google.com, pub-3412048091495808, DIRECT, f08c47fec0942fa0 Sahitya Tirtha - My Literature, My Creation साहित्य तीर्थ - माझं साहित्य, माझं लिखाण: 31 ऑक्टो, 2024

गुरुवार, ३१ ऑक्टोबर, २०२४

आठवणींची पाने – आठवणींचा धांडोळा

II साहित्य तीर्थ II *आठवणींची पाने – आठवणींचा धांडोळा
* सोमनाथ पगार संपर्क क्र.:- ९२७३३५७१५९. जन्म झाल्यावर कळायला लागल्यापासून जीवनाच्या प्रवासात थांब्याथांब्यावर भेटलेली माणसं व आलेले बरेवाईट अनुभव माणसाला शहाणे करतात, त्यामुळे भविष्याचा वेध घेत अचूक वाटचाल करण्यासठी निच्छितच मदत होते. हे नक्की... हीच शिदोरी पुढे आयुष्यभर पुरते. आणि हो, ज्याप्रमाणे पाण्याची टाकी भरली कि ओव्हरफ्लो हा ठरलेला असतो, त्याचप्रमाणे माणसाच्या मनातील विचारांचे असते. ते साचत राहिले तर माणूस अस्वस्थ होतो. त्यामुळे मनोरंजन हा जरी मुख्य हेतू असला तरीही भावनांना वाट मोकळी करून द्यावी म्हणून कदाचित पूर्वी कथा, कविता सांगितल्या जात असाव्यात. असे वाटते. हीच परंपरा आजतागायत सुरु असावी. आत्मचरित्र हा त्याचाच एक भाग असावा, असे मला वाटते. भोगाव्या लागलेल्या वेदना, परिस्थितीशी करावे लागलेले दोन हात. यातून घडत गेलेले जीवन. हा सारा अनुभव कुणाला तरी लिखित स्वरुपात सांगितल्याने मन शांत होऊन आनंद मिळतो. कारण प्रत्येकवेळी आपलं ऐकायला हक्काचं कुणी असेलच याची शास्वती नसते. त्यातूनच डॉ. प्रशांत आंबरे यांनी लिहलेल्या ‘आठवणींची पाने’ अशा आत्मचरित्राचे लिखाण झाले आसवे. वैद्यकीय पेशातील, नाशिक येथील कवी, लेखक असलेले डॉ. प्रशांत आंबरे हे एक ख्यातनाम डॉक्टर असूनही त्यांच्यातील लेखक त्यांना अस्वस्थ केल्याशिवाय राहत नाही. त्यांच्या ‘आठवणींची पाने’ या आत्मचरित्रावर गिरणा गौरव प्रतिष्टान आयोजित पुस्तकावर बोलू काही या उपक्रमात व्याख्यान संपन्न होणार असल्याने रसिक वाचकांशी हितगुज साधण्यासाठी हा प्रपंच. आईचे श्रद्धास्थान समनापूरचा गणपती, पोहेगावच्या वस्तीवरील दिवस, गणोऱ्यातील दिवस, शेतीवरचे दिवस, गणोऱ्याच्या अंबाबाईची जत्रा, आजोळचे दिवस, ग्रामीण भागातील मुलांच्या अडचणी, गुणे शास्त्री आयुर्वेद कोलेजला प्रवेश, नगर सोडतांना, मुबईत काही दिवस, वयाच्या ५३व्या वर्षी एम,बी.ए. चा विद्यार्थी, वाचलेले पहिले पुस्तक, माजी आमदार, कै. के. बी. देशमुख (दादा), सहकार क्षेत्रात सहकारमहर्षी कै. पंढरीनाथ आंबरे (दादा) याचं योगदान, लोकनेते कै. के. बी. रोहमारे (दादा), माजी मंत्री कै. बी. जे. खताळ पाटील अशा एकूण सोळा प्रकरणामधून त्यांनी या आत्मचरित्रात त्यांचा जीवनपट उलगडून दाखविला आहे. चित्रकार भूषण बिरारी यांनी अत्यंत सुबक व समर्पक असे मुखपृष्ठ रेखाटलेले असून गृह, तारे सामावलेली विस्तीर्ण आकाशगंगा दिसते आहे, पृथ्वीच्या गोलावर आपल्या अस्तित्वाच्या खुणा टिकवत वृक्षवेलींच्या गराड्यात महत्वाचा भाग असलेला माणूस काहीतरी विचार करतो आहे, सांगू पाहतो आहे. मलपृष्ठावरील उगवता सूर्य हा या भूतलावरील भरारी घेऊ पाहणाऱ्या माणसाचे प्रतिनिधीत्व करत असावा असे क्षणभर वाटल्याशिवाय राहत नाही. तसेच ज्येष्ठ विज्ञान लेखक व निवृत्त प्राचार्य डॉ. किशोर पवार यांची प्रस्तावना या आत्मचरित्राची जमेची बाजू म्हणावी लागेल. आपले आईवडील मा. श्री. विश्वनाथ लक्ष्मण आंबरे, कै. उर्मिला विश्वनाथ आंबरे, भाऊ कै. प्रदीप विश्वनाथ आंबरे यांच्या चरणी लेखकाने आपले हे आत्मचरित्र अर्पण केले आहे. आपल्या लेखणीद्वारे समाजाप्रती संवेदना अधोरेखित करणारे वैद्यकीय पेशातील एक संवेदनशील असे हे साहित्यिक असून त्यांच्या लिखाणात गत काळातील आठवांचा दरवळ व्यापलेला आहे. मनात रुंजी घालणाऱ्या अशाच ‘आठवणींचा धांडोळा’ आत्मचरित्र रूपाने आपल्या पुस्तकात लेखकाने वाचकांसाठी मांडलेला आहे. गाव-खेड्यात शिक्षण घेत लहानाचे मोठे झाल्यावर आजकाल तरुण, तरुणी सर्रास शहरची वाट धरतात, कारण खेड्यापेक्षा शहरात उपलब्ध असलेली सुखसोयीयुक्त आधुनिक जीवनशैली, उत्तम शिक्षण व्यवस्था, दर्जेदार राहणीमान, चविष्ट तसेच उत्तम खानपान, चांगली दळणवळणाची साधने याचसोबत सातत्याने होत असलेला विकास त्यामुळे उपलब्ध रोजगाराच्या संधी, तसेच झपाट्याने होत असलेले औद्योगिकीकरणामुळे सहज रोजीरोटीचा प्रश्न मिटत असल्याने हा बेरोगारांचा लोंढा सहज शहराकडे आकर्षित होतो. याउलट ग्रामीण भागात या सर्व सुविधांचा अभाव असून काबाडकष्ट व संघर्ष हा तेथील जनतेच्या पाचवीला पुजलेला असतो. अशा परिस्थितीशी दोन हात करत डॉ. प्रशांत आंबरे यांच्या सारखा एखादा ग्रामीण भागातील तरुण उच्चविद्याविभूषित होत शहराकडे धाव घेतो, त्यात नवल काय? लेखकाचे आजोबा सहकारमहर्षी कै. पंढरीनाथ जिजाबा आंबरे दादांनी पुण्यात उभं केलेलं डाळीच्या व्यापाराचं साम्राज्य भीषण आगीत जळून भस्मसात झाल्यावर लेखकाचे आईवडील आपल्या मुळगावी म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील गणोरे गावी परत येतात आणि इथूनच खरा जीवनाचा संघर्ष सुरु होतो. तो पुढे लेखकाने डॉक्टर, वकील, व्यवस्थापन इत्यादी पदव्या घेत जीवनात स्थिरस्थावर होईपर्यंत सुरु राहतो. लेखकाच्या आईवडिलांचे कष्ट, आपल्या मुलांनी शिक्षण घ्यावं, मोठं व्हावं, यासाठी त्यांची तळमळ, संघर्ष, काबाडकष्ट तसेच लेखकाने अशाही संघर्षातून आपल्या जिद्द व चिकाटीच्या जोरावर आपल्या जीवनात मिळवलेले यश याला तोड नाही. त्यांनी शिक्षणाचा ध्यास सुरूच ठेवला, ते डॉक्टर झाल्यावर वैद्यकीय व्यवसाय सांभाळत पुढे त्यांनी एल.एल.बी. चे शिक्षण घेऊन कायद्याचे ज्ञानही त्यांनी घेतले. एवढ्यावरच ते न थांबता वयाच्या त्रेपान्नाव्या वर्षी त्यांनी एम.बी.ए. ही व्यवस्थापन क्षेत्रातील पद्व्युतर पदवी मिळवली. जसे कि वर नमूद केले आहे, लेखकाच्या जीवनातील संघर्षाची सुरवात ही आंबरे दादांनी पुण्यात उभं केलेलं डाळीच्या व्यापाराचं साम्राज्य भीषण आगीत जळून खाक होऊन झाली होती. पुस्तक वाचतांना एखादा चलचित्रपट पहावा असे चित्र वाचकाच्या मनपटलावर उमटत जाते. ग्रामीण जीवनातील आठवणींना उजाळा देत गरिबीची, हलाखीची परिस्थिती असल्याने कधीकधी पोटाला अन्नही मिळत नसे. त्यांची आई म्हणजे काकी व वडील म्हणजे काका यांचे कष्ट, त्यांनी गाळलेला घाम, दोन वेलची भ्रांत मिटवण्यासाठी गावोगाव करावं लागलेलं स्थलांतर. यात ओघानेच ग्रामीण जीवनाचे चित्रण आले, जसे कि, तिकीट काढणे शक्य नसल्याने कनातीखालून प्रवेश मिळवत कांताबाई सातारकर यांचा गावात आलेला तमाशा पाहणे, शिक्षण घेण्यासाठी करावी लागलेली पायपीठ, पाट तसेच विहिरीत पोहणे, झालेले अपघात, स्पर्धांमध्ये मिळवलेले बक्षिसे, अंगावर बोंबलाची भाजी सांडून भाजणे, पुढे दहावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावने, संगमनेरच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेणे, गावाकडील सणवार, नाटकामध्ये केलेला अभिनय व मिळालेले पुरस्कार, एसटीवर येणारा जेवणाचा डब्बा, अहमदनगर येथील आयुर्वेदिक महाविद्यालयातील प्रवेश घेवून डॉक्टर होणे, होस्टेलचे जीवन तसेच त्यांच्या वैद्यकीय पेशातील अनेक अनुभव त्यांनी वर्णन केलेले आहेत. अशा लेखकाने मनात जपलेल्या अनेक आठवणी या आत्मचरित्रात वाचकाला वाचायला मिळतात. हे सारे काही आपल्याच जीवनात किंवा सभोवताली घडत आसवे असे क्षणभर वाटून जाते. आपल्या जीवन प्रवासात अनेक दिग्गज राजकीय व्यक्तीचा सहवास त्यांना लाभला असून त्यात आमदार, खासदार, समाजसेवक तसेच मंत्री यांचा समावेश आहे. या सर्व आठवणी या पुस्तकात तपशीलवार आढळतात. माजी आमदार, कै. के. बी. देशमुख (दादा), सहकार क्षेत्रात सहकारमहर्षी कै. पंढरीनाथ आंबरे (दादा), लोकनेते कै. के. बी. रोहमारे (दादा), माजी मंत्री कै. बी. जे. खताळ पाटील इत्यादी मान्यवरांचा उल्लेख व आठवणी या पुस्तकात आढळतात. ‘आठवणींचे पाने’ असे समर्पक व आगळेवेगळे शीर्षक या आत्मचरित्राला देण्यात आले असून संघर्ष करत स्वत:च्या पायावर उभे राहिलेल्या प्रत्येक वाचकाला स्वतःचं वाटावं असं हे पुस्तक आहे. डॉ. प्रशांत आंबरे यांना यापूर्वी अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झालेले असून त्यांचे समाजतरंग हा कवितासंग्रह, मातु:श्री हे आईविषयी लिहलेले पुस्तक, मधुमेह हे आरोग्य विषयक पुस्तक व आठवणींचे पाने अशी ग्रंथसंपदा प्रकशित असून लवकरच त्यांचा ‘सत्यधारा’ हा कवितासंग्रह प्रकशित होत आहे. हे सर्व लिहिण्याचे कारण म्हणजे गुरुवार, दि. ३१ ऑक्टोबर, २०२४ रोजी हुतात्मा स्मारक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, नाशिक येथे गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष माणूसमित्र सुरेश पवार यांनी आयोजित केलेल्या ‘पुस्तकावर बोलू काही...’ या सदरात कवी/ लेखक डॉ. प्रशांत आंबरे यांच्या ‘आठवणींची पाने’ या आत्मचरित्रावर आधारित ऐसपैस गप्पांच्या कार्यक्रमाची मेजवानी नाशिकमधील रसिकवाचक तसेच साहित्यिकांसाठी उपलब्ध झाली आहे. दि. ५ मार्च, २०२४ ते दि.२८ फेब्रुवारी, २०२५ दरम्यान दर मंगळवारी आणि शुक्रवारी हा उपक्रम संपन्न होणार आहे. अशा प्रकारचा बहुधा हा साहित्य क्षेत्रातील पहिलाच अभिनव उपक्रम असावा. यामध्ये नवोदित तसेच प्रस्थापित साहित्यिकांना व्यक्त होण्यासाठी हक्काचं व्यासपीठ उपलब्ध झालं आहे. याहीपुढे, त्यांची लेखणी अशीच तळपत रहावी. त्यांच्या हातून सर्व प्रकारचे साहित्यिक लिखाण व्हावे, हीच सदिच्छा! डॉ. प्रशांत आंबरे सरांना गिरणा गौरव प्रतिष्ठान आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ या सदरात संपन्न होणाऱ्या व्याख्यानास आभाळभर शुभेच्छा! पुस्तकाचे नाव :- आठवणींचे पाने लेखक :- डॉ. प्रशांत आंबरे, संवाद क्र. ९८२३०४९३६६ प्रस्तावना :- प्राचार्य डॉ. किशोर पवार स्वागत मूल्य :- ₹ २००/- मात्र (सवलतमूल्य, टपाल खर्च आणि अधिक माहितीसाठी कृपया, संबंधितांशी संपर्क साधावा.) सोमनाथ आवडाजी पगार (सॅप) (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेत प्रकाशनार्थ अनुदान प्राप्त साहित्यिक) संपर्क क्र.:- ९२७३३५७१५९, Email:- somnathpagar@yahoo.co.in गीतकार/ कवी, कथा, पटकथा, संवाद लेखक, युसमीक्षक, ट्युबर, ब्लॉगर, टेक्नोक्रॅट, ऑनलाईन डॉक्युमेंट्स ऍडव्हायझर, इंग्लिश लँग्वेज ट्रेनर. @highlight Following Amazon India Following Love Somnath Pagar #highlightseveryone #marathipoems #followers #pandharpur #highlights