google.com, pub-3412048091495808, DIRECT, f08c47fec0942fa0 Sahitya Tirtha - My Literature, My Creation साहित्य तीर्थ - माझं साहित्य, माझं लिखाण: बाप कवितेचे समीक्षण

रविवार, २६ मे, २०२४

बाप कवितेचे समीक्षण

https://www.facebook.com/share/p/27uUKWktLJoGT8TA/?mibextid=xfxF2i कर्मयोगी संत शुकदासजी महाराजश्री द्वारा संस्थापित विवेकानंद विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, हिवरा आश्रम ता. मेहकर जि. बुलडाणा येथील इंग्रजी विषयाचे विद्यार्थीप्रिय शिक्षक, संगीत मार्गदर्शक ( तबला) , जेष्ठ पत्रकार, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, साहित्य संपादक व साहित्यिक *श्री भगवान राईतकर* सरांनी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळच्या नवलेखक अनुदान योजनेत अनुदान प्राप्त होऊन प्रकाशित झालेल्या माझ्या *'वेदनेचे काटे'* या कवितासंग्रहातील *'बाप'* या कवितेची केलेली *समीक्षा* बुलडाणा येथील *दै. महाभूमि* या वर्तमान पत्रात आज दि. २६ मे २०२४ प्रकाशित झालेली आहे. सर, आपले मनःपूर्वक धन्यवाद ! 💐🙏 https://epaper.dainikmahabhoomi.com/clip/191 *मुलांसाठी झऱ्यासारखा झुरणारा सोमनाथ पगार यांच्या कवितेतील ' बाप '* ................................. काव्यनभातील बाप भगवान राईतकर हिवरा आश्रम मो.नं.९७३०३३२१५१ ................................... बाप हा कुटुंबाच्या भल्यासाठी जन्मभर प्रयत्न करीत असतो. अनेकदा कुटुंबाच्या हितासाठी प्रयत्न करीत असताना बापाला स्वतःचा विसर पडतो. कुटुंबासाठी सारखा झिजणारा 'बाप' हा कवीला झ-यासारखा वाटतो. झरा हा शब्द 'विहीर' या शब्दाच्या संबंधित आहे. नितळ पाण्याचा झरा ज्या विहिरीमध्ये असतो, ती विहीर भर उन्हाळ्यामध्ये सुद्धा आटत नाही, त्याचे पाणी कमी होते. तसेच झऱ्याप्रमाणे सदैव झुरणारा 'बाप', पंचवटी, नाशिक येथील सुप्रसिद्ध कवी सोमनाथ पगार यांनी त्यांच्या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेत अनुदान प्राप्त होऊन प्रकाशित झालेल्या 'वेदनेचे काटे' या मराठी कविता संग्रहातील 'बाप' या कवितेमधून व्यक्त केला आहे. कुटुंबाच्या कल्याणासाठी जन्मभर रात्रंदिवस कष्ट उपासणाऱ्या बापाचं महत्त्व त्या पिढी पुरतं कायम राहतं. त्यानंतर मात्र, त्याचं नाव हे नावापुरतं राहतं. शेवटी 'बाप ' नावापुरता उरत असतो. पिढ्यांपिढ्या आपण नावापुरतचं उरणार आहोत याची जाणीव असतांना सुद्धा, एका पिढीच्या नाही तर, कुळाच्या भल्यासाठी ' बाप ' हा वेळेचे माप भरत असतो. कवीने 'माप भरत असतो' असा शब्दप्रयोग केला आहे. माप हा शब्द मला या ठिकाणी वेळ अशा अर्थाने वाटतो. 'वेळेचं माप भरणे' याचा अर्थ जीवनातला प्रत्येक क्षण, 'बाप' हा आपल्या कुळाच्या भल्यासाठी उपयोगात आणतो. थोडक्यात बाप कुळाच्या हिताचा विचार करीत असतो. एका पिढीचा नाही तर, संपूर्ण कुळाच्या हिताचा, कल्याणाचा आणि फायद्याचा विचार करणारा जगातील एकमेव व्यक्ती म्हणजे 'बाप' होय. आपण नावापुरते उरणार आहोत असे असताना सुद्धा कुळाच्या हितासाठी कष्ट करणारा 'बाप' हा कवीने कवितेच्या पहिल्या कडव्यामध्ये शब्दबद्ध केला आहे... *पिढ्यानपिढ्या नावातच उरत असतो बाप* *कुळाच्या भल्यासाठी भरत असतो माप* आपण अनेकदा अनेक लोकांकडून ऐकत असतो की, जीवन एक नाटक आहे. परंतु, कवीला मात्र बापाचं जीवन म्हणजे जीवघेणा खेळ वाटतो. बापाच्या या जीवघेण्या खेळाचं वैशिष्ट्य असं आहे की, या खेळामध्ये न दिसणारे घाव होतात किंवा या खेळात घाव दिसत नाही. परंतु, वेदना मात्र खूप असतात आणि त्याही अव्यक्त स्वरूपामधल्या... त्या वेदना व्यक्त झाल्या तर त्याचा विपरीत परिणाम कुटुंबावर होईल, असा विचार कदाचित बापाचा असेल. बापाच्या काळजामध्ये झालेल्या घावाच्या जखमा ह्या काळजातील आहेत. बापाच्या जखमांचा विचार संपूर्ण गाव करीत असते. गाव हा शब्द मला या ठिकाणी वैचारिक विश्व वाटते. विचाराच्या गावामध्ये काळजाच्या जखमांचा विचार करणारा 'बाप' कवीने कवितेच्या दुसऱ्या कडव्यांमधून व्यक्त केला आहे... *जीवघेणा खेळ सारा दिसत नसतो घाव* *काळजात जखमांचा घोकत असतो गाव* बापाचं आयुष्य म्हणजे समुद्रासारखा. समुद्रामध्ये ज्या पद्धतीने विविध प्रकारची वादळे येतात, त्यासारखीच समस्यांची संकटांची आणि अडीअडचणीची अनेक वादळे ही बापाच्या जीवनरुपी सागरामध्ये येतात. परंतु, अशा या समस्यारुपी वादळांना न जुमानता हसतमुखाने आयुष्याची नाव हाकणारा जगातील एकमेव व्यक्ती म्हणजे बाप असतो. जीवनाची ही नौका यशस्वीपणे वल्लवतांना 'बाप ' घामाघूम होतो. परंतु अशाही परिस्थितीमध्ये बाप हा आपली वाटचाल यशस्वी जीवनाकडे करीत असतो.' काढत असतो धाव ' यामधील धाव शब्द क्रिकेट खेळाशी संबंधित असून, धाव काढणे म्हणजे यशाकडे वाटचाल करणे, अशा अर्थाने लक्षात घेणे महत्त्वाचे वाटते. वादळांची तमा न बाळगता, कष्टाची भीती न बाळगता, जीवनातील प्रत्येक कृतीला मुलांच्या हितासाठी समर्पित करणारा आणि जीवनातील समस्यांना हासतमुखाने पळवून लावणारा ' बाप ' हा कवीने कवितेतील पुढील कडव्यामध्ये शब्दबद्ध केलेला आहे... *हसत वादळात पिटाळत असतो नाव* *घामाघूम होतो तरी काढत असतो धाव* मुलांच्या भल्यासाठी सदैव राबणाऱ्या बापाच्या मनगटामध्ये प्रत्येकाला आत्मविश्वासाचा बळ पहावयास मिळते. परंतु, मुलांच्या हिताच्यासाठी कष्ट करणाऱ्या बापाच्या मनामध्ये, मुलाच्या हिताची भावना ही पूर्ण करण्यासाठी 'बाप' हा रक्ताचे पाणी करीत असतो. 'बापाच्या रक्तातील कळ' म्हणजे कष्टाच्या वेदना या कुणालाही दिसत नाही. बापाच्या रक्तातील कष्टाचार वेदना ह्या कवींनी कवितेच्या पुढील कडव्यामध्ये मांडलेल्या आहेत... *मनगटात जरी दिसत असलं बळ* *कुणाला दिसत नाही थेट रक्तातील कळ* मुलगा किंवा मुलगी किती मोठी झाली तरीसुद्धा, बापासाठी तो किंवा ती पिल्लू असते... म्हणजे लहानच असते. पक्षी ज्याप्रमाणे आपल्या पिलांच्या चाऱ्याची काळजी करतो... पिलांच्या चोचीमध्ये जोपर्यंत पक्षी अन्न देत नाही, तोपर्यंत त्या पक्षामध्ये मनाची अस्थिरता पहावयास मिळते. त्याचप्रमाणे जोपर्यंत मुलांच्या पोटापाण्याचा म्हणजेच भाकरीचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत, प्रत्येक बापाच्या मनामध्ये चिंता ही असते. ज्यावेळी मुलांच्या जीवनामध्ये संकट उभी राहतात त्यावेळेस त्या संकटांना दूर करण्यासाठी बाप हा 'धापा 'टाकत असतो. धापा टाकणे म्हणजे आपल्या कष्टाची गती वाढवीत असतो. संकटाच्या पुरात मुलांना आणि कुटुंबाला कुठल्याही प्रकारची इजा पोहोचायला नको, यासाठी 'बाप ' हा संकटाच्या पुरामध्ये संकटाचा सामना करतो आणि कुटुंबाला या संकटातून सोडवतो. मुलांच्या अन्नाची चिंता आणि संकटाशी जोरदार सामना करणारा बाप कवीने कवितेच्या पुढील कडव्यातील शब्दामधून मांडलेला आहे... *पिलांमुखी चाऱ्यासाठी घोर पोसतो उरात* *धाप टाकत असतो जो संकटांच्या पुरात* मुलांच्या हितासाठी काबाडकष्ट करणारे 'बाप' ज्यावेळेला या जगाचा निरोप घेतात त्यावेळेला, मुलांच्या हितासाठी कष्ट करून बाप मेला , असे अनेकदा लोक स्मशानात जळणाऱ्या 'बाप' नावाच्या व्यक्तीकडे पाहून बोलत असतात. परंतु, स्मशानात जळणारा 'बाप 'हा खरा बाप नसतो , असे कवी म्हणतात. याचा अर्थ शब्दशः न घेता वाचकांनी असा घेणे अपेक्षित आहे की, स्मशानामध्ये बापाच्या कार्याला, बापाच्या कष्टाच्या श्रीमंतीला आणि बापाच्या ' बापपणाला आठवणे म्हणजे बाप नाही. तर, मुलांसाठी संपूर्ण जीवनभर झऱ्याप्रमाणे अखंडितपणे झुरणारा ' बाप ' हा मुलांनी आणि समाजाने समजून घेणे, हे कवीला अपेक्षित असावे. मुलांच्या हितासाठी झुरणारा 'बाप' हा एकदा मरत नसतो तर, जीवनातील संकटांचा सामना करताना त्याला रोज झुरावा लागतं आणि... मनाने मरावं लागतं. कष्टानंतर सुद्धा अपेक्षित फळ प्राप्त न झाल्यामुळे झालेल्या अपेक्षाभंगाच्या यातना म्हणजे मरण म्हणता येणार नाही का ? असाच झऱ्यासारखा झुरणारा 'बाप' कवी सोमनाथ पगार यांनी कवितेच्या शेवटच्या कडव्यामधून वाचकांच्या समोर ठेवला आहे... *स्मशानांत जळणाराच नसतो बाप खरा* *मुलांसाठी वाहत असतो झुरणारा झरा* मुलांच्या हितासाठी कष्ट करूनही एखाद्या वाहणाऱ्या झऱ्याप्रमाणे झुरणारा ' बाप ' हा समाजाला आणि मुलांना समजावा, ही कदाचित अपेक्षा या निमित्ताने कवीने कवितेच्या माध्यमातून व्यक्त केली असावी, असे वाटते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: