google.com, pub-3412048091495808, DIRECT, f08c47fec0942fa0 Sahitya Tirtha - My Literature, My Creation साहित्य तीर्थ - माझं साहित्य, माझं लिखाण: 4 जून, 2020

गुरुवार, ४ जून, २०२०

भय कथा: खैसाची कुस्ती

Add caption
Youtube वर कथा ऐका:- https://www.youtube.com/watch?v=DddhMQAhiYk
बाहेर काळकुट अंधार, बहुतेक अमावस्येची रात असावी. मला नि आठवत नही. पण अमावस्याच असंल. बाहेर टिटव्या रोजच्यापेक्षा जास्तच टिव, टिव करत इकडून तिकडे जीवाच्या आकांताने उडत व्ह्त्या. अण्णांनी रांगड्या स्वरात आवाज देला.
“रामड्या उठ, पार उजाडलं ना आता, कव्हा नेतो चरायला बैलायला? दिस उगवल्यावर का?” आणांच्या आरोळीनं मला जाग आली, पण उठू वाटना.
 आण्णा माझा बाप, लई रांगडा माणूस, सच्चा हाडाचा शेतकरी. पायाला जशी भिंगरी, सारखा राब, राबत असं. रोज पहाटला बैल जोडी माळरानावर चरायला नेलीच पाहिजे. कधी मागं पुढं झालं त आण्णांची तळपायाची आग मस्तकात जायला येळ लागत नसायची. एरवी माझा आण्णा म्हणजे मधासारखा गोड माणूस, लई जितराबात जीव त्यांचा. सूर्य उजाडायच्या आत परत बैल गोठ्यात गव्हानीला आलं  पाहिजे. या नित्यनियमात खंड पडाया नको. कवळ्या उन्हात घडी पहार नांगराच्या पाळ्या पाडल्याच पाहिजे, म्हणजे उन्हाचं जितराब आराम करतं निवांत.  सकाळी सकाळी वावरत जाऊन बांधा मेराचं  गवत, घास, कडबा कापून आणून ढोरांपुढं टाकला तर ठीक नाहीतर आण्णा मला खाऊ का राहू करी. हे सारं काम आण्णाच करी, पण आता हि जबाबदारी माझ्यावर सोपवली व्हती. नहीतरी मी आता बरोबरीचा झालो व्हतो. मीही बारावीत इंग्रजीत नापास झाल्यावर शेतीमातीत रमलो व्हतो. आण्णा परीस मी हाडाकाडाने चांगलाच उचा पुरा गडी दिसाया लागलो. दाढी मिशा आल्याने चांगला भरदार दिसू लागल्याने घरात अधून मधून माझ्या लग्नाच्या चर्चेच्या फैरी झाडू लागल्या व्हत्या.
“सांज सकाळ लगन व्हईल पण तू काही सुधारणार नही, माणसानं एका आवाजात उठाया पाहिजे खाडकन” अस आण्णा दुसऱ्यांदा म्हणताच मी अंथरुणावर उठून उभाच राहिलो तडकन.
“उठलो कि आण्णा, थोडा घडीभर दम, धीर धरावा. दिसभरभी राबावं लागतं अन पहाटलाभी लवकर उठावं लागतं” मी थोडासा रागातच बोललो.
“अरे! रामड्या  तसं नही, तुला सवय कधी लागंल. एकतर शिक्षण नही, शेतकरी झाला हायेच मग या सवयी लागाया नको का?” आण्णांनी मला समजावत निरुत्तर केलं. खरं तर त्यांनाच या जगामधी सर्वात जास्त खरी माझ्या भविष्याची चिंता व्हती.
“व्हय आण्णा तुमचंभी खरंच हाय कि, कोण नही म्हणतं” मी हा ला हा लावली. आण्णा खुश झाले.
शेवटी ‘बापाचा इरुध करू नही’ असं रामायणाचं पारायण मारुतीच्या देवळात चालू व्हतं ना तव्हा माळकरी तात्यानं बजावून, बजावून सांगितलं व्हतं. रामानं बाप दशरथ राजाची आज्ञा पाळून चौदा वर्षे वनवास भोगल्याची कथा चगळून, चगळून सारी चोथा झाली व्हती. पण रामानं हा नही कि चू नही केलं. असे आपले संस्कार. 
अंगावरच्या रगीची व अंगाखालच्या गोधडीची घडी घातली. तोंडावर पाणी मारून चूळ भरली. तवर मायनं चूल पेटवली. चुल्यात जाळ धगधगत व्हता.  थंडी घालवावी म्हणून थोडं शेकावं वाटलं, पण परत आण्णा ओरडल म्हणून तडक गोठ्यात गेलो. काहीतरी सरसर करत गेल्याच जाणवलं. अंगावर घाबरून काटा आला. पटकन मागं वळलो. तिकडे टिटव्या टिव, टिव करत होत्या. आज जरा वेगळंच काहीतरी घडत असल्याचं जाणवलं. रोज कधीच काही वाटत नसायचं. परत घरात येऊन कंदिल शोधला. रातच्याला जळून, जळून त्याच्या वातीची राख झाली व्हती. त्याच्यातल्या राकेलाचा शेवटचा थेंब संपून कव्हाचाच इझला व्हता बिचारा. थोडं राकेल भरल्यानं त्याच्या जिवात जीव आला. परत शिलगावला, कंदिल आज जरा येगळाच फुर, फुर करत होता. पायात बूट घातला, पायाला काहीतरी टोचलं, म्हणून बूट झटकून घेतला.
“हे काय विचित्र घडतय आज?” अस क्षणभर वाटल्याने माझ्या काळजात धस्स झालं. पण मी घाबरून न घाबरल्यासारखं केलं.
काकडा हातात घेतला, खळ्यात गेलो अंधार चाचपडत. बैलांनाही माझा लईच लळा. मला पाहून लगेच दोघही उठले. मलाही बैलांचा आधार वाटल्यानं बरं वाटलं. रोजचीच सवय म्हणा. बैल मला चाटू लागले. माणसाला माणसाची सवय व्हती मग बैलांना का नाही व्हणार. माझ्या फक्तस्त चाहुलीनं उठून बसता, हंबरु लागता माझ्याकड पाहता. जितं जितराब लई मायाळू असतं, फक्तस्त आपण जीव लावाया पाहिजे.
खुटाचे दावे सोडले, गव्हानीतली वैरण सावरली. आह्ळावर पाणी पाजायला गेलो. बैल घटाघटा पाणी पिऊ लागले. बैल पाणीच पित व्हते. वरल्यांगाच्या वडाच्या झाडावरून टिटव्या टिव, टिव करत उडत गेल्या.  मी आवाज ऐकला. पण फारस काही त्यांच्याकडं लक्ष देलं नही.  माझे जीवाभावाचे मैतर माझे दोन्ही बैल ढवळ्या व पवळ्या दोघांनी मात्र टिटवीचा आवाज ऐकून हंबरडा फोडला. दोघ फूस, फूस करू लागले. ढवळ्यानं तर शिंगानं माती उकरली. मी दोघांना आवाज दिला. बैल जणू भानावर आले. आतून मात्र मी पुरता दचकलो होतो.
“अरे! पाणी प्यायाचं सोडून माती उकरून राहिले व्हय. चरायला नही का जायाचं माझ्या राज्या हो” माझा आवाज ऐकून बैल माझ्याकडे पाहू लागले. बहुतेक त्यांना पुढील घटनांची चाहूल लागली असावी.
आम्ही थोड्याच वेळात माळरानाच्या दिशेने चालू लागलो. आमच्या वस्तीतून जाणाऱ्या मुख्य रस्त्यानं पुढे गेलं कि डावीकडे वळून माळरान लागतं. हा समदा एक , दिड मैलाचा प्रवास. छानपैकी बैल चरून तट झाले कि दिवस उजाडायच्या आत परत घरी. असा आमचं रोजचंच.
आमची वस्ती म्हणजी फार काही मोठी नवती. दहा वीस उंबऱ्याची भावकीतली दहा, पंधरा एकरावर उभी घरं, भावकी जपत वर्षानुवर्षे. दोन, तीन पिढ्या इथं राहिलेल्या. माझ्या खापर पणजोबा इथं राहायला आलेला. मग पुढ पंजा, आजा, माझा बाप, चुलते काके इथंच रमले कायमचे.
धवळ्या, पवळ्या पुढं, मागं दावे हातात धरून मी. गळ्यातलं घोगरं अन शिंगातल्या शेंब्यांच्या आवाजानं ठेका धरला. रोजच्या वाटनं अंधाराला भेदत, टपटप पावलं उचलत चालत निघालो माळरानावर. तसं दावं धरलं काय नि न धरला काय. काही फरक पडत नही. आम्ही एकमेकांची साथ काही सोडत नही. उलट एकमेकांच्या आसऱ्याने चालत असू.
घरापासून टेकडावर पोहचलो. भावस्या, तात्याचा हनम्या खळ्यात दिसला. मला त्याची चाहूल लागली.
“हनम्या चाल कि लवकर, उशीर होऊ राहिला” मी आधार शोधत व्हतो.
“अरे! रामडया, तू चाल कि पुढं, मी आलोच, मागून थोड्या वक्तानं” हनम्यानं लवकर येण्याचं मला आश्वासन देलं.
“ये कि लवकर, लई उगा येळ नको लावू” म्हणत  मी हळूहळू मी चालू लागलो.
आम्ही मारुतीच्या देवळाजवळ पोह्चलो, काळ्या गडद अंधारात महाबली हनुमान दिसले नही. फक्त मंदिर जाणवलं. भययुक्त अंधारच तेवढ होतं अवतीभोवती घाबरावयाला.
अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान
एक मुखानं बोला, बोला जय,जय हनुमान
असं काहीतरी पुटपुटत अंधाराला चिरत चिरत निघालो. याव्यतिरिक्त मला काही ठावही नवतं म्हणा. कधी नव्हं ते आज राम, कृष्णाची आठवण काढत त्यांना भजत व्हतो.
देवळाच्या पाठीमागं काही अंतरावर भावकीसाठी स्मशानभूमी व्हती. कितीही दुर्लक्ष केलं तरी नजर तिकडं गेलीच. अन काळजात धस्स झालं. कुणाचं तरी प्रेत जळत असल्याचं क्षणभर वाटलं. मागच्याच महिन्यात परसाच्या वावरात खांडकीच्या इहरीत मोठ हाकतांना इहरीत मोटाचा कणा लावतांना तोल जावून घसरून पडल्यानं परशराम सदा अपघाती दगावल्याचं आठवलं. यावर्षी पाणी पाऊस चांगला झाल्याने इहीर फुल भरली व्हती. अंगभर काटा आला. आजूबाजूची झाड, झुडपं विना चेहऱ्याच्या भूतागत सारे दिसाया लागल्याने मी अजूनच टरकलो. आम्ही लहान पोरं भी लई अवचंदी गरज नसतांना इहरीत डोकवून पाहिलं. परशराम सदा फुगल्यानं टर होऊन पाण्यावर भुसकट भरल्यागत तरंगत व्हता दात इचकुन. दुसऱ्या दिवशी सांजच्याला पोलीस आल्यावर इहरीत बाज टाकून त्याला वर काढलं, दवाखान्यात नेलं. परत आणून सतीगती लावलं रडत गागत. आम्ही पोरा, सोरांनी  सारं पुढं होऊ, होऊ सारं पाहिलं होतं. तव्हा काहीच वाटलं नही अन आता माझी इजारच वली व्हायची राहिली व्हती तेवढी.
मारुतीची मनात प्रार्थना करू लागलो. “तूच माझा पाठीराखा, मारुतीराया, सांभाळ आता” असं मनातल्या मनात पुटपुटत पाठीमागून हनम्या कधी येईल हा इच्यार करत त्याची वाट पाहत थोडा घुटमळलो. त्याचा काही थांगपत्ता लागना. बैलही एका जागेवर राहिना. तेवढ्यात रघुनानाच्या खळ्यातून काहीतरी पळालं, माझ्या जवळून गेलं. पण दिसलं काही नही. पाठीमागून त्यांचं खंड्या कुतरं धावत पाटलाग करत पळत गेलं. मी टनकन जागेवर उडालो. बहुतेक घूस नहीतर मांजरीच्या मागं खंड्या धावला असावा अशी स्वतःची समजूत घातली. बैल मात्र खुर रोखून ओढायला लागल्याने मी आपसूकच घाबरलो.
स्मशानापासून थोडं दूर आलो. रोजच्या पेक्षा वाऱ्याला आज जास्तच चेव आल्यानं मोठ्यानं घोंगावत वाहत व्हतं चित्र विचित्र आवाज काढत.
तिकढं परसाच्या वावरात सुकदेव तात्या नी शेजारीच म्हसू भाऊ बारे देत व्हते. त्यांचा आवाज आला, थोडं हायसं वाटलं. दिवाळसण जवळ येऊन ठेपलेला. सारी पिकं सुगीवर आलेली. सुकदेव तात्या तर या सालला अख्खी सोसायटी निल करायचं म्हणत व्हता. असं जोरदार कांदे, मका रंगात आलं व्व्हतं कि ज्याचं नाव तेच.
बैल पुढं, मी मागं असा आमचा लवाजमा आज रोजच्यापेक्षा घाबरत घाबरत चालला व्हता माळरानाकडं. अंधार कधी नव्ह आज भोकाडी बनला व्हतं. मधूनच कुठतरी एखाद दुसरं कुत्र क्याव, क्याव करत विव्ह्ळायचं, कुठतरी पाखरं, रात किडे किर् किर् करायचं अन वातावरण अजूनच भयावह बनवायला अजून भर घालायचे.
पुढं गेल्यावं मुख्य वाटच्या डाव्या बाजूला आंबू बाबाची आंबराई लागली.  आंबू बाबाची आंबराई पुर्विला म्हण इथं पाच, पंचवीस झाडं व्हती आंब्याची. त्यावरच आंबू बाबाचा रहाट गाडं चालायचं. आंबू बाबा गेला. त्याचा लेक नोकरीला कंपनीत कामगार म्हणून नाशिकला. तो कुठं इकडं गावाकडं ध्यान देतो. शिवाय म्हण इथं हडळ राहती. असं म्हणायचे वस्तीवाले. पोटुशा बायका दिसल्या कि ती आवाज देती.
“अग! बाई ये जरा इकडं बसाया जरा येळ” असं म्हणत बोलावल्याचा अनुभव वस्तीवरच्या नि गावातल्या बायांनी सांगितल्याचं उगाच आठवून भय वाढवून गेलं. कधी नव्ह ते अशा येळला ध्यानात येतं. माझ्या मायनं रंभा काकूला गुरवाच्या अलकीवर गुदरलेला प्रसंग सांगितला व्हता. ते माझ्या पक्क ध्यानात.
अचानक भयानक आंबराईतून सरसर करत काहीतरी गेलं. बैल थबकले, पानांची हालचाल वाढली. वाऱ्यानं जोर धरला. मी मात्र गर्भगळीत झालो. मागं परतून गेलो तर आण्णांना काय सांगायचं? त्यांनी मला ‘घाबरट’ म्हटलं आसतं. त्यामुळं तसंच पुढं जात राहिलो.   माळरानावर पोहचलो. आता आंबराई, मुख्य रस्ता सारं, सारं दूर मागं राहिलं होतं. बैल चरायला लागले. मी दावे हातात धरून बसलो. रोज तसा दावे सोडून कुठतरी ताणून द्यायचो. आज दावे हातातून सोडू वाटना, माझे ढवळ्या, पवळ्याच मला आधार होते.
बराच वेळ गेला तरी हनम्या काही येईना. मी वाट पाहू लागलो. मात्र त्याचा पत्ता नवता. तसाच जीव धरून राहिलो. तेवढ्यात टिटवी ‘टिव, टिव’ करून डोक्यावरून गेली. बैलांची हालचाल वाढली. शेपुट हलवाया लागले, शिंग मागं पुढ केले. कशावर तरी चाल करून धावून राहिले असं जाणवलं. दावे ताणले गेले, मी भानावर येऊन करकचून धरले.
“ढवळ्या, पवळ्या चरा कि नीट, कशाला त्रास देवू राहिले उगाच?” मी खेकसलो. तसं दोन्ही बैलांनी माझ्याकडं वळून पाहिलं. अचानक पवळ्यानं शिंग मातीत खुपसून माती उखरली. कशावर तरी चाल करत असल्याचं भासलं. आता नेमकं काय आहे म्हणून पाहू तर ढवळ्या माझ्या आड आला. मी दोन्ही बैल जवळ ओढले. दोन्ही बैल माझ्या दोन्ही बाजूला येऊन उभे राहिले जणू माझे राखण कराया.
बैल हंबराया लागली. माझी नजर समोरच्या लवणात पिंपळाच्या झाडाशेजारी पापडीच्या झाडावं गेली. तिढं काहीतरी पांढर शुभ्र आकृतीची हालचाल  होतांना जाणवली.सुरवातीला पापडीच्या झाडाची हालचाल वाटली म्हणून मी तिकडं दुर्लक्ष करून बैलांना हाकलू लागलो.
“चला रे! नीट पोटभर खावा परत दिसभर कामच काम तुम्हाला अन मलाही” मी माझ्या मुक्या मित्रांशी संवाद साधला.
बैलांनी पाठीवर शेपटी हलवून मला प्रतिसाद दिला, तरी सुद्धा त्यांच्यातली विचित्र चुळबुळ विचित्र थांबली नवती. माझे जीवाभावाचे बैल ढवळ्या, पवळ्या ‘असं काय करताय?’ म्हणून काळजीही वाटत  व्हती.
मारुतीच्या देवळाजवळून येत व्हतो तवा स्मशानाजवळ माझी चड्डी वली व्हायची राहिली व्हती. आता ढवळ्या, पवळ्यानं एकाच येळला शेण, मुताचा वर्षाव केला.  हे नेहमीचच म्हणून मी जिवाभावाच्या जितराबाकड डोळे भरून पाहिलं.
माझा खिल्लारी ढवळ्या, पवळ्याला जोड घेतला तवा गोरहाच व्हता कि. उचा, पुरा, टोकदार गोल शिंग, लांब झुबकेदार शेपूट. भरदार खांदा, गोजिरवाणा रुबाब अन पवळ्या थोडासा तपकिरी लाल रंग, घरच्याच पवळी गाईचा गोरहा. लहानपणापासून गुबगुबीत. ढवळ्याला तोडीस तोड असा जोडीदार. थोडासा उचीला बुटका. पण ताकदीन ढवळ्याला सरस.  खाया पिया वान नही, हिरवी वैरण गवनीला सालभर असती. सारं गाव माझ्या बैलाच्या प्रेमात पडलं व्हतं. ढवळ्या, पवळ्या दोघं टांग्याला हमसून, हमसून पळवेल. पभा पाटलाच्या घोड्याला माझ्या ढवळ्या, पवळ्यागत जोड कधीच घावली नही ती नहीच. अशी कोणतीच शैर्यत नवती कि ती या बहादरायनं जिकेल नही. माझा लई जीव दोघांमधी.
अजून थोडा येळ गेला, जोराचा वारा आला. वाऱ्यामुळं काहीतरी खडा बीडा उडून माझ्या डोक्याला लागला. मी थोडा चपापलो. ढवळ्या, पवळ्या मागं वळले. आता तर मी पुरता हादरलोच, माझी बोलती बंद झाली. दूरवरची आकृती माझ्याकडं येत असल्याचा मला भास झाला. मी आता घामाघुम व्हाया लागलो. काय करावं सूचना. दुर्लक्ष करावं तर नजर बाजूला जाईना.
“ढवळ्या, पवळ्या चला आपण तिकडं वाटाकडं जाऊ” मी बैलांचे दावे ओढून परतणार तोच मला आवाज ऐकायला आला.
“अरे! चालला कुठं? थांब. तुझ्यासाठीच तर मी आलोय ईकडं” ती पांढरी आकृती मोठ्यानं बोलल्याचं मी चांगलं ऐकलं. आता माझं काही खरं नवतं. मी पायायचा येग वाढवाया लागलो. बैलही त्यांना समजल्यागत आज्ञाधारकपणे हंबरत चालू लागले.
“जातो कुठं? थांब माझ्याशी कुस्ती खेळ, खैसाची कुस्ती कशी खेळता एकदा खेळून पहा तरी. मला तू हरवलं तर मी तुझा गुलाम. मी तुला हरवलं तर तू माझा गुलाम” माझ्यावर चाल करून येत त्या आकृतीनं मला आवाहन देलं.
मी ऐकलं न ऐकलं केलं अन गप गुमान घामाघूम, गर्भगळीत होऊन चालत राहिलो. आता तर माझी चड्डी खरोखर वली झालीच.
यापूर्वी वस्तीवरच्या म्हाताऱ्या कोताऱ्या भूता खेतायच्या गप्पा गोष्टी सांगायच्या. त्या कधी खऱ्या तर कधी खोट्या वाटायच्या. असं काही नसतं म्हणत म्हाताऱ्यायची टिंगल टवाळी करायचो. आज खरच भूताशी गाठ पडली व्हती. पळावं का ओरडावं काही कळना. ओरडलो तर आवाज कुणाला जाईल? मी सारी ताकद एक केली.
“वाचवा, धावा, हनम्या आलाय का रे बैल घेवून? म्हसू भाऊ, सुका तात्या धावा, वाचवा”  मी जीवाच्या आकांताने रडत, गागत ओरडत पळू लागलो. माझे ढवळ्या, पवळ्याही हंबरत पळू लागले.
“अ रे! पळतो कुठं? पळकुट्या, मी आज कुस्ती खेल्याशिवाय तुला सोडीतच नही” त्या पांढऱ्या आकृतीनं  निश्चय बोलून दाखवीला.
ती आकृती जवळ जवळ येत व्हती. माझे मैतर मागे वळत हंबरत व्हते. मधूनच शिंग मातीत खुपसून माती उधळायचे. जणू काही मला दिलेलं आवाहन त्यांनी स्वीकारलं होतं. फक्त मी पळतोय म्हणून ते पळत असावेत नहीतर ते त्या आकृतीशी दोन हात करायला तयारच होते जणू, आपल्या जिवाभावाच्या मालकाला वाचवायला.
माझा आवाज काही कुणाला जात नवता. आत्ता माझा बैलांसह येग जरा वाढलाच व्हता. आम्ही जोरजोरात पळत व्हतो. पवळ्या माझ्या मागं तर ढवळ्या माझ्या पुढं झाले. जसा काही मला वाचवायचा दोघायना विडाच उचलला व्हता कि. पळता पळता मी आरोळ्या देत व्हतो, बैल हंबरत व्हते. मात्र आमच्याकडं लक्ष द्याया अमावस्येच्या काळ्या भयान अंधारात कोणीच नवतं. ‘आता काही खरं नही’ म्हणून जीव वाचवाया हि सारी धडपड पळापळ चालू व्हती. पळता, पळता  माझ्या पायाला कशाची तरी ठेस लागली. तसा मी धडकन तोंडावर आदळलो. तेवढ्यात ती पांढरी आकृती माझ्या पुढ्यात मी बेशुद्ध..........
दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजलं असंल मला जाग आली. मी आजूबाजूला पाहू लागलो.
“रामड्या शुद्धीवर आला, रामड्या शुद्धीवर आला” असा एकच गलका झाला.
“नशीब चांगलं खैसाच्या तावडीतून सुटला, नहीतर काही खरं नवतं ग! बाई” म्हाळसाई हरी तात्याला सांगत व्हती अन मी ऐकत व्हतो.
“व्हयना ओ माय पहिल्या जनमाचं पुण्य म्हणायचं त्याचे मायबापाचं चांगल वागणं कामी आलं. बरं झालं जीवावरचं संकट टळलं” हरी तात्या म्हाळसाईला घाबरत, घाबरतच सांगत व्हता.
मी आता बऱ्यापैकी शुद्धीवर आल्याने आजूबाजूला न्याहळू  लागलो. माझी माय, आण्णा, वस्तीवरचे सारे भाऊबंध बसलेले, काही न काही कुजबुज सुरु व्हती. मला काय कळना नेमकं काय चालूय. थोडं न्याहळल्यावर लक्ष्सात आलं कि मी खालच्या मळ्यातल्या बबन भक्ताच्या म्हसोबाच्या देवळात पडलो आहे. माझ्या अंगावर बबन भक्तानं मंतरून भगवा कपडा टाकलाय. कपाळाला अंगारा लावलाय.
मी काही विचारणार तर मला गप्प करण्यात आलं. आणि बबन भगत बोलू लागला,
“पोराचं नशीब चांगलं, अन हे जीवाभावाचे जोडीदार मैतर, मुके जीतराब नसतं तर  काही खरं नवतं” बबन भगतानं आण्णांना सांगितलं.
“पहाटला बाहेर बैलायचा हंबरायचा आवाज येतो म्हणून बाहेर आलो तर पवळ्याच्या शिंगावर तू अन बैल म्ह्सुबाडं पळत येत व्हता. मी हाकलायला काही गवसतं का म्हणून पाहतो तर तवर तुला धाडकन देवापुढ आणून टाकलं. अन बैल बाजुला जाऊन पहात उभा राहिला. मला काही कळना, तू बेशुद्ध, तुझ्या आण्णाला निरोप धाडून बोलावलं” बबन भगत पाठांतर केल्यागत वकून मोकळा झाला व्हता.
त्यानंतर मी माझ्यावर रातच्याला गुदरलेला सारी हकीगत सांगितली. मग लक्षात आलं कि ढवळ्यानं त्या खैसाचा प्रतिकार केला तर पवळ्यानं मला शिंगावर उचलून इढं म्हसोबाच्या पुढ्यात आणून टाकलं. मी बेशुद्ध पडल्यानं मला फारसं काही कळलं नवतं.
“व्हय न व्हय तो परशरामचाच आत्मा व्हता, आज अमावस्येची रात व्हती, बरुबर येळ साधली व्हती. असं अपघाती मरण चांगलं नसतं, जीव ऊगा घुटमळत राहतो” बबन भगतानं बरोबर अंदाज वर्तवला व्हता. साऱ्या मंडळीनं भगताचं मत मान्य केलं.
माझ्या जिवाभावाचे मुके मैतर माझ्या ढवळ्या, पवळ्यानी  जिवाची बाजी लावून आज माझा जीव वाचवला व्हता. दोन्ही बैल माझ्या बाजूला उभे व्हते. आपल्या धन्याला सुखरूप पाहून दोघही हंबरले. अंगात ताकत नवती, तरी पण  कसातरी उठलो अन दोघांच्या गळ्यात पडून ओक्साबोक्शी रडू लागलो. माझ्या ढवळ्या, पवळ्याच्या डोळ्यांतून अश्रू टप तप तपकत व्हते. आण्णा, माय अन सारी मंडळी आम्हाला पाहून घळाघळा रडाया लागली. माझे ढवळ्या, पवळ्या मला मायेनं चाटत व्हते.

लेखक: सोमनाथ आवडाजी पगार
मो. ९२७३३५७१५९
          somnathpagar@yahoo.co.in