google.com, pub-3412048091495808, DIRECT, f08c47fec0942fa0 Sahitya Tirtha - My Literature, My Creation साहित्य तीर्थ - माझं साहित्य, माझं लिखाण: 05/01/2024 - 06/01/2024

रविवार, २६ मे, २०२४

बाप कवितेचे समीक्षण

https://www.facebook.com/share/p/27uUKWktLJoGT8TA/?mibextid=xfxF2i कर्मयोगी संत शुकदासजी महाराजश्री द्वारा संस्थापित विवेकानंद विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, हिवरा आश्रम ता. मेहकर जि. बुलडाणा येथील इंग्रजी विषयाचे विद्यार्थीप्रिय शिक्षक, संगीत मार्गदर्शक ( तबला) , जेष्ठ पत्रकार, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, साहित्य संपादक व साहित्यिक *श्री भगवान राईतकर* सरांनी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळच्या नवलेखक अनुदान योजनेत अनुदान प्राप्त होऊन प्रकाशित झालेल्या माझ्या *'वेदनेचे काटे'* या कवितासंग्रहातील *'बाप'* या कवितेची केलेली *समीक्षा* बुलडाणा येथील *दै. महाभूमि* या वर्तमान पत्रात आज दि. २६ मे २०२४ प्रकाशित झालेली आहे. सर, आपले मनःपूर्वक धन्यवाद ! 💐🙏 https://epaper.dainikmahabhoomi.com/clip/191 *मुलांसाठी झऱ्यासारखा झुरणारा सोमनाथ पगार यांच्या कवितेतील ' बाप '* ................................. काव्यनभातील बाप भगवान राईतकर हिवरा आश्रम मो.नं.९७३०३३२१५१ ................................... बाप हा कुटुंबाच्या भल्यासाठी जन्मभर प्रयत्न करीत असतो. अनेकदा कुटुंबाच्या हितासाठी प्रयत्न करीत असताना बापाला स्वतःचा विसर पडतो. कुटुंबासाठी सारखा झिजणारा 'बाप' हा कवीला झ-यासारखा वाटतो. झरा हा शब्द 'विहीर' या शब्दाच्या संबंधित आहे. नितळ पाण्याचा झरा ज्या विहिरीमध्ये असतो, ती विहीर भर उन्हाळ्यामध्ये सुद्धा आटत नाही, त्याचे पाणी कमी होते. तसेच झऱ्याप्रमाणे सदैव झुरणारा 'बाप', पंचवटी, नाशिक येथील सुप्रसिद्ध कवी सोमनाथ पगार यांनी त्यांच्या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेत अनुदान प्राप्त होऊन प्रकाशित झालेल्या 'वेदनेचे काटे' या मराठी कविता संग्रहातील 'बाप' या कवितेमधून व्यक्त केला आहे. कुटुंबाच्या कल्याणासाठी जन्मभर रात्रंदिवस कष्ट उपासणाऱ्या बापाचं महत्त्व त्या पिढी पुरतं कायम राहतं. त्यानंतर मात्र, त्याचं नाव हे नावापुरतं राहतं. शेवटी 'बाप ' नावापुरता उरत असतो. पिढ्यांपिढ्या आपण नावापुरतचं उरणार आहोत याची जाणीव असतांना सुद्धा, एका पिढीच्या नाही तर, कुळाच्या भल्यासाठी ' बाप ' हा वेळेचे माप भरत असतो. कवीने 'माप भरत असतो' असा शब्दप्रयोग केला आहे. माप हा शब्द मला या ठिकाणी वेळ अशा अर्थाने वाटतो. 'वेळेचं माप भरणे' याचा अर्थ जीवनातला प्रत्येक क्षण, 'बाप' हा आपल्या कुळाच्या भल्यासाठी उपयोगात आणतो. थोडक्यात बाप कुळाच्या हिताचा विचार करीत असतो. एका पिढीचा नाही तर, संपूर्ण कुळाच्या हिताचा, कल्याणाचा आणि फायद्याचा विचार करणारा जगातील एकमेव व्यक्ती म्हणजे 'बाप' होय. आपण नावापुरते उरणार आहोत असे असताना सुद्धा कुळाच्या हितासाठी कष्ट करणारा 'बाप' हा कवीने कवितेच्या पहिल्या कडव्यामध्ये शब्दबद्ध केला आहे... *पिढ्यानपिढ्या नावातच उरत असतो बाप* *कुळाच्या भल्यासाठी भरत असतो माप* आपण अनेकदा अनेक लोकांकडून ऐकत असतो की, जीवन एक नाटक आहे. परंतु, कवीला मात्र बापाचं जीवन म्हणजे जीवघेणा खेळ वाटतो. बापाच्या या जीवघेण्या खेळाचं वैशिष्ट्य असं आहे की, या खेळामध्ये न दिसणारे घाव होतात किंवा या खेळात घाव दिसत नाही. परंतु, वेदना मात्र खूप असतात आणि त्याही अव्यक्त स्वरूपामधल्या... त्या वेदना व्यक्त झाल्या तर त्याचा विपरीत परिणाम कुटुंबावर होईल, असा विचार कदाचित बापाचा असेल. बापाच्या काळजामध्ये झालेल्या घावाच्या जखमा ह्या काळजातील आहेत. बापाच्या जखमांचा विचार संपूर्ण गाव करीत असते. गाव हा शब्द मला या ठिकाणी वैचारिक विश्व वाटते. विचाराच्या गावामध्ये काळजाच्या जखमांचा विचार करणारा 'बाप' कवीने कवितेच्या दुसऱ्या कडव्यांमधून व्यक्त केला आहे... *जीवघेणा खेळ सारा दिसत नसतो घाव* *काळजात जखमांचा घोकत असतो गाव* बापाचं आयुष्य म्हणजे समुद्रासारखा. समुद्रामध्ये ज्या पद्धतीने विविध प्रकारची वादळे येतात, त्यासारखीच समस्यांची संकटांची आणि अडीअडचणीची अनेक वादळे ही बापाच्या जीवनरुपी सागरामध्ये येतात. परंतु, अशा या समस्यारुपी वादळांना न जुमानता हसतमुखाने आयुष्याची नाव हाकणारा जगातील एकमेव व्यक्ती म्हणजे बाप असतो. जीवनाची ही नौका यशस्वीपणे वल्लवतांना 'बाप ' घामाघूम होतो. परंतु अशाही परिस्थितीमध्ये बाप हा आपली वाटचाल यशस्वी जीवनाकडे करीत असतो.' काढत असतो धाव ' यामधील धाव शब्द क्रिकेट खेळाशी संबंधित असून, धाव काढणे म्हणजे यशाकडे वाटचाल करणे, अशा अर्थाने लक्षात घेणे महत्त्वाचे वाटते. वादळांची तमा न बाळगता, कष्टाची भीती न बाळगता, जीवनातील प्रत्येक कृतीला मुलांच्या हितासाठी समर्पित करणारा आणि जीवनातील समस्यांना हासतमुखाने पळवून लावणारा ' बाप ' हा कवीने कवितेतील पुढील कडव्यामध्ये शब्दबद्ध केलेला आहे... *हसत वादळात पिटाळत असतो नाव* *घामाघूम होतो तरी काढत असतो धाव* मुलांच्या भल्यासाठी सदैव राबणाऱ्या बापाच्या मनगटामध्ये प्रत्येकाला आत्मविश्वासाचा बळ पहावयास मिळते. परंतु, मुलांच्या हिताच्यासाठी कष्ट करणाऱ्या बापाच्या मनामध्ये, मुलाच्या हिताची भावना ही पूर्ण करण्यासाठी 'बाप' हा रक्ताचे पाणी करीत असतो. 'बापाच्या रक्तातील कळ' म्हणजे कष्टाच्या वेदना या कुणालाही दिसत नाही. बापाच्या रक्तातील कष्टाचार वेदना ह्या कवींनी कवितेच्या पुढील कडव्यामध्ये मांडलेल्या आहेत... *मनगटात जरी दिसत असलं बळ* *कुणाला दिसत नाही थेट रक्तातील कळ* मुलगा किंवा मुलगी किती मोठी झाली तरीसुद्धा, बापासाठी तो किंवा ती पिल्लू असते... म्हणजे लहानच असते. पक्षी ज्याप्रमाणे आपल्या पिलांच्या चाऱ्याची काळजी करतो... पिलांच्या चोचीमध्ये जोपर्यंत पक्षी अन्न देत नाही, तोपर्यंत त्या पक्षामध्ये मनाची अस्थिरता पहावयास मिळते. त्याचप्रमाणे जोपर्यंत मुलांच्या पोटापाण्याचा म्हणजेच भाकरीचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत, प्रत्येक बापाच्या मनामध्ये चिंता ही असते. ज्यावेळी मुलांच्या जीवनामध्ये संकट उभी राहतात त्यावेळेस त्या संकटांना दूर करण्यासाठी बाप हा 'धापा 'टाकत असतो. धापा टाकणे म्हणजे आपल्या कष्टाची गती वाढवीत असतो. संकटाच्या पुरात मुलांना आणि कुटुंबाला कुठल्याही प्रकारची इजा पोहोचायला नको, यासाठी 'बाप ' हा संकटाच्या पुरामध्ये संकटाचा सामना करतो आणि कुटुंबाला या संकटातून सोडवतो. मुलांच्या अन्नाची चिंता आणि संकटाशी जोरदार सामना करणारा बाप कवीने कवितेच्या पुढील कडव्यातील शब्दामधून मांडलेला आहे... *पिलांमुखी चाऱ्यासाठी घोर पोसतो उरात* *धाप टाकत असतो जो संकटांच्या पुरात* मुलांच्या हितासाठी काबाडकष्ट करणारे 'बाप' ज्यावेळेला या जगाचा निरोप घेतात त्यावेळेला, मुलांच्या हितासाठी कष्ट करून बाप मेला , असे अनेकदा लोक स्मशानात जळणाऱ्या 'बाप' नावाच्या व्यक्तीकडे पाहून बोलत असतात. परंतु, स्मशानात जळणारा 'बाप 'हा खरा बाप नसतो , असे कवी म्हणतात. याचा अर्थ शब्दशः न घेता वाचकांनी असा घेणे अपेक्षित आहे की, स्मशानामध्ये बापाच्या कार्याला, बापाच्या कष्टाच्या श्रीमंतीला आणि बापाच्या ' बापपणाला आठवणे म्हणजे बाप नाही. तर, मुलांसाठी संपूर्ण जीवनभर झऱ्याप्रमाणे अखंडितपणे झुरणारा ' बाप ' हा मुलांनी आणि समाजाने समजून घेणे, हे कवीला अपेक्षित असावे. मुलांच्या हितासाठी झुरणारा 'बाप' हा एकदा मरत नसतो तर, जीवनातील संकटांचा सामना करताना त्याला रोज झुरावा लागतं आणि... मनाने मरावं लागतं. कष्टानंतर सुद्धा अपेक्षित फळ प्राप्त न झाल्यामुळे झालेल्या अपेक्षाभंगाच्या यातना म्हणजे मरण म्हणता येणार नाही का ? असाच झऱ्यासारखा झुरणारा 'बाप' कवी सोमनाथ पगार यांनी कवितेच्या शेवटच्या कडव्यामधून वाचकांच्या समोर ठेवला आहे... *स्मशानांत जळणाराच नसतो बाप खरा* *मुलांसाठी वाहत असतो झुरणारा झरा* मुलांच्या हितासाठी कष्ट करूनही एखाद्या वाहणाऱ्या झऱ्याप्रमाणे झुरणारा ' बाप ' हा समाजाला आणि मुलांना समजावा, ही कदाचित अपेक्षा या निमित्ताने कवीने कवितेच्या माध्यमातून व्यक्त केली असावी, असे वाटते.

शुक्रवार, २४ मे, २०२४

कुणब्याची कविता- कुणब्याच्या व्यथा, वेदनांचा सात-बारा

*साहित्य तीर्थ* पुस्तक परिचय *कुणब्याची कविता – कुणब्याच्या व्यथा, वेदनांचा सातबारा* *सोमनाथ पगार* संपर्क क्र.:- ९२७३३५७१५९. *खरं तर आपण सारेच तलाठ्याच्या सौजन्यानं* *बापाचं बोट सोडून उतरत जातो सात-बारा’च्या अज्ञात बेटावर* *बापाचा वारस म्हणून* *आणि न्याहळू लागतो आपल्या पूर्वजांच्या अस्तित्वाच्या खुणा* *‘सहा-ड’च्या मसणवटीत थडग्यांच्या ओळीत ... क्रमाक्रमानं* (सात-बाराची नोंद) या ओळी आहेत *जेष्ठ कवी, प्राचार्य लक्ष्मण महाडिक* यांच्या *‘कुणब्याची कविता’* या कवितासंग्रहातील सात-बाराची नोंद या कवितेतील. या कवितासंग्रहाचं गारुड साहित्य क्षेत्रात रसिक वाचकांच्या मनावर गेल्या दोन दशकांपासून विराजमान असल्याचं आपणास ठाव आहे. काही कथा, कविता वाचल्या किंवा ऐकल्यावर आपल्याला स्वर्गीय आनंद मिळतो. याचे कारण त्यांचा आशय-विषय, त्यांच्यातील भावना अंत:करणाला भिडणाऱ्या असतात. कदाचित अशा रचनांची चाल मधुर असते किंवा त्या वाचकाच्या भावविश्वाशी, आयुष्याशी निगडीत असतात. चमत्कृतीपूर्ण कल्पना, मांडलेले विचार प्रभावी असतील. साध्यासोप्या परतू अर्थपूर्ण रचना असूनही शब्दाला नादमाधुर्य असेल, भाषा सहज सोपी विषयाला साजेशी असेल. आवडता खाद्यपदार्थ खाल्यावर मिळणारी तृप्ती, अशा वाचनातून वाचकांना निश्चितच मिळते. आणि हेच काम ‘कुणब्याची कविता’ या कवितासंग्रहातील कविता करत असल्याचे अभिमानाने मला नमूद करतांना विशेष आनंद होतो आहे. मातीत राबराबून कुणबी अन्नधान्याचे पीक घेतो खरा, मात्र योग्य तो भाव त्याच्या पिकाला कधीच मिळत नाही. घाम गाळणारा शेतकरी आपल्या पिकाचा भाव मात्र स्वतः ठरवू शकत नाही ; त्याच्या मालाचा भाव व्यापारी ठरवतो, तोही कवडीमोल. शेती करून कुणबी सुखी झाल्याचे आजवर तरी ऐकिवात नाही. महागाई, दारिद्र्य, हालअपेष्टा, काबाडकष्ट हे हरळ, गाजर गवतासारखं त्याच्या आयुष्याच्या बांधामेराला, पाचवीला पुजलेले असतात. हे असं असलं तरीही मायमातीशी आपली नाळ तो कधीच तोडू शकत नाही, कारण याच शेतीने आपल्या कित्येक पिढ्यांना पोसले असल्याची त्याला जाणीव आहे. आज ना उद्या आपल्या कुळाला चांगले दिवस येवून समृद्धी प्राप्त होईल, ही भाबडी इच्छा त्याच्या मनात घर करून असते. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हा वारसा युगेयुगे चालत आलेला आहे. आपल्या बापजाद्यांनी भोगलेल्या कळा सात-बारावरील नोंदीप्रमाणे वारसाहक्काने वाट्याला येतात. हेच या ओळींमधून अधोरेखित होत आहे. खालील ओळी पाहू, *आणेवारीत शेतसारा भरता भरता* *सात-बारा वरच्या विहिरी कोरड्या पडतात* *आणि चारातागाई मिळवता मिळवता* *देहू आळंदीच्या वाऱ्या घडतात* (घोषणांच्या बेमोसमी पावसात) किंवा *जन्माआधी पोसे माता पुढे जन्मभर माती* *एक नाळ तुटताच श्वास गुंफतात नाती* *उंच उडावे आकाशी ठेवा मातीवर पाय* *जन्मणाऱ्या प्रत्येकाची तीच बाप तीच माय* (माती) बरं, सरकार मायबाप म्हणावं तर तेही कुणब्याच्या हिताच्या योजना राबवत नाही, योजना राबविल्याच तर त्यात त्याची ससेहोलपट ठरलेली असते. आणि शेवटी कुणब्याच्या हाती शून्य ठरलेला. घोषणांचा बेमोसमी पाऊस बरसत राहतो. सोबतीला शासनाचे कर भरता भरता त्याच्या नाकीनऊ येते. चारातगाई सारख्या योजनांचा लाभ घ्यायचा तर देहू आळंदीच्या वाऱ्यांसारख्या शासकीय कार्यालयांमध्ये चिरीमिरी वाटता वाटता खेट्या घालूनही हाताला काहीच घावत नाही. अशा या बिकट परिस्थितीने गांजल्याने खेड्यापाड्यातील तरूण माणसं शहरात परागंदा झाल्याने खेडी वांझ झाल्याची सल कवीला बोचते आहे. शेवटी माथी योजनांचा चिखल शिल्लक राहतो तो सरकारी अधिकार्यांच्या कर्तबगारीने आणि यामुळे कुणब्याची दारिद्र्य रेषा काही केल्या पुसली जात नाही. असं असलं तरी इथल्या मायमातीशी नाळ घट्ट असून जन्मभर माती उपाशी राहू न देता कुणब्याला पोसत असते. याची त्याला पक्की जाणीव असल्याने उंच आकाशी झेप घेत असतांना मातीवर पाय घट्ट असावेत कारण ही मातीच माय आणि बाप दोन्ही आहे. हे त्याला पक्के ठाव आहे. हे लिहण्याचे कारण म्हणजे नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव येथील ज्येष्ठ कवी तसेच विद्यार्थीप्रिय शिक्षक, माजी प्राचार्य, कवी लक्ष्मण महाडिक यांचा साहित्यजगतातील प्रसिध्द शब्दालय प्रकाशनाने प्रकाशित केलेला ‘कुणब्याची कविता’ हा कवितासंग्रह नुकताच माझ्या वाचण्यात आला. कवितेची जान आल्यापासून या कवितासंग्रहाबद्द्ल ऐकून होतो, पुस्तकांची आई आदरणीय भीमाबाई जोंधळे यांच्या ‘पुस्तकाचे हॉटेल’ येथे हा कवितासंग्रह विक्रीस असल्याचे कळताच वेळ न दवडता जावून खरेदी केला. त्यामुळे आता हा कवितासंग्रह हाती पडल्याने वाचू शकलो. आणि एकेक कविता वाचत कवितासंग्रह पूर्ण वाचूनच पुस्तक हातातून खाली ठेवले. वीस एकवीस वर्षाचा काळ लोटला तरीही या कविता वर्तमानाशी नाळ जोडलेल्या आहेत. जागतिकीकरणाच्या आक्रमणात बदलणारी ग्रामसंस्कृती, कृषिसंस्कृती तसेच बदलणाऱ्या गावाचे दर्शन या कवितांमधून होते. कदाचित यामुळेच या कविता वैश्विक वाटू लागतात. शिक्षणाचा वसा नसलेल्या अडाणी शेतकरी पण वारकरी कुटुंबात जन्मलेल्या या कवीच्या कविता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या आंतरभारती या दहावीच्या अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकात तसेच विविध नियतकालिके, समीक्षा ग्रंथातून, मासिकांमधून लिहल्या तर गेलेल्या आहेच त्याचबरोबर महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांमध्ये या कवितासंग्रहातील कवितांचा समावेश पदवी व पदव्युत्तर अभास्क्रमांमध्ये केला गेला. अनेक मानाच्या नामवंत पुरस्कारांसह महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे दिल्या जाणारा बहिणाबाई चौधरी यांच्या नावाने दिला जाणारा प्रथम प्रकाशन सदरातील पुरस्कार या कवितासंग्रहाला प्राप्त झालेला आहे. यातच या कवीचे व कवितासंग्रहाचे मोठेपण आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही. ‘उत्कृष्ट व उत्स्फूर्त रचना म्हणजे काव्य’ असे वर्डस्वर्थने म्हटले आहेच. 'कुणब्याची कविता' या कवितासंग्रहातील कविता वाचतांना हे सहजच आठवून गेलं कारण सर्वच कविता अप्रतिम, उत्कृष्ट आहेत. प्राचार्य लक्ष्मण महाडिक हे एक ज्येष्ठ कवी असून साहित्यिक क्षेत्रातलं एक उत्तम कवी तसेच शैक्षणिक क्षेत्रात एक विद्यार्थीप्रिय शिक्षक तसेच प्राचार्य म्हणून परिचित असलेलं नाव. हा त्यांचा हा पहिलावहिला कवितासंग्रह. त्यांनी साहित्य क्षेत्रात कवी म्हणून नावलौकिक मिळवलेला आहे. अशा या साहित्यिकाच्या या कवितासंग्रहाचे वाचकांनी त्याचे भरभरून स्वागत केले आहे. प्रतिभासंपन्न अशा या कवीने आजवर अनेक कविसंमेलनं तसेच काव्यस्पर्धा गाजवल्याचे तसेच अनेक लिह्त्या हातांना बळ देवून लिहते केले आहे, हे रसिकांना ज्ञात आहेच. याचबरोबर अनेक शाळा, महाविद्यालयांमध्ये आपली कविता घेवून फिरत असल्याने ते एक उत्तम वक्ता व कवी म्हणून सर्वश्रुत आहे. कवी कविता लिहतो, याचे कारण मनाची अस्वस्थता. सामाजिक वास्तवाच्या व्यथा, वेदनांनी मनातील धग वाढत जाते. मनातील घुसमट कमी करण्याचे साधन कविता बनून जाते. जेव्हा कवितेच्या रुपात संवेदना, मनातील भावनांचा निचरा होतो तेव्हा मनातील वेदनांची ठसठस कमी होऊन जीवन सुसह्य होऊ लागते. आपल्या अवतीभवतीच्या सामाजिक जाणीवा घेऊन कविता आत काळजात वाढत, मनावर परिणाम करत असते. यातून सामाजिक वास्तवाकडे बघता बघता शादांतून व्यक्त होत कविता भोवतालच वास्तव हाच विषय होऊन झिरपत असते काळजातून. खालील ओळी पाहू, *कुणब्याच्या दुखाची* *लिहलेली गाथा* *मरणाची व्यथा* *शब्दबद्ध* (गाथा) कुणब्याच्या पोटी जन्माला आलो हे आपलं संचित असून कुणब्याचं जीवन म्हणजे स्वतःच स्वतःचं सरण रचण्यासारखं आहे. आयुष्यभर वारकरी बनून देवधर्म करूनही सुखाची वाट पाहत मी माझ्या दारी स्तब्ध उभा आहे. अशा आपल्या व्यथा, वेदनांचा सात-बारा कवी वाचत कवी वाचकांना अंतर्मुख होण्य्यास भाग पाडत आहे. हेच या कवितासंग्रहातील कवितांचे यश आहे. कुणब्याचं अर्थात शेतकऱ्याच जगणं म्हणजे फरफट, दु:ख, असं असलं तरी त्याचा बागलबुवा करतांना तो सहसा दिसत नाही, वेदनांना कुरवाळत बसत नाही. वेळेवर न पडणारा पाऊस एकतर पडत नाही, पडलाच तर पिकांची राखरांगोळी करून सोडतो. लोकसंखेच्या भरमसाठ वाढीमुळे गाव सोडणारी पिढी, गावपण उरत जपण्यासाठी धडपडते आहे. खालील ओळी वाचल्यावर आपल्या हे सहज लक्षात येईल, *पोटासाठी शहराकडे* *वाहू लागला इथला वारा* *दारिद्र्याच्या पानगळीत नष्ट झाला सात-बारा* (आठवणीतलं गाव) साध्यासोप्या शब्दात वाचकाला आत्मपरीक्षण करायला लावणाऱ्या या ओळी आहेत. कुणी कितीही मोठा झाला तरी आपलं गावपण काही मनातून आटत नाही. असं असलं तरीही पोटापाण्यासाठी शहराकडे धाव सुरु झाल्याने जमीनी विकल्या जावून सात-बारावरील त्यांच्या नोंदी कोऱ्या होतांना दिसत असल्याने कवी दु:खी होतो आहे. आजही कवीला गावगाडा, वाडा, विहीर, मोट, चाक-कणा, नाडा रहाट, काळीमाती, लाकूड फाटा वगैरे साद घालत आहेत. अशाही परिस्थितीत कवी आपल्या आई बापाला विसरू शकत नाही. मायच्या जन्माची चित्तरकथा वर्णन करतांना, *उभा जन्म सांधताना दिल्या गाठीवर गाठी* *वाढे बाळसं धरून दु:ख तिच्या ओठी पोटी* तर बापाचं महत्व व बापपण, *काल परवा बाप वैकुंठवासी झाला* *माझ्या आयुष्याचा नाडा सैल झाला* या शब्दात बापाच्या गेल्याने निर्माण झालेली पोकळी, दु:ख, उणीव कवीला छळते आहे. तसेच पंढरीच्या वाऱ्या करूनही विठ्ठू काही पावला नाही कारण, स्वतः विठ्ठल म्हणतो कि, *द्यावी सोडून पंढरी जावं एकांतात दूर* *हल्ली फार झाले म्हणे माझ्या पंढरीत चोर* स्वतः विठ्ठलच जर दुखी, कष्टी आहे. तर मग तो भक्तांना कसा पावणार? केवळ पाटी, पुस्तक, पेन्सिल अर्थात शिक्षणच माणसाला प्रगतशिल व सुखी बनवू शकते, हे कवीला पक्के ठाव आहे. त्यामुळे सुख स्वप्नांची पहाट उजाडावी, म्हणून कवी म्हणतो कि, *माझ्या आईनं माती खाल्ली* *म्हणून मी मातीती रुजलो* *अन रुजतोय* *पुढे मी तिला सांगेन* *तू फक्त पुस्तक खा ... पेन्सिल खा*. *तू फक्त पुस्तक खा ... पेन्सिल खा*. (राख, माती आणि पेन्सिल) तर गावातील मातीसुद्धा विकासाच्या भस्मासुरामुळे सुरक्षित नसल्याने कवी नाराज आहे, *आता तर दिवसेंदिवस याचा वाढतोय वावर सर्वत्रच* *गल्लीबोळापासून ते माळरानापर्यंत* *हा बेलाशक कुणाच्याही कुपाटीला खेटतो, उभ्या पिकात शिरतो* *फुलाऱ्यातल्या ज्वारी-बाजरीची लुसलुसीत* *हिरवी पिवळी कोवळी कणसं चाखतो* *तर कधी नुसतीच नासधूस* (हा कोण ...?) मातीची ओढ कवीला स्वस्थ बसू देत नाही. गावाकडची माती, कृमी-कीटकं, जंगल, पाखरं, शेळी, बैल. कुत्रे, औत, मोट, व्यापारी, आधुनिकतेची साक्ष देणारे ट्रक्टर, ट्रोली, पी.व्ही.सी, रोटोव्हेटर, पेरणी/ मळणी यंत्र तसेच तलाठी वैगरे सारं काही कवीने काळजात जपलेलं आहे. असं असलं तरी दुष्काळाने सत्वपरीक्षा घ्यायचं सोडलेलं नाही. आमराई सुकून गेली, सीताफळांची झाडे शिल्लक राहिली नाही. दुष्काळामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी गंगथडीला जावून कशीबशी गुजराण करावी लागते आहे. याचबरोबर गावाकडची गुरं ढोरं मात्र चारा, पाण्यावाचून हातपाय खोडून मेल्याची सल कवीला सलते आहे. या कवितासंग्रहातील एकेक कविता म्हणजे कुणब्याची भळभळती जखम आहे. एक मात्र इथे नमूद करावे वाटते कि, कवी नोकरीनिमित्ताने गावापासून दूर गेला असला तरी आपला गाव, भाऊबंद, शेती, वाडी हे वैभव काळजात जपून आहे. या कवितासंग्रहास चित्रकार धनंजय गोवर्धने (प्रथम आवृत्ती) चित्रकार विष्णू थोरे (द्वितीय आवृत्ती) यांनी रेखाटलेले समर्पक आणि बोलके मुखपृष्ठ वाचकाला पाने पालटून कविता वाचायला प्रेरित करते. तसेच रानकवी ना. धो. महानोर व प्रा. डॉ. मनोज तायडे (दुसऱ्या आवृतीस) यांच्या समर्पक प्रस्थावनेमुळे कवितासंग्रहाचा एकूण आवाका सहज लक्षात येतो. तसेच आपले ‘तीर्थरूप ‘त्यासोबतच ‘देशातील शेती व शेतमालाच्या प्रश्नासंदर्भात संघर्ष करतांना हुतात्मा झालेल्या तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या स्मृतीला हा कवितासंग्रह अर्पण केलेला आहे. अष्टाक्षरी, लयबद्ध गाणी, अभंग, मुक्तछंद अशा विविध प्रकारच्या रचनांनी हा संग्रह बहरलेला आहे. कवितेशी विशेष जिव्हाळा असलेले हे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या कवितांमधून त्याचं भावविश्व अर्थात त्यांचं गाव, माती, पाऊस, गुरं ढोरं, झाडे, आईवडील, पक्षी-निसर्ग अशी विविधता आणि संपन्नता आढळते. पुन:पुन्हा वाचाव्या अशा त्यांच्या कविता आहेत. एकूण ६२ वाचनीय आणि आशयगर्भ कवितांचा या कवितासंग्रहात समावेश असून ‘कुणब्याची कविता’ या कवितासंग्रहात अतिशय वाचनीय, आशयगर्भ कविता वाचायला मिळतात. हा संग्रह वाचकांनी आवर्जून वाचावा, असे मला वाटते. हे सर्व लिहिण्याचे कारण म्हणजे शुक्रवार, दि. २४ मे, २०२४ रोजी हुतात्मा स्मारक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, नाशिक येथे गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष माणूसमित्र सुरेश पवार यांनी आयोजित केलेल्या ‘पुस्तकावर बोलू काही...’ या सदरात कवी प्राचार्य लक्ष्मण महाडिक यांच्या ‘कुणब्याची कविता' या कवितासंग्रहावर आधारित ऐसपैस गप्पांच्या कार्यक्रमाची मेजवानी नाशिकमधील रसिकवाचक तसेच साहित्यिकांसाठी उपलब्ध झाली आहे. दि. ५ मार्च, २०२४ ते दि.२८ फेब्रुवारी, २०२५ दरम्यान दर मंगळवारी आणि शुक्रवारी हा उपक्रम संपन्न होणार आहे. अशा प्रकारचा बहुधा हा साहित्य क्षेत्रातील पहिलाच अभिनव उपक्रम असावा. यामध्ये नवोदित तसेच प्रस्थापित साहित्यिकांना व्यक्त होण्यासाठी हक्काचं व्यासपीठ उपलब्ध झालं आहे. याहीपुढे, त्यांची लेखणी अशीच तळपत रहावी. त्यांच्या हातून सर्व प्रकारचे साहित्यिक लिखाण व्हावे, हीच सदिच्छा! आदरणीय प्राचार्य, कवी लक्ष्मण महाडिक यांना गिरणा गौरव प्रतिष्ठान आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ या सदरात संपन्न होणाऱ्या व्याख्यानास आभाळभर शुभेच्छा! पुस्तकाचे नाव :- कुणब्याची कविता लेखक :- लक्ष्मण महाडिक, संवाद क्र. ९४२२७५७५४२३ प्रकाशक :- शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर पाठराखण :- ना.धो महानोर प्रस्थावना :- ना.धो महानोर, प्रा. डॉ. मनोज तायडे स्वागत मूल्य :- ₹ १३०/- मात्र (सवलतमूल्य, टपाल खर्च आणि अधिक माहितीसाठी कृपया, संबंधितांशी संपर्क साधावा.) आस्वादक: *सोमनाथ आवडाजी पगार* (सॅप) (*महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेत प्रकाशनार्थ अनुदान प्राप्त साहित्यिक*) संपर्क क्र.:- ९२७३३५७१५९, Email:- somnathpagar@yahoo.co.in गीतकार/ कवी, कथा, पटकथा, संवाद लेखक, युसमीक्षक, ट्युबर, ब्लॉगर, टेक्नोक्रॅट, ऑनलाईन डॉक्युमेंट्स ऍडव्हायझर, इंग्लिश लँग्वेज ट्रेनर.

शुक्रवार, १७ मे, २०२४

गुलमोहराचं कुंकू- फुलणारा कवितेचा मळा

https://www.facebook.com/share/p/Q4AShYgc1FZvXmYy/?mibextid=qi2Omg ll *साहित्य तीर्थ* ll पुस्तक परिचय *गुलमोहराचं कुकू – फुलणारा कवितेचा मळा* ! *सोमनाथ पगार* संपर्क क्र.:- ९२७३३५७१५९. *आता पावसा मातीशी कर लगीन साजरं* *गुलमोहराचं कुकू तिच्या भांगामधी भर* ‘जे न देखे रवी, ते देखे कवी’ असे कधी आदराने तर कधी उपहासाने म्हटले गेल्याचे आपण बऱ्याचदा ऐकतो. ज्या गोष्टी कुणाच्याही दृष्टीस पडणार नाहीत किंवा सुर्यालाही दिसत नाही त्या गोष्टी कवी आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर सहज वर्णन करत असतो. कवीला दिव्य दृष्टीची देणगी जन्मताच लाभलेली असून कल्पनेच्या जोरावर या जगाच्या पलीकडच्या गोष्टीही त्यांना दिसू शकतात. असे समजले जाते. साहित्यिक क्षेत्रात असे अनेक प्रज्ञावंत साहित्यिक आपले योगदान देण्याचं प्रयत्न करत ते भूत, भविष्य आणि वर्तमानचा वेध आपल्या लेखणीच्या माध्यमातून घेत असतात. हे सर्व लिहण्याचे/ आठवण्याचे कारण म्हणजे नाशिकमधील गोड गळ्याचा कवी तसेच विद्यार्थीप्रिय शिक्षक *कवी प्रशांत केंदळे* यांचा पुणे येथील प्रसिद्ध अशा *चपराक प्रकाशनाने प्रकाशित* केलेला *‘गुलमोहराचं कुकू’* हा कवितासंग्रह नुकताच वाचण्यात आला. शीर्षक कवितेच्या ध्रुवपदातील वर नमूद ओळी सहज वाचता-वाचता मी मनात या ओळी गुणगुणायला लागलो. आणि एकेक कविता वाचत कवितासंग्रह पूर्ण वाचूनच पुस्तक हातातून खाली ठेवले. पावसानं वाजत गाजत मातीशी लग्न करून म्हणजेच बरसून या मातीला हिरवागार बनवून बहारदार गुलमोहरागत सजवावं-धजवावं अशी कवीची आगळीवेगळी कल्पना या कवितेत आहे. बाभळीच्या फुलांची हळद वापरून मातीचा हळदसोहळा साजरा व्हावा. वेळेप्रसंगी गारांचा पाऊस पडला तरी चालेल तसेच या गारांच्या माळा मातीच्या गळा घालत असतांना वर विजांचा संगीतमय गडगडाट सुरु असावा, याच वेळी पावसाची वरात मातीच्या भांगात गुलमोहराचं कुकू भराया निघावी. वाळलेल्या पानाच्या अक्षदा, येरे येरे पावसा म्हणत वऱ्हाडींच्या टाळ्या, उन्हाचा अंतरपाट, मातीचं आनंदानं दरवळनं, हिरवं होऊन लाजणं, पहिल्या रातीचा जांभळा अंधार, पाऊस- मातीची फारकत, आभाळाचे बाहू, सूर्याचं पावसाला नादी लावणं, आणि शेवटी माती व पावसाचा संसार असे अनेक विशेषणे, अलंकार, उपमा, दृष्टांत योजून उत्कृष्ट यमक साधत समृद्ध झालेली कविता वाचकाच्या मनाला अत्यानंद देवून तृप्त करते. ‘कविता’ असं नाव जरी कानावर पडलं तरी ऐकणाऱ्या रसिकांना अथवा वाचकांच्या मनात दैनदिन बोलल्या जाणाऱ्या भाषेपेक्षा वेगळ्याच भाषेची प्रतिमा व कल्पना मनात रुंजी घालू लागते. आजकाल बरेच लिहते हात स्वतःला कवी म्हणून घेत असल्याचे निदर्शनास येते. तथापि, प्रत्यक्ष त्यांच्या कविता वाचल्या/ ऐकल्यावर काही क्षणात भ्रमनिरास होतो. असं असलं तरी दर्जेदार साहित्यिक लिखाण करणारे बरेच लिहते हात आहेतच. याचबरोबर त्याचं सादरीकरणहि भाव खावून जाते. अशाच काही लिह्त्या हातांपैकी एक मराठी कवितेचं भविष्य ठरू पाहणारं नाव म्हणजे कवी प्रशांत केंदळे होय. ताल, सूर, लय या सोबतच उपमा, अलंकार, यती या दागिन्यांनी सजलेली शोभून दिसणारी त्यांची कविता आहे. त्यांच्या कविता ह्या विचारपूर्वक लिहलेल्या असून कुणालाही आवडाव्या असे त्यांचे परिपूर्ण व विचारपूर्वक लिखाण आहे. उगीच शब्दाला शब्द लावून, ओळीला ओळी जोडून लिहलेली त्यांची कविता नसते. हे मी जाणीवपूर्वक नमूद करतो आहे. ‘वाक्यं रसात्मक काव्यम’ अर्थात ज्यात रस आहे अशा वाक्याला काव्य म्हणावे. असे विश्वनाथ पंडित यांनी म्हटले आहे. कॉलरीज यांनी ‘उत्कृष्ट शब्दांची उत्कृष्ट रचना म्हणजे काव्य’ असे संबोधिले आहे. गुलमोहराचं कुकू या कवितासंग्रहातील कविता वाचतांना हे सहजच आठवून गेलं कारण सर्वच कविता अप्रतिम आहेत. कवी प्रशांत केंदळे हे साहित्यिक क्षेत्रातलं एक उत्तम कवी तसेच शैक्षणिक क्षेत्रात एक विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून परिचित असलेलं नाव. हा त्यांचा हा पहिलावहिला कवितासंग्रह. त्यांनी साहित्य, कला, मनोरंजन क्षेत्रात गोड गळ्याचा गाणारा कवी म्हणून नावलौकिक मिळवलेला आहे. अशा या साहित्यिकाचा हा कवितासंग्रह साहित्य जगतात दाखल झाला असून वाचकांनी त्याचे भरभरून स्वागत व कौतुक केले आहे. प्रतिभासंपन्न अशा या कवीने आजवर अनेक कविसंमेलनं तसेच काव्यस्पर्धा गाजवल्याचे रसिकांना ज्ञात आहेच. कवी कविता रचतो म्हणजे काय करतो? असा प्रश्न अनेकदा निर्माण होतो. माझ्या मते विचारांचं आभाळ गच्च भरून आलं कि त्याला रिते होणे अपरिहार्य असते, त्याचप्रमाणे कवी सतत विचार करत असतो. आपल्या अवतीभवती घडणाऱ्या घटनांचा त्याच्या मनावर परिणाम होत असतो, यातून आजूबाजूला असलेल्यांना काहीतरी सांगावं, त्याचं मनोरंजन करावं. असं त्याला वाटत असतं. ‘शहाणे करून सोडावे अवघे जन’ अशीच त्याची प्रवृत्ती असते. अशावेळी कविता माध्यम बनून येते. पहिलीच कविता पाहू, *माथ्यावरती ऊन जरी सूर्य रोज पाखडी* *त्या कोरडवाहूनेच दिली कवितेची बाराखडी* *मग झाडाझुडपांचाही मजला असा संसर्ग झाला* *मिळाले हे कवितेचे रान ; माझाच निसर्ग झाला* ... जन्माला येणाऱ्या प्रत्येक जीवाला उन्हाळा व पावसाळा म्हणजेच सुख, दु:ख सहन करावेच लागते. कोरडवाहू जीवनात कितीही संकटे आले, ठेचा खाव्या लागल्या तरी जगणं सुसह्य करणारी कवितेची बाराखडी ही त्यामुळेच लाभू शकली. या कवितेच्या वेडापायी झाडं झुडपांचा म्हणजेच निसर्गाचा लळा लागून हे कवितेचं रान सुंदर, हिरवं झाल्यानं कवी स्वतःच निसर्गमय झाल्याचं आनंदानं सांगत असल्याचे वाचताना आपल्या सहज लक्षात येते. वृक्षवेली, सूर्य, चंद्र, तारे, गुरं ढोरं अर्थात निसर्गाचा विशेष स्नेह व जिव्हाळा असलेला हा कवी आहे. हुबेहूब निसर्गचित्र वाचतांना वाचकांच्या मनात निर्माण करण्यात हा कवी पारंगत आहे. कमी शब्दात आशयगर्भ कविता असे विशेषण या कवितांना तंतोतंत लागू होते. चारच ओळींची खालील कविता वाचल्यावर आपल्या हे सहज लक्षात येईल, *मळ्याच्या वाटेवरती* *उभ्या बाभळी दोन*... *टेहाळणी करतात* *येतं –जातं कोण-कोण* ...! किती आशयपूर्ण या ओळी आहेत ना ! समृद्ध भाषा, उपमा, अलंकारांनी ओतपोत भारलेल्या या कविता निसर्गचित्र निर्माण करण्यात व वाचकांच्या मनात जागा निर्माण करण्यात यशस्वी होतात. निसर्गाशी विशेष स्नेह, जिव्हाळा असलेला हा कवी आजी, माय-बापाच्या काबाडकष्टाची, त्यांच्या त्यागाची, मायेची विशेष जाण ठेवून आहे. आणि ही जाण आपल्याला काही रचनांमधून भावल्याशिवाय राहत नाही, *बाळंतीण लेकीच्या आईला* *दिसत असेल आपले मातृत्व* *तिच्या लेकीत*, *तसेच माझ्या आईलाही* *दिसत नसेल मातीत* ? किंवा *माय कुर्वाळीत राही* *बाप दुरून पाहतो* *त्याच्या आसवांचा पूर* *फक्त एकांती वाहतो* बाळंतीण लेकीची आई जशी आनंदी होऊन बाळाला जपते, तशीच आई वावरातील भाजी साडीच्या पदरात अलगद गुंडाळून जपते. यावेळी आईच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेनासा झालेला असतो. यातून आईचे मोठेपण अधोरेखित होते तर आजकाल आपल्याला फक्त आईचेच महत्व वर्णन करणाऱ्या कथा, कविता वाचायला मिळतात. इथे मात्र कवीच्या लेखी माय आणि बाप दोघांचेही स्थान जीवनात महत्वपूर्ण असल्याचे जाणवते. माय चंद्राच्या शीतलतेने आपल्या अपत्यांना जोजावते तर बाप सुर्यापरी झिजून आपल्या अपत्यांचे जीवन घडवत असतो. कवी विद्यार्थ्यांमध्ये रमणारा विद्यार्थीप्रिय शिक्षक असून एक चांगला पालकही असल्याने आपला लाडका तान्हा व जीवाचा जीवडा अर्थात लेक कवीच्या लेखणीतून लेख सुटत नाही, *कृष्णापरी दिसे* *तिला तिचा तान्हा* *सोडताना पान्हा* *यशोदेचा* किंवा *बाप मनात जपतो* *लेक त्याची सोनपरी* *तरी जीवाचा जीवडा* *देतो परक्याच्या घरी* कवीला छोट्या तान्हुल्यात कृष्ण भासतो तर लेक परक्याच्या घरी जाणार या कल्पनेने थोडा हळवा होतो. साध्यासुध्या शब्दातसुद्धा कवी फार मोठा आशय व्यक्त करण्यात यशस्वी झाल्याचे आपल्या लक्षात येते. एक मात्र इथे नमूद करावे वाटते कि, कवी शहरात राहत असला तरी आपला गाव, भाऊबंद, निसर्ग यात अडकलेला आहे. कवितेला वाहून घेतलेला कवितेचा मळा फुलवणारा असा हा प्रचंड आशावादी, हिरवं स्वप्न पाहणारा सकारात्मक विचारांचा कवी आहे, *दुष्काळाची दैना* *सारी ही सरू दे* *कुणब्याला स्वप्न* *हिरवं पेरू दे* ... काळ्याकुट अंधाऱ्या रात्रीनंतर निरभ्र सकाळ होणारच, सूर्यप्रकाश आपलं अस्तित्व सिद्ध करणारच त्याचप्रमाणे कितीही दुष्काळ पडला तरीही एक ना एक दिवस पाऊस पडून कुणब्याचं जीवन हिरवं होणारच असा आशावाद हा कवी उराशी बाळगून आहे. या कवितासंग्रहास *चित्रकार संतोष घोंघडे* यांनी रेखाटलेले उत्कृष्ट आणि बोलके मुखपृष्ठ वाचकाला पाने पालटून कविता वाचायला प्रेरित करते. तसेच *ज्येष्ठ साहित्यिक म. भा. चव्हाण* यांच्या समर्पक प्रस्थावनेमुळे कवितासंग्रहाचा एकूण आवाका सहज लक्षात येतो. तसेच *‘रक्ताचं पाणी करून कवितेचा मळा फुलविणाऱ्या मायबापासह या प्रेरक आणि सुंदर सृष्टीला’* त्यांनी हा कवितासंग्रह अर्पण केलेला आहे. *षडाक्षरी, अष्टाक्षरी, लयबद्ध गाणी, गजल सदृश्य रचना, अभंग, मुक्तछंद* अशा विविध प्रकारच्या रचनांनी हा संग्रह बहरलेला आहे. कवितेवर निस्सीम प्रेम असलेले हे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या कवितांमधून त्याचं भावविश्व अर्थात त्यांची शाळा, विद्यार्थी, आईवडील, निसर्ग अशी विविधता आणि संपन्नता आढळते. पुन:पुन्हा वाचाव्या अशा त्यांच्या कविता आहेत. *'माझ्या कवितेचा मळा, वृक्ष लळा, काळीजकळा, ऊनझळा-पाऊसकळा'* अशा चार विभागात एकूण ५७ वाचनीय आणि आशयगर्भ कवितांचा या कवितासंग्रहात समावेश असून ‘गुलमोहराचं कुकू’ या कवितासंग्रहात अतिशय वाचनीय, आशयगर्भ कविता वाचायला मिळतात. हा संग्रह वाचकांनी आवर्जून वाचावा, असे मला वाटते. हे सर्व लिहिण्याचे कारण म्हणजे शुक्रवार, दि. १७ मे, २०२४ रोजी हुतात्मा स्मारक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, नाशिक येथे गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष माणूसमित्र सुरेश पवार यांनी आयोजित केलेल्या *‘पुस्तकावर बोलू काही*...’ या सदरात कवी प्रशांत केंदळे यांच्या ‘गुलमोहराचं कुकू’ या कवितासंग्रहावर आधारित *ऐसपैस गप्पांच्या कार्यक्रमाची मेजवानी* नाशिकमधील रसिकवाचक तसेच साहित्यिकांसाठी उपलब्ध झाली आहे. दि. ५ मार्च, २०२४ ते दि.२८ फेब्रुवारी, २०२५ दरम्यान दर मंगळवारी आणि शुक्रवारी हा उपक्रम संपन्न होणार आहे. अशा प्रकारचा बहुधा हा साहित्य क्षेत्रातील पहिलाच अभिनव उपक्रम असावा. यामध्ये नवोदित तसेच प्रस्थापित साहित्यिकांना व्यक्त होण्यासाठी हक्काचं व्यासपीठ उपलब्ध झालं आहे. याहीपुढे, त्यांची लेखणी अशीच तळपत रहावी. त्यांच्या हातून सर्व प्रकारचे साहित्यिक लिखाण व्हावे, हीच सदिच्छा! कवी प्रशांत केंदळे यांना गिरणा गौरव प्रतिष्ठान आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ या सदरात संपन्न होणाऱ्या व्याख्यानास आभाळभर शुभेच्छा! पुस्तकाचे नाव :- *गुलमोहराचं कुकू* कवी/लेखक :- *प्रशांत केंदळे*, संवाद क्र. *८०८७१७२२४१* प्रकाशक :- *चपराक प्रकाशन*, पुणे पाठराखण :- *म. भा. चव्हाण*, पुणे स्वागत मूल्य :- ₹ १२०/- मात्र (*सवलतमूल्य, टपाल खर्च आणि अधिक माहितीसाठी कृपया, संबंधितांशी संपर्क साधावा.*) आस्वादक :- *सोमनाथ आवडाजी पगार* (सॅप) *(महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेत प्रकाशनार्थ अनुदान प्राप्त साहित्यिक)* सुसंवाद.:- ९२७३३५७१५९, Email:- somnathpagar@yahoo.co.in *गीतकार/ कवी, कथा, पटकथा, संवाद लेखक, युसमीक्षक, ट्युबर, ब्लॉगर, टेक्नोक्रॅट, ऑनलाईन डॉक्युमेंट्स ऍडव्हायझर, इंग्लिश लँग्वेज ट्रेनर.*