बुधवार, ३१ डिसेंबर, २०२५

समाजमनाच्या वेदनांचा आशयपूर्ण वेध घेणारा कवितासंग्रह: वेदनेचे काटे:- डॉ. नरसिंग आप्पासाहेब कदम

 *विश्वकोश निर्मिती मंडळ*, महाराष्ट्र राज्य, मुंबईचे सन्मानीय *सदस्य* तथा लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील *छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालयातील प्रोफेसर*  मा. *डॉ. नरसिंग अप्पासाहेब कदम* सरांनी  *'महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे नवलेखक प्रकाशनार्थ अनुदान प्राप्त होऊन ठाणे येथील अनघा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या* माझ्या *वेदनेचे काटे* या पहिल्या कवितासंग्रहाचे *समाजमनाच्या वेदनांचा आशयपूर्ण वेध घेणारा कवितासंग्रह: वेदनेचे काटे * अशा शब्दात लिहलेले सविस्तर व अभ्यासपूर्ण परीक्षण/ समीक्षण महाराष्ट्रातील 
*मराठवाडा साथी*, 
*राजधर्म*, 
*बालाघाटचा आवाज*, 
*अदिती एक्स्प्रेस*, 
*दंडाधिकार*,
*जगमित्र*
अशा नामवंत वर्तमानपत्रांमध्ये प्रकाशित झाले आहे.







https://www.facebook.com/share/p/1A2qpGhYzu/

सर, आपले खूप खूप धन्यवाद! आपण माझ्या *वेदनेचे काटे* या कवितासंग्रहाचे अतिशय समर्पक शब्दात समीक्षण लिहून/ परिचय करून दिला. आपली ही प्रतिक्रिया मला निश्चितच पुढील लिखाणासाठी बळ देणारी व दिशादायी आहे. 

धन्यवाद सर!💐🙏💐

🙏💐आपला स्नेहांकित

*सोमनाथ  पगार* (सॅप)

------------------------------------------

*सविस्तर परिचय खाली देत आहे*...

*समाजमनाच्या वेदनांचा आशयपूर्ण वेध घेणारा कवितासंग्रह : वेदनेचे काटे*

           साहित्य हा समाजाचा आरसा असतो. समाजमनाचे प्रतिबिंब त्यात उमटलेले असते. कविता हा त्यातलाच एक प्रकार. समाजात घडणाऱ्या घडामोडीचे चित्रण त्यातून टिपले जाते. कवी सोमनाथ पगार यांनी आपल्या अवतीभवती घडणाऱ्या घटनांचे, प्रसंगांचे चित्रण या कवितासंग्रहातून शब्दबद्ध केले. कवी समाजाची विस्कटलेली घडी पाहून हतबल होतो. त्याच्या मनाला त्या वेदना बोचत राहतात. त्यामुळे कवीची लेखणी धारदार होते. शब्दबंबाळ अनुभवातून भावना व्यक्त होतात. त्या भावनेचा आविष्कार म्हणजे 'वेदनेचे काटे' हा कवितासंग्रह होय. 

               मानवी जीवन हे शब्द प्रामाण्यावर चालणारे होते. आज तसे राहिलेले नाही. एकदा का शब्द दिला तर मग कोणत्याही परिस्थितीत पाळला जायचा. मग त्यांच्यापुढे पैशाचे, पदाचे आमिषसुद्धा चालायचे नाही. दिवस जसजसे निघून गेले तसतसा काळ बदलत गेला. माणसे यंत्रवत बनत गेली. माया, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा हे फक्त आता पुस्तकातच शोभून उरलेले शब्द राहिले. यापासून माणूस कोसो दूर गेला. दिलेला शब्द मोडणाऱ्यांची संख्या वाढत गेली. नात्यातील ओलावा कमी होत गेला. माणुसकीहीन जगणे वाढले. दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होणे तर कोसो दूरच पण त्याकडे संवेदनशीलतेने पाहणेपण बंद झाले. जो तो फक्त स्वतःपुरता विचार करू लागला. त्यामुळे जग दिशाहीन होत चाललेले आहे. स्वार्थांध जगाकडे पाहिले की मनाला काटे टोचायला लागतात. त्याच काट्याच्या वेदना ज्यातून टिपल्या तो कवितासंग्रह म्हणजे 'वेदनेचे काटे' होय. 

             जगरहाटी बदलत चाललेली आहे. जखमा करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. हे बोचणारे काटे असह्य करू लागले आहेत. 

'काळजाला टोचे वेदनेचे काटे 
जगाचे व्यवहार सारे उफराटे'

       माणूस म्हणून माणसाकडे पाहण्याची वृत्ती राहिलेली नाही. एकमेकांत दुरावा निर्माण होत आहे. माणसेच माणसांचे शत्रू बनलेले आहेत. एकमेकांचे उणेदुणे काढत आहेत. 

'माणुसकीचे झरे 
डोह आटलेले खारट, तुरट 
आग्या मोहोळाच्या हाती सत्ता 
भुतावळ करी थयथयाट'

       आता चांगल्यांचे दिवस राहिलेले नाहीत. वाईट व्यक्तींची सर्वत्र सत्ता पसरत आहे. माणुसकीचे झरे आटून खारट, तुरट, चवहिनांचे राज्य प्रस्थापित होत आहे. हे पाहून कवीला प्रश्न पडतो की हे 'वेदनेचे काटे' आता सहन कसे करावे? त्यामुळे ते मानवतेची प्रार्थना करतात.

 'ज्ञान मंदिरात नित्य,आमुची प्रार्थना 
समृद्धीचे गीत ओठी, विश्वाच्या कल्याणा'

    कवीला वाटते माणसाने राग, लोभ, भेदभाव विसरून प्रेमाने वागावे. जात-पात, धर्म या पलीकडे जाऊन जगावे. विकासाचे स्वप्न मनी बाळगावीत. सर्वांच्या ओठावर विश्वाच्या कल्याणाचे गीत असावे. अशी प्रार्थना कवी करताना दिसतात.

          दुसरीकडे कवी मराठी भाषेचे गोडवे गातात. आमची आई मराठी आहे सांगताना ते म्हणतात,

 'ज्ञानदेव, तुकाराम 
परंपरेचा आदर 
सोमनाथा मुखी गोड 
मराठीचा हा जागर' 

          हिंदी आमची मावशी आहे. आम्ही इंग्रजीचे बोट धरून चालत आहोत. पण माय मराठी ही आमची महत्त्वाची आहे. तिचा विसर पडू नये एवढेच कवीचे मागणे आहे. म्हणजे कवी मराठी भाषेचे संवर्धन करतात. ती प्रत्येकाच्या मुखात, कार्यात असावी असे त्यांना वाटते. 

              शेतकरी हा राजा आहे. त्याच्यावर सुलतानी आणि अस्मानी संकटे येत आहेत. तो जगला तर सगळे जग जगणार आहे. तो काळ्या आईची मनोभावे सेवा करतो. म्हणून तो ठामपणे म्हणतो,

'माझी काळी आई I
जन्माची पुण्याई ll 
उभी हिरवाई l 
आयुष्याची ll     

     या भूमिपुत्राने काळ्या आईची सेवा केल्यामुळेच सृष्टीवरील जीवाच्या तोंडात चार घास पडत आहेत. या शेतकऱ्याला आता, 

'घावलंय आता आम्हा अवजार 
मशागत करू तणामनाची 
कात टाकून झटकू जळमटं 
नवी पहाट सुख-समृद्धीची'

          नवा मार्ग सापडलाय. त्यामुळे तोही आता नवी वाट धुंडाळून विकासाकडे झुकलेला आहे. शेतकऱ्याच्या जीवनातील परिवर्तन ही काळाची गरज आहे. हे कवीने ओळखले म्हणूनच कवी परिवर्तनवादी विचार मांडताना दिसतात.

            कवी स्वतःलाच स्वतःचा मित्र बनवतात. कारण कवीला माहीत आहे आपल्या आयुष्याचे आपणच विधाते आहोत. त्यासोबतच आपल्या जीवनात गुरुचे स्थान खूप मोठे आहे. त्यामुळे आपण आपल्या मनात 

'गुरुंप्रति श्रद्धा l
आदर,विश्वास ll 
जीवनात खास l 
स्थान माझ्या ll

          गुरुचा आदर असावा. तेच जीवनात प्रकाशज्योत पेटवतात. आपल्या देशामध्ये खरे मोलाचे स्थान हे मायबाप आणि मातीचेच आहे. म्हणून ते म्हणतात,

 'मायबाप आणि माती
ह्रदयाची नाळ नाती 
मायबाप काळजात
मातीवर खरी प्रीती'

 ह्या सर्वांची नाळ पक्की आहे. त्यांनीच आपली नाती जोडून ठेवलेली आहेत. आपल्या अभंग वाणीतून कवीने मानवी जन्माचे सार सांगितले.

'करावा संसारात l
थोढे उपकार ll
जन्माचे हे सार l
असते हो ll१ll

आपला जन्म आला तसा जातो. त्यासाठी आपण चांगले कर्म करावे. माणुसकीच्या धर्माची बिजे रोवावीत. असे कवीला वाटते. माणसाने आता भावनिक राहून चालत नाही. कारण,

'सोडताना रडलो मी गाव आता 
भावनांना उरला ना भाव आता'

       आता खोटेपणा, लबाडी, फसवणूक करणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे माणसे ओळखायला शिका असे कवी म्हणताना दिसतात. 

               'वेदनेचे काटे 'या कवितासंग्रहातून कवी सोमनाथ पगार हे माणसांचे नाते निसर्गाशी जोडतात. माणसांनी माणसांशी माणसाप्रमाणे वागावे याची शिकवण देतात. आई- वडील, गुरुजन, समाजसेवक यांचा आदर करायला शिकवतात. श्रद्धा- अंधश्रद्धा ओळखून जीवनाचा मार्ग मार्गक्रमण करायला शिकवतात. प्राणीमात्रावर दया करायला सांगतात. मातीशी नाते घट्ट करतात कारण मातीशी इमान नाही राखले तर आपल्या आयुष्याचीच माती होते. हे कवींनी जाणले आहे. तसेच राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये खूप विसंगती निर्माण झालेली आहे. ते ओळखायला शिकण्याचा संदेश कवी देतात. यातील संबंध कविता आपल्याला मार्गदर्शक ठरणाऱ्या आहेत. आपण त्याचे नक्कीच स्वागत कराल. कवीला मनःपूर्वक शुभेच्छा! 

समीक्षक 
डॉ. नरसिंग अप्पासाहेब कदम 
सदस्य, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ महाराष्ट्र राज्य,मुंबई तथा प्रोफेसर छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालय,उदगीर जि. लातूर. ९४०४७३१०१०