google.com, pub-3412048091495808, DIRECT, f08c47fec0942fa0 Sahitya Tirtha - My Literature, My Creation साहित्य तीर्थ - माझं साहित्य, माझं लिखाण: जगण्याची कविता- चिंतनशील आशावादाची कविता

सोमवार, २३ सप्टेंबर, २०२४

जगण्याची कविता- चिंतनशील आशावादाची कविता

जगण्याची कविता- चिंतनशील आशावादाची कविता
सोमनाथ पगार संपर्क क्र.:- ९२७३३५७१५९. कविता असते ‘अनुभवाची शिदोरी, करपलेली भाकरी, परिस्थितीची चाकरी, सुखस्वप्नांची टोकरी’ असे मी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अनुदान प्राप्त तसेच अनघा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या माझ्या ‘वेदनेचे काटे’ या कवितासंग्रहाच्या प्रस्तावनेत नमूद केले असल्याचे शैक्षणिक क्षेत्रातील मोठं नाव शंकरसुत उर्फ प्रा. डॉ यशवंत पाटील सरांच्या ‘जगण्याची कविता’ हा पुणे येथील संवेदना प्रकाशनाने प्रकाशित केलेला कवितासंग्रह हाती पडताच मला आठवले. असे म्हटले जाते कि, साहित्य हा समाजाचा आरसा असतो. त्यातल्या त्यात कविता हे कमी शब्दात जास्त आशय व्यक्त करण्याचे भावनाशील साधन असून इथे प्रत्येकाला व्यक्त व्हावे असे वाटत असते म्हणूनच तर माणसा-माणसांतील संवाद हा नियमितपणे सुरु असतो. व्यक्त होण्याची माध्यमे वेगळी असू शकतात. एखादा चित्रकार हा आपल्या चित्रांच्या माध्यामतून आपले विचार मांडतो तर साहित्यिक हा शब्दरुपी कुंचल्याद्वारे आपले भावनाविश्व मांडत असतो. कविता ही खळखळून वाहणाऱ्या नदीसमान असते असे म्हटले तरी अतिशयोक्ती ठरणार नाही कारण ज्याप्रमाणे नदी आपल्या आजूबाजूचा परिसर समृद्ध करत आपले मार्गक्रमण करत असते त्याचप्रमाणे कविता ही जनमानसाला आनंद देत समृद्ध करण्याचे काम अव्याहतपणे करत असते. कविता म्हणजे अभिव्यक्ती... जमेल तसे लिहणे महत्वाचे असून कविता कशी लिहावी, याबाबत कवीला स्वतंत्र्य असते. मुक्तपणे व्यक्त होणे महत्वाचे असते, हेच खरे, कारण कविता ही कवीच्या अंतर्मनातून आलेली साद असते. प्रा. डॉ. यशवंत पाटील सर हे साहित्य तसेच शैक्षणिक क्षेत्रातील एक मोठे नाव असून असंख्य वाचक तसेच विद्यार्थी वर्गासाठी ते मार्गदर्शक तथा श्रद्धास्थानी आहे. सुरवातीलाच नमूद केल्याप्रमाणे कविता अनुभवांची शिदोरी असते. त्यामुळे कविता ठरवून लिहता येत नाही. तशा कवितेत भावनिक ओढ न जाणवता कृतीमता जाणवते. हे या ठिकाणी या कविता वाचून मला प्रकर्षाने नमूद करावेसे वाटले कारण या कवितासंग्रहातील कविता ह्या समृद्ध व चिंतनशील आशावादाची कविता आहेत. ‘जगण्याची कविता’ या शीर्षक कवितेतील काही ओळी पाहू, विवेकाने जगायचं की अविवेकाने हे ज्याचे त्याने विचारपूर्वक ठरवावे ... जगणं एक नव्हे बहु सुरमयी कविता व्हावं आशय, अर्थ. ताल, सुराने संत्पुत असावे. (पृष्ठ क्र.२०,२१-जगण्याची कविता) योग्य वेळी शहाणपण येणे गरजेचे असून उशिरा आलेले शहाणपण काही कामाचे नसते. का व कशासाठी जगायचे? एकसुरी, रडत, आदळत इतरांना दु:खी करत यातना देत जगण्यापेक्षा फुलासम होऊन भवताल सुगंधी करण्यासाठी संयमी, विवेकी, आस्वादक, षढरिपू विरहीत न खचता, न थकता मिळालेले आयुष्य हे प्रसाद समजून जीवन सार्थकी लावण्याचा विवेकी प्रयत्न करावा. हे माणसाने वेळीच ठरवले पाहिजे. असा आशावाद या रचनेतून कवीने वाचकांना दिला आहे. अध्यात्म, चिंतन, निसर्ग, शेती या अशा विविध आशय-विषय असलेल्या कविता या कविता संग्रहात वाचायला मिळतात. एकूणच या कविता अनुभवातून समृद्ध झालेल्या चिंतनशील आहेत. सुखमय जीवनासाठी आशेचे किरण शोधण्याचा प्रयत्न झाला असल्याचे या कवितासंग्रहातून जाणवल्याशिवाय राहत नाही. उच्च विद्या विभूषित, एक विद्यार्थी प्रिय शिक्षक, बहुश्रुत वक्ता याचबरोबर अध्यात्माची जाण असणारे हे व्यक्तिमत्व आहे. माणसाचे जसे आचार विचार असतात तसेच भावविश्व त्या व्यक्तीच्या लेखणीतून झिरपते, हेच खरे. इंद्रधनू या कवितेतील खालील ओळी वानगीदाखल पाहू, हेक्केखोर हट्टी विचारसरणी नसावी आचार-विचारात ‘विनयशीलता’ असावी (पृष्ठ क्र.८- इंद्रधनू) किंवा क्रोधाने दुर्योधन संपला संयमाने अर्जुन जिंकला राग, संयमाने रामायण-महाभारत (पृष्ठ क्र.३८- राग आल्यावर) समाजात बऱ्याच वाईट घटना केवळ राग अनावर झाल्याने, संयम न राहिल्याने घडल्या असल्याचे आपण पाहतो. थोडं थांबून नमतं घेतलं तर सर्व काही व्यवस्थित होऊ शकते. रागाचे मूळ हे अविचार असल्याचे कवीचे योग्य असे आकलन आहे. आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली कि जगणे असह्य होते. आलेले अनुभव व त्यातूने आलेले शहाणपण, आजूबाजूला घडणाऱ्या घटना यातून व्यक्ती घडत जाते. मनातील प्रश्नांची उत्तरे कवी शोधायचा प्रयत्न करत असतो. त्यासाठी कविता मदतीला धावून येतात, परिणामी जीवन सुकर व्हायला मदतच होते. सर एक विद्यार्थी प्रिय शिक्षक असल्याने आजचा विद्यार्थी पाहून ते व्यथित होतात. आजच्या या आधुनिक विज्ञान युगातसुद्धा अंधश्रद्धा, कर्मकांड पाहू कवी अस्वस्थ झाल्याशिवाय राहत नाही. अंधश्रद्धा या कवितेतील ओळी हेच तर अधोरेखित करतात, मठ, मंदिरांची प्रचंड संख्या शुभ-अशुभाचा हलकल्लोळ विज्ञान- संशोधन आहे मर्यादित मुहर्त, विज्ञानाचा काय ताळमेळ ? (पृष्ठ क्र.४२- अंधश्रद्धा) एकविसाव्या शतकातही जन्मलेला बालकाला टिके लावणे, लिंबू-मिरची बांधणे, बुवा-बाबांना भजने, पूजने, पत्रिका-कुंडल्या पाहणे, लग्न जमविणे. हे सर्व आजच्या आधुनिक विज्ञानवादी युगातही सर्हास चालू असल्याने अंधश्रद्धेच्या आहारी गेलेला समाज पाहून कवीला वाईट वाटते. शकडो पुस्तके वाचूनही जे समजणार नाही ते या बोटावर मोजण्या इतपत ओळी वाचून मनाला भावून जाते. किती गहन अर्थ या ओळींमध्ये दडलेला आहे ? सत्यम, शिवम, सुंदरम या तत्वाशी बांधिलकीचा जागर या कविता वाचतांना आढळतो. त्यामुळेच जे-जे चांगले आहे ते देण्याचा कवीचा प्रामाणिक प्रयत्न आहे. तथापि, आजकाल खेड्यांतून शहरात युवकांचा वाहणारा लोंढा त्यामुळे अक्राळविक्राळ वाढलेली शहरे, याचबरोबर औद्योगिकीकरणामुळे वाढते जल, वायू, ध्वनी प्रदूषण पाहून कवी आपल्या भावनांना शब्दांच्या माध्यमातून वाट मोकळी करून देत असल्याचे लक्षात येते, प्रदूषित श्वास कोंडलेली नगरे अक्राळविक्राळ पसरलेली उपनगरे वाढते तापमान, नासलेल्या नद्या दाटीवाटीत उभी घरेदारे (पृष्ठ क्र.९०- दुष्परिणाम) कोंडवाड्यात जनावरे असतात त्याप्रमाणे दाटीवाटीने जीव मुठीत धरून राहणारी माणसे, दारासमोर वाहणारी गटारे, या जीवघेण्या घाणीच्या विळख्यात आयुष्य घालविणारे नागरिक पाहिल्यावर हा सारा दुष्परिणाम शहरीकरणाचा असून ‘खेड्याकडे चला’ असा मूलमंत्र कवीने वाचकांना दिला आहे. ‘जगण्याची कविता’ असे आगळेवेगळे नाव या कवितासंग्रहाला देण्यात आले आहे. कविता लिहण्याची कला कवीला निसर्गदत्त लाभलेली असते. आपल्या कल्पना शक्तीच्या जोरावर कवी आपल्याला आलेले अनुभव उत्कठपणे मांडत आपल्या मनातील भावविश्व निर्माण करत असतो. पुणे येथील संवेदना प्रकाशनाने हा संग्रह प्रकाशित केला असून सामान्य माणसाला वाचता- वाचता विचार करायला प्रवृत्त करणाऱ्या या कवितासंग्रहातील एकूण १०७ आशयगर्भ कविता वाचकाच्या मनाला आनंदी करतात. ‘जगण्याची कविता’ या कवितासंग्रहात अतिशय वाचनीय, आशयगर्भ कविता असल्याने तसेच वैचारिक अधिष्ठान असलेल्या या कविता वाचकांना अंतर्मुख करायला निश्चितच प्रेरित करतात. त्यामुळे, हा संग्रह वाचकांनी वाचावा, असे मला वाटते. कविता तसा सर्व प्रकारच्या वाचकांना आवडणारा साहित्य प्रकार असून रोजच्या भाषेपेक्षा वेगळी भाषा कवितेची असते. डॉ. यशवंत पाटील सर हे शैक्षणिक तसेच साहित्यिक क्षेत्रातलं परिचित असलेलं नाव असून आजवर त्यांनी शैक्षणिक, अध्यात्मिक, वैचारिक, प्रौढ, ललित तसेच कविता अशा विविध साहित्य प्रकारात अनेक पुस्तके लिहलेली आहेत. ‘जगण्याची कविता’ हा त्यांचा दुसरा कवितासंग्रह असून यापूर्वी ‘कवितेच्या पारंब्या’ हा त्यांचा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झालेला आहे. या कवितासंग्रहास चित्रकार सतीश भावसार यांनी रेखाटलेले उत्कृष्ट मुखपृष्ठ वाचकाला पाने पालटून कविता वाचायला प्रेरित करते. तसेच ज्येष्ठ साहित्यिक सतीश सोळांकूरकर यांची समर्पक प्रस्थावना, त्याचप्रमाणे आकाशवाणीमुळे सर्वांच्याच परिचयाचे असे ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कोळगावकर यांची पाठराखण यामुळे या कवितासंग्रहाचा एकूण आवाका सहज लक्षात येतो. ‘लोकशाही संविधानावर, कालसुसंगत जगण्यावर, चिरंतन मानवी मुल्यांवर, निसर्गावर, सुसंस्कारावर, आणि मराठी साहित्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या सर्व रसिक, वाचक, आस्वादकांस सदर कवितासंग्रह त्यांनी सविनय अर्पण केलेला आहे.’ याहीपुढे, डॉ. यशवंत पाटील सरांची लेखणी अशीच तळपत रहावी. त्यांच्या हातून सर्व प्रकारचे साहित्यिक लिखाण होत राहावे, हीच सदिच्छा! पुस्तकाचे नाव :- जगण्याची कविता ISBN :- 978-81-19737-30-7 कवी :- शंकरसुत उर्फ प्रा. डॉ. यशवंत पाटील , संवाद क्र. ९८९०६१५६४९ प्रकाशक :- संवेदना प्रकाशन, पुणे प्रस्तावना :- सतीश सोळांकूरकर पाठराखण :- उत्तम कोळगावकर स्वागत मूल्य :- ₹ २५०/- मात्र (सवलतमूल्य, टपाल खर्च आणि अधिक माहितीसाठी कृपया, संबंधितांशी संपर्क साधावा.) सोमनाथ आवडाजी पगार (सॅप) (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेत प्रकाशनार्थ अनुदान प्राप्त साहित्यिक) संपर्क क्र.:- ९२७३३५७१५९, Email:- somnathpagar@yahoo.co.in गीतकार/ कवी, कथा, पटकथा, संवाद लेखक, समीक्षक, ट्युबर, ब्लॉगर, टेक्नोक्रॅट,, इंग्लिश लँग्वेज ट्रेनर, ऑनलाईन डॉक्युमेंट्स ऍडव्हायझर.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: