google.com, pub-3412048091495808, DIRECT, f08c47fec0942fa0 Sahitya Tirtha - My Literature, My Creation साहित्य तीर्थ - माझं साहित्य, माझं लिखाण: 06/01/2023 - 07/01/2023

रविवार, १८ जून, २०२३

कथा:- कसोटी... A Divine Trial (©All rights reserved.)

कसोटी... A Divine Trial ही कथा आहे आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान युगातील नवसाला पावणारी माता केद्राईप्रति असलेला भक्तीभाव, श्रद्धा आणि शक्तीची. ही कथा आहे खऱ्या व उत्कट प्रेमाची, विवाह झाल्यावर लवकर मुलबाळ न होणाऱ्या गौरी आणि विजयची, त्यांची मुलाबाळाप्रति असलेल्या खऱ्या वात्सल्याची. कथा सुरु होते ती नाशिक शहरातील एका सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये, गौरीचा पती विजयचा घातपातामुळे अपघात झाल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले असून पोलीस तपास करण्यासाठी आले आहेत. योगायोगाने पोलीस इनस्पेक्टर कौतिक जाधव हे विजयचा कॉलेजचा मित्र असल्याने गौरी तपासाअंती आजपर्यंत घडलेल्या घटना कथन करते आहे. विनता नदीतिरी असलेले खडक ओझर गावचे जागृत ग्रामदैवत केद्राई मातेची आरती होते सर्व उपस्थित भक्त व ग्रामस्त पुजारी/ गुरव बाबांकडून प्रसाद घेवून आपापल्या मार्गाला जातात. केद्राई माता नवसाला पावणारी देवी, भक्तांच्या मनात श्रद्धाभाव असणारी, शुद्ध मनाने नवस केल्यास भक्ताची इच्छा पूर्ण करणारी. आजही नवस फेडण्यासाठी गर्दी झालेली. गौरीच्या मळ्यात दैनदिन कामे सुरु असतात, बापूरावांचा सुखी व समाधानी संसार. बापूरावांचं या खेडेगावातील मळ्यातील बंगल्यात वास्तव्यास असणारं मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंब; पत्नी सरूबाई, आई लक्ष्मीबाई, वडील गणपतराव, मोठा मुलगा शरद व लहान कन्या गौरी जी केद्राई मातेला नवस करून जन्माला आलेली असते. गौरी, सुंदर, सुशील, हुशार; घरकामात आईला व शेतात वडील तसेच भावाला मदत करणारी, बारावीला जवळच्या मोठ्या गावातील महाविद्यालयात शिक्षण घेत असते. त्याच महाविद्यालयात गावातील बडी असामी आमदार बाजीराव डावधरे यांचा मुलगा, तो तसा व्यसनी, मुलींची छेड काढणारा, उनाड, टपोरी, गुंडगिरी करणारा, बापाच्या सत्तेचा व संपतीचा माज असणारा प्रकाश वरच्या वर्गात नावालाच शिक्षण घेत असतो. प्रथमत: पाहिल्यापासून प्रकाशला गौरी आवडू लागते आणि तो तिला मिळवण्यासाठी तिच्या मागे लागलेला असतो, त्यासाठी तो काहीही करायला तयार असतो. यामुळे गौरी व प्रकाश यांच्यात बऱ्याचदा खटकेही उडतात. परंतु गौरीला प्रकाश मुळीच आवडत नसतो. सर्व विद्यार्थी मित्रमंडळी, शिक्षक तसेच गावातील काही वडीलधाऱ्या मंडळीना याची भुणभुण लागलेली असते. मात्र आमदार पुत्राविरूढ ‘ब्र’ शब्द काढण्याची कुणाची हिम्मत होत नसते. केद्राई मातेचा जोगवा मागणारी भक्तीन दुर्गाई, जी गौरीच्या घरीही नेहमीच येत असते, ती तिला भेटते व “तू आईचा प्रसाद असून तुझ्या मनात आईची मोठी भक्ती आहे, तू आईला कधी विसरू नको. आई तुला सुखी ठेवील” असा आशीर्वाद देते. गावचे जागृत ग्रामदैवत नवसाला पावणाऱ्या केद्राई मातेची यात्रा सुरु असते. गौरीला एकटीला पाहून प्रकाश तिची छेड काढतो. याच यात्रेत देवीच्या साक्षीने लग्न लावण्याची गळ घालतो, तिला पकडून नेऊन जबरदस्ती करतो. त्याचे तिच्यावर खरे प्रेम मुळीच नसते. असते ती फक्त एक शारीरिक भूक, वासना. खरतर फक्त लग्न लावून तिला बरबाद केल, कि ती कायमची आपल्या कब्जात व त्यानंतर आपण आपले कसेही वागायला मोकळे असा त्याचा प्लॅन असतो. हि बातमी प्रथमदर्शी अंबादास या गावातील तरुणाकडून गौरीचा चुलत भाऊ अर्जुनला समजते. अर्जुन शहरात मोठ्या कंपनीत नोकरीला असतो, आपल्या गावातील यात्रा पाहण्यासाठी, आपल्या कंपनीतील इंजिनिअर विजयला यात्रेसाठी सोबत आणलेले असते. सर्व हकीगत समजल्यावर दोघेजण आपल्या मित्रांबरोबर जावून प्रकाश व त्याच्या गुंड मित्रांना चांगलाच चोप देवून गौरीला त्यांच्या तावडीतून सोडवून आणतात. यामुळे प्रकाशशी यांचे वैर सुरु होते. प्रकाश विजयला संपवण्याची तसेच गौरीला बरबाद करण्याची शपथ घेतो. गौरीला पाहताच विजय तिच्या प्रेमात पडतो. गौरीलाही काही अंशी विजय आवडू लागतो. आपल्या स्वनात येणारा राजकुमार हाच असावा. याची तिला खात्री पटते. “कदाचित आई केद्राईची हीच इच्छा असेल.” असे तिच्या मैत्रिणी तिला सांगतात. त्यामुळे ती विजय बरोबर सुखी आयुष्याची स्वप्न रंगवू लागते. विजय गावची, केद्राई मातेची यात्रा संपल्यावर अर्जुनबरोबर नाशिकला परततो. इकडे गावी गौरीला प्रकाश व त्याच्या गुंड मित्रांकडून बराच त्रास सहन करावा लागतो. ती कॉलेजमधून घरी परतत असतांना घाबरल्याने गाडी जोरात चालवते. त्यातच तिचा अपघात होतो, ती थोडं खर्चटून जखमी होते. ही बाब घरी समजल्यावर तिचे कॉलेजमध्ये जाणं बंद होते. हे अर्जुन, फोनवर शरद, गौरीच्या भावाशी बोलत असताना विजय ऐकतो. ”तू यात पडू नको, शेवटी तो आमदाराचा पुत्र असून गुंड प्रवृत्तीचा आहे.” असं अर्जुन विजयला बजावतो. मात्र अन्याय, अत्याचाराची चीड असणाऱ्या विजयला राहवत नाही. खरतरं त्याला मनोमन ती आवडूही लागली होतीच. यावर उपाय काय करावा? हा विचार ते दोघे करतात. काही दिवस गेल्यावर अर्जुनची बहिण काजलच्या लग्नासाठी विजय अर्जुनबरोबर खडक ओझरला येतो. लग्न समारंभात विजय व गौरीचे प्रेम वाढत जाते. ते एकमेकांना आवडू लागतात. अर्जुनची साथ व मदत त्यांना असतेच. ही बाब गौरीच्या व विजयच्या घरच्यांना कशी सांगायची हा पेचप्रसंग निर्माण होतो. विजयचे आईबाबा आधुनिक विचारसरणीचे, त्यांना ‘उच्च शिक्षित सून हवी’ हा त्यांचा अट्टाहास. कारण ते स्वत: दोघेही नोकरी करणारे, अजयराव विजयचे वडील, मोठे सरकारी अधिकारी तर आई शारदा या शहरातील नामांकित महविद्यालयात जीवशास्त्राच्या प्राध्यापिका, असे हे नाशिक शहरातील श्रीमंत कुटुंब असते. आपली सूनही नोकरी करणारी असावी. ही त्यांची इच्छा! शेवटी मार्ग निघतो, रीतसर अर्जुनच्या मध्यस्तीने आत्या राधाबाईच्या मदतीने पत्रिका पाठवून, भटजींना गाठून व लग्नानंतर गौरीचे शिक्षण पूर्ण करून नोकरी करण्याच्या अटीवर त्या दोघांचे लग्न लागते. ही वार्ता प्रकाशला समजते. तो वेळोवेळी विघ्न आणण्याचा प्रयत्न करतो. मात्र दरवेळी तोंडघशी पडतो. नाशिक शहरात एका वेगळ्या आधुनिक विचारसरणी असलेल्या परिवारात गौरी सून बनते. गौरीच्या माहेराला ग्रामदैवत केद्राई मातेप्रति भक्तीभाव असल्याने पूजा अर्चा चाले. मात्र तिच्या सासरच्या आधुनिक सुशिक्षित कुटुंबात अर्थात त्यांच्या मोठ्या वैभवशाली बंगल्यात हे मान्य नव्हते. तिला तिच्या श्रद्धेला तिलांजली द्यावी लागली. केद्राई मातेचा फोटोसुद्धा तिला बंगल्यात ठेवू दिला गेला नाही. दु:खी अंत:करणाने तिला कुटुंबाच्या मर्जीप्रमाणे वागावे लागले. मात्र विजयचं प्रेम व छोटी नंनद संजना हिचा आधार यामुळे तिला त्या कुटुंबाशी जुळवून घेण्यास मदत होते. एक दिवस गंगापूर नाक्यावर सिग्नलवर विजयची कार उभी असतांना एक छोटी गरीब मुलगी छोट्या बांबूच्या विणलेल्या पाटीत केद्राईचा फोटो ठेवलेला, त्याला हळदीकुंकू लावून, मातेच्या नावाने जोगवा मागत त्यांच्या कारजवळ येवून गाडीची काचेवर टकटक करताच गौरी काच खाली करते. हे तिच्या सासूला पटत नाही ती गौरीला रागावते, व भसकन खेकसते, “कर काच वर, तुला काही कळते का? कामधंदा करायचा सोडून ही लोकं भिक मागतात, मूर्ख कुठली.” गौरीचा अपमान होतो. हे ती मुलगी पाहते, “केद्राई माता तुम्हाला सद्बुद्धी देवो” असे म्हणत पुढे जाते. गौरीचे पुढील उच्च शिक्षण सुरु होते, विजयचे तिला कॉलेजला सोडवायला जाणे, शहरातील मॉल्समध्ये शॉपिंगला, धार्मिक ठिकाणे (तपोवन, नवश्या गणपती, सोमेश्वर, अंजनेरी, त्रंबकेश्वर, वणी, चांदवड) तसेच वेगवेगळे पिकनिक स्पॉट, शहरातील प्रसिध्द ठिकाणे, हॉटेलिंगला जाणे, अशा मौजमजा सोबतच तिचा अभ्यास घेणे. अशी ही प्रेम कथा खुलत जाते. सुरवातीच्या काळात ते शिक्षण व नोकरीच्या नादात फॅमिली प्लॅनिंग करतात. नंतर मात्र इच्छा असतांनाही काही केल्या त्यांना मुलबाळ होईना. घरात सासूचे टोमणे व जाच सुरु होतो. आई व गौरी दोघींचे मन सांभाळण्यात विजयची तारांबळ उडते. खडक ओझरला गौरीच्या माहेरी जोगवा मागायला येणारी म्हातारी स्त्री दुर्गाई शहरातील तिच्या घरी येते. ते तिच्या आधुनिक सासूला पटत नाही. ती तिचा अपमान करून हाकलून देते मात्र गौरीच्या मनातील खरी भक्ती माहित असल्याचं सांगून ती केद्राई मातेचे नामस्मरण करत निघून जाते. बरेच वैद्यकीय उपचार केल्यावर गौरीला दिवस जातात. विजय व गौरीच्या जीवनात काही सुखाचे क्षण येतात; मात्र जन्माला आलेले बाळ हे जेनेटिकली डिसऑर्डर निघते. वैद्यकीय उपचार होतात, तरी काही आठवड्यात ते बाळ दगावते. (मध्यांतर) दु:खाच्या छायेत काही कालावधी जातो. परत बाळ जन्माला यावं म्हणून घरातून सासू, सासरे यांचा दबाव येऊ लागतो. सासू तिला पांढऱ्या पायाची म्हणून हिणवते. काही केल्या गौरीला बाळ होईना. परत वैद्यकीय उपचार सुरु झाले. सर्व टेस्ट करूनही यश काही येईना. सर्व हतबल झाले. आता मात्र मुल नाहीच झाले तर दुसरे लग्न करण्यासाठी विजयला घरातून आईचा आग्रह होऊ लागतो. रक्षाबंधनासाठी गौरी माहेरला जाते. तिच्या चेहऱ्यावरची चिंता जाणवत होती. त्याचवेळी केद्राई मातेचा जोगवा मागणारी म्हातारी दुर्गाई येते. गौरी जोगवा वाढते. तशी ती नेहमीच येत असते. गौरीला ओळखते. तिच्या दु:खाचे कारण सांगते, “यावर केद्राई मातेच्या चरणावर डोकं ठेवणं हाच एक मार्ग” असल्याचे सांगते. आजी लक्ष्मीबाई तिला केद्राई मातेच्या दर्शनाला नेते. खणा, नारळाची ओटी भरून मातेचरणी नवस बोलते, “माझ्या गौरीची इच्छा पुरी होऊ दे, तीच पोटपाणी पिकू दे, तिच्या पोटी येणाऱ्या बाळाचं जावळ तुझ्या दारात काढील, तुझा प्रसाद मानून त्याचं नाव तुझ्या नावावरून ठेवील.” दोन तीन दिवसानंतर गौरी माहेरहून सासरी नाशिकला परतते. आजीने बोललेल्या नवसाबद्दल घरात सांगते: मात्र जीवशास्त्राची प्राध्यापिका असणाऱ्या सासू प्रा. शारदा बाईला यात विश्वास नव्हता. विजय फक्त तिच्या सुरात सूर मिळवत होता. त्याचे गौरीवर जीवापाड प्रेम असते. मात्र घरातील परिस्थितीला तोही आता वैतागू लागला होता. दैनदिन दिनचर्या सुरु होते. एकमात्र नंनद संजना तिला समजून घेवून तिच्या बाजूने उभी राहते. परत घरात विषय निघतो, वैद्यकीय उपचार सुरु होतात. दुसऱ्यांदा गौरीला दिवस जातात. ती एका गोंडस बाळाला जन्म देते, कुळाला वंशाचा कुलदीपक मिळाल्याने घरात आनंदी आनंद होतो, त्याच वेळी विजयला आपल्या नोकरी निमित्ताने नाशिक शहर सोडून मुंबईला जावे लागते. काही दिवसानंतर गौरीही त्याच्यासोबत राहायला जाते. मुलाच्या आनंदात व विजयच्या प्रेमात गौरी आकंठ बुडून संसारात सुखी व आनंदी होते, त्यांचा राजाराणीचा संसार बहरायला लागतो. यात सर्वच केद्राई मातेचा नवस फेडायचं विसरून जातात. गौरीला वारंवार चमत्कारिक स्वप्न पडू लागतात, तिला काहीतरी भास होतात, तिचे चित्त स्थिर राहत नाही. मात्र तिला आठवत काहीच नाही. इकडे आजी लक्ष्मीआई वृद्धापकाळाने आजारी पडते. तिला शेवटचं गौरीला व बाळ पणतू राजला भेटायचं असते, नवस पुरा करायचा असतो मात्र गौरी दूर असल्याने व तब्येत ठीक नसल्याने निरोप मिळूनही वेळेत पोहचू शकली नाही. आजीचा सर्व जीव गौरी व पणतू राजमध्ये असतो. इच्छा पूर्ण न होताच आजी जीव सोडते. विजय व गौरी धावपळ करत बाळासह माहेराला येतात. मात्र आजीला शेवटचं भेटणं राहून जातं. अस्थी विसर्जनासाठी गौरी व कुटुंबातील इतर व्यक्ती नाशिकला रामकुंडावर जातात. हिवाळ्याचे दिवस असल्याने कडाक्याची थंडी असते. अंघोळ करतांना ती थंडीने कुडकुडते आणि अचानक शरीर गारठतं. हातांचा थरकाप होऊ लागतो, तिला थंडी भरते. आपल्या शहरीरात काहीतरी वेगळंच दैवी घडत असल्याचा तिला भास होतो. ती चक्कर येवून खाली पडते. यानंतर तिचा उजवा हात थरथर करू लागतो. अंग भरून थंडी वाजणे काही केल्या बंद होत नाही. कुणी म्हणे अशक्तपणा असेल, कुणी म्हणे आजीचा तिच्यात फार जीव होता त्यामुळं आजीच्या मृत्यूचा झटका सहन नाही झाला. तर कुणी म्हणे बाहेरचा झटका असावा. अस्थी विसर्जनाचा विधी एका बाजूला तर तिच्या दावाखाण्याची धावपळ एका बाजूला सुरु होतो. फॅमिली डॉक्टरकडून काही उपचाराचा उपयोग होईना मग मोठ्या नुरोलोजीस्ट कडे नेले जाते, सर्व टेस्ट नॉर्मल असतात तरी सिलिकॉन कमी असू शकेल असं बोललं गेलं. उपचारांचा काही उपयोग झाला नाही. शेवटी “पेशंटच्या डोक्यात फरक पडला आहे, तिला ठाण्याला किंवा दुसऱ्या एखाद्या चांगल्या मेंटल हॉस्पिटलला भरती करा” असा सल्ला देण्यात आला. डॉक्टरच्या या ओपेनिअनमुळे मेडिक्लेम मिळू शकला नाही. त्यामुळे पैशामागे पळणाऱ्या या आधुनिक परिवारातील सर्वांची मानसिकता बिघडते. गौरीला सांभाळायला तिची आई सरूबाई त्यांच्या सोबत जाते. विजयला आता जबरदस्त टेन्शन येऊ लागते, पूर्ण फॅमिली डिस्टर्ब झाली होती. नेमके काय उपचार करावेत हे कुणालच कळेना. सर्व प्रकारचे उपचार झाले, टेस्ट झाल्या, गोळ्या औषधे खाऊन झाली. मात्र गौरीची मानसिक स्तिथी सुधारत नव्हती तसेच हाताची थरथरही कमी होत नव्हती. एक दिवस विजय त्याच्या सहकार्याशी बोलत असतो, “अमुक अमुक गावाला एक फार मोठे बाबा आहे, फी घेत नाही मात्र गुण येतो म्हणजे येतो.” नाविलाजाने दोघे बाबाकडे जातात. धागा बांधतात, रातभर दारे, खिडक्या बंद ठेवतात. गुरुवारच्या पाच खेट्या घालतात. तरीही गौरीच्या तब्येतीत सुधारणा होत नाही. अशा बऱ्याच वैद्य, भक्तांकडे गौरीला उपचारासाठी नेलं जातं. निंबू, मिरची, अंगात येणे. असे धरबंधन केले जाते. असे करूनही काही फरक पडला नाही. आता काही पर्याय नाही. आहे तसे राहायचे. असे ते ठरवतात. एक दिवस विजय कामावर असतांना सासू सरुबाईचा फोन येतो, गौरीला जास्त त्रास सुरु होऊ लागतो, थरथर, थंडी, ताप, बडबड वगैरे. तो हातचे काम सोडून घरी येतो. आणि गौरीला हॉस्पिटलमध्ये भरती करतो. हे आता असे नित्याचेच होऊ लागले होते. गौरीची काळजी घेणे विजयला शक्य नसते तसेच हवा पालटावी म्हणून गौरीला माहेरला पाठवले जाते. एके सकाळी नेहमी येणारी जोगवा मागणारी म्हातारी दुर्गाई येते. गौरीची अवस्था पाहून हवालदिल होते. “तू आईला विसरली होती पण आई तुला विसरणार नाही, आईला शरण जा, माफी माग, आई तुला माफी देईल, सारं सुखाचं होईल” अस सांगून जोगवा न घेताच निघून जाते. गौरीला तीचे आई व वडील केद्राईच्या दर्शनाला घेवून येतात. ओल्या वस्त्रानिशी आईचं दर्शन घेवून आईच्या चरणावर माथा टेकवतात. बाळाला आईच्या पायावर ठेवतात. “आई चुकलं भूकलं माफ कर, तुझा नवस फेडू, सारं पहिल्यासारखे ठीकठाक होऊ दे, आई तूच आमचा आधार आहे” असं म्हणून आईची माफी मागतात. व घरी परत येतात. गौरीला यावेळी आजी लक्ष्मीबाईची फारच कमतरता भासते, आठवण येते. खरोखर चमत्कार होतो, गौरीला हळूहळू बरं वाटू लागतं. आश्चर्य म्हणजे ती पूर्णपणे बरीही होते. सर्वांनाच आईच्या भक्तीची व शक्तीची प्रचीती येते. केद्राई मातेचा उदोउदो होतो. पंचक्रोशीत चर्चा सुरु होते. तब्येत बरी झाल्याने गौरी परत सासरला परत जाते. हे एवढे सगळे आश्चर्य चमत्कार घडूनही गौरीच्या सासरला हे देवी वगैरे काही मान्य नव्हते. त्यामुळे तिला नवस फेडता येत नाही, शिवाय विजयचीही बदली व पदोन्नती झाल्याने तिला त्याच्यासोबत जावे लागते. बरेच दिवस, महिने जातत. सर्व काही सुरळीत चालू असते. एक दिवस छोट्या राजला ताप येवून तब्येत बिघडते. आणि भरीस भर एक दिवस अचानक विजयचा अपघात होतो. त्यापूर्वी आर्थिक फसवणूक व लाचखोरीच्या आरोपाखाली त्याला नोकरीतून निलंबित केले जाते. घरी येतांना त्याचा अपघात होऊन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले जाते. एकीकडे छोटा मुलगा राज तापाने फणफणलेला तर एकीकडे पती विजय व्हेंटिलेटरवर... अशी बिकट अवस्था निर्माण होते. आमदार पुत्र प्रकाश विजयच्या ऑफिसमधील अधिकाऱ्याला ब्लॅकमेल करून, फितवून मोठी रक्कम देवून विजयला आर्थिक घोटाळ्यात व लाचखोरीत अडकवतो. विजय ऑफिसमधून बाहेर पडतांना फोन करून गुंडांकडून त्याचा अपघात घडवून आणतो. ही माहिती विजयचा विश्वासू सहकारी नाव न सांगण्याच्या अटीवर गौरीला सांगतो. गौरी इनस्पेक्टर कौतिक जाधव यांना हे सर्व सांगत असते. “एकदा केद्राई मातेचा नवस फेडा” चमत्कार निच्छितच घडेल असं मलाही वाटतं आहे” अस ते तिला सुचवतात. बरेच दिवस विजय शुद्धीवर नसतो, एक दिवस जोगवा मागणारी म्हातारी दुर्गाई गौरीला भेटते, “आईला विसरली, आईला शरण जा, ती तुला मदत करील” असे म्हणते. गौरी पाहते तर दुसऱ्याच क्षणात ती म्हातारी तिथं दिसत नाही. दुसऱ्या दिवशी गौरी सासरचा विरोध पत्करून माहेरी येते. केद्राई मातेच्या पायावर डोके ठेवून माफी मागते. तिकडे विजय शुद्धीवर येतो. बाळची तब्येतही धडधाकट होते. गौरीच्या सासरच्या लोकांनाही केद्रोईच्या भक्तीचा विश्वास पटतो. त्यांनतर बाळाचं नामकरण केदू असे होते. आईचा नवस वाजत गाजत फेडून सर्व आनंदाने राहू लागतात. तपासाअंती अपघात हा प्रकाशने घडवून आणलेला असतो तसेच आर्थिक घोटाळा व लाचखोरी हे प्रकाशचेच षड्यंत्र होते, हे सिद्ध होते. प्रकाशला शिक्षा होते तर विजय निर्दोष सुटतो. गौरी व विजयचा सुखाचा संसार फुलू लागतो . जोगवा मागणारी म्हातारी दुर्गाई दुसरी कुणी नसून साक्षात केद्राई माताच होती. याची सर्वांना खात्री पटते. (समाप्त) जय केद्राई माता !