google.com, pub-3412048091495808, DIRECT, f08c47fec0942fa0 Sahitya Tirtha - My Literature, My Creation साहित्य तीर्थ - माझं साहित्य, माझं लिखाण: गुलमोहराचं कुंकू- फुलणारा कवितेचा मळा

शुक्रवार, १७ मे, २०२४

गुलमोहराचं कुंकू- फुलणारा कवितेचा मळा

https://www.facebook.com/share/p/Q4AShYgc1FZvXmYy/?mibextid=qi2Omg ll *साहित्य तीर्थ* ll पुस्तक परिचय *गुलमोहराचं कुकू – फुलणारा कवितेचा मळा* ! *सोमनाथ पगार* संपर्क क्र.:- ९२७३३५७१५९. *आता पावसा मातीशी कर लगीन साजरं* *गुलमोहराचं कुकू तिच्या भांगामधी भर* ‘जे न देखे रवी, ते देखे कवी’ असे कधी आदराने तर कधी उपहासाने म्हटले गेल्याचे आपण बऱ्याचदा ऐकतो. ज्या गोष्टी कुणाच्याही दृष्टीस पडणार नाहीत किंवा सुर्यालाही दिसत नाही त्या गोष्टी कवी आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर सहज वर्णन करत असतो. कवीला दिव्य दृष्टीची देणगी जन्मताच लाभलेली असून कल्पनेच्या जोरावर या जगाच्या पलीकडच्या गोष्टीही त्यांना दिसू शकतात. असे समजले जाते. साहित्यिक क्षेत्रात असे अनेक प्रज्ञावंत साहित्यिक आपले योगदान देण्याचं प्रयत्न करत ते भूत, भविष्य आणि वर्तमानचा वेध आपल्या लेखणीच्या माध्यमातून घेत असतात. हे सर्व लिहण्याचे/ आठवण्याचे कारण म्हणजे नाशिकमधील गोड गळ्याचा कवी तसेच विद्यार्थीप्रिय शिक्षक *कवी प्रशांत केंदळे* यांचा पुणे येथील प्रसिद्ध अशा *चपराक प्रकाशनाने प्रकाशित* केलेला *‘गुलमोहराचं कुकू’* हा कवितासंग्रह नुकताच वाचण्यात आला. शीर्षक कवितेच्या ध्रुवपदातील वर नमूद ओळी सहज वाचता-वाचता मी मनात या ओळी गुणगुणायला लागलो. आणि एकेक कविता वाचत कवितासंग्रह पूर्ण वाचूनच पुस्तक हातातून खाली ठेवले. पावसानं वाजत गाजत मातीशी लग्न करून म्हणजेच बरसून या मातीला हिरवागार बनवून बहारदार गुलमोहरागत सजवावं-धजवावं अशी कवीची आगळीवेगळी कल्पना या कवितेत आहे. बाभळीच्या फुलांची हळद वापरून मातीचा हळदसोहळा साजरा व्हावा. वेळेप्रसंगी गारांचा पाऊस पडला तरी चालेल तसेच या गारांच्या माळा मातीच्या गळा घालत असतांना वर विजांचा संगीतमय गडगडाट सुरु असावा, याच वेळी पावसाची वरात मातीच्या भांगात गुलमोहराचं कुकू भराया निघावी. वाळलेल्या पानाच्या अक्षदा, येरे येरे पावसा म्हणत वऱ्हाडींच्या टाळ्या, उन्हाचा अंतरपाट, मातीचं आनंदानं दरवळनं, हिरवं होऊन लाजणं, पहिल्या रातीचा जांभळा अंधार, पाऊस- मातीची फारकत, आभाळाचे बाहू, सूर्याचं पावसाला नादी लावणं, आणि शेवटी माती व पावसाचा संसार असे अनेक विशेषणे, अलंकार, उपमा, दृष्टांत योजून उत्कृष्ट यमक साधत समृद्ध झालेली कविता वाचकाच्या मनाला अत्यानंद देवून तृप्त करते. ‘कविता’ असं नाव जरी कानावर पडलं तरी ऐकणाऱ्या रसिकांना अथवा वाचकांच्या मनात दैनदिन बोलल्या जाणाऱ्या भाषेपेक्षा वेगळ्याच भाषेची प्रतिमा व कल्पना मनात रुंजी घालू लागते. आजकाल बरेच लिहते हात स्वतःला कवी म्हणून घेत असल्याचे निदर्शनास येते. तथापि, प्रत्यक्ष त्यांच्या कविता वाचल्या/ ऐकल्यावर काही क्षणात भ्रमनिरास होतो. असं असलं तरी दर्जेदार साहित्यिक लिखाण करणारे बरेच लिहते हात आहेतच. याचबरोबर त्याचं सादरीकरणहि भाव खावून जाते. अशाच काही लिह्त्या हातांपैकी एक मराठी कवितेचं भविष्य ठरू पाहणारं नाव म्हणजे कवी प्रशांत केंदळे होय. ताल, सूर, लय या सोबतच उपमा, अलंकार, यती या दागिन्यांनी सजलेली शोभून दिसणारी त्यांची कविता आहे. त्यांच्या कविता ह्या विचारपूर्वक लिहलेल्या असून कुणालाही आवडाव्या असे त्यांचे परिपूर्ण व विचारपूर्वक लिखाण आहे. उगीच शब्दाला शब्द लावून, ओळीला ओळी जोडून लिहलेली त्यांची कविता नसते. हे मी जाणीवपूर्वक नमूद करतो आहे. ‘वाक्यं रसात्मक काव्यम’ अर्थात ज्यात रस आहे अशा वाक्याला काव्य म्हणावे. असे विश्वनाथ पंडित यांनी म्हटले आहे. कॉलरीज यांनी ‘उत्कृष्ट शब्दांची उत्कृष्ट रचना म्हणजे काव्य’ असे संबोधिले आहे. गुलमोहराचं कुकू या कवितासंग्रहातील कविता वाचतांना हे सहजच आठवून गेलं कारण सर्वच कविता अप्रतिम आहेत. कवी प्रशांत केंदळे हे साहित्यिक क्षेत्रातलं एक उत्तम कवी तसेच शैक्षणिक क्षेत्रात एक विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून परिचित असलेलं नाव. हा त्यांचा हा पहिलावहिला कवितासंग्रह. त्यांनी साहित्य, कला, मनोरंजन क्षेत्रात गोड गळ्याचा गाणारा कवी म्हणून नावलौकिक मिळवलेला आहे. अशा या साहित्यिकाचा हा कवितासंग्रह साहित्य जगतात दाखल झाला असून वाचकांनी त्याचे भरभरून स्वागत व कौतुक केले आहे. प्रतिभासंपन्न अशा या कवीने आजवर अनेक कविसंमेलनं तसेच काव्यस्पर्धा गाजवल्याचे रसिकांना ज्ञात आहेच. कवी कविता रचतो म्हणजे काय करतो? असा प्रश्न अनेकदा निर्माण होतो. माझ्या मते विचारांचं आभाळ गच्च भरून आलं कि त्याला रिते होणे अपरिहार्य असते, त्याचप्रमाणे कवी सतत विचार करत असतो. आपल्या अवतीभवती घडणाऱ्या घटनांचा त्याच्या मनावर परिणाम होत असतो, यातून आजूबाजूला असलेल्यांना काहीतरी सांगावं, त्याचं मनोरंजन करावं. असं त्याला वाटत असतं. ‘शहाणे करून सोडावे अवघे जन’ अशीच त्याची प्रवृत्ती असते. अशावेळी कविता माध्यम बनून येते. पहिलीच कविता पाहू, *माथ्यावरती ऊन जरी सूर्य रोज पाखडी* *त्या कोरडवाहूनेच दिली कवितेची बाराखडी* *मग झाडाझुडपांचाही मजला असा संसर्ग झाला* *मिळाले हे कवितेचे रान ; माझाच निसर्ग झाला* ... जन्माला येणाऱ्या प्रत्येक जीवाला उन्हाळा व पावसाळा म्हणजेच सुख, दु:ख सहन करावेच लागते. कोरडवाहू जीवनात कितीही संकटे आले, ठेचा खाव्या लागल्या तरी जगणं सुसह्य करणारी कवितेची बाराखडी ही त्यामुळेच लाभू शकली. या कवितेच्या वेडापायी झाडं झुडपांचा म्हणजेच निसर्गाचा लळा लागून हे कवितेचं रान सुंदर, हिरवं झाल्यानं कवी स्वतःच निसर्गमय झाल्याचं आनंदानं सांगत असल्याचे वाचताना आपल्या सहज लक्षात येते. वृक्षवेली, सूर्य, चंद्र, तारे, गुरं ढोरं अर्थात निसर्गाचा विशेष स्नेह व जिव्हाळा असलेला हा कवी आहे. हुबेहूब निसर्गचित्र वाचतांना वाचकांच्या मनात निर्माण करण्यात हा कवी पारंगत आहे. कमी शब्दात आशयगर्भ कविता असे विशेषण या कवितांना तंतोतंत लागू होते. चारच ओळींची खालील कविता वाचल्यावर आपल्या हे सहज लक्षात येईल, *मळ्याच्या वाटेवरती* *उभ्या बाभळी दोन*... *टेहाळणी करतात* *येतं –जातं कोण-कोण* ...! किती आशयपूर्ण या ओळी आहेत ना ! समृद्ध भाषा, उपमा, अलंकारांनी ओतपोत भारलेल्या या कविता निसर्गचित्र निर्माण करण्यात व वाचकांच्या मनात जागा निर्माण करण्यात यशस्वी होतात. निसर्गाशी विशेष स्नेह, जिव्हाळा असलेला हा कवी आजी, माय-बापाच्या काबाडकष्टाची, त्यांच्या त्यागाची, मायेची विशेष जाण ठेवून आहे. आणि ही जाण आपल्याला काही रचनांमधून भावल्याशिवाय राहत नाही, *बाळंतीण लेकीच्या आईला* *दिसत असेल आपले मातृत्व* *तिच्या लेकीत*, *तसेच माझ्या आईलाही* *दिसत नसेल मातीत* ? किंवा *माय कुर्वाळीत राही* *बाप दुरून पाहतो* *त्याच्या आसवांचा पूर* *फक्त एकांती वाहतो* बाळंतीण लेकीची आई जशी आनंदी होऊन बाळाला जपते, तशीच आई वावरातील भाजी साडीच्या पदरात अलगद गुंडाळून जपते. यावेळी आईच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेनासा झालेला असतो. यातून आईचे मोठेपण अधोरेखित होते तर आजकाल आपल्याला फक्त आईचेच महत्व वर्णन करणाऱ्या कथा, कविता वाचायला मिळतात. इथे मात्र कवीच्या लेखी माय आणि बाप दोघांचेही स्थान जीवनात महत्वपूर्ण असल्याचे जाणवते. माय चंद्राच्या शीतलतेने आपल्या अपत्यांना जोजावते तर बाप सुर्यापरी झिजून आपल्या अपत्यांचे जीवन घडवत असतो. कवी विद्यार्थ्यांमध्ये रमणारा विद्यार्थीप्रिय शिक्षक असून एक चांगला पालकही असल्याने आपला लाडका तान्हा व जीवाचा जीवडा अर्थात लेक कवीच्या लेखणीतून लेख सुटत नाही, *कृष्णापरी दिसे* *तिला तिचा तान्हा* *सोडताना पान्हा* *यशोदेचा* किंवा *बाप मनात जपतो* *लेक त्याची सोनपरी* *तरी जीवाचा जीवडा* *देतो परक्याच्या घरी* कवीला छोट्या तान्हुल्यात कृष्ण भासतो तर लेक परक्याच्या घरी जाणार या कल्पनेने थोडा हळवा होतो. साध्यासुध्या शब्दातसुद्धा कवी फार मोठा आशय व्यक्त करण्यात यशस्वी झाल्याचे आपल्या लक्षात येते. एक मात्र इथे नमूद करावे वाटते कि, कवी शहरात राहत असला तरी आपला गाव, भाऊबंद, निसर्ग यात अडकलेला आहे. कवितेला वाहून घेतलेला कवितेचा मळा फुलवणारा असा हा प्रचंड आशावादी, हिरवं स्वप्न पाहणारा सकारात्मक विचारांचा कवी आहे, *दुष्काळाची दैना* *सारी ही सरू दे* *कुणब्याला स्वप्न* *हिरवं पेरू दे* ... काळ्याकुट अंधाऱ्या रात्रीनंतर निरभ्र सकाळ होणारच, सूर्यप्रकाश आपलं अस्तित्व सिद्ध करणारच त्याचप्रमाणे कितीही दुष्काळ पडला तरीही एक ना एक दिवस पाऊस पडून कुणब्याचं जीवन हिरवं होणारच असा आशावाद हा कवी उराशी बाळगून आहे. या कवितासंग्रहास *चित्रकार संतोष घोंघडे* यांनी रेखाटलेले उत्कृष्ट आणि बोलके मुखपृष्ठ वाचकाला पाने पालटून कविता वाचायला प्रेरित करते. तसेच *ज्येष्ठ साहित्यिक म. भा. चव्हाण* यांच्या समर्पक प्रस्थावनेमुळे कवितासंग्रहाचा एकूण आवाका सहज लक्षात येतो. तसेच *‘रक्ताचं पाणी करून कवितेचा मळा फुलविणाऱ्या मायबापासह या प्रेरक आणि सुंदर सृष्टीला’* त्यांनी हा कवितासंग्रह अर्पण केलेला आहे. *षडाक्षरी, अष्टाक्षरी, लयबद्ध गाणी, गजल सदृश्य रचना, अभंग, मुक्तछंद* अशा विविध प्रकारच्या रचनांनी हा संग्रह बहरलेला आहे. कवितेवर निस्सीम प्रेम असलेले हे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या कवितांमधून त्याचं भावविश्व अर्थात त्यांची शाळा, विद्यार्थी, आईवडील, निसर्ग अशी विविधता आणि संपन्नता आढळते. पुन:पुन्हा वाचाव्या अशा त्यांच्या कविता आहेत. *'माझ्या कवितेचा मळा, वृक्ष लळा, काळीजकळा, ऊनझळा-पाऊसकळा'* अशा चार विभागात एकूण ५७ वाचनीय आणि आशयगर्भ कवितांचा या कवितासंग्रहात समावेश असून ‘गुलमोहराचं कुकू’ या कवितासंग्रहात अतिशय वाचनीय, आशयगर्भ कविता वाचायला मिळतात. हा संग्रह वाचकांनी आवर्जून वाचावा, असे मला वाटते. हे सर्व लिहिण्याचे कारण म्हणजे शुक्रवार, दि. १७ मे, २०२४ रोजी हुतात्मा स्मारक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, नाशिक येथे गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष माणूसमित्र सुरेश पवार यांनी आयोजित केलेल्या *‘पुस्तकावर बोलू काही*...’ या सदरात कवी प्रशांत केंदळे यांच्या ‘गुलमोहराचं कुकू’ या कवितासंग्रहावर आधारित *ऐसपैस गप्पांच्या कार्यक्रमाची मेजवानी* नाशिकमधील रसिकवाचक तसेच साहित्यिकांसाठी उपलब्ध झाली आहे. दि. ५ मार्च, २०२४ ते दि.२८ फेब्रुवारी, २०२५ दरम्यान दर मंगळवारी आणि शुक्रवारी हा उपक्रम संपन्न होणार आहे. अशा प्रकारचा बहुधा हा साहित्य क्षेत्रातील पहिलाच अभिनव उपक्रम असावा. यामध्ये नवोदित तसेच प्रस्थापित साहित्यिकांना व्यक्त होण्यासाठी हक्काचं व्यासपीठ उपलब्ध झालं आहे. याहीपुढे, त्यांची लेखणी अशीच तळपत रहावी. त्यांच्या हातून सर्व प्रकारचे साहित्यिक लिखाण व्हावे, हीच सदिच्छा! कवी प्रशांत केंदळे यांना गिरणा गौरव प्रतिष्ठान आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ या सदरात संपन्न होणाऱ्या व्याख्यानास आभाळभर शुभेच्छा! पुस्तकाचे नाव :- *गुलमोहराचं कुकू* कवी/लेखक :- *प्रशांत केंदळे*, संवाद क्र. *८०८७१७२२४१* प्रकाशक :- *चपराक प्रकाशन*, पुणे पाठराखण :- *म. भा. चव्हाण*, पुणे स्वागत मूल्य :- ₹ १२०/- मात्र (*सवलतमूल्य, टपाल खर्च आणि अधिक माहितीसाठी कृपया, संबंधितांशी संपर्क साधावा.*) आस्वादक :- *सोमनाथ आवडाजी पगार* (सॅप) *(महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेत प्रकाशनार्थ अनुदान प्राप्त साहित्यिक)* सुसंवाद.:- ९२७३३५७१५९, Email:- somnathpagar@yahoo.co.in *गीतकार/ कवी, कथा, पटकथा, संवाद लेखक, युसमीक्षक, ट्युबर, ब्लॉगर, टेक्नोक्रॅट, ऑनलाईन डॉक्युमेंट्स ऍडव्हायझर, इंग्लिश लँग्वेज ट्रेनर.*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: