशा या साहित्यिकाच्या या कवितासंग्रहाचे वाचकांनी भरभरून स्वागत केले आहे. प्रतिभासंपन्न अशा या कवीने आजवर अनेक कविसंमेलनं तसेच काव्यस्पर्धा गाजवल्याचे तसेच अनेक लिह्त्या हातांना बळ देवून लिहते केले आहे हे रसिकांना ज्ञात आहेच. याचबरोबर अनेक शाळा, महाविद्यालयांमध्ये आपली कविता घेवून फिरत साहित्याची सेवा ते करत असतात. या कवितासंग्रहास चित्रकार पद्मा सहस्त्रबुद्धे यांनी रेखाटलेले समर्पक आणि बोलके मुखपृष्ठ वाचकाला पाने पालटून कविता वाचायला प्रेरित करते. तसेच ज्येष्ठ लेखिका प्रभा गणोरकर यांच्या समर्पक पाठराखणीमुळे कवितासंग्रहाचा एकूण आवाका सहज लक्षात येतो. तसेच आपले *साहित्यिक गुरु* ना. धो. महानोर, प्रा. विजय दत्तात्रय काचरे यांना ‘तुम्ही माझ्या कोरडवाहू जमिनीत ओलिताची स्वप्नं पाहिली’ असे ऋण व्यक्त करत हा कवितासंग्रह त्यांनी त्यांना अर्पण केलेला आहे. अष्टाक्षरी, लयबद्ध गाणी, अभंग, मुक्तछंद अशा विविध प्रकारच्या लहान मोठ्या, तसेच अल्पाक्षरी रचनांनी हा संग्रह बहरलेला आहे. एकूण ६२ वाचनीय कवितांचा या कवितासंग्रहात समावेश असून ‘कोरडे नक्षत्र’ या कवितासंग्रहात अतिशय आशयगर्भ कविता वाचायला मिळतात. हा संग्रह वाचकांनी आवर्जून वाचावा, असे मला वाटते. हे सर्व लिहिण्याचे कारण म्हणजे मंगळवार, दि. ११ जून, २०२४ रोजी हुतात्मा स्मारक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, नाशिक येथे गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष माणूसमित्र सुरेश पवार यांनी आयोजित केलेल्या ‘पुस्तकावर बोलू काही...’ या सदरात कवी/ गीतकार प्रकाश होळकर यांच्या ‘कोरडे नक्षत्र’ या कवितासंग्रहावर आधारित ऐसपैस गप्पांच्या कार्यक्रमाची मेजवानी नाशिकमधील रसिकवाचक तसेच साहित्यिकांसाठी उपलब्ध झाली आहे. दि. ५ मार्च, २०२४ ते दि.२८ फेब्रुवारी, २०२५ दरम्यान दर मंगळवारी आणि शुक्रवारी हा उपक्रम संपन्न होत आहे. अशा प्रकारचा बहुधा हा साहित्य क्षेत्रातील पहिलाच अभिनव उपक्रम असावा. यामध्ये नवोदित तसेच प्रस्थापित साहित्यिकांना व्यक्त होण्यासाठी हक्काचं व्यासपीठ उपलब्ध झालं आहे. याहीपुढे, त्यांची लेखणी अशीच तळपत रहावी. त्यांच्या हातून सर्व प्रकारचे साहित्यिक लिखाण व्हावे, हीच सदिच्छा! आदरणीय कवी/ गीतकार, मार्गदर्शक प्रकाश होळकर यांना गिरणा गौरव प्रतिष्ठान आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ या सदरात संपन्न होणाऱ्या व्याख्यानास आभाळभर शुभेच्छा! पुस्तकाचे नाव :- कोरडे नक्षत्र लेखक :- प्रकाश होळकर, संवाद क्र. ९४२२९६२०५५ प्रकाशक :- पॉप्युलर प्रकाशन, मुंबई पाठराखण :- प्रभा गणोरकर स्वागत मूल्य :- ₹ ६०/- मात्र (सवलतमूल्य, टपाल खर्च आणि अधिक माहितीसाठी कृपया, संबंधितांशी संपर्क साधावा.) आस्वादक: सोमनाथ आवडाजी पगार (सॅप) (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेत प्रकाशनार्थ अनुदान प्राप्त साहित्यिक) संपर्क क्र.:- ९२७३३५७१५९, Email:- somnathpagar@yahoo.co.in गीतकार/ कवी, कथा, पटकथा, संवाद लेखक, युट्युबर, ब्लॉगर, टेक्नोक्रॅट, ऑनलाईन डॉक्युमेंट्स ऍडव्हायझर, इंग्लिश लँग्वेज ट्रेनर.