गुरुवार, ४ जुलै, २०२४

सत्य असत्याशी मन करा रे ग्वाही

ll साहित्य तीर्थ ll पुस्तक परिचय *सत्य-असत्याशी मन करा रे ग्वाही- वैचारिक दस्तऐवज (अंधश्रध्देवर जोरदार आसूड)* सोमनाथ पगार संपर्क क्र.:- ९२७३३५७१५९. सत्य असत्याशी मन केले ग्वाही । मानियले नाही बहुमता ।। वरील ओळी आहेत संत तुकाराम महाराज यांच्या अभंगातील. भेदाभेद अमंगळ असून आपण सारे एकाच देवाची लेकरं आहोत, ही शिकवण या अभंगातून ते आपल्याला देतात. माणसामाणसात भेद करू नका सांगणारे, अंधश्रद्धा अयोग्य असून स्पर्श्यास्पर्शाच्या, उच्च-निचतेसंबंधी पारंपारिक कल्पना अयोग्य आहेत. जात-धर्म-स्त्री-पुरुष असा भेद मानू नये. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे सांगणारे, वैज्ञानिक दृष्टिकोन असणारे तुकोबाराय म्हणतात कि, सत्य काय आणि असत्य काय हे जाणून घेण्यासाठी त्यांनी नेहमीच त्यांच्या मनाचा कौल ग्राह्य धरला. केवळ बहुसंख्य लोकं म्हणतात म्हणून सत्य आणि असत्याचा निर्णय होत नाही तर बुद्धी चालवून, योग्य विचार करून आणि तर्कशक्ती वापरून जो निष्कर्ष मनाला पटेल असाच तार्किक व वैज्ञानिक दृष्टीकोन असेल त्याचाच विचार व स्वीकार करावा. योगायोग म्हणजे ‘सत्य - असत्याशी मन करा रे ग्वाही अर्थात निरामय जीवनाच्या निर्मळ प्रकाशवाटा’ हे कवी व लेखक तु. सी. ढिकले यांचे अंधश्रद्धा तसेच पारंपारिक बुरसटलेले आचार विचार सोडून वैज्ञानिकतेची कास धरायला प्रवृत्त करणारे वैचारिक पुस्तक माझ्या हाती पडले आणि माझे वाचून झाल्यावर आपल्याशी संवाद साधण्याचा मोह आवरता आला नाही, म्हणूनच हा प्रपंच. आजही जर आपण पाहिले तर उद्याच्या अनेक पिढ्या घडविणाऱ्या शाळांची अवस्था बिकट आहे, याउलट मंदिरांची रंगरंगोटी, डागडुजी उत्तम प्रकारे केली जाते, शाळांना निधीची कमतरता आहे तर दुसरीकडे मंदिरातील दानपेट्या सोन्यानाण्याने, पैशाने भरत आहेत. तु. सी. ढिकले हे निवृत्त असे अध्यापनाला वाहून घेतलेले लोकप्रिय शिक्षक आहे. आपल्या समाजातील घडामोडी पाहून त्यांचे मन व्यथित होते. त्यामुळे आपण समजाचे ऋण फेडावे, समाजाला दिशा मिळावी यासाठी खारीचा वाटा उचलावा म्हणून त्यांनी आपल्या लेखणीचा पुरेपूर उपयोग करून घेतला आहे. बुद्धिवाद, वैज्ञानिक दृष्टीकोन, पुरोगामी जीवनदृष्टी असणारे हे व्यक्तिमत्व आहे. ‘सत्य - असत्याशी मन करा रे ग्वाही अर्थात निरामय जीवनाच्या निर्मळ प्रकाशवाटा’ हे त्यांचे वाचकांना विचार करायला लावणारे विचार प्रवर्तक पुस्तक असून समाजात असणाऱ्या अंधश्रध्देमुळे अशिक्षित, गोरगरीब जनता भरडली जातेय, हे पाहून त्यांचे मन व्यथित झाल्याशिवाय राहत नाही. त्यासाठी त्यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून केलेले लिखाण निच्छितच दिशादायी ठरावं असेच आहे. आज कोणी कितीही शिक्षित झाला तरी अंधश्रद्धा, पारंपारिक विचारसरणी सोडून विज्ञानाची कास सहसा धरतांना दिसत नाही आणि तसे झाले असते तर समाजातील कालबाह्य चालीरीती, परंपरा, बुरसटलेले विचार, जात-पात- धर्म भेद हे केव्हाच समजातून हद्दपार झाले असते. अशावेळी अशी पुस्तके वाचकांचे प्रबोधन करण्यास निश्चितच हातभार लावण्यास मदत करतील. हे पुस्तक वाचायला घेतल्यावर मी आत आत जात राहिलो, पाने पालटत. आणि मग लक्षात आले कि, हे तर सारेकाही आपल्या अवतीभोवती घडतं आहे. पुन्हा अंधारून आले आहे येथे या पहिल्याच लेखात, आम्ही स्वीकारली विज्ञानाची सृष्टी I विज्ञानाची दृष्टी नाही आली II सुरवातच वाचकांना विचार करायला प्रवृत्त करायला लावणारी आहे. आजच्या या आधुनिक विज्ञान युगात अनेक शोध लागले, संशोधने चालू आहेत, विज्ञान हे मानवाला मिळालेले वरदान असून अनेक सोयी सुविधांमुळे सर्व मानव व प्राणीमात्रांचे जीवन सुखमय झाले आहे. साथीचे रोग तसेच असाध्य आजारांपासून वैद्यकीय क्षेत्रातील क्रांतीमुळे माणसाला वाचविले जावू शकत असल्याने सर्वांचे आयुष्यमान वाढले आहे. असे असूनही पोथी, पुराण अंधश्रद्धा, शुभ, अशुभ, बुवाबाजी व गंडे दोरे यापासून समाज मुक्त होऊ शकला नाही, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल, नाही का? आपण शिक्षित झालो पण सुशिक्षित विज्ञानवादी मुळीच झालो नाही, आणि असे होणे ही काळाची गरज आहे. देवळात देव नसते पुजाऱ्याचे पोट असते. खरा देव तो दीन , दुखी, दुबळा यांच्यात असतो, त्यांची सेवा करा, तुम्हाला देव भेटेन ... असं संत गाडगेबाबा यांनी सांगितले आहे. खरेतर हे पुस्तक वारकरी संप्रदायातील सर्व संताना ... महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत नामदेव, संत ज्ञानेश्वर माउली, संत एकनाथ, संत गोरा कुंभार, संतश्रेष्ठ चोखोबा, संत सावता माळी, जगत्गुरू संत तुकाराम, संत तुकडोजी या मांदियाळीतील सर्व संताना तसेच प्रखर बुद्धिवादी वारकरी संप्रदायाच्या कळसावरील फडकते निशाण संत शिरोमणी संत गाडगे बाबा यांना मनोभावे अर्पण करण्यात आले आहे. याचसोबत गावातील तसेच माणसांच्या मेंदूतील घाण साफ करून त्यांचे प्रबोधन कर्ते समाजसुधारक कृतीशील राष्ट्रसंत गाडगे महाराज यांना विनम्र अभिवादनही व्यक्त करण्यात आले आहे. मानवाचे शत्रू – निरक्षरता, अज्ञान, दारिद्र्य, अंधश्रद्धा ... असे महर्षी शाहू महाराज यांनी म्हटले असल्याचे सुरवातीला लेखकाने नमूद केले आहे. मंदिरातील भक्तांची रांग लांबच लांब आपल्या दृष्टीस पडतेच. याउलट समाज साक्षर करणे, उत्तम दर्जाची शिक्षण व्यवस्था उभारणे, विज्ञाननिष्ट आधुनिक विचार सरणीचा समाज निर्माण करणे. यासाठी फारसा प्रयत्न होतांना दिसत नाही. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना समाज जीवनाबरोबरच हळव्या व वैचारिक व्यक्तीच्या मनपटलावर परिणाम करतात. त्यातून व्यक्ती घडत जातो, यातून साहित्यिक सुटूच शकत नाही. पुढे हेच जगणं त्या लेखकाच्या/ साहित्यिकाच्या साहित्यात रेखाटले जाते. भावना ओतपोत झाल्या कि, त्याचे रुपांतर साहित्यात होते. कळतनकळत साहित्यिक आपल्या अवतीभोवतीच्या व्यथा, वेदना मांडून सामान्य जणांचे जीवनमान सुखकर होण्यास मदत करत असतो. विचारांचे वादळ शांत करण्यासाठी साहित्य महत्वाची भूमिका बजावते. समाजात शिक्षित तसेच अशिक्षित सर्वांमध्ये अंधश्रद्धा कमीअधिक प्रमाणात आढळतेच. ही एक समाजमनाला लागलेली कीड आहे. याला संसर्गजन्य रोगही म्हणता येईल. यासाठी आपल्या शिक्षण व्यवस्थेत अमुलाग्र बदल करणे आवश्यक आहे, त्यासाठी विज्ञाननिष्ट समाज ही काळाची गरज आहे. कालबाह्य रूढी, परंपरांचे समूळ उच्चाटन आवश्यक आहे. आयुष्याची जमा पुंजी खर्च करून घर बांधलं जातं, केवळ अंधश्रद्धेपोटी वेळप्रसंगी कर्ज काढून किंवा उचल घेवून वास्तुशांती संपन्न केली जाते. यावेळी पदरमोड करून पूजाअर्चा घातली जाते, पुजाऱ्याला दक्षिणा दिला जातो. पाहुण्यांना जेवण दिले जाते. हा सारा झगमगाट काही क्षणांचा असतो, पुढे मात्र कर्ज फेडण्यात सारी हयात संपून जाते. आलेली मंडळी, पाहुणे हात पुसून निघून जातात, नावे ठेवत. वास्तुशांती करूनही घरात जर भांडणे होतात, सौख्य लाभत नाही तर मग या पूजा घालून, खर्च करून उपयोग तरी काय? हाच पैसा जर वाचविला तर कर्जाची रक्कम कमी होऊ शकते, वाचविलेली रक्कम मुलाबाळांच्या शिक्षणाला उपयोगी पडू शकतो. असे असूनही लोकं सुधारत नाहीच. तशीच गोष्ट कुंडली किंवा नवसाची आहे, कुंडली पाहून जुळलेली लग्ने घटस्फोटापर्यंत जाऊच नये. नवस करून जर मुलं होत असतील तर मग लग्न करायची गरजच पडू नये, नवस करीता पुत्र होती मग का करावा लागे पति? असा रास्त रोकडा सवाल करत जगत्गुरू संत तुकारामांनी अंधश्रद्धेवर कडाडून आसूड ओढला असल्याचं लेखकाने कुंडली : एक थोतांड या लेखात नमूद केले आहे. याहीपुढे जात विषमुक्त शेती ही काळाची गरज असल्याचे आवर्जून लेखकाने आपल्या विषमुक्त शेती : एक आव्हान या लेखात नमूद केले आहे. अंधश्रद्धा निर्मुलनासाठी वेळोवेळी लिहलेल्या लेखांचा हा संग्रह खास मित्रांच्या आग्रहाखातर लेखकाने पुस्तकाच्या रूपाने प्रकाशित केला आहे. या पुस्तकात पारंपारिक अंधश्रद्धांच्या सबंधी विभिन्न विषयावरील पुन्हा एकदा अंधारून आले आहे, धर्म ही तर अफूची गोळी, विज्ञानाच्या गावा जा रे, तीर्थी धोंडा पाणी, वास्तुशांती : केवळ अंधश्रद्धा, सत्यनारायण : बावळटांचा बाजार, दशक्रिया : परंपरेचे अवजड जोखड, कुंडली : एक थोतांड, बहुजन : पिंजऱ्यातील पोपट, सत्य – असत्याशी मन करा रे ग्वाही, होय महाराष्ट्र हा शिवरायांचाच आहे असे अकरा लेख व शेती आणि आधुनिक सुधारित शेती सबंधित शेतीविश्व : विषमुक्त शेती एक आव्हान असा एक लेख असे एकूण बारा लेखांचा समावेश आहे. लेखक हे विज्ञानाचे अध्यापक म्हणून ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत असतांना त्यांना आलेले अनुभव व त्यासाबंधीचे विचार त्यांनी व्यक्त केलेले आहेत. ते मुळचे पुरोगामी विचारांचे असल्याने आजच्या विज्ञान युगातही चालू असलेले कर्मकांड, देवदेव,अनिष्ट रूढी परंपरा, अंधश्रद्धा, शुभ-अशुभ, नरबळी, पशुबळी, भानामती, बुवाबाजी यातून समाज मुक्त झाला नसल्याने तसेच आजही जगभर धर्मांधता, कट्टरवादी विचारसरणी पाहायला व अनुभवायला मिळतेच यामुळे ते विचलित होत असावे. समाजाचे परिवर्तन ही काळाची गरज आहे. त्यासाठी त्यांनी आपला हा खारीचा वाटा उचललेला आहे. आजही धर्माच्या, देवदेवताच्या नावाखाली कर्मकांडाचे पीक कमी झाल्याचे दिसत नाही. वास्तुशांती, दशक्रिया विधी, नारायण नागबळी, सत्यनारायण पूजन, असे कितीतरी विधी सगळीकडे सुरु असल्याचे सर्रास नजरेस पडते. त्यामुळे बहुजनांचे शोषण होते. या सर्व प्रकारांवर लेखकाने लेखणीच्या माध्यमातून आसूड ओढलेला आहे, हे नक्की. अनेकजण म्हातारपणी तीर्थ यात्रा करतात, चालू शकत नाही म्हणून गाडवावर किंवा दुसऱ्या गरीब व्यक्तीच्या पाठीवर बसतात. काय उपयोग अशा दर्शनचा? यात पैसा, वेळ वाया जातो. प्रसंगी अपघात घडतात. ज्या देवाच्या दर्शनासाठी लोकं जातात तोच देव अपघात समयी त्यांना वाचवू शकत नाही, ही मोठी आश्चर्याची बाब आहे. 'सत्य-असत्याशी मन करा रे ग्वाही' हे त्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकार झालेले सातवे पुस्तक आहे, यापूर्वी त्यांचे सृजनगान (कावितासंग्र्ह), सोनचाफा (बालकवितासंग्रह), वैदिक धर्मकांड, परागस्मृतीगंध : स्मृतिगंध, लेणे सृजनाचे (कवितासंग्रह), मी खोदतोय लेणी (कवितासंग्रह) इत्यादी पुस्तके विविध प्रकाशकांनी प्रकाशित केलेली असून रसिक वाचक व साहित्यिकांनी त्यांच्या सर्वच पुस्तकांची दखल घेवून भरभरून स्वागत केले आहे. या वैचारिक पुस्तकास सौ. रुपाली अनिकेत पाटील यांनी रेखाटलेले मुखप्रुष्ठ अतिशय समर्पक आणि बोलके असून वाचकाला पाने पालटून लेख वाचायला प्रेरित करणारे आहे. खालच्या बाजूला मानवी अंधश्रद्धेचे प्रतिनिधित्व करणारा वटारून पाहणारा समाज, त्यांच्या मनावर स्वार असलेले बुरसटलेले विचार अर्थात मिरची लिंबू, उलटी टांगलेली बाहुली आणि शेजारी वैज्ञानिकतेचा उजेड पेरणारी मेणबत्ती, त्यावर आशेचा किरण म्हणजे संतांचे विचार दर्शविणारे रूपकात्मक चित्र, अशी ही मुखपृष्ठावर मांडणी करून, रेखाटून या पुस्तकात आत दडलेल्या वैचारिक खजिन्याचा सहज अंदाज येतो. तसेच ज्येष्ठ लेखक प्राचार्य डॉ. किशोर पवार यांची अतिशय थोडक्यात पण समर्पक प्रस्तावना लाभली असून जेष्ठ लेखक रावसाहेब कसबे यांच्या पाठराखणीमुळे पुस्तकाचा एकूण आवाका सहज लक्षात येतो. हा उहापोह करण्याचे दुसरे कारण म्हणजे शुक्रवार, दि. ५ जुलै २०२४ रोजी हुतात्मा स्मारकात, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, नाशिक येथे गिरणा गौरव प्रतिष्टान आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ या सदरात ‘सत्य - असत्याशी मन करा रे ग्वाही अर्थात निरामय जीवनाच्या निर्मळ प्रकाशवाटा’ हे कवी व लेखक तु. सी. ढिकले यांच्या वैचारिक पुस्तकावर ऐसपैस गप्पांच्या कार्यक्रमाची मेजवानी नाशिकमधील रसिक वाचक तसेच साहित्यिकांसाठी उपलब्ध झाली आहे. दि. ५ मार्च २०२४ ते दि. २८ फेब्रुवारी २०२५ दरम्यान दर मंगळवारी व दर शुक्रवारी हा उपक्रम संपन्न होणार आहे. अशा प्रकारचा बहुधा हा साहित्य क्षेत्रातील पहिलाच अभिनव उपक्रम असावा. यामध्ये नवोदित तसेच प्रस्थापित साहित्यिकांना व्यक्त होण्यासठी हक्काचं व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. यापुढे, त्यांची लेखणी अशीच तळपत राहवी. साहित्याची सेवा घडावी. काव्य, कादंबरी, कथा, आत्मकथन वाचकांना वाचायला मिळावे. हिच सदिच्छा! सन्माननीय तु. सी. ढिकले सरांना गिरणा गौरव प्रतिष्टान आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ या सदरात संपन्न होणाऱ्या व्याख्यानास आभाळभर शुभेच्छा!!! पुस्तकाचे नाव :- सत्य - असत्याशी मन करा रे ग्वाही लेखक :- तु. सी ढिकले, संवाद क्र. ७५८८८२८८३४ प्रकाशक :- वैशाली प्रकाशन, नाशिक प्रस्तावना : प्राचार्य डॉ. किशोर पवार पाठराखण :- रावसाहेब कसबे स्वागत मूल्य :- ₹ २००/- मात्र (सवलतमूल्य, टपाल खर्च आणि अधिक माहितीसाठी कृपया, संबंधितांशी संपर्क साधावा.) आस्वादक: सोमनाथ आवडाजी पगार (सॅप) (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेत प्रकाशनार्थ अनुदान प्राप्त साहित्यिक) संपर्क क्र.:- ९२७३३५७१५९, Email:- somnathpagar@yahoo.co.in गीतकार/ कवी, कथा, पटकथा, संवाद लेखक, युट्युबर, ब्लॉगर, टेक्नोक्रॅट, ऑनलाईन डॉक्युमेंट्स ऍडव्हायझर, इंग्लिश लँग्वेज ट्रेनर.

जगणं वाचणं: जिद्द, दूर्दम्य अशावादाची कहाणी

ll साहित्य तीर्थ ll पुस्तक परिचय *जगणं वाचणं- जिद्द, दुर्दम्य आशावादाची कहाणी* सोमनाथ पगार संपर्क क्र.:- ९२७३३५७१५९. आजकालच्या इंटरनेटच्या युगात पुस्तके वाचनाचे महत्व कमी होत चालले असतांना काही साहित्यिक मंडळी आपली साहित्य निर्मिती मोठ्या जोमाने करत आहेत. एक काळ होता कि, ज्याच्या घरी जास्त पुस्तके ती व्यक्ती बौद्धिक श्रीमंत, आणि अशा व्यक्तीला एक प्रकारचा मान सन्मान असायचा. मात्र काळाच्या ओघात परिमाणे बदलत जातात हेही नाकारून चालत नाही. ज्या व्यक्तीकडे महागडा मोबाईल, स्मार्ट टेलेव्हिजन तसेच इतर मनोरंजनाची साधने उपलब्ध असतात. अशा व्यक्तीला वाचनापेक्षा सहज मनोरंजन उपलब्ध होत असल्याने त्याचे पुस्तके वाचनाचे प्रमाण अपोआप कमी होते. पूर्वी मनोरंजनाची साधने नसल्याने नवनवीन पुस्तके वाचली जायची. परिणामी अधिकाधिक लिखाण होऊन पुस्तके प्रकाशित व्हायची. साहित्यिक मंडळींनाही लाभ मिळायचा. मात्र आजकाल फारसा फायदा नसूनही साहित्य निर्मिती करून साहित्य सेवा अविरत करणारे काही साहित्यिक आहेत. हीच एक जमेची बाजू. साहित्य हा समाजाचा आरसा असतो, आपल्या आजूबाजूला घडणारे घटनाक्रम प्रकर्षाने साहित्यात आढळत असल्याने वाचक साहित्याशी एकरूप होऊन जातो. अरिस्टटलची कथारसीस ही संकल्पना याठिकाणी तंतोतंत लागू पडते. आपलंच ‘जगणं वाचणं’- जिद्द, दुर्दम्य आशावादाची कहाणी वाचायला मिळाल्याने एक प्रकारचा आनंद वाचनाने वाचकाला मिळून एक प्रकारची तृप्ती मिळते. त्यामुळेच कथा, कविता, कादंबरी, नाटके वाचन करणारा वाचक वर्ग आजही टिकून आहे. हे सर्व लिहण्याचे कारण म्हणजे चांदवड सारख्या तालुक्याच्या ठिकाणी, ग्रामीण, दुष्काळग्रस्त भागात गोरगरीबांची रुग्णसेवा करणारे साक्षात धन्वंतरी लोकप्रिय डॉ. राजेंद्र मलोसे यांची ‘जगणं वाचणं’ ही संकटाला तोंड दिलेल्या जिद्दीची, दुर्दम्य आशावादी कहाणी सांगणारी कादंबरी वाचली असता मी मंत्रमुग्ध होऊन भारावून गेलो. आपण सर्वांनी ही कादंबरी वाचावी असं मला सर्वाना आवर्जून सांगावसं वाटतं. कादंबरी या साहित्य प्रकाराविषयी थोडं सांगावसं वाटते आहे; यमुनापर्यटन (इ.स.१८५७), ही लेखक - बाबा पदमनजी. यांनी लिहलेली आधुनिक भारतीय भाषेतील पहिली कादंबरी समजली जाते. साधारणत: अधिक लांबीच्या काल्पनिक, वास्तव किंवा मिश्र कथा असलेल्या गद्य लेखनास कादंबरी असे संबोधले जाते. मराठी भाषेतील कादंबऱ्यांनी मराठी साहित्याचा ठेवा समृद्ध केला आहे. असे मानले जाते कि, कादंबरी हा शब्द भारतात सातव्या शतकात होऊन गेलेल्या बाणभट्ट नामक कवीने लिहिलेल्या ’कादंबरी’ या ग्रंथनामावरून आला. कथानात्मक या साहित्याच्या मूलभूत प्रवृत्तीत ‘कादंबरी’ हा प्रकार मोडतो. यातून कादंबरीकार त्याने अनुभवलेल्या जीवनाचे त्रयस्थपणे कथन करत असतो. म्हणून या प्रकाराला आत्मनिष्ठ म्हणता येत नाही. कादंबरीत येणारा जीवनपट एका विशिष्ट काळाचे दर्शन घडवत असतो. कादंबरीत येणारा हा ‘काळ’ भूतकाळ असतो. कादंबरी ही कथनात्मक स्वरूपाची असल्याने कादंबरीकार त्यातील व्यक्तिरेखांविषयी सांगत असतो. हे सारं ही कादंबरी वाचतांना वाचकाच्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही. काही लोक वाचत असतात. एखादा राजाविज्या फक्त वाचतच सुटला तर? वाचणं आपल्याला काय देते? राजाविज्या वाचनाकडून काहीही न मागता, वाचत सुटला तर? ह्या वाचनवेड्यावर प्रेम करणारं कुणी भेटलं तर? ही कविकल्पना वाटते पण कधीतरी कुणाच्यातरी जगण्यात असं घडतं. आणि कुणी पुस्तकाचं घर बांधून त्यात राहायला जातं. फिरदोसला पाहिजे असतं वाचनबीज. ह्या कविकल्पना वाटतात. अशी मानसं असतात. परग्रहावरची वाटावीत अशी मानसं भेटतात. आताच माझ्या एका मित्राने वाचण्यासाठी नोकरी सोडली. एका माझ्या मित्राने कविता वाचून त्या मुलीशी लग्न केलं. असतं कुठेतरी म्हणून तर ते येतं माझ्या लिखाणात. असे हे ‘लेखकाचं ‘जगणं वाचणं’ मधील मनोगत वाचून कादंबरीविषयी उत्सुकता वाढून आपोआपच वाचक पाने पालटून वाचू लागतो. एकाच ध्यासाने पछाडलेल्या राजाविज्याच्या ध्यासाला फुलवत जाणारे कथानक... अर्थात विजय यशवंतराव नळे उर्फ राजाविज्या व जागृती पाटील उर्फ गती प्रगती जागृती, या दोघांच्या नात्याचे पदर उलगडत जातात. फिरदोस, रणधरे सर, दाई, केशवराव जेधे इत्यादी विविध पात्रे, स्थळे ही कादंबरीतील प्रतीके आहेत. बालपणीच पोरके होऊन अनाथ झालेल्या, आश्रिताचे जीवन व्यतीत करणाऱ्या विजय यशवंतराव नळे उर्फ राजाविज्याला पुस्तके वाचनाचा छंद लागतो. हा छंद ध्यास बनतो आणि पुढे तर चक्क वेड लागण्याच्या पातळीपर्यंत हा छंद वाढत जातो. वेळप्रसंगी पुस्तकाचं वेड त्याला सावरत, तारून नेते. माणूस जगतो म्हणजे काय करतो? तर तो उरात काहीतरी ध्यास, खूळ घेऊन उगवत्या सूर्याशी दोन हात करत असतो. त्याची झुंज अविरत शेवटच्या श्वासापर्यंत सुरु असते. आलेल्या प्रत्येक वादळाशी झुंज देत कधी जिंकतो तर कधी हारतो मात्र विझला तरी आतून संपलेला कधीच नसतो. परत नव्याने सुरवात करत असतो, उद्यासाठी, उगवत्या सूर्याच्या साक्षीने. ‘सूर्य लपला होता त्या दिशेला त्याला जायचं होतं. निश्चयाचा पक्का, राजाविज्या पुहा खुटीजवळ गेला. त्याने शबनम पिशवी खाली उतरवली, ती खांद्यावर घेतली, आणि वाट धरली.’ सूर्य लपला होता त्या दिशेला म्हणजे कुठेतरी अंधारातून प्रकाशाच्या दिशेने होणारा प्रवास या ठिकाणी लेखकाला अधोरेखित करायचा असावा. तसेच कादंबरीतील नायकाचा प्रवासा जिद्द, दुर्दम्य आशावाद या ठिकाणी वाचकांना प्रेरित करत असल्याची जाणीव मला वाचनाची सुरवात करतानाच झाली. विजय यशवंतराव नळे उर्फ राजाविज्याची अशीच ही झुंज आहे, काव्यात्मक लयीत ‘जगणं वाचणं’ ही कादंबरी लेखकाने वाचकांसमोर मांडली आहे. साहित्यिक प्रांतात डॉ. राजेंद्र मलोसे यांनी एक वेगळी उंची गाठली असल्याने त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झालेली आहे. एक स्वतंत्र शैली असलेल्या दर्जेदार लिखाण करणाऱ्या लेखकांमध्ये त्यांची गणना होते, याचा परिचय ही कादंबरी वाचल्यावर आपणास येईलच. वाचता वाचता वाचक मंत्रमुग्ध होतोच, मात्र वाचून झाल्यावर काहीतरी घावलं असल्याची अनुभूती निच्छितच आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे, कादंबरी वाचून झाल्यावरही आपल्याला त्यातील प्रसंग, पात्रे साद घालतात, आठवतात. आजकालच्या दृकश्राव्य युगातही अशी पुस्तके वाचकांना साद घालतात. यातच या कादंबरीचे यश सामावलेले आहे. आजकालच्या स्पर्धेच्या युगात डॉ. राजेंद्र मलोसे यांच्या सारखा देवदूत अविरतपणे गेल्या चाळीस वर्षांपासून नाशिक जिल्ह्यातील दुष्कळग्रस्त ग्रामीण भागात फिजिशियन म्हणून आपल्या डॉक्टर पत्नीसोबत वैद्यकीय सेवा करता करता साहित्याची सेवा करत आहे. गोरगरिबांसाठी एक आशेचा किरण आजही टिकून आहे. माझ्यासारख्या अनेक लिह्त्या हाताला बळ देण्याचे व मार्गदर्शन करण्याचे काम ते अविरतपणे करत आहे. दिवसातील पंधरा ते सोळा तास, शिवाय रात्री अपरात्रीही रुग्ण सेवा करत वैद्यकीय व्यवसायातील दैनदिन ताणतणावांना तोंड देत ते आपले लिखाण करतात. महत्वाचे म्हणजे त्यांचे आजवरचे सर्व लेखन हे त्यांनी पूर्णपणे रुग्ण तपासणी दालनात बसूनच मधल्या वेळेत केलेले आहे. ही बाब केवळ अचंबित करणारी आहे. खरं तर माता सरस्वतीची ही देण म्हणता येईल. ते वैद्यकीय व्यवसाय हे एक व्रत समजून व निष्टापूर्वक चांदवड सारख्या लहान गावात करत असून त्यांची ओळख एक उत्तम वक्ता आहे. आरोग्यपूर्ण सवयी व इतर प्रबोधनपर विषयांवर ते शक्य त्या त्या ठिकाणी, जसे शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्थांचे कार्यक्रम वगैरे ... कुमारवयीन आणि तरुण मुलामुलींशी आपल्या सरळसोप्या आणि मिश्कील शैलीत ते संवाद साधत असतात. स्वप्नपंख, गाथासप्तपदी, नखपुराण, बखर आणि तुझं माझं घर, मोबाईलपुराण, तू चालत राहा, महात्मा गांधी दगड दवाखाना, अंघोळ पुराण, आहेच वेगळी, सांगड व ‘जगणं वाचणं’ अशा आजवर एकूण त्यांच्या अकरा साहित्यिक ग्रंथसंपदा नामवंत अशा प्रकाशन संस्थांनी प्रकशित केलेल्या आहेत. या कादंबरीस सुप्रसिद्ध चित्रकार धनंजय गोवर्धने यांनी रेखाटलेले समर्पक आणि बोलके मुखपृष्ठ वाचकाला पाने पालटून पुस्तक वाचायला प्रेरित करते. गावातील युवकांना प्रकाशमय करणारी पुस्तके शेजारी खुटीला टांगलेल्या शबनममध्ये असावीत, अशी ही भन्नाट कल्पना आहे. अंधारात असलेलं गाव, अशा गावाला प्रतीक्षा सूर्योदय होण्याची असावी कारण मग धरा प्रकाशमय होणार हे नक्की असतं. त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रकाश देणाऱ्या सूर्याऐवजी पुस्तक दिसत आहे. ज्याला पुस्तके वाचता आली, सुशिक्षित होता आलं, त्याच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश पडून तो सुखी होणार हे निच्छित असतं. आपण जसे बालपणी गाव, सूर्य, डोंगर यांचे चित्रे रंगवायचो, अगदी तशीच मांडणी या मुखपृष्टाची आहे. वाचन वाचकाला समृद्ध केल्याशिवाय राहत नाही. हेच या ठिकाणी वाचकांना लेखक व चित्रकार सांगू इच्छित असावेत. लिहिणाऱ्यावर खूप प्रेम, माया करणाऱ्या ... अशा वाचनवेड्या महान माणसाच्या, म्हणजेच गुरुवर्य श्री. भालचंद्र नेमाडे सरांच्या चरणी सविनय ही कादंबरी अर्पण करण्यात आली आहे. हे सर्व लिहण्याचे कारण म्हणजे शुक्रवार, दि. २ जुलै २०२४ रोजी हुतात्मा स्मारकात, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, नाशिक येथे गिरणा गौरव प्रतिष्टान आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ या सदरात लेखक डॉ. राजेंद्र मलोसे यांच्या ‘जगणं वाचणं’ या कादंबरीवर ऐसपैस गप्पांच्या कार्यक्रमाची मेजवानी नाशिकमधील रसिक वाचक तसेच साहित्यिकांसाठी उपलब्ध झाली आहे. दि. ५ मार्च २०२४ ते दि. २८ फेब्रुवारी २०२५ दरम्यान दर मंगळवारी व दर शुक्रवारी हा उपक्रम संपन्न होणार आहे. अशा प्रकारचा बहुधा हा साहित्य क्षेत्रातील पहिलाच अभिनव उपक्रम असावा. यामध्ये नवोदित तसेच प्रस्थापित साहित्यिकांना व्यक्त होण्यासठी हक्काचं व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. डॉ. राजेंद्र मलोसे यांची ‘जगणं वाचणं’ ही कादंबरी मी वाचली, मला आवडली, भावली म्हणूनच तुम्हीही वाचावी म्हणून हा सारा प्रपंच. अनोख्या वाचनवेड्या माणसाची/ नायकाची ही कथा वाचून एक अनोखी अनुभूती, एक वेगळा आनंद व तृप्तीचा ढेकर वाचकांना आल्याशिवाय राहणार नाही. याची मला खात्री आहे. याहीपुढे, त्यांची लेखणी तळपत रहावी, त्यांच्या हातून साहित्यिक, वैद्यकीय, वैज्ञानिक लिखाण व्हावे, हिच सदिच्छा! सन्माननीय डॉ. राजेंद्र मलोसे सरांना गिरणा गौरव प्रतिष्टान आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ या सदरात संपन्न होणाऱ्या व्याख्यानास आभाळभर शुभेच्छा! पुस्तकाचे नाव :- ‘जगणं वाचणं’ लेखक :- डॉ. राजेंद्र मलोसे प्रकाशक :- वर्णमुद्रा पब्लिशर्स, शेगाव, जि. बुलढाणा स्वागत मूल्य :- ₹ ४४४ /- मात्र (सवलत मूल्यासाठी कृपया, संबंधितांशी संपर्क साधावा) आस्वादक: सोमनाथ आवडाजी पगार (सॅप) (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेत प्रकाशनार्थ अनुदान प्राप्त साहित्यिक) संपर्क क्र.:- ९२७३३५७१५९, Email:- somnathpagar@yahoo.co.in गीतकार/ कवी, कथा, पटकथा, संवाद लेखक, युट्युबर, ब्लॉगर, टेक्नोक्रॅट, ऑनलाईन डॉक्युमेंट्स ऍडव्हायझर, इंग्लिश लँग्वेज ट्रेनर.