कोरोना हे नाव फक्त उच्चारले तरी अंगावर काटे येतात. गेले काही दिवस जगभर धुमाकूळ घालणाऱ्या या व्हायरसचा चीनमधील वुहान शहरात उगम झाला. सुरवातीला फक्त वुहानमध्ये प्रादुर्भाव असणाऱ्या या विषाणूने सर्व जग आपल्या विळख्यात घेतले आहे. जगभर लाखो लोकांना संसर्ग झाला असून हजारो लोकं मृत्युमुखी पडले आहेत.
उपाययोजना म्हणून कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शाळा, महाविद्यालयांना सुट्या देऊन परीक्षा रद्द करण्यात आल्या. त्यानंतर भारताचे पंतप्रधान आदरनीय नरेंद्र मोदीजींनी रविवार दि. २२ मार्च २०२० रोजी सकाळी ७ वाजेपासून रात्री ९ वाजेपर्यंत जनता कर्फ्यु अर्थात जनता संचारबंदीचे आवाहन केले. सर्वांनी मोठ्या उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. मात्र त्याच दिवशी सायंकाळी ५ वा आपापल्या घरी, बाल्कनीत, दरवाजात टाळ्या वाजवत, टाळ, घंटी वाजवत कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी दिनरात कोरोना बाधितांवर उपचार करणारे डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी, अत्यावश्यक उपाय योजना करणारे प्रशासन, अधिकारी तसेच इतर सर्व कर्मचाऱ्यांप्रती आदर व्यक्त करण्याचे आवाहन केल्याप्रमाणे जनतेने उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. मात्र काही उत्साही लोकांनी गर्दी केली. मिरवणूक काढली. अनेक लोकांनी एकत्र येत या घटनेला उत्सवाचे स्वरूप दिले. हि घटना निश्चितच लाजिरवाणी आहे. एकत्र येत गर्दी करणे म्हणजे कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावास आयतेच आमंत्रण देण्यासारखे आहे.
त्यानंतर माननीय पंतप्रधानानी दि. २५ मार्च २०२० पासून पुढील एकवीस दिवस देशभर लॉकडाऊनची घोषणा केली. कोरोना व्हायरसला अटकाव करणे, संसर्गाची साखळी खंडित करणे, पर्यायाने या व्हायरसचा संसर्ग आपल्या देशवाशीयांना होऊ नये. यादरम्यान जनतेने आपापल्या घरात आहे तेथेच राहावे. हाच उद्देश होता.
लॉकडाऊन जाहीर होताच लोकांनी घराबाहेर पडून अत्यावश्यक वस्तूंचा भरणा करण्यास सुरवात केली. परिणामी किराणा दुकाने, भाजी बजार आदी ठिकाणी गर्दी वाढली. लोकांनी अत्यावश्यक वस्तूंचा साठा केला तर दुकानांमध्ये वस्तूंच्या किंमती वाढल्याचे दिसून आले.
दुकानांमध्ये गर्दीच्या ठिकाणी लोकं मास्क किंवा रुमाल तोंडावर न बांधता बेफिकिरपणे संचार करतांना दिसत होती. काही महाभाग तर अंतर ठेवून उभं राहायला सांगणाऱ्याशी अथवा मास्क बांधायला लावणाऱ्यांशी हुज्जत घालायचे. लोकांनी घरात सुरक्षित राहणे ऐवजी शतपावलीला जाणे, खरेदी करण्यास बाहेर पडणे. यास प्राधान्य दिल्याचे दिसत होते
जनतेला अत्यावश्यक सेवा पुरवण्याच्या नावाखाली काही विक्रेते फळे, भाजीपाला गल्ली बोळात तोंडाला रुमाल न बांधता किंवा मास्क न बांधता विकत फिरतांना दिसू लागले. नागरिकही बिनदिक्कतपणे कुठलीही सुरक्षितता न बाळगता खरेदी करत होती. 'आमच्याकडे कोरोना नाही, आम्हाला काही होणार नाही'. अशा वलग्ना सहज ऐकायला मिळे. परदेशातून आलेले किंवा क्वारंटाईन केलेले लोकं प्रशासनाच्या आदेशाला न जुमानता चोरून लपून बस किंवा रस्त्यावर दिसून आले. काही जागरूक नागरिकांनी त्यांना पकडूनही दिले.
वारंवार सांगूनही काही ऐकत नसणाऱ्या माथेफिरू अतिशहाण्या लोकांना पोलिसांना दंडुक्यांनी प्रसाद दयावा लागला. जरी पोलिसांना लोकांनी नावं ठेवले तरी सुद्धा काही मूर्खांना सरळ करण्यासाठी दंडुके हाच एकमेव उपाय आहे. हेही तितकंच सत्य आहे.
रोजगार नसल्याने बेरोजगार गावाकडे परतू लागल्याने त्यांना ठिक ठिकाणी अडवले गेले. गरीब, भिकारी यांचे हाल तर वर्णन करू शकत नाही. त्याही कठीण परिस्थितीत काही दानशूर, काही सेवाभावी संस्था व पोलिसांनी त्यांना अन्न पाणी पुरवले. पशु, पक्षी तर अन्न पाण्यासाठी सैरभैर झाल्याचे दिसले. अशा या बिकट समयीसुद्धा कुठेही थुकणारे, फिरणारे होतेच. या लोकांना साक्षात ब्रम्हदेव सांगायला आले तरी ते मुळीच ऐकणार नाहीत.
सर्वात महत्त्वाचा मुद्दा नमूद करावा वाटतो की, जगभरातील देशी, विदेशी नागरिकांची स्थिती जैसे थे ठेवायला हवी होती. यावर पर्याय म्हणजे आपल्या देशातील विदेशींची काळजी आपण घेतली असती. तर परदेशातील आपल्या नागरिकांची काळजी तेथील प्रशासनाने घेतली असती. त्यामुळे परदेशातून येणाऱ्या कोरोना बाधित प्रवाशांकडून होणारा कोरोनाचा प्रादुर्भाव टाळता आला असता. मात्र तसे न झाल्याने प्रादुर्भाव वाढल्याने नाहक स्थानिक गरीब जनतेला त्रास सहन करावा लागला. हेही तेवढेच सत्य आहे.
सर्वांनी यापुढे एकविचाराने प्रशासनाचे निर्देश पाळूया. घरातच थांबून कोरोनाची साखळी खंडित करूया. त्यामुळे कोरोनाच्या प्रादुर्भावावर मर्यादा येऊन कोरोना व्हायरसचे समूळ उच्चाटन होणे शक्य होईल. हिच सर्वांना नम्र विनंती.
सोमनाथ आवडाजी पगार,