रविवार, २७ फेब्रुवारी, २०२२

माय मराठी अमृता समान -२७ फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांशी संवाद

माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जागल्या, दर्याखोर्यांतील शिळा

असे गौरव उद्गार आपल्या काव्यातून मराठी भाषेविषयी व्यक्त करणारे कवी कुसुमाग्रज अर्थात विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांमध्ये अत्यंत मोठ्या उत्सहात साजरा केला जातो. जागतिक मराठी अकादमीने याकामी पुढाकार असून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, हि समस्त मराठीजनाची मागणी आहे. मराठी भाषा जरी समृद्ध व गौरवशाली परंपरा असलेली असली तरी मराठी भाषा टिकली पाहिजे, हि काळाची गरज आहे. आजकाल इंग्रजी माध्यमात शिक्षण हे वेड मराठी भाषेसाठी मारक असल्याच आपल्याला दिसून येत आहे. आई, बाबा या तसेच अशा अनेक तत्सम परंपरागत बोलल्या जाणार्या शब्दांची जागा इंग्रजीतील शब्दांनी घेतल्याचे आपल्या लक्षात येते. यापुढे मुलांना जाणीवपूर्वक मराठी माध्यमांच्या शाळेत शिक्षण दिले पाहिजे आणि तसे शक्य झाले नाही, तरी मुलांना घरीदारी मराठी बोलण्यासाठी प्रवृत्त करणे, हे पालकांचे आद्य कर्तव्यच आहे. शिक्षण कोणत्याही माध्यमाच्या शाळेत घेतले तरी आपल्या मातृभाषेचा अभ्यास प्रत्येक मुलाने सखोल केला तरी मराठी भाषेसाठी तो पूरक होईल. अभ्यास करतांना सोपी भाषा म्हणून मराठी भाषेकडे दुर्लक्ष्य कधीही केले जावू नये. यासाठी शिक्षक व पालकांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. सर्वच भाषा महत्वाच्या असल्या तरी आपली मराठी भाषा आपल्यासाठी अमृतासमान असून जन्मापासून मराठी भाषेने आपल्याला जोजवले आहे. हे आपण विसरून चालणार नाही. यासाठी प्रयत्नपूर्वक अबालवृद्ध, तरुण तसेच मुलांना मराठी ग्रंथ, वर्तमानपत्रे, कविता, कथा, कादंबरी, नाटके इत्यादी वाचनाची आवड तसेच मराठी लिहण्याची सवय जोपासणे गरजेचे आहे. मराठी भाषा गौरवदिन एका दिवसाचा उत्सव न राहता वर्षभर मराठी भाषा जोपासण्याचा आपण सारे मिळून संकल्प करूया. इये मऱ्हाटिचीया नगरी ब्रह्म विद्येचा सुकाळू करी l अशा शब्दांतून श्री ज्ञानदेवानी मराठीचा उल्लेख करता, करता ब्रम्हविध्या, शब्दब्रह्मह असा केला आहे. याची यथार्थता आज मराठी भाषा गौरव दिनी प्रकर्षाने पटते. अमृतातेही पैजासी जिंकणाऱ्या या माय मराठीचा आपल्याला सार्थ अभिमान वाटतो. आपल्यासाठी गर्वाची बाब म्हणजे हा दिन आपल्या नाशिकचे कवी कुसुमाग्रजांचा जन्मदिवस आहे. आपल्या मातृभाषेचा गौरव तसेच कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय दिनांक २१ जानेवारी इ.स. २०१३ रोजी घेण्यात आला. कुसुमाग्रजांचा जन्म २७ फेब्रुवारी १९१२ रोजी झाला असून कुसुमाग्रज या टोपण नावाने त्यांनी काव्यलेखन केले आहे. त्यांना आत्मनिष्ठ तसेच समाजनिष्ठ जाणीव असणारे साहित्यिक मानले जाते. कुसुमाग्रज हे एक महान मराठी कवी, नाटककार, उपसंपादक आणि कथालेखक सुद्धा होते, त्यांना महान मराठी साहित्यक म्हणून ओळखले जाते. मराठी भाषेच्या जडण घडणीत या महान व्यक्तीमत्वाचा मोठा हातभार आहे. कुसुमाग्रजांच्या पाच दशकांच्या कारकीर्दीत त्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून अनेक कविता, लघुकथा, निबंध, नाटकं आणि कादंबर्‍या लिहल्या केल्या. जीवनलहरी, किनारा, मराठी माती, वादळवेल इत्यादी त्याचे प्रकाशित काव्यसंग्रह, १९४२ मध्ये भारतीय स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देणारा कवितासंग्रह, विशाखा, आधुनिक मराठी काव्याचे एक कायमचे भूषण आहे. दुसरा पेशवा, वीज म्हणाली धरतीला, नटसम्राट, राजमुकुट इत्यादी गाजलेली नाटके. वैष्णव, जान्हवी, कल्पनेच्या तीरावर ह्या त्याच्या प्रसिद्ध कादंबर्‍या. 1964 साली संपन्न झालेल्या मडगाव, गोव्या येथील साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. तसेच कोल्हापूर येथे संपन्न झालेले नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष, मुंबईतील जागतिक मराठी परिषदेचे अध्यक्ष, हि पदे त्यांनी भूषविली आहेत. पद्म भूषण (1991), मराठीतील थोर साहित्यिक वि. स. खांडेकर यांचे नंतर मराठी साहित्यात 1987 मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यक तर यासह मराठीतील 1974 मध्ये नटसम्राट ह्या नाटकाला साहित्य अकादमी पुरस्कार असे अनेक राज्य पुरस्कार आणि राष्ट्रीय पुरस्कारांचे ते प्राप्तकर्ते होते. या कविश्रेष्टांचे १० मार्च १९९९ रोजी नाशिक येथे निधन झाले. मराठी भाषेचा थोडक्यात इतिहास मराठी हि जगभरात बोलली जाणारी तसेच भारतातील तिसर्या क्रमांकाची सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे. असे मानले जाते की, मराठी भाषेचा उदय संस्‍कृतचा प्रभावाखाली निर्माण झालेल्या प्राकृत भाषेचा 'महाराष्ट्री' या बोलीभाषेपासून झ़ाला. सर्वप्रथम पैठण (प्रतिष्ठान) येथील सातवाहन साम्राज्याने प्रशासनात महाराष्ट्री भाषेचा वापर केला. त्यानंतर देवगिरीच्या यादवांच्या काळात मराठी भाषेची भरभराट झाली. मराठी ही भाषा देवनागरी लिपी मधुन लिहिली जाते. इ.स. 1278 मध्ये म्हाइंभट यांनी ‘लीळा चरित्र’ लिहिले. इ.स. 1290 मध्ये ‘ज्ञानेश्वरी’ या ग्रंथाची रचना संत ज्ञानेश्वरांनी केली. महानुभाव संप्रदायाने मराठी साहित्यात मोलाची भर घातली. संत एकनाथ यांनी या भाषेत भारुडे लिहिली आणि एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आदि ग्रंथांची भर घातली. स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि पेशव्यांनी या साम्राज्याच़ा विस्तार केला. त्यानंतर मराठी भाषेस राजाश्रय मिळाला. इ.स. 1947 नंतर स्वतंत्र भारत देशाने मराठीला अधिकृत राज्य भाषेचा दर्जा दिला. इ.स. 1960 मध्ये मराठी भाषिकांच्या महाराष्ट्र राज्यास मान्यता मिळाली आणि मराठीस राजभाषेचा मुकुट प्राप्त झाला. मराठी भाषा दिवस साजरा करण्यासाठी महाराष्ट्र भर विविध सांस्कृतिक, शैक्षणिक, भाषिक, कार्यक्रम शाळा आणि इतर संस्थां मध्ये आयोजित केले जातात.
या मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने माझी एक कविता
अष्टाक्षरी :- आई आमची मराठी आई आमची मराठी हिंदी आमची मावशी इंग्रजीचे बोट हाती सूर जुळले जगाशी ll१ll छाती मराठी निधडी कांती इंग्रजी गव्हाळी हिंदी सिंधुतील मोती गाठ जुळली लव्हाळी II२II बोलू अमृताची बोली जिला समुद्राची खोली सूर्य जोडी हात दोन्ही गाली पश्चिमेच्या लाली ll३ll
नभी फडके गर्वाने झेंडा माझ्या मराठीचा साता समुद्रापारही ताज शोभे संस्काराचा ll४ll पक्का निर्धार मनाशी मराठीच्या जतनाचा अभिमान ह्या उराशी मराठीच्या वतनाचा ll५ll जशी प्रेमळ, मधाळ भाषा होठावं मराठी बोट धरुनी वाढलो विश्व शांतीचाच साठी ll६ll ज्ञानदेव, तुकाराम परंपरेचा आदर सोमनाथा मुखी गोड माय मराठी जागर ll७ll
सोमनाथ पगार, नाशिक, गितकार/कवी, (MSRA, MABMCM) मो.9273357159. Blog:- https://somnathpagar.blogspot.com.com

सोमवार, २१ फेब्रुवारी, २०२२

आज २१ फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाच्या निमित्ताने विद्याद्यार्थ्यांशी संवाद साधला यामित्ताने....

दरवर्षी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन २१ फेब्रुवारी रोजी जगभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. १७ नोव्हेंबर १९९९ ला युनेस्कोने हा दिवस "आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन" म्हणून जाहीर केला. आणि त्यानंतर २००० पासून आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन जगभरात शांतता तसेच बहुभाषिकतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सर्व मातृभाषांचे संरक्षण करण्यासाठी साजरा करण्यात येत आहे. नोव्हेंबर १९९९ मध्ये संयुक्त राष्ट्राच्या शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (यूनेस्को-UNESCO: United Nations Educational, Scientific and Cultural Organization) च्या जनरल कॉन्फरन्सने हा दिवस जाहीर केला. संयुक्त राष्ट्र महासभेने १६ मे २००९ रोजी जगभरात बोलल्या जाणार्या सर्व भाषांचे संरक्षण करण्यासाठी, तसेच यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी त्याच्या सदस्यांना राजी केले. ठराविक संकल्पनेत, बहुभाषिकता आणि बहुसंस्कृतीकरणाद्वारे विविधता आणि आंतरराष्ट्रीय समजूतदारतेतील एकता वाढवण्यासाठी जनरल असेंब्लीने २००८ मध्ये आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले.


जसे कि आपण जाणतो, भाषा हे आपल्या मूर्त, अमूर्त वारसाचे जतन तथा विकास करण्याचे सर्वात प्रभावी व शक्तिशाली माध्यम आहे. संयुक्त राष्ट्राकडून (UN) 2000 पासून या दिवसाचं सेलिब्रेशन सुरू झालं. आज झपाट्याने बदलत असलेल्या युगात अनेक जुन्या भाषा नष्ट होत आहेत. त्यामुळेच समाजात भाषेतील आणि संस्कृतीमधील विविधता जपण्यासाठी प्रयत्न केले जातात. दरवर्षी एका विशिष्ट थीमवर या दिवसाचं सेलिब्रेशन आधारित असतं, तसे उपक्रम सर्वत्र राबविले जातात. जगभरातील अनेक बोली भाषांचं अस्तित्त्व धोक्यात आलं आहे. जगभरातील शिक्षण व्यवस्थेमध्ये आज अत्यंत मोजक्या भाषांमध्ये शिक्षण उपलब्ध करून दिलं जात असल्याच आपल्या लक्षात येतं. मुलांच्या मानसिक व बौद्धिक विकासासाठी प्राथमिक शिक्षण त्यांच्या मातृभाषेमध्येच (Mother Tongue) दिलं जाणं आवश्यक आहे, असा मतप्रवाह असून यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न सुद्धा केले जात आहेत.

जागतिक मातृभाषा दिन साजरा केला जाण्याचं कारण,
१९४७ साली भारताची फाळणी होऊन भारत व पाकिस्तान या दोन देशांची झालेली निर्मिती हीच जागतिक मातृभाषा दिनाच्या निर्मितीच्या संकल्पनेचे मूळ आहे. भारत व पाकिस्तानची फाळणी झाल्यानंतर पाकिस्तानची राष्ट्रीय भाषा ही उर्दू असेल असे सांगण्यात आले. मात्र बांग्लादेशातील स्थानिकांना हे मान्य नव्हते. यासाठी त्यांनी मोहिम सुरु केली. आणि त्यानंतर 1956 साली बंगाली ही पाकिस्तानातील दुसरी अधिकृत भाषा मान्य झाली.

जगाच्या इतिहासात भाषेसाठी छेडण्यात आलेली ही विशेष मोहिम लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्राने स्थानिक भाषा आणि त्याचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी 21 फेब्रुवारी दिवशी जागतिक स्तरावर मातृभाषा दिन साजरा करण्याचं ठरवले. बांग्लादेशामध्ये 21 फेब्रुवारी हा दिवस Language Movement Day किंवा Shohid Dibosh म्हणून साजरा केला जातो. तर भारतामध्येही पश्चिम बंगालसह सर्व राज्यांमध्ये मातृभाषा दिन म्हणून 21 फेब्रुवारी हा दिवस साजरा केला जातो.

दरवर्षी भारत सरकार कडून जागतिक मातृभाषा दिनाचं औचित्य साधत खास उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते.

बुधवार, १६ फेब्रुवारी, २०२२

आदरणीय भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली

 के. के. वाघ अर्थात कर्मवीर काकासाहेब वाघ शिक्षण संस्था हे शैक्षणिक क्षेत्रातील उत्तम दर्जा व गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी नावलौकिक मिळवलेले एक दर्जेदार शिक्षण संस्थेचे नाव. आजमितीस अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन, कृषी, वरिष्ठ महाविद्यालये, शाळा-विद्यालयांतून विद्यार्थी शिक्षण घेत असून अनेक माजी विद्यार्थी देश-विदेशात कार्यरत आहेत. विद्यार्थी व पालकांचा विश्वास असलेली ही शिक्षण संस्था असून या शिक्षण संस्थेचे वटवृक्षात रुपांतर झालेले आपल्याला पहावयास मिळते. खरंतर याचे सर्व श्रेय जाते ते संस्थेचे अध्यक्ष आदरणीय भाऊ यांची दूरदृष्टी, त्यांच्या अभ्यासू व सक्षम नेतृत्वाला.

असे आपले सर्वांचे प्रेरणास्थान, आदरणीय दिवंगत कै. बाळासाहेब देवराम वाघ उर्फ भाऊ यांना रविवार दिनांक ६ फेब्रुवारी २०२२ रोजी रात्री १०:३० वाजता वयाच्या ९०व्या वर्षी काळाने आपल्यातून हिरावून नेले. आदरणीय भाऊंच्या दुःखद निधनाने के. के. वाघ परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. यामुळे कधीही न भरून निघणारी आपली हानी झाली आहे. भाऊंच्या नेतृत्वाची, मार्गदर्शनाची तसेच प्रेरणेची अजूनही काही काळ आपल्या सर्वांना गरज होती. मात्र आपण सारेच नियतीपुढे हतबल आहोत, हेच खरे.

आयुष्यातला सर्वात जास्त म्हणजे २५ वर्षांपेक्षा जास्त काळ आदरणीय भाऊंचे सक्षम नेतृत्व व कार्य प्रत्यक्ष पाहण्यात व अनुभवण्यात गेला असून आपल्या के. के. वाघ परिवारातील प्रत्येक सदस्याची जडणघडण भाऊंच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाने झाली आहे. कित्येक कुटुंबे भाऊंच्या कार्यामुळे स्थिरस्तावर झालेली आहेत. आपोआपच भाऊंच्या कार्याचा प्रभाव सर्वांवर होणे स्वाभाविकच आहे. आदरणीय भाऊंची एवढी सवय झाली आहे की आता भाऊ आपल्याला पोरके करून गेले, ही कल्पनाच सहन होत नाही.  के. के. वाघ हा आपला परिवारच आहे. ज्याप्रमाणे परिवारात ज्येष्ठ व्यक्ती मार्गदर्शक व आदरणीय असते तसेच आदरणीय, प्रेरक व श्रद्धास्थानी आपल्यासाठी आपले भाऊ होय.

काळाची पावले ओळखून दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणाची कवाडे खुली करून सर्वसामान्य माणसांपर्यंत शैक्षणिक व सामाजिक विकास साधणारे थोर शिक्षणतज्ञ/ शिक्षणमहर्षी, ज्ञानयोगी, कर्मयोगी, कर्मधुरंधर, समाजसुधारक आदरणीय भाऊंचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला होता. अविरत कार्यरत होते असे आदरणीय भाऊ, उत्तम, कार्यक्षम बुद्धिमत्तेचे मूर्तिमंत उदाहरण. आदरणीय भाऊंचे संपूर्ण आयुष्य हे एका अर्थाने तपस्वीचे आयुष्य आहे. ‘सामान्य पेहरावमात्र व्यक्तिमत्त्व असामान्य’ असे भाऊंचे वर्णन करता येईल. कामावरची व जीवनावरची अविरत निष्ठा. हाती येईल ते काम परिपूर्णतेचा, उत्कृष्टतेचा ध्यास, हे त्यांचे वैशिष्ट्य. आदरणीय भाऊंचा आपल्या सर्वाना आदरयुक्त दरारा तर होताच यासोबत आधारही होता.

आदर्श शिक्षणतज्ञ व समाजसेवक कसा असावा? याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपले आदरणीय भाऊ. आदरणीय भाऊंच्या खंबीर नेतृत्वाखाली संस्थेने सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे केले असून संस्थेची यशस्वी वाटचाल सुरू आहे.

प्रत्येक कामात आदरणीय भाऊंचे मार्गदर्शन असणार म्हणजे असणार. भाऊ स्वतः हजर राहून प्रत्येक काम परिपूर्ण कसे होईल? याकडे लक्ष द्यायचे. लॅबची मांडणी असो, फर्निचर बनवणे असो, किंवा विद्यार्थ्यांसाठी प्रयोगशाळा साहित्य असो. आदरणीय भाऊ नेहमीच स्वतः लक्ष घालून मार्गदर्शन करायचे. संस्थेची प्रत्येक इमारत, रस्ते, झाडे भाऊंच्या कार्याची साक्ष देत आहेत. कर्मवीर काकासाहेब वाघ यांचे कार्य तसे मोठे. त्यांच्या कार्याचा समर्थ वारसा आदरणीय भाऊंच्या रुपाने आपल्याला अनुभवायला मिळाला. हे आपले सर्वांचे भाग्यच म्हणावे लागेल.

आजच्या तरुणांना आदर्श ठरावा, पुढच्या कित्येक पिढ्यांना प्रेरणा ठरावी. असे आदरणीय भाऊंचे आदर्श व प्रेरणादायी कार्य आहे. के. के. वाघ शिक्षण संस्थेचा नावलौकिक केवळ आदरणीय भाऊंची दूरदृष्टी व संशोधक वृत्ती, आधुनिक विचार यामुळेच झाली आहे. आदरणीय भाऊंची आठवण कायमच येत राहील. त्यांचे कार्य, शिकवण व मार्गदर्शन कायमच प्रेरणा देत राहील.

आदरणीय भाऊंच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो. हीच ईश्वर चरणी विनम्र प्रार्थना.

 💐भावपूर्ण श्रद्धांजली.💐

 

भाऊ तुमच्या जाण्याने
आम्ही झालो निराधार
नितीमुल्यशिकवणी
आम्हा जगण्या आधार II१II

सूर्यचंद्रतारे नभी
धरेवरी आम्हा भाऊ
ज्ञान मंदिरी नेमाने
तुम्हा स्मरत हो राहू II२II

कर्मवीर बंधारे नी
पिकं शिवारी डोलती
जण मनात नांदते
खऱ्या सोन्याची पावती II३II

कर्मवीरांच्या कार्याचा
तुम्ही आदर्श वारसा
ज्ञानयोगीकर्मयोगी
तुम्ही प्रेरक आरसा II४II

साधी राहणी तुमची
उच्च प्रेरक विचार
कार्य तुमचे आदर्श
होण्या पिढ्यांचा उद्धार II५II

नत मस्तक होऊनी
समर्पित शब्दांजली
अर्पू पवित्र स्मृतींना
भावपूर्ण श्रद्धांजली II६II 💐

 

आदरणीय भाऊंच्या वाढदिवसानिमित्त मागे केलेली एक उत्स्फूर्त रचना

 

गीत:- कर्मधुरंधर आमचे भाऊ

 

कर्मवीर पुत्र, शिक्षण तज्ञ

ध्यानी मनी हो शिक्षणाचा यज्ञ

कर्मधुरंधर आमचे भाऊ

प्रेरणास्थान मुखी गुण गाऊ llध्रुll

कर्मधुरंधर आमचे भाऊ

 

सहकारातून समृद्धीकडे

विकासाची फुलवली हि मळे

साक्ष देई कर्मवीर बंधारे

विकासाचे दिसे रूप वेगळे

भाग्यविधात्याचे पाईक होऊ llll

कर्मधुरंधर आमचे भाऊ

 

समाज सेवेचा खरा आरसा

कर्मवीरांचा ते थोर वारसा

ज्ञानमंदिरं उभारीले पहा

शिक्षणाचा हाती घेऊनी वसा

आधारवड हा आधार घेऊ llll

कर्मधुरंधर आमचे भाऊ

 

साधी राहणी नी उच्च विचार

घावला नीती, मूल्यांचा भांडार

ज्ञानवंतगुणवंत उदार

पाठीवर हात आम्हा आधार

थोर कार्याचा वसा पुढे नेऊ llll

कर्मधुरंधर आमचे भाऊ

 

सोमनाथ पगार