google.com, pub-3412048091495808, DIRECT, f08c47fec0942fa0 Sahitya Tirtha - My Literature, My Creation साहित्य तीर्थ - माझं साहित्य, माझं लिखाण: 27 जाने, 2025

सोमवार, २७ जानेवारी, २०२५

निसर्गाच्या वैविधतेची अनुभूती- हिरवाई

पुस्तक परिचय *निसर्गाच्या वैविधतेची अनुभूती- हिरवाई* आस्वादक:- सोमनाथ पगार संपर्क क्र.:- ९२७३३५७१५९. वृक्ष वेलींनी असे बहरून यावे
हिरवे स्वप्न नयनी दिसावे चांदण्यात फिरताना मग मी गीत हिरवाईचे गावे (हिरवे स्वप्न) या ओळी आहेत कवयित्री डॉ. शोभा रवींद्र सातभाई यांच्या ‘हिरवाई’ या कवितासंग्रहातील हिरवे स्वप्न या कवितेतील. अलीकडच्या काळात वाढते शहरीकरण तसेच औद्योगिकरणामुळे होणारी वृक्षतोड, त्यामुळे निसर्गाचा होणारा ऱ्हास, परिणामी निसर्गाचं बदललेलं चक्र, यामुळे सततची दुष्काळ सदृश्य परिस्तिथी आणि बरेच काही... असे असले तरी ही परिस्तिथी कायमची अशीच न राहता निच्छित बदलेल हा मनाशी आशावाद आहे. श्रावणसरी बरसून गेल्यावर हिरवाई तर होईलच त्याचबरोबर कळ्यांची फुले होतील, हे नक्की. निसर्गाच्या स्थिती संवेदनशील कवयित्रीच्या मनाला विचार करायला भाग पाडते. हेच खरे! निसर्गाचं वास्तववादी रूप व हिरवाईचं स्वप्न या संग्रहातील कविता वाचकांना दाखविण्यास कवयित्री यशस्वी झाल्या आहे, असे मला या कविता वाचताना वाटून गेले. नदी खळाळून वाहत प्रवाही राहिली तर वाटेत भेटणाऱ्या प्रत्येकाला जीवनदान देते. दैनदिन जीवनात अशा अनेक घटना घडत असतात. त्याकडे व्यापक विचारांनी व उघड्या डोळ्यांनी पाहिलं तर चिंतनशील व्यक्ती आपल्या परीने अर्थ लावत या विश्वाच्या भल्यासाठी काहीतरी करण्याची धडपड करत असते. आहे त्याहून अधिक सकारात्मक व चागले कसे होईल, यासाठी हा प्रयत्न असतो. कवी मनाच्या व्यक्तीही कवितेच्या माध्यमातून जनजागृती तसेच समाज प्रबोधन करत आपला खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करत असते. कवयित्री सहज लिहून जाते, इथे निळ्या भोर आभाळाची डोंगरांना चादर खळखळणाऱ्या सागराला मिळे नद्यांचा पाझर (भारत माझ्या देशा) किंवा निळ्या आकाशी निजे हे सूर्य, चंद्र, तारे होता पहाट जागे होई झाड, वेली हे जग सारे (निळ्या आकाशी) वैश्विक भौगोलिक स्थितीचा विचार केला तर आपल्या भारत भुला निसर्गाची देणगी लाभली आहे. हिरव्यागार वृक्षवल्लीमुळे चारी दिशा सजलेल्या आहेत. उतरेच्या हिमालयाच्या रांगा व काश्मीरसारखे नंदनवन, दक्षिणेकडील नारळाच्या हिरव्या झाडांनी बहरलेले केरळ, पश्चिमेला गुलाबी जयपूर, चहा उत्पादनासाठी प्रसिद्ध असा पूर्वेकडील आसाम अशी समृद्धता आपल्या देशाची शान आहे. इतकेच नव्हे तर निळ्या आभाळातील गृह, तारे, इथली पक्ष्यांची किलबिल हे सारं काही अभिमान वाटावं असंच आहे. या भूतलावरील प्रत्येकाचं व्यक्तीमत्व वेगळं असतं, प्रत्येकाच्या आनंदाच्या संकल्पना वेगळ्या असू शकतात. कवितासुद्धा एक व्यक्त होत आनंद मिळवण्याचं होण्याचं मध्यम असून या व्यक्त होण्यातून निर्मितीचा वेगळाच अद्भुत आनंद मिळत असतो. यासाठी संवेदनशील मन असावं लागतं. या कवयित्रीला असे सृजनशील मन लाभले असल्याने भोवतालीच्या निसर्गातील घडामोडी तसेच वास्तवाला कल्पनाशक्तीच्या जोरावर काव्यात गुंफण्याची क्षमता लाभली आहे. कविता ही उदात्त कला असून कविता म्हणजे भावना आणि विचारांना व्यक्त करण्यासाठी वापरलेला लेखन प्रकार. कवितेत आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे प्रतिबिंब उमटते तेसेच कवितेतून जीवन कळते, समजते आणि उमगतेसुद्धा. पाऊस न पडल्याने व्याकूळ होऊन, आभाळा रे आभाळा गरज तू आता तरी वाट पाहुनी जीवाला आस लागली खरी... शमतील वेदना मातीच्या थेंब थेंब पडुनी अंगावरी दुष्काळाच्या चक्रात जगणं झालंय भारी (आभाळा गरज तू) विकासाच्या नावाखाली झाडांची झालेली कत्तल, अमर्याद कार्बन उत्सर्जन त्यामुळे ऋतुमानात झालेला बदल. परिणामी पावसाची वानवा. पाऊस पडावा म्हणून शब्दाच्या माध्यमातून आर्त हाक काळजाला चिर्र करून जाते. पाऊस पडला तर जमिनीच्या भेगा मिटतील. दुष्काळाचं चक्र सरेल. करपून चाललेलं पिक वाचेल आणि बळीराजा सुखावेल. अशी कवयित्रीला आस आहे. या संग्रहात पानोपानी निसर्ग व हिरवाई बहरलेली कारण कवयित्री पर्यावरणप्रेमी असून वृक्षरोपण व संवर्धन हे त्यांचे जिव्हाळ्याचे विषय असल्याचे जाणवते. डोंगरदऱ्या, वृक्षवल्ली, शेतीमाती यासह निसर्गाचा कानाकोपरा जसे की वसुंधरा, सूर्य, चंद्र, तारे, समुद्र, पशुपक्षी मेघ, आभाळ हे सारे आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर त्यांनी शब्दबद्ध केलेले आहेत. अधिनिक युगात निसर्गाची हिरवाई टिकली तरच भविष्य उज्ज्वल राहील असा जणू संदेशच या कवितांमधून झिरपत आहे. असे मला वाटते. यातूनच, मन हे माझे वेडे, वाऱ्यासंगे बोले झुळझुळणारा वारा हा स्वप्नमंजुरी खोले (पावसात उनाड वारा) किंवा नका तोडू ही झाडे किडा, मुंगी, पक्षी सारे झाडावर घर त्यांचे पडतील ते उघडे (नका तोडू ही झाडे) माणूस आपल्या कुटुंबासाठी घर बांधतो, आपल्या अपत्यांची, माय-बापाची काळजी घेतो, मग किडे, मुंगी पक्षी यांचे जीवन यापेक्षा वेगळे नाही. वृक्षतोड झालीतर त्यांचेही घरटे उध्वस्त होतेच ना? हा रास्त सवाल कवयित्रीने वाचकांपुढे ठेवला आहे. आजकालच्या माणसाचे वागणे पाहून कवयित्री व्यथित झाल्याशिवाय राहत नाही, आजच्या युगात यंत्राबरोबर काम करताना माणूसही जणू यंत्र झाला कलियुगातल्या या माणसातल्या माणुसकीचा अंतच झाला... (माणुसकीला जपा) माणसातल्या माणुसकीचा अंत झाली की काय असे क्षणभर वाटते न वाटते तर लगेच, बीजाने मातीत खोल-खोलवर रुजून दबकत उगी जगावे धरतीच्या उदरात अन्न पाणी घेऊन सामावून जावे (बीजाचे वृक्षात रुपांतर) असा नवनिर्मितीचा आशावाद निर्माण करत त्यांची कविता वाचकांच्या मनात नवचैतन्य निर्माण करते. या संग्रहातील कवितांचा आशय-विषय, त्यांच्यातील भावना अंत:करणाला भिडतात. बऱ्याच रचना या तालबद्ध आहेत. यातील शब्दांना नादमाधुर्य आहे. या रचना प्रत्येकाच्या भावविश्वाशी निगडीत असून मांडलेले विचार वास्तववादी व प्रभावी आहेत. भाषा सहज सोपी विषयाला साजेशी आणि वाचनातून वाचकांना निश्चितच आनंद देणारी आहे. कवयित्री डॉ. शोभा रवींद्र सातभाई यांचा ‘हिरवाई’ हा कवितासंग्रह प्रगती प्रकाशनाने प्रकाशित केलेला असून हा संग्रह नुकताच माझ्या वाचण्यात आला. आजवर या कवयित्रीला व या कवितासंग्रहाला अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त असून सर्वच रचना वाचनीय आहेत. कवी किंवा कवयित्री लिहते याचे कारण आजूबाजूच्या घटनांचा संवेदनशील मनावर होणारा परिणाम. यामुळे मनाची अस्वस्थता, मनातील घुसमट कमी होण्यास मदत होते. कवितेच्या रुपात तेव्हा मनातील वेदनांची ठसठस कमी होऊन भावनांचा निचरा होतो, तेव्हा स्वर्गीय आनंद लाभतो. यातून वाचणाऱ्यालाही आनंद लाभतोच. या कवितासंग्रहास धनंजय गोवर्धने यांनी रेखाटलेले समर्पक आणि बोलके मुखपृष्ठ वाचकाला पाने पालटून कविता वाचायला प्रेरित करते. कवी प्रा. लक्ष्मण महाडिक, यांची समर्पक प्रस्तावना तसेच कवी रवींद्र सुमन मुकुंदराव मालुंजकर व साहित्यिक डॉ. श्यामसुंदर झळके यांच्या शुभेच्छा आणि ज्येष्ठ कवी माजी आमदार नानासाहेब बोरस्ते यांची पाठराखण हे या संग्रहाच्या जमेच्या बाजू आहेत. आपले तीर्थरूप ‘ज्यांच्या आशीर्वादाने माझे काव्य स्फुरले आणि संस्काराने जीवनाचे सूर-तालात बहरले असे माझे आई व दादांच्या चरणी’ अशा शब्दात त्यांनी हा कवितासंग्रह अर्पण केलेला आहे. विविध प्रकारच्या रचनांनी हा संग्रह बहरलेला असून पुन:पुन्हा वाचाव्या अशा या कविता आहेत. एकूण ७५ वाचनीय आणि आशयगर्भ कवितांचा या कवितासंग्रहात समावेश असून ‘हिरवाई’ या कवितासंग्रहात अतिशय वाचनीय, आशयगर्भ कविता वाचायला मिळतात. हा संग्रह वाचकांनी आवर्जून वाचावा, असे मला वाटते. हे सर्व लिहिण्याचे दुसरे कारण म्हणजे मंगळवार, दि. २८ जानेवारी, २०२५ रोजी हुतात्मा स्मारक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, नाशिक येथे गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष माणूसमित्र सुरेश पवार यांनी आयोजित केलेल्या ‘पुस्तकावर बोलू काही...’ या सदरात कवयित्री डॉ. शोभा रवींद्र सातभाई यांच्या ‘हिरवाई’ या कवितासंग्रहावर आधारित ऐसपैस गप्पांच्या कार्यक्रमाची मेजवानी नाशिकमधील रसिकवाचक तसेच साहित्यिकांसाठी उपलब्ध झाली आहे. दि. ५ मार्च, २०२४ ते दि.२८ फेब्रुवारी, २०२५ दरम्यान दर मंगळवारी आणि शुक्रवारी हा उपक्रम संपन्न होणार आहे. अशा प्रकारचा बहुधा हा साहित्य क्षेत्रातील पहिलाच अभिनव उपक्रम असावा. यामध्ये नवोदित तसेच प्रस्थापित साहित्यिकांना व्यक्त होण्यासाठी हक्काचं व्यासपीठ उपलब्ध झालं आहे. याहीपुढे, त्यांची लेखणी अशीच तळपत रहावी. त्यांच्या हातून सर्व प्रकारचे साहित्यिक लिखाण व्हावे, हीच सदिच्छा! सन्मानीय कवयित्री डॉ. शोभा रवींद्र सातभाई मॅडम यांना गिरणा गौरव प्रतिष्ठान आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ या सदरात संपन्न होणाऱ्या व्याख्यानास आभाळभर शुभेच्छा! पुस्तकाचे नाव :- हिरवाई कवयित्री :- डॉ. शोभा रवींद्र सातभाई, संवाद क्र. ९०११०५९७५७ प्रकाशक :- प्रगती प्रकाशन, नाशिक प्रस्तावना :- कवी प्रा. लक्ष्मण महाडिक शुभेच्छा :- कवी रवींद्र सुमन मुकुंदराव मालुंजकर, साहित्यिक डॉ. श्यामसुंदर झळके पाठराखण :- ज्येष्ठ कवी माजी आमदार नानासाहेब बोरस्ते स्वागत मूल्य :- ₹ १२०/- मात्र (सवलतमूल्य, टपाल खर्च आणि अधिक माहितीसाठी कृपया, संबंधितांशी संपर्क साधावा.) *आस्वादक: सोमनाथ आवडाजी पगार* (सॅप), संपर्क क्र.:- ९२७३३५७१५९, Email:- somnathpagar@yahoo.co.in महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेत प्रकाशनार्थ अनुदानप्राप्त साहित्यिक (गीतकार/ कवी, कथा, पटकथा, संवाद लेखक), युट्युबर, ब्लॉगर, टेक्नोक्रॅट, ऑनलाईन डॉक्युमेंट्स ऍडव्हायझर, इंग्लिश लँग्वेज ट्रेनर.