Sahitya Tirtha - My Literature, My Creation साहित्य तीर्थ - माझं साहित्य, माझं लिखाण
Its all about my Compositions/ Creation i.e. Poems, Songs, Stories etc.
शुक्रवार, १४ फेब्रुवारी, २०२५
गावाकडच्या गोष्टी - अनुभव समृद्धआठवणी
गावाकडच्या गोष्टी – अनुभवसमृद्ध आठवणी !
आस्वादक : सोमनाथ पगार
संपर्क क्र.:- ९२७३३५७१५९
https://www.facebook.com/share/p/1FepSLoTbG/
माझ्या परिचयातील एका जवळच्या व्यक्तीने शहरात स्थिरस्थावर झाल्यानंतर मध्यंतरी आपल्या गावाला गेल्यावर तेथील शेतातील पिकाचे, परिसराचे फोटो फेसबुकवर पोस्ट केले होते. ते फोटो पाहून मी, ‘माणूस गावापासून दूर गेला की जास्त प्रमाणात आपलं गाव काळजात जपत असतो’ अशी उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया नोंदवली होती. त्याचं कारण म्हणजे, 'ओढ लावते या जीवाला गावाकडची माती, वाट पहात असतात आपुलकीची नाती.' या माझ्यासारख्या अनेक व्यक्तींच्या मनातील बोलक्या भावना होय.
‘आपण खूप खूप शिकून मोठ्ठं व्हावं’ असं लहानपणी प्रत्येकालाच वाटत असलं तरी शिकून मोठ्ठं झाल्यावर आपण आपल्या गावाला पारखं होणार, परकं होणार याची किंचितसुद्धा कुणाला कल्पना नसते आणि होतंही तसंच... पोटापाण्यासाठी गावाला मुकावं लागल्यावर शहरात किंवा दूर कुठंतरी स्वप्नांच्या दुनियेत स्वप्न पूर्ण करण्यासाठी जावं लागतं. मग कालांतराने पाहुण्यासारखं गावात कधीतरी येणं-जाणं होतं, पर्यायाने काळजात गावाचं महत्व अधिकच वाढत जातं. अप्रत्यक्षपणे कळत नकळतपणे आपल्या गावाचं गावपण व्यक्ती काळजात जपत सगळीकडे अभिमानाने मिरवत असते. गावात गेल्यावर तेथील शेतीमाती, शाळा, व्यक्ती, नदीनाले, डोंगरदऱ्या पहिल्यापेक्षा आपल्याला प्रिय वाटू लागतात. आणि आपसूकच आपल्या गावावर आपण अधिकच प्रेम करू लागतो.
हे सारं लिहिण्याचे कारण म्हणजे माझे मार्गदर्शक ज्येष्ठ लेखक, सेवानिवृत्त शिक्षक तसेच नामवंत मुद्रितशोधक श्री अर्जुन वेळजाळी सरांच्या ‘गावाकडच्या गोष्टी’ या आत्मबंधात्मक ललितलेखसंग्रहाचे प्रकाशन सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी श्री. वि. ग. बोरस्ते, ग्रामीण साहित्यिक विजयकुमार मिठे, ज्येष्ठ लेखक डॉ. यशवंत पाटील, आकाशवाणीचे माजी संचालक कवी उत्तम कोळगावकर, माजी सनदी अधिकारी डॉ. बी. जी. वाघ, ज्येष्ठ लेखक, ॲड. मिलिंद चिंधडे, ज्येष्ठ कवी लक्ष्मण महाडिक, ज्येष्ठ गजलकार तुकाराम ढिकले, शिवछत्रपती पुरस्कार विजेते क्रीडा संघटक श्री. अशोक दुधारे, गिरणा गौरव प्रतिष्टानचे अध्यक्ष, माणुसमित्र सुरेश पवार आदी मान्यवरांच्या हस्ते नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील हुतात्मा स्मारकात मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
नामवंत अशा ग्रंथाली प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले असून चित्रकार प्रमोद जोशी यांनी रेखाटलेले बोलक्या मुखपृष्टासह प्रमोद जोशी व अभिषेक भंडारे यांनी रेखाटलेली आतील रेखाचित्रे, विजयालक्ष्मी मणेरीकर यांची समर्पक प्रस्तावना तसेच वाचकांचे भावविश्व श्रीमंत करणारे मृद्गंधात माखलेल्या आठवणी व अनुभवसमृद्ध ललितलेख ही या पुस्तकाची बलस्थाने म्हणावे लागतील.
साहित्यिक आपले अनुभव, आपले भावविश्व आपल्या लिखाणातून मांडत असला तरी यातून वाचकांना निखळ आनंद देणे याबरोबरच वाचकांचे मनोरंजन करत त्यांचे भावविश्व समृद्ध करणे, भावी पिढ्यांना मार्गदर्शन करत त्यांना दिशा देणे, हेसुद्धा मुख्य हेतू असतात. हे हेतू साध्य करण्यात लेखक यशस्वी झाल्याचे मला या पुस्तकातील लेख वाचताना जाणवल्याशिवाय राहिले नाही. असे लिखाण वाचताना वाचक रममाण होतात, त्यांना त्यातून स्वर्गीय आनंद मिळतो. असाच अनुभव मला हे पुस्तक वाचताना आला.
'जीवन म्हणजे अनुभवाची शाळा.' पावलोपावली आलेल्या अनुभवाच्या बळावर पुढील मार्गक्रमण ठरत असले तरी भावी आयुष्याची पायाभरणी बालपणीचे अनुभव तसेच प्राप्त परिस्थितीनुसार होत असते हे नक्की. एखादा साहित्यिक आपल्या साहित्यातून जनमानसाच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम करत असतो. ओघवत्या, सहज, सोप्या रसाळ भाषेत लिहिलेले या लेख असून आपल्या अनुभवांचं दालन लेखकाने या लेखांमधून वाचकांना मोकळं करून दिलं आहे. या लेखांमधील स्थळ, काळ, पात्रे आपल्या अवतीभवती असलेली, आपल्या जीवनातील वाटतात. आणि त्यामुळेच हे लेख वाचकांच्या मनाला भिडतात.
सोडताना रडलो मी गाव माता
भावनांना उरला ना भाव आता (भावनांना उरला ना भाव आता)
तसेच
नेहमी आठवतो मला
आपला गाव मनातला
तिथं माणसं डोंगराएवढी
माणुसकीला समुद्राची खोली
मुखी झिरपते सदा
ज्यांच्या काळजातली बोली (आपला गाव मनातला)
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेत प्रकाशनार्थ अनुदान प्राप्त होऊन प्रकाशित झालेल्या माझ्या ‘वेदनेचे काटे’ या कवितासंग्रहातील वरील ओळी मला हे लेख वाचताना परत परत आठवत होते. एकूणच काय तर हे लेख वैश्विक आहेत याची प्रचीती येते. त्यामुळे मी या ओळी इथे नमूद केल्या.
‘बालपणीचा काळ सुखाचा’ असे म्हटले जाते. दररोज नवनवीन अनुभवांची शिदोरी अनुभवसंपन्न करत असते. त्यातून व्यक्तीची जडणघडण होते. एकांतात हे सारं संचित आठवत आयुष्याची वाटचाल निरंतर सुरु राहते. यातूनच ‘गावाकडच्या गोष्टी’ सारख्या आत्मबंधात्मक लेखनाचा जन्म होतो. पहिल्या लेखात आपल्या गावाची ओळख करून देताना ‘वावी : ऐतिहासिक वारसा असलेलं माझं गाव !’... गावापासून दूर गेले, की गावाकडील आईवडील, शेतीवाडी, शाळा, मित्र यांची आठवण येऊन गावातील सुखाची, आनंदाची कल्पना येते अन् मन गावाकडे धाव घेऊ लागतं. अशी सहज, समर्पक सुरुवात केली असल्याने एकूणच लेखांचा आवाका सहज लक्षात येतो. परिणामी वाचकाच्या मनात पुढे काय याची उत्सुकता वाढत जाते.
तसे पहिले तर लेखक हे एक हाडाचे शिक्षक तर आहेच त्याचबरोबर ते उत्तम साहित्यिक आहे. त्यांचे ‘सुविचारातील आई’, ‘वावी : ऐतिहासिक वारसा असेलेलं गाव’, ‘शालेय विशेष दिनविशेष’ आणि आता हे ‘गावाकडच्या गोष्टी’ इत्यादी दर्जेदार साहित्यिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचे प्रत्येक पुस्तक एक उत्तम साहित्यिक दस्तऐवज ठरावे असेच आहे.
अवर्षणप्रवण भागात त्यांचे गाव येत असल्याने तसेच बालपणी भयंकर दुष्काळ सहन करावा लागल्याने प्रतिकूल परिस्थितीत काबाडकष्ट करत त्यांना शाळा व महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करावे लागले, त्यासाठी प्रसंगी आईला विकावे लागलेले मंगळसूत्र, याची सल त्यांना सतत बोचत असल्याने ती त्यांच्या लेखणीतून झिरपली असल्याचे जाणवल्याशिवाय राहत नाही. गनिमी काव्याने गायींची केलेली सुटका, बैलाशी झुंज, डोके व कान झोडपणारा पाऊस, लळा लावणारी आठवणीतील शाळा, विनातिकीट प्रवास केल्याची सल अशा चित्तवेधक लेखांसह गुरुजींनी जीवनाला दिशा दिली हे सांगायला लेखक विसरत नाही.
पूर्वी गावापासून दूर तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षणासाठी मुलांना रहावं लागे, अशा वेळी गावाकडून एस.टी. मधून जेवणाचा डबा पाठवला जाई. ही महत्वाची तसेच खडतर असली तरी जीवनाला दिशा देणारी अशी आठवण त्यांनी ‘विद्यार्थ्यांची अन्नपूर्णा : एस. टी.’ या लेखात उत्तमरित्या वर्णन केली आहे. आपल्या आईच्या बाबतीत मात्र लेखक हळवे होत ' त्यागमूर्ती माझी आई ' असे सार्थ वर्णन त्यांनी आपल्या आईचे केले आहे.
अर्जुन वेलजाळी सरांचे ‘गावाकडच्या गोष्टी हे प्रेरणा देणारं, मनात आपल्या गावाबद्दल प्रेम निर्माण करणारं कथन आहे. त्यांनी वर्णन केलेले प्रसंग बोलके व वाचकाच्या मनात कुतूहल निर्माण करणारे आहेत. हे लिहिताना त्यांची स्मरणशक्ती अफलातून असल्याचे जाणवते. बालपणीच्या घटना, प्रसंग जसे की, साळुंकीला झालेली इजा, खारुताईच्या पिलांची व चिमणीची झालेली हत्त्या, त्यावेळी असलेले मित्र, लाभलेले शिक्षक व या सर्वांची नावे आजही सरांच्या लक्षात आहेत हे विशेष. फक्त आर्थिक नव्हे तर प्रेम, माया, ममता, संस्कार, निसर्ग याबाबतीत श्रीमंत असणारी ग्रामसंस्कृती आजच्या पिढीला समजण्यास हे लेख हातभर लावतात. कारण ग्रामसंस्कृतीचं चित्र डोळ्यासमोर हे लेख वाचताना निर्माण होते. लोकप्रिय लेखकांची वाक्ये, वाक्प्रचार यांची चपलख पेरणी या लेखांमध्ये आढळते.
आठवणींचा धांडोळा घेत त्यांनी प्रसंग वर्णन केलेले असून वाचकांना खिळवून ठेवतील अशी लेखांची मांडणी केली आहे. बालपण, आईवडील, भाऊबहिण, शाळा, कुटुंब, शिक्षक, आपले मित्र, जनावरे, एस. टी. यांसह लेखातील विविध पात्रे व व्यक्तिमत्वे सहजच आपली वाटून जातात. आयुष्यभर आपल्या गावाची नाळ त्यांनी तुटू दिली नाही. थोडक्यात, गावाच्या आठवणींद्वारे त्यांनी जीवनाच्या विविध टप्प्यांवरील गावाला आठवण्याचा प्रयत्न केला आहे.
‘लहानपणी माझे जीवन घडत असताना माझ्यावर ज्या ज्या शिक्षकांनी उत्तम संस्कार केले, मित्रांनी नि:स्पृह सहकार्य केले अन् नातेवाइकांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मदत केली, त्या सर्वांना माझ्या या ‘गावाकडच्या आठवणी’ सविनय समर्पित !’ अशी समर्पक कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी ही त्यांची साहित्यकृती अर्पण केली आहे. या लेखसंग्रहात 'वावी : ऐतिहासिक वारसा असलेलं माझं गाव', 'माझ्या आठवणीतील शाळा', 'शेतक-यांची सांस्कृतिक श्रीमंती –चुरमा, तुकडे,... असे एकूण चौतीस वाचनीय लेख वाचकांना खिळवून ठेवणाऱ्या आहेत.
हा उहापोह करण्याचे महत्वाचे कारण म्हणजे आज शुक्रवार दि १४ फेब्रुवारी २०२५ रोजी हुतात्मा स्मारकात, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, नाशिक येथे गिरणा गौरव प्रतिष्टान आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ या उपक्रमात ‘गावाकडच्या गोष्टी’ या लेखक अर्जुन वेलजाळी सरांच्या पुस्तकावर ऐसपैस गप्पांच्या कार्यक्रमाची मेजवानी नाशिकमधील रसिक वाचक तसेच साहित्यिकांसाठी उपलब्ध झाली आहे. दि. ५ मार्च २०२४ पासून दर मंगळवारी व दर शुक्रवारी हा उपक्रम संपन्न होत आहे. अशा प्रकारचा बहुधा हा साहित्य क्षेत्रातील पहिलाच अभिनव उपक्रम असावा. यामध्ये नवोदित तसेच प्रस्थापित साहित्यिकांना आपल्या साहित्यकृतीवर व्यक्त होण्यासाठी हक्काचं व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
मराठी साहित्यात / कथाविश्वात प्रकाशित झालेलं हे पुस्तक म्हणजे एक दर्जेदार लेखसंग्रह असून वाचकांनी हा लेखसंग्रह आवर्जुन वाचावा हा आवाहन व आग्रह करून लेखक अर्जुन वेलजाळी सरांना पुढील साहित्यिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !
*पुस्तकाचे नाव :-* गावाकडच्या गोष्टी ( आत्मबंधात्मक ललित लेखसंग्रह )
*ISBN :-* 978-93-5650-729-6
*लेखक :-* अर्जुन वेलजाळी. *संपर्क नं.* ९०४९५२२२४०
*प्रकाशक :-* ग्रंथाली, मुंबई
*प्रस्तावना :-* विजयालक्ष्मी मणेरीकर
*मुखपृष्ठ :-* प्रमोद जोशी
*रेखाचित्रे :-* प्रमोद जोशी, अभिषेक भंडारे
*स्वागत मूल्य :-* ₹ २५०/- मात्र ( सवलत मूल्य व टपालखर्च यासाठी कृपया, संबंधितांशी संपर्क साधावा)
*आस्वादक :-* सोमनाथ पगार (सॅप), नाशिक
(महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेत प्रकाशनार्थ अनुदानप्राप्त साहित्यिक (गीतकार/ कवी,लेखक), ट्रान्सलेटर, युट्युबर, ब्लॉगर, टेक्नोक्रॅट (Engineer), इंग्लिश लँग्वेज ट्रेनर, ऑनलाईन डॉक्युमेंट्स ऍडव्हायझर.)
*संपर्क क्र.:-* ९२७३३५७१५९, *Email :-* sahityatirthasp@gmail.com
फ्लॅट न. १, वैष्णवी विहार, सिद्धेश्वर नगर, रेशीमबंध लॉन्समागे, हिरावाडी, पंचवटी, नाशिक - ४२२००३.
सोमवार, २७ जानेवारी, २०२५
निसर्गाच्या वैविधतेची अनुभूती- हिरवाई
पुस्तक परिचय
*निसर्गाच्या वैविधतेची अनुभूती- हिरवाई*
आस्वादक:- सोमनाथ पगार
संपर्क क्र.:- ९२७३३५७१५९.
वृक्ष वेलींनी असे बहरून यावे
हिरवे स्वप्न नयनी दिसावे
चांदण्यात फिरताना मग मी
गीत हिरवाईचे गावे (हिरवे स्वप्न)
या ओळी आहेत कवयित्री डॉ. शोभा रवींद्र सातभाई यांच्या ‘हिरवाई’ या कवितासंग्रहातील हिरवे स्वप्न या कवितेतील. अलीकडच्या काळात वाढते शहरीकरण तसेच औद्योगिकरणामुळे होणारी वृक्षतोड, त्यामुळे निसर्गाचा होणारा ऱ्हास, परिणामी निसर्गाचं बदललेलं चक्र, यामुळे सततची दुष्काळ सदृश्य परिस्तिथी आणि बरेच काही... असे असले तरी ही परिस्तिथी कायमची अशीच न राहता निच्छित बदलेल हा मनाशी आशावाद आहे. श्रावणसरी बरसून गेल्यावर हिरवाई तर होईलच त्याचबरोबर कळ्यांची फुले होतील, हे नक्की. निसर्गाच्या स्थिती संवेदनशील कवयित्रीच्या मनाला विचार करायला भाग पाडते. हेच खरे!
निसर्गाचं वास्तववादी रूप व हिरवाईचं स्वप्न या संग्रहातील कविता वाचकांना दाखविण्यास कवयित्री यशस्वी झाल्या आहे, असे मला या कविता वाचताना वाटून गेले. नदी खळाळून वाहत प्रवाही राहिली तर वाटेत भेटणाऱ्या प्रत्येकाला जीवनदान देते. दैनदिन जीवनात अशा अनेक घटना घडत असतात. त्याकडे व्यापक विचारांनी व उघड्या डोळ्यांनी पाहिलं तर चिंतनशील व्यक्ती आपल्या परीने अर्थ लावत या विश्वाच्या भल्यासाठी काहीतरी करण्याची धडपड करत असते. आहे त्याहून अधिक सकारात्मक व चागले कसे होईल, यासाठी हा प्रयत्न असतो. कवी मनाच्या व्यक्तीही कवितेच्या माध्यमातून जनजागृती तसेच समाज प्रबोधन करत आपला खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करत असते. कवयित्री सहज लिहून जाते,
इथे निळ्या भोर आभाळाची डोंगरांना चादर
खळखळणाऱ्या सागराला मिळे नद्यांचा पाझर (भारत माझ्या देशा)
किंवा
निळ्या आकाशी निजे
हे सूर्य, चंद्र, तारे
होता पहाट जागे होई
झाड, वेली हे जग सारे (निळ्या आकाशी)
वैश्विक भौगोलिक स्थितीचा विचार केला तर आपल्या भारत भुला निसर्गाची देणगी लाभली आहे. हिरव्यागार वृक्षवल्लीमुळे चारी दिशा सजलेल्या आहेत. उतरेच्या हिमालयाच्या रांगा व काश्मीरसारखे नंदनवन, दक्षिणेकडील नारळाच्या हिरव्या झाडांनी बहरलेले केरळ, पश्चिमेला गुलाबी जयपूर, चहा उत्पादनासाठी प्रसिद्ध असा पूर्वेकडील आसाम अशी समृद्धता आपल्या देशाची शान आहे. इतकेच नव्हे तर निळ्या आभाळातील गृह, तारे, इथली पक्ष्यांची किलबिल हे सारं काही अभिमान वाटावं असंच आहे.
या भूतलावरील प्रत्येकाचं व्यक्तीमत्व वेगळं असतं, प्रत्येकाच्या आनंदाच्या संकल्पना वेगळ्या असू शकतात. कवितासुद्धा एक व्यक्त होत आनंद मिळवण्याचं होण्याचं मध्यम असून या व्यक्त होण्यातून निर्मितीचा वेगळाच अद्भुत आनंद मिळत असतो. यासाठी संवेदनशील मन असावं लागतं. या कवयित्रीला असे सृजनशील मन लाभले असल्याने भोवतालीच्या निसर्गातील घडामोडी तसेच वास्तवाला कल्पनाशक्तीच्या जोरावर काव्यात गुंफण्याची क्षमता लाभली आहे. कविता ही उदात्त कला असून कविता म्हणजे भावना आणि विचारांना व्यक्त करण्यासाठी वापरलेला लेखन प्रकार. कवितेत आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे प्रतिबिंब उमटते तेसेच कवितेतून जीवन कळते, समजते आणि उमगतेसुद्धा. पाऊस न पडल्याने व्याकूळ होऊन,
आभाळा रे आभाळा गरज तू आता तरी
वाट पाहुनी जीवाला आस लागली खरी...
शमतील वेदना मातीच्या थेंब थेंब पडुनी अंगावरी
दुष्काळाच्या चक्रात जगणं झालंय भारी (आभाळा गरज तू)
विकासाच्या नावाखाली झाडांची झालेली कत्तल, अमर्याद कार्बन उत्सर्जन त्यामुळे ऋतुमानात झालेला बदल. परिणामी पावसाची वानवा. पाऊस पडावा म्हणून शब्दाच्या माध्यमातून आर्त हाक काळजाला चिर्र करून जाते. पाऊस पडला तर जमिनीच्या भेगा मिटतील. दुष्काळाचं चक्र सरेल. करपून चाललेलं पिक वाचेल आणि बळीराजा सुखावेल. अशी कवयित्रीला आस आहे.
या संग्रहात पानोपानी निसर्ग व हिरवाई बहरलेली कारण कवयित्री पर्यावरणप्रेमी असून वृक्षरोपण व संवर्धन हे त्यांचे जिव्हाळ्याचे विषय असल्याचे जाणवते. डोंगरदऱ्या, वृक्षवल्ली, शेतीमाती यासह निसर्गाचा कानाकोपरा जसे की वसुंधरा, सूर्य, चंद्र, तारे, समुद्र, पशुपक्षी मेघ, आभाळ हे सारे आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर त्यांनी शब्दबद्ध केलेले आहेत. अधिनिक युगात निसर्गाची हिरवाई टिकली तरच भविष्य उज्ज्वल राहील असा जणू संदेशच या कवितांमधून झिरपत आहे. असे मला वाटते. यातूनच,
मन हे माझे वेडे, वाऱ्यासंगे बोले
झुळझुळणारा वारा हा स्वप्नमंजुरी खोले (पावसात उनाड वारा)
किंवा
नका तोडू ही झाडे
किडा, मुंगी, पक्षी सारे
झाडावर घर त्यांचे
पडतील ते उघडे (नका तोडू ही झाडे)
माणूस आपल्या कुटुंबासाठी घर बांधतो, आपल्या अपत्यांची, माय-बापाची काळजी घेतो, मग किडे, मुंगी पक्षी यांचे जीवन यापेक्षा वेगळे नाही. वृक्षतोड झालीतर त्यांचेही घरटे उध्वस्त होतेच ना? हा रास्त सवाल कवयित्रीने वाचकांपुढे ठेवला आहे.
आजकालच्या माणसाचे वागणे पाहून कवयित्री व्यथित झाल्याशिवाय राहत नाही,
आजच्या युगात
यंत्राबरोबर काम करताना
माणूसही जणू यंत्र झाला
कलियुगातल्या या माणसातल्या
माणुसकीचा अंतच झाला... (माणुसकीला जपा)
माणसातल्या माणुसकीचा अंत झाली की काय असे क्षणभर वाटते न वाटते तर लगेच,
बीजाने मातीत खोल-खोलवर रुजून दबकत उगी जगावे
धरतीच्या उदरात अन्न पाणी घेऊन सामावून जावे (बीजाचे वृक्षात रुपांतर)
असा नवनिर्मितीचा आशावाद निर्माण करत त्यांची कविता वाचकांच्या मनात नवचैतन्य निर्माण करते.
या संग्रहातील कवितांचा आशय-विषय, त्यांच्यातील भावना अंत:करणाला भिडतात. बऱ्याच रचना या तालबद्ध आहेत. यातील शब्दांना नादमाधुर्य आहे. या रचना प्रत्येकाच्या भावविश्वाशी निगडीत असून मांडलेले विचार वास्तववादी व प्रभावी आहेत. भाषा सहज सोपी विषयाला साजेशी आणि वाचनातून वाचकांना निश्चितच आनंद देणारी आहे.
कवयित्री डॉ. शोभा रवींद्र सातभाई यांचा ‘हिरवाई’ हा कवितासंग्रह प्रगती प्रकाशनाने प्रकाशित केलेला असून हा संग्रह नुकताच माझ्या वाचण्यात आला. आजवर या कवयित्रीला व या कवितासंग्रहाला अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त असून सर्वच रचना वाचनीय आहेत.
कवी किंवा कवयित्री लिहते याचे कारण आजूबाजूच्या घटनांचा संवेदनशील मनावर होणारा परिणाम. यामुळे मनाची अस्वस्थता, मनातील घुसमट कमी होण्यास मदत होते. कवितेच्या रुपात तेव्हा मनातील वेदनांची ठसठस कमी होऊन भावनांचा निचरा होतो, तेव्हा स्वर्गीय आनंद लाभतो. यातून वाचणाऱ्यालाही आनंद लाभतोच.
या कवितासंग्रहास धनंजय गोवर्धने यांनी रेखाटलेले समर्पक आणि बोलके मुखपृष्ठ वाचकाला पाने पालटून कविता वाचायला प्रेरित करते. कवी प्रा. लक्ष्मण महाडिक, यांची समर्पक प्रस्तावना तसेच कवी रवींद्र सुमन मुकुंदराव मालुंजकर व साहित्यिक डॉ. श्यामसुंदर झळके यांच्या शुभेच्छा आणि ज्येष्ठ कवी माजी आमदार नानासाहेब बोरस्ते यांची पाठराखण हे या संग्रहाच्या जमेच्या बाजू आहेत. आपले तीर्थरूप ‘ज्यांच्या आशीर्वादाने माझे काव्य स्फुरले आणि संस्काराने जीवनाचे सूर-तालात बहरले असे माझे आई व दादांच्या चरणी’ अशा शब्दात त्यांनी हा कवितासंग्रह अर्पण केलेला आहे. विविध प्रकारच्या रचनांनी हा संग्रह बहरलेला असून पुन:पुन्हा वाचाव्या अशा या कविता आहेत.
एकूण ७५ वाचनीय आणि आशयगर्भ कवितांचा या कवितासंग्रहात समावेश असून ‘हिरवाई’ या कवितासंग्रहात अतिशय वाचनीय, आशयगर्भ कविता वाचायला मिळतात. हा संग्रह वाचकांनी आवर्जून वाचावा, असे मला वाटते.
हे सर्व लिहिण्याचे दुसरे कारण म्हणजे मंगळवार, दि. २८ जानेवारी, २०२५ रोजी हुतात्मा स्मारक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, नाशिक येथे गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष माणूसमित्र सुरेश पवार यांनी आयोजित केलेल्या ‘पुस्तकावर बोलू काही...’ या सदरात कवयित्री डॉ. शोभा रवींद्र सातभाई यांच्या ‘हिरवाई’ या कवितासंग्रहावर आधारित ऐसपैस गप्पांच्या कार्यक्रमाची मेजवानी नाशिकमधील रसिकवाचक तसेच साहित्यिकांसाठी उपलब्ध झाली आहे. दि. ५ मार्च, २०२४ ते दि.२८ फेब्रुवारी, २०२५ दरम्यान दर मंगळवारी आणि शुक्रवारी हा उपक्रम संपन्न होणार आहे. अशा प्रकारचा बहुधा हा साहित्य क्षेत्रातील पहिलाच अभिनव उपक्रम असावा. यामध्ये नवोदित तसेच प्रस्थापित साहित्यिकांना व्यक्त होण्यासाठी हक्काचं व्यासपीठ उपलब्ध झालं आहे.
याहीपुढे, त्यांची लेखणी अशीच तळपत रहावी. त्यांच्या हातून सर्व प्रकारचे साहित्यिक लिखाण व्हावे, हीच सदिच्छा! सन्मानीय कवयित्री डॉ. शोभा रवींद्र सातभाई मॅडम यांना गिरणा गौरव प्रतिष्ठान आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ या सदरात संपन्न होणाऱ्या व्याख्यानास आभाळभर शुभेच्छा!
पुस्तकाचे नाव :- हिरवाई
कवयित्री :- डॉ. शोभा रवींद्र सातभाई, संवाद क्र. ९०११०५९७५७
प्रकाशक :- प्रगती प्रकाशन, नाशिक
प्रस्तावना :- कवी प्रा. लक्ष्मण महाडिक
शुभेच्छा :- कवी रवींद्र सुमन मुकुंदराव मालुंजकर, साहित्यिक डॉ. श्यामसुंदर झळके
पाठराखण :- ज्येष्ठ कवी माजी आमदार नानासाहेब बोरस्ते
स्वागत मूल्य :- ₹ १२०/- मात्र (सवलतमूल्य, टपाल खर्च आणि अधिक माहितीसाठी कृपया, संबंधितांशी संपर्क साधावा.)
*आस्वादक: सोमनाथ आवडाजी पगार* (सॅप), संपर्क क्र.:- ९२७३३५७१५९, Email:- somnathpagar@yahoo.co.in
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेत प्रकाशनार्थ अनुदानप्राप्त साहित्यिक (गीतकार/ कवी, कथा, पटकथा, संवाद लेखक), युट्युबर, ब्लॉगर, टेक्नोक्रॅट, ऑनलाईन डॉक्युमेंट्स ऍडव्हायझर, इंग्लिश लँग्वेज ट्रेनर.
शुक्रवार, २७ डिसेंबर, २०२४
माझा दुसरा कवितासंग्रह - 'कारुण्यबोध' आपल्या भेटीला...
माझा दुसरा कवितासंग्रह - 'कारुण्यबोध' आपल्या भेटीला...
१) वैश्विक महामारी कोरोना काळातील भयावह परिस्थितीचा साहित्यिक दस्तऐवज ठरावा असा कवितासंग्रह...
२) या संग्रहात नांदी, वृत्तबद्ध कविता (पादाकूलक वृत्त, अक्रूर वृत्त), मुक्तछंद, अभंग (मोठा व लहान), अष्टाक्षरी, षडाक्षरी, समाक्षरी, गीत (जुन्या लोकप्रिय गीताच्या चालीवर लिहलेल्या गीतासह) तसेच गझल अशा विविध प्रकारच्या रचनांचा समावेश
असून
प्रत्येक रचनेच्या शीर्षकाखाली रचनेच प्रकार, वृत्त, मात्रा व लगावली नमूद केलेले आहेत.
३) नवीन किंवा प्रथमच कवितासंग्रह, कथासंग्रह वगैरे प्रकाशित करू इच्छिणाऱ्या कवी/ लेखकांसाठी मार्गदर्शक अशी कवितांची तसेच पुस्तकाची मांडणी केली असल्याने हा संग्रह आवर्जून संग्रही ठेवावा असा आहे.
४) कोरोना काळ अनुभवलेल्या प्रत्येकाच्याच तसेच या महामारीमुळे हकनाक बळी ठरलेल्या आपल्या प्रिय व्यक्तीच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा संग्रह आपल्या संग्रही असायलाच हवा.
तसेच
आपल्या प्रिय व्यक्तीच्या स्मृतिदिनानिमित्त किंवा स्मृतिप्रीत्यर्थ या संग्रहाच्या प्रती आपले आप्तेष्ट, सगेसोयरे, मित्रमंडळी यांना वाटप करू शकतात.
५) ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक डॉ. अेकनाथ पगार सरांची 'कोरोना काळाचा कारुण्यबोध' अशी समर्पक प्रस्तावना/ पाठराखण या संग्रहाला लाभली आहे.
६) जेष्ठ साहित्यिक अर्जुन वेलजाळी सर, कवी, व्याख्याते, प्राचार्य राजेश्वर शेळके सर, ज्येष्ठ साहित्यिक सोमनाथ साखरे सर, ज्येष्ठ साहित्यिक सुनिल गायकवाड सर या मान्यवरांचा मुद्रित शोधनासाठी मोलाचा हातभार, ही या संग्रहाची जमेची बाजू.
७) प्रसिद्ध चित्रकार संजय पाडवी सरांचे उत्कृष्ट व विषयाला अनुरूप असे अप्रतिम मुखपृष्ठ.
८) २५ वर्षाची परंपरा असलेल्या नामांकित पायगुण प्रकाशनाची दर्जेदार निर्मिती.
९) महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेत प्रकाशनार्थ अनुदान प्राप्त होऊन यापूर्वी मी लिहलेल्या माझ्या इतर कवितांचा माझा 'वेदनेचे काटे' हा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला असल्याने त्यानंतर लिहलेल्या व आता प्रकाशित होत असलेल्या 'कारुण्यबोध' या कवितासंग्रहात चांगल्या आशयपूर्ण तसेच वाचनीय कविता आहेत, याची हमी.
१०) 'कारुण्यबोध' या कवितासंग्रहाची मूळ किंमत ₹. २५१/- असून सवलत मूल्य ₹. १५१/- मध्ये टपाल खर्चासह हा संग्रह घरपोहच पाठवला जाईल.
तसेच
'वेदनेचे काटे' या कवितासंग्रहाची किंमत रोखीने फक्त ₹ ४८/- असून हा संग्रह टपाल खर्चासह फक्त ₹. ९१/- मध्ये घरपोच पाठवला जाईल.
तथापि,
दोन्ही संग्रह हवे असल्यास फक्त ₹. २०१/- मध्ये रोखीने किंवा टपाल खर्चासह घरपोहच पाठविले जातील.
तरी कृपया,
🍃 *9226196298* या नंबर वर *फोन पे* ने किंवा 💳 *9226196298@kotak* या *UPI Id* वर रक्कम send करून स्क्रीनशॉट व पत्ता पाठवावा, ही विनंती💐🙏💐
आपला नम्र
*सोमनाथ पगार* (सॅप)
*(महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेत प्रकाशनार्थ अनुदान प्राप्त साहित्यिक)*
सुसंवाद.:- ९२७३३५७१५९,
Email:- sahityatirthasp@gmail.com
*गीतकार/ कवी, कथा, पटकथा, संवाद लेखक, युट्युबर, ब्लॉगर, टेक्नोक्रॅट, ऑनलाईन डॉक्युमेंट्स ऍडव्हायझर, इंग्लिश लँग्वेज ट्रेनर.*
सभासद:
१.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
२.स्क्रीन राइटर्स असोसियशन
३.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
४.मराठी साहित्य परिषद
५.विश्व मराठी परिषद
*मार्गदर्शक साहित्यिक/ वाचक/ आप्तेष्ट/ शुभचिंतक/ मित्रांचे मनःपुर्वक आभार* 💐🙏💐
मंगळवार, २४ डिसेंबर, २०२४
शाब्बास गुरुजी - सरकारी शाळांचे श्रेष्ठत्व अधोरेखित करणारा लेखाजोखा
ll साहित्य तीर्थ ll
पुस्तक परिचय
शाब्बास गुरुजी – सरकारी शाळांचे श्रेष्ठत्व अधोरेखित करणारा लेखाजोखा
*आस्वादक:- सोमनाथ पगार,*
संपर्क क्र.:- ९२७३३५७१५९.
बालकांच्या बालमनावर आईवडिलांनतर खरे संस्कार आपल्या शिक्षकांकडून शाळेत पहिले पाउल टाकल्यावर होतात. आईवडील चिखलाला आकार द्यावा तसे आपल्या मुलांना घडवतात तर शिक्षक आपल्या कौशल्याच्या बळावर ज्ञानदानाच्या माध्यमातून त्यांच्यात जीव भरतात. खरे तर शाळेत प्रवेश झाल्यावर विद्यार्थ्याला/ बालकाला लाभणारे शिक्षक यावर त्याच्या भावी आयुष्याची दिशा ठरावी इतके महत्व शिक्षकांचे विद्यार्थ्यांच्या जीवनात असते. एखादी इमारत बांधतांना जर इमारतीचा पाया भक्कम असेल तरच त्यावर उभी असणारी इमारत पुढे वादळवाऱ्यात भक्कमपणे सर्व संकटांना समर्थपणे तोंड देत उभी राहू शकते, तीच गत विद्यार्थ्यांनी असते. ज्ञानदान व संस्कार करून विद्यार्थ्यांच्या जीवनाचा भक्कम पाया केवळ शिक्षकच उभारतात, यात तिळमात्र शंका नाही. त्यामुळेच शिक्षक हा चांगल्या शिक्षण व्यवस्थेचा पाया असतो.
आपल्या विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी शिक्षक सतत झटत असतात, ज्ञानार्जन प्रभावी होण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करत असतात. काहीची दाखल घेतली जाते तर काहींचे कार्य अंधारातच राहत असल्याने सर्वसामन्यांना त्याची पुसटशी कल्पनाही नसते. अशाच काही प्रयोगशील तसेच आपल्या विद्यार्थ्यांना घडविण्याचा वसा घेतलेल्या शिक्षकांच्या कार्याचा अर्थात ‘सरकारी शाळांचे श्रेष्ठत्व अधोरेखित करणारा लेखाजोखा’ ‘शाब्बास गुरुजी’ या प्रेरक साहित्यिक लिखाणातून विद्यार्थीप्रिय तसेच उपक्रमशील शिक्षक साहित्यिक राजेंद्र केवळबाई प्रल्हाद दिघे यांनी मांडला आहे.
चांगल्या शिक्षकांमुळेच शास्त्रज्ञ, राजकारणी, अभियंता, डॉक्टर, लेखक किंवा कलाकार घडतात. जेव्हा आपण शिकण्याच्या प्रक्रियेत शिक्षकाच्या भूमिकेबद्दल बोलतो ; हे केवळ शैक्षणिक किंवा खेळातच नाही तर जीवनाच्या शाळेतही आहे. शिक्षक हा केवळ धडे आणि विषय शिकवणारा नसतो. शिक्षक विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा शोध घेण्यासाठी आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करतात. शिक्षक ही अशी व्यक्ती असते जी विद्यार्थ्यांना ज्ञान, संस्कार देवून विद्यार्थ्यांना नैतिक व चारित्र्यसंपन्न बनवून वडीलधारी मंडळी, आपला देश तसेच कला, खेळ वगैरेंप्रती श्रद्धा निर्माण करून जगण्याची पद्धत शिकवते. म्हणूनच शिक्षक हा विद्यार्थ्याचा एक मार्गदर्शक, तत्त्वज्ञ आणि मित्र असतो.
शिक्षणाची दिशा आणि दशा बदलणारे सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, सर्वपल्ली राधाकृष्णन, साने गुरुजी, हेरंब कुलकर्णी, वारे गुरुजी, रणजीतसिंह डिसले अशा अनेक विद्यार्थीप्रिय शिक्षकांचा आपल्या महाराष्ट्राला वारसा लाभला आहे.
सुजाण नागरिक घडवण्याचे परम कर्तव्य बजावणारे प्रयोगशील शिक्षक, शिक्षिकांच्या कार्याची तसेच नवसर्जनाच्या वाटेवर आलेल्या शाळांची माहिती समाजाला ’दैनिक सकाळ’ मधून ‘शाब्बास गुरुजी’ या सदरात लेखक राजेंद्र दिघे यांनी करून दिली आहे. शिक्षण क्षेत्राचे महत्व विशद करणाऱ्या या कर्तबगार शिक्षकांच्या व त्यांच्या आभाळाएवढ्या कार्याची ओळख या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध झालेली आहे.
घटणारी विद्यार्थी संख्या, इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे पालकांचा वाढलेला कल, अशी बदलती परिस्थिती, काही शिक्षकांना ‘शिक्षण सेवक’ या पदावर करावी लागणारी दमछाक अशा अनेक आवाहनांमुळे खरं तर शासकीय मराठी माध्यमांच्या शाळांची परिस्थिती चिंतनीय आहे. अशा आवाहनांना तोंड देत शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागते.
पहिल्याच लेखात वर्षभर चालणाऱ्या जिल्हा परिषेदेच्या ‘हिवाळी’ येथील शाळेतील अवलिया असे सर्जनशील शिक्षक केशव गावित भेटतात. गावाशी एकरूप होत ‘हेच माझे घर, हीच माझी शाळा’ म्हणत टेक्नोसॅव्ही होत नवोपक्रमशीलतेचा ध्यास घेवून अतिदुर्गम आदिवाशी भागात वाट नसलेल्या गावात शिक्षणाची गंगा प्रवाही करून विद्यार्थ्यांचे जगणं समृद्ध करत आहे. त्यांच्या अद्भुत कामगिरीमुळे ३६५ दिवस सतत १२ तास ही शाळा सुरु असते. इतकेच नव्हे तर विद्यार्थ्यांचा सक्रीय सहभाग तसेच ‘गिव्ह’चं पालकत्व हेसुद्धा औत्सुक्याचे विषय आहेत.
‘हिरावाडी’ येथील पाचटाच्या कोपीतील शाळा सलग तीन वर्षांपासून ‘अ’ श्रेणीत तर येतेच त्याचबरोबर जिल्हा गुणवत्ता समृद्धी चाचणीत ‘फाईव्ह स्टार’ मानंकात पटकावते. अशा शाळेतील अडाणी पालकांच्या लेकरांना पंख देणारे शिक्षक शशिकांत शिंदे तर फारच प्रयोगशील... गावात जायला कच्चा व चिखल तुडवावा लागणारा रस्ता, आदिवाशी, सालगडी, अडाणी शेतमजुरांची लेकरं कोटी, अब्ज, खर्व, निखर्व अशा संख्या सहज वाचतात. शिंदे गुरुजीमुळे ही शाळा आज सुसज्ज इमारत, सुंदर बगीचा, आणि सुंदर फुलझाडांसह समृद्ध वनराईने नटली आहे.
स्पर्धेच्या युगात झोपडपट्टीतील विद्यार्थीसुद्धा सरस होऊन जीवनात यशस्वी होण्यासाठी सुसंस्कृत व्हावा म्हणून नाविन्य व लोकसहभागातून आपल्या शाळेचा कायापालट घडवून आणणाऱ्या, ज्यांच्या उपक्रमशीलतेची दखल केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने घेतली आहे. विद्यार्थी गरीब असले तरी ज्ञानाने श्रीमंत करण्याचे ध्येय बाळगणाऱ्या शिक्षिका कुंदा बच्छाव यांची प्रयोगशीलता तसेच नवोप्रक्रमांमुळे मनपाच्या ‘आनंदवल्ली’ शाळेने कात टाकली आहे.
देवळा तालुक्यातील ‘खामखेडा’ गावच्या ‘फागंदर’ आदिवाशी वस्तीवर शिक्षणाचे नंदनवन फुलवणारे उपक्रमशील शिक्षक खंडू मोरे यांचे कार्य तर अचंबित करणारे आहे. निमशिक्षक असलेल्या गुरुजींनी पदरमोड करत गोरगरीब वंचित आदिवासींची लेकरं शिक्षणाच्या प्रवाहात आणली. आदिवाशी वस्तीतील विद्यार्थ्यांना त्यांनी चक्क विमानातून मुंबईची सफर घडवून आणली. आज जरी चांगल्या इमारतीत शिक्षणाच्या वाटेवरील डीजीटल अशी आनंदवन म्हणून ही शाळा भरत असली तरी सुरवातीला पाचटाच्या झोपडीतच नव्हे तर झाडाखालीही त्यांनी प्रसंगी शाळा भरवली.
जागतिक महामारी कोरोना काळात ऑनलाईन, ऑफलाईन शक्य त्या पद्धतीने शिक्षणाचा ज्ञानयज्ञ सुरु ठेवला गेला तसेच ‘घर तेथे शाळा’ उपक्रमामुळे सुपरिचित झालेली ‘भवानीनगर’ येथील शाळा आयएसओ मानांकन मिळवत जिल्ह्यात द्वितीय वस्ती शाळा म्हणून उपक्रमशील दिव्यांग शिक्षक संदीप महाले यांच्या धडपडीमुळे नावारूपाला आली आहे.
चांदवडमधील दीडशे वर्षांपूर्वी १८४५ मध्ये अहिल्याबाई होळकर यांच्या वाड्यात म्हणजेच रंगमहालात भरणारी आजची दगडी शाळा जी एकेकाळी प्रतिष्टा असणारी शाळा होती, आज काळाच्या ओघात ‘जुने लोप पावावे’ तशी मोडकळीस आली होती. त्याच शाळेचे माजी विद्यार्थी असलेल्या संदीप महाले गुर्जींनी लोकसहभागातून तसेच माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने त्या शाळेला गतवैभव प्राप्त करून दिले.
गुजरात राज्याच्या सीमेवर निसर्गरम्य परिसरात तीनशे लोकवस्ती असलेल्या ‘मांगलीदर’ या गावात ग्रामपंचायत, आई प्रतिष्टान, मालेगाव त्याचबरोबर राजधानी गारमेंट्स यांच्या सहकार्यामुळे तसेच कृतीशील शिक्षक राजू देवरे यांचे प्रयत्न फळाला आल्याने अवघी चार पटसंख्या असल्याने बंद पडणार असणारी बिनभिंतीची मांगलीदर शाळा बदलली आहे.
नाविन्यपूर्ण उपक्रमांतून शिकणं सुलभ करणारे प्रयोगशील शिक्षक प्रवीण शिंदे यांची गाव अन् शाळेची घट्ट नाळ जपणारी ‘दापुरे शाळा’, गुणवत्तेसह इंग्रजीत अव्वल ठरणारी, तंत्रस्नेही शिक्षिका लीनाली फटकाळे यांची ‘शिवाजीनगर’ येथील आदर्शवत शाळा, टी.व्ही. पॅटर्नमुळे राज्यात प्रसिद्ध, अतिदुर्गम भागातील ‘धामकीवाडी’ येथील ज्ञानधारा रुजविणारे शिक्षक प्रमोद परदेशी यांची शाळा, आदर्श शाळेचे स्वप्न साकारणारे शिक्षक काशिनाथ सोनवणे यांची आदिवासी समाज मनावर ठसा बिंबवणारी’शेपुपाडा’ शाळा, उपक्रमशील शिक्षक निलेश भामरेंकडून तंत्रज्ञानाला लोकसहभागाची जोड मिळवत अवघ्या वर्षभरात कायापालट झालेली ‘इन्शी’ शाळा, उपक्रमशील शिक्षक निवृत्ती आहेर यांच्या जिद्दीने शाळेचा चेहरा मोहरा बदललेली विभागातील एकमेव ओजस’ अशी ‘भोयेगाव’ची आंतरराष्ट्रीय शाळा, उपक्रमशील शिक्षक विलास सोनवने यांच्या डिजिटल फ्लेक्सने चर्चेत असलेली ‘जनकाकर’ वस्तीशाळा, प्रयोगशील शिक्षक गोकुळ वाघ यांच्या उपयुक्त उपाययोजनांमुळे शिक्षणवारीत राज्यस्तरीय यश मिळवणारी ‘अंगणगाव’ शाळा, गणिताचे पर्यावरणप्रेमी शिक्षक योगेश महाजन यांचे कोंदण लाभलेली भौतिक सुविधांयुक्त ‘सावरगाव’ येथील कृतीशील शाळा, तंत्रस्नेही शिक्षिका माधुरी पवार यांची इंग्लिश गार्डनसोबत सफर घडवणारी ‘अजमिर सौंदाणे’ची शाळा, स्मार्ट टीचर राम तळपे यांच्या उपक्रमांचे कोंदण लाभलेली शिक्षकांच्या एकजुटीमुळे अग्रेसर ठरलेली ‘पाथर्डी’ येथील मुलींची शाळा, प्रयोगशील शिक्षक प्रकाश परदेशी यांची किमया असणारी दुर्गम ‘हरणशिकार’ शाळा, शिक्षक पंकज सोनवणे यांच्या उपक्रमशीलतेने बदललेली अवघड वाट असूनही गुणवत्तेच्या पटलावर असलेली ‘कुसुंबीनाला’ येथील शाळा, शिक्षिका नयना वाघ यांच्या पूरक प्रयत्नामुळे त्यांच्या उपक्रमांतून सर्वांगीण विकास साधणारी ‘खर्डे’ शाळा, संवेदनशील शिक्षिका आशा सोनवणे यांची प्रेरकता तसेच उपक्रमांचे कोंदण असलेली ‘चंदनपुरी’ शाळा तसेच,
प्रयोगशील शिक्षक गोकुळ निकम यांच्यामुळे गुणवत्तेचा ध्यास घेतलेली ‘हाटकरवस्ती’ शाळा, हुरहुन्नरी अभिनयशील शिक्षक देवेंद्र वाघ यांची शिक्षणाची गंगा घरोघरी नेणारी ‘देवीची माथा’ शाळा, तंत्रस्नेही शिक्षक जयदीप गायकवाड यांची बालमित्रच्या माध्यमातून गुणवत्तेला बळ देणारी नवोपक्रमशील ‘वाघाड’ शाळा, प्रयोगशील विज्ञान शिक्षक चंद्रशेखर दंडगव्हाळ यांची विज्ञान उपक्रमांद्वारे बलशाही भारताचे स्वप्न बघणारी ‘पिंपळगाव जलाल’ शाळा, प्रयोगशील दिव्यांग शिक्षक सोपान खैरनार जिल्ह्यातील शिक्षकांना प्रेरणादायी, गरुड भरारी घेणारी ‘मोरे नगर’ शाळा, प्रयोगशील शिक्षक संजय बेडसेंचा ध्यास, सातत्याने उपक्रमयुक्त गुणवंत ‘निमगुले लहान’ शाळा. शिक्षक भरत पाटील यांच्या तंत्रस्नेहाचे कोंदण राज्यात अव्वल ‘माळीनगर’ शाळा, तंत्रस्नेही इंग्रजी शिक्षक दत्तात्रय उगले यांची गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे अद्यावत विद्या मंदिर ‘पांगरी बुद्रुक’ शाळा, प्रयोगशील शिक्षिका वैशाली सूर्यवंशी यांची पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घेणारी ‘खालप फाट्याची’ शाळा, शिक्षिका नीलिमा पगार यांची नाविन्याचा ध्यास असणारी डिजिटल ‘दहीवड’ शाळा, तंत्रस्नेही शिक्षिका वैशाली भामरे यांची सर्वांगसुंदर उपक्रमांची परिपूर्ण ‘मानके’ शाळा, प्रयोगशील शिक्षक हेमंत बधान यांची गुणवत्तापूर्ण स्कूल ‘खेलदरी’, उपक्रमशील शिक्षिका योगिता गायकवाड यांची आदिवासीबहुल भागातील आगळीवेगळी ‘पिंपळपाडा’ शाळा, उपक्रमशील शिक्षिका शालिनी जाधव यांचे प्रेरक नेतृत्वामुळे शिक्षिकांच्या पुढाकाराने गुणवत्तेच्या पटलावर असणारी ‘भाटगाव’ शाळा, व्हाट्सॲपद्वारे कायापालट झालेली उपक्रमशील शिक्षक सुनील कापडणीस यांची ‘अंबासन’ शाळा, याचबरोबर,
समाजप्रिय उपक्रमशील शिक्षक नानासाहेब कुऱ्हाडे यांची सर्वांगीण विकासमय ‘नेऊरगाव’ शाळा, उपक्रमशील शिक्षक किरण अहिरे यांच्या धडाडी उपक्रमशीलतेने पटात वाढ झालेली ‘ढवळीविहीर’ शाळा, शिक्षक दादाजी देवरे यांच्या नेतृत्वात अग्रेसर, राज्यातील अव्वल सेमी ‘कळवणची’ मुलींची शाळा क्रमांक एक, तंत्रस्नेही शिक्षिका नूतन चौधरी यांची उपक्रमशील झेडपीची सेमी इंग्रजीचे धडे देणारी ‘टेहरे’ शाळा, प्रयोगशील शिक्षक प्रेमानंद घरटे यांची पॉवर नसल्याने मोबाईलवर धडे गिरवणारी ‘पवारवस्ती’ शाळा, तंत्रस्नेही शिक्षिका चचित्रा देवरे नाविन्यतेचा वसा घेतलेली सर्वांगीण विकासाठी आदर्शवत ‘अभोणा. मुले शाळा, बदलाचे शिल्पकार उपक्रमशील शिक्षक तुषार महाजन यांची स्वच्छतेतून समृद्धीकडे नेणारी ‘खालप’ शाळा, उपक्रमशील शिक्षक सुरेश लिलके यांची व्यापक समाज संपर्कातून प्रकाशमान ‘शेणीत’ शाळा, प्रयोगशील शिक्षक अनिल सावंत बदलाचे शिल्पकार ठरलेली गुणवत्तेत अग्रेसर ‘भावडे’ शाळा, आंतरराष्ट्रीय शाळेसाठी धडपडणारे शिक्षक वैजिनाथ भारती यांची तंत्रज्ञानाने बदलणारी ‘एरंडगाव’ शाळा, मिशन नवोदय सक्सेस करणारे स्मार्ट प्रयोगशील शिक्षक सतीश इंगळे यांची ‘उंबरठाण’ शाळा, उपक्रमशील शिक्षिका सविता भामरे यांची सांघिक प्रयत्नांनी शैक्षणिक पटलावर आलेली ‘उसवाड’ शाळा, विद्यार्थीप्रिय शिक्षक सुमित बच्छाव यांची शिक्षणासह जीवनमूल्ये रुजवणारी ‘गणेशनगर’ शाळा, शिक्षक सुनील पवार यांची लोकसहभागातून नावारूपाला आलेली ‘पिंपळगाव’ शाळा, उपक्रमशील शिक्षक सोपान बोरसे- सोनवणे जोडगळींची ज्ञानरचनावादी उपक्रमांची ‘पन्हाळे’ शाळा, प्रयोगशील शिक्षक दिनेश सोनवणे यांची गुणवत्तेचे कृतीयुक्त धडे देणारी ‘भिलवाडी’ची शाळा, शिक्षक प्रकाश बंजारा यांची विकासाच्या पायऱ्या चढणारी ‘दिघवद’ शाळा, मुख्याध्यापक सुरेश बच्छाव यांचे प्रेरक नेतृत्व व लोकसहभागातून बदललेली ‘देवघट’ शाळा... अशा अनेक शाळांमध्ये ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत आपली शाळा व विद्यार्थ्यांच्या जीवनाचा कायापालट करणारे शिक्षक या प्रेरक लेखांमधून पानोपानी वाचकांच्या भेटीला आले आहेत. एक वेगळा दर्जा असणारा हा दस्तऐवज म्हणायला हरकत नाही.
समाजात आदर्श असे स्थान आजही शिक्षकांना आहे. शिकवण्याची आवड आणि वचनबद्धतेसाठी हे महान शिक्षक जगभरातील इतर हजारो शिक्षकांपेक्षा वेगळे आहेत. त्यांचे जीवन विद्यार्थ्याच्या जीवनातील शिक्षकांच्या अनेक भूमिका आपल्याला दाखवतात. या शिक्षकांनी शिकवणे वर्गाच्या चार भिंतींपर्यंत मर्यादित ठेवले नाही. त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना संधीचे जग दाखवले.
मध्यंतरी खडू आणि फळा जाऊन ऑनलाईन शिक्षण प्रणाली ज्ञानदानाचे माध्यम बनते की काय ? अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचे वातावरण निर्माण झालेही असल्याचे आपण अनुभवले देखील आहे. परंतु या शिक्षकांचच्या कार्याबद्दल वाचून मन भारावून तर जातेच परंतु दर्जेदार शिक्षणासाठी खडू आणि फळा ही परंपरागत माध्यमे नेहमीच उपयुक्त राहतील, हे नक्की.
सर्वच प्रेरक लेखांची भाषा ओघवती, संक्षेपी व वाचकांना सहज समजणारी आहे. मोजक्या व प्रभावी शब्दात त्यांनी आपले लेख वाचकांना उपलब्ध करून दिलेले आहेत.
लेखक राजेंद्र दिघे हे एक विद्यार्थीप्रिय शिक्षक असून आई प्रतिष्टान, मालेगावचे ते संस्थापक अध्यक्ष, म.रा. प्राथमिक शिक्षक भारती, नाशिक विभागाचे अध्यक्ष तसेच ते अनेक संस्थाच्या कार्यात सक्रीय आहे. पुस्तक हातात पडताच पुस्तकाची मांडणी भावली, एखादं क्लासिक बुक अशीच मांडणी या पुस्तकाची केलेली आहे. त्यासाठी प्रकाशकाचे विशेष अभिनंदन. तसेही चपराक प्रकाशनाने अल्पावधीत आपला नावलौकिक आपल्या दर्जेदार कार्यशैलीमुळे मिळवला आहेच.
या लेखसंग्रहास संतोष घोंगडे यांनी रेखाटलेले मुखप्रुष्ठ अतिशय समर्पक आणि बोलके असून वाचकाला पाने पालटून लेख वाचायला प्रेरित करणारे आहे. मुखपृष्ठावरील मांडणीमुळे या पुस्तकात आत काय दडले आहे याचा सहज अंदाज येतो. तसेच विधान परिषद सदस्य मा. कपिलजी पाटील यांची प्रस्तावना तसेच माननीय मंत्री, दादाजी भुसे यांची अतिशय थोडक्यात पण समर्पक पाठराखण या पुस्तकाला लाभली असून यामुळे पुस्तकाचा एकूण आवाका सहज लक्षात येतो. माजी मंत्री आमदार छगनजी भुजबळ यांच्या शुभेच्छा ! हे या पुस्तकाचे खास आकर्षण म्हणावे लागेल.
बालपणात संवेदनाचे धडे गिरवून घेणाऱ्या मायमाऊली स्व. आईस... आयुष्यात कष्ट सोसत प्रामाणिकपणे जगलेल्या आप्पांना... सतत उर्जास्त्रोत ठरलेल्या माझ्या आयुष्यातील तमाम गुरुजन, मार्गदर्शक व मित्र-मैत्रीणींना... ज्या लेकरांमुळे इथवर प्रवास सुखकर झाला त्या आजपर्यंतच्या सर्व माझ्या विद्यार्थ्यांना... असे नमूद करत त्यांनी हा लेखसंग्रह अर्पण केलेला आहे.
हा उहापोह करण्याचे कारण म्हणजे मंगळवार, दि २४ डिसेंबर २०२४ रोजी हुतात्मा स्मारकात, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, नाशिक येथे गिरणा गौरव प्रतिष्टान आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ या सदरात ‘शाब्बास गुरुजी’ या लेखक राजेंद्र दिघे लेखसंग्रहावर/पुस्तकावर ऐसपैस गप्पांच्या कार्यक्रमाची मेजवानी नाशिकमधील रसिक वाचक तसेच साहित्यिकांसाठी उपलब्ध झाली आहे. दि. ५ मार्च २०२४ ते दि. २८ फेब्रुवारी २०२५ दरम्यान दर मंगळवारी व दर शुक्रवारी हा उपक्रम संपन्न होणार आहे. अशा प्रकारचा बहुधा हा साहित्य क्षेत्रातील पहिलाच अभिनव उपक्रम असावा. यामध्ये नवोदित तसेच प्रस्थापित साहित्यिकांना व्यक्त होण्यासठी हक्काचं व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
यापुढे, त्यांची लेखणी अशीच तळपत राहवी. साहित्याची सेवा घडावी. काव्य, कादंबरी, कथा, आत्मकथन, नाटके इ. वाचकांना वाचायला मिळावेत. हिच सदिच्छा ! सन्माननीय राजेंद्र दिघे सरांना गिरणा गौरव प्रतिष्टान आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ या सदरात संपन्न होणाऱ्या व्याख्यानास आभाळभर शुभेच्छा!!!
पुस्तकाचे नाव :- शाब्बास गुरुजी
लेखक :- राजेंद्र दिघे, संवाद क्र. ९४२१६००७११/ ८१६९५००७००.
प्रकाशक :- चपराक प्रकाशन, पुणे
ISBN :- 9789391239299
प्रस्तावना : कपिलजी पाटील
पाठराखण :- मा. मंत्री दादाजी भुसे
शुभेच्छा :- मा. आ. छगनजी भुजबळ
स्वागत मूल्य :- ₹ २५०/- मात्र (सवलतमूल्य, टपाल खर्च आणि अधिक माहितीसाठी कृपया, संबंधितांशी संपर्क साधावा.)
आस्वादक: *सोमनाथ आवडाजी पगार* (सॅप)
(महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेत प्रकाशनार्थ अनुदान प्राप्त साहित्यिक)
संपर्क क्र.:- ९२७३३५७१५९, Email:- sahityatirthasp@gmail.com
गीतकार/ कवी, कथा, पटकथा, संवाद लेखक, युट्युबर, ब्लॉगर, टेक्नोक्रॅट, ऑनलाईन डॉक्युमेंट्स ऍडव्हायझर, इंग्लिश लँग्वेज ट्रेनर.
मंगळवार, १७ डिसेंबर, २०२४
अस्मिता- सकारात्मकतेचे पंख देणारी कविता
ll साहित्य तीर्थ ll
पुस्तक परिचय
*अस्मिता – सकारात्मकतेचे पंख देणारी कविता*
सोमनाथ पगार
संपर्क क्र.:- ९२७३३५७१५९.
महात्मा ज्योतिबा फुले व त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी १८४८ मध्ये पुण्यात मुलींसाठी शाळा सुरु करून स्त्री शिक्षणाची मुहर्तमेढ रोवली त्यामुळे स्त्रियांसाठी शिक्षणाची कवाडे खुली झाल्याने ‘स्त्री म्हणजे चूल आणि मुल’ अशी असलेली ओळख पुसली जाऊन आज स्त्रियांनी विविध क्षेत्रे आपल्या कार्य व कर्तुत्वाच्या बळावर पादाक्रांत केलेली आहेत. साहित्य क्षेत्रही त्याला अपवाद नाही. आपल्या साहित्यातून वेगळेपणाची प्रकर्षाने जाणीव व्यक्त करत व तसेच स्वत्वाचा शोध घेऊ पाहणारे साहित्य अर्थात कथा, कविता सहज वाचायला मिळतात. साहित्य क्षेत्रातील असेच एक नाव महत्वाचे नाव म्हणजे शिक्षिका, कवयित्री सौ. आशा विनोद पाटील होय.
त्यांचा ‘अस्मिता’ कवितासंग्रह वाचण्यात आल्याने हितगुज साधावी म्हणून हा प्रपंच...
मुलींसाठी काढून पहिली शाळा
विद्या दानाने फुलवला मळा...
मर्म जाणिले स्त्री स्वातंत्र्याचे
माणूस म्हणून घडविले आम्हाला
ज्या काळी स्त्रीयांना शिक्षण घेण्यास बंदी होती, त्याकाळची परिस्थितीची कल्पना न केलेली बरी. अशावेळी समाजाचा विरोध झुगारून प्रयत्नांची पराकाष्टा करत प्रसंगी हाल अपेष्टा सहन करून महात्मा ज्योतिबा फुले व त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाची ज्ञानगंगा प्रवाहित करून दिली. शिक्षणाचा कानमंत्र मिळाल्यामुळेच आज महिला सक्षम होऊ शकल्या. हे सत्य कुणीही नाकारू शकत नाही. त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे ऋण कधीही फेडले जाऊ शकत नाही.
खरं तर गृहिणी ते शक्षिका असा सावित्रीबाई यांचा समाजव्यवस्था प्रतिकूल असतानाही खडतर प्रवास होता, तोच सावित्रीचा वसा आजकालच्या स्त्री शिक्षिका आपल्या खांद्यावर घेऊन पुढे नेत आहेत, असे म्हणायला हरकत नाही. कारण आजकालची स्त्री घरातील सर्व जबाबदाऱ्या उत्तमरीत्या सांभाळून आपली व्यावसायिक कारकीर्द यशस्वी पणे सांभाळताना आपण पाहतो. काळाच्या भाळावर आपल्या कार्तुत्वाच्गा ठसा स्पष्टपणे उमटवत आहे. असं आपण म्हणू शकतो.
नारी तू नारायणी
कर्तुत्व, मातृत्व हिरकणी
झेप उतुंग घे गगनी
साप्त्सुरातील तूच बंदिनी
आपली समाजव्यवस्था स्त्रीला दुय्यम स्थान देत असल्याचे बोलले जाते, तशा पाऊलखुणा जाणवतातही. जर स्त्रीच या भूतलावर नसती तर ? कल्पना तशी भयावह आहे. स्त्री शिवाय माणूस अपूर्ण आहे, स्त्रीच्या उदरातून जन्म घेवून, आईच्या दुधावर पालनपोषण होऊन मग माणूस पराक्रम करायला सज्ज होतो. असे असले तरी समाजात स्त्रियांवर होणारे अन्याय, अत्याचार थांबत नाही. अशा या नारीचा, स्त्रीचा नेहमी सन्मान झाला पाहिजे.
‘मैत्री’ या कवितेत कवयित्रीने मैत्रीचे सहज साध्या शब्दात महत्व अधोरेखित केल्याचे जाणवते. मैत्री दोन अक्षरं असलेला शब्द असला तरी मैत्रीच्या नात्यामुळे माणसाचा जीवन प्रवास सुखकर होतो, हे नक्की. कुणीतरी स्नेहाचे, आपुलकीचे, हक्काचे आपल्या सुखदु:खात आधार असे मैत्रीच्या अंगणात हवे असते. ज्यात आपुलकी, माया असते क्षणभर मन मोकळं करण्यासाठी.
मैत्री, पहाटेच्या दवासारखी
थंडगार स्पर्श करणारी
मैत्री असते सुर्योद्यासारखी
मनाला चैतन्य देणारी
कृष्ण, सुदामाच्या मैत्रीसारखी मैत्रीची पखरण करत शब्दांचे शब्ददीप प्रज्वलित होत, विचारधारांची ही काव्यरुपी दीपमाळ मनात आनंदाचे तरंग निर्माण करते.
वलयांकित शब्दात माणूस वाचते मी, प्रकाशद्विपात अंधार मालवते मी, भविष्यात प्रकाशाचे स्वप्न विणते मी, अज्ञानाच्या प्रज्वलून ज्योती,, आसमंतात जुळून नाती, शब्दात शोधते मी, माणसात दरवळते मी, सुगंधात गुलाब गंध शोधते मी... अशा आशयाच्या सकारात्मक भाव पेरणाऱ्या रचना या कवितासंग्रहात भेटतात.
आता मी पुस्तके कमी
माणसे अधिक वाचू लागली
मुखवट्या मागचा चेहरा
चेहऱ्या मागचा मुखवटा बघू लागली
आयुष्याच्या या प्रवासात बरेवाईट अनुभव येत राहतात, माणूस त्यातून आपले मार्गक्रमण करत असतो. सत्य परेशानच नाही तर पराजित झालेलं पाहून कवयित्री व्यथित होते. आणि त्यामुळेच कदाचित चेहऱ्या मागचे मुखवटे वाचून सावधपणे वागलं पाहिजे हा मौलिक सल्ला वाचकांना मिळतो. मीच माझी हिम्मत म्हणून डगमगून न जाता जीवनप्रवास सुरु ठेवला पाहिजे असा सडेतोड सल्ला महत्वाचा ठरतो.
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी असे म्हटले जाते, आणि ते खरेही आहे. आईचे स्मरण होताच मन माहेरी घुटमळू लागते. भर उन्हात सुखद गारवा देणाऱ्या सावलीसारखी आई सुखदुखात साथ देत असते. अंधारात काजव्याने प्रकाशून वाट दाखवावी तशीच महत्वाची व्यक्ती ही प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात आईच असते. पण हीच आई कितीही अश्रूंची लाखोली वाहिली तरी पुन्हा नेत्रास दिसत नाही. त्यामुळे जग दाखवणाऱ्या आईवडीलांना आपण जपलं पाहिजे. हे सत्य असे वास्तव आई या कवितेत अधोरेखित झाले आहे.
बाप... कुटुंबाचा आधार
मायेचा सागर
प्रकाशाचा जागर
कष्टाचा पाझर
प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात आईवडील हेच पहिला आधार व गुरु असतात. बाप प्रेरणा देणारा, अस्मिता जपणारा, विचार पेरणारा आधारवड असतो. बाप दीपस्तंभ असतो खरं तर मुलांसाठी. अनुभवाचं पाहिलं विद्यापीठ बापच असतो. कुटुंबाची ढाल असतो. असा हा वादळातील खंबीर बेट बाप आपल्या लाडाच्या लेकीचं कन्यादान करून आपलं धन परक्याच्या हवाली करतो. तोच बाप आपल्या लाडाच्या लेकीला पुढे आयुष्यभर मोरपिसासारखा काळजात जपत असतो.
जीवनाला वेदनेची किनार असली तरीही सुखद रेशमी तलम वस्त्रासारखी हवीहवीशी कविता जीवनात आल्यावर कळतनकळतपणे शब्दांचा उत्सव कधी बनून जाते. कारण शब्दात सौंदर्य असते. शब्दच मशाल होऊन वाट दाखवतात. अशाच कवितेच्या माध्यमातून किल्ल्याविषयी वर्णन करताना कवयित्रीच्या शब्दांतून किल्ला बोलू लागतो की, ‘रात्रीच्या गर्भात उष:काल, मी नव्हे किल्ला’ केवळ, मी प्रेरणास्थान, मी स्फूर्तीस्थान...’
संकटे तर मानवाच्या पाचवीलाच पुजलेली असतात. त्यातच कोरोना महामारीने जगभर धुमाकूळ घातला होता, अशा वेळी गुरु करोना, मास्क अशा रचनांमधून कवयित्रीने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली असल्याचे लक्षात येते.
सावित्री, मातृत्व, मैत्री, पुस्तक, विद्यार्थी, आई, जिद्द, महामानव, शिक्षक, संधी अशा विविध ४२ कविता या संग्रहात वाचकांना वाचायला भेटतात. ‘उत्कृष्ट व उत्स्फूर्त रचना म्हणजे काव्य’ असे वर्डस्वर्थने म्हटले आहे. असे असले तरी या संग्रहात काही उणीवा जरूर आहेत. त्यांचा स्वतंत्रपणे उहापोह करता येईल. कवयित्री सौ. आशा पाटील ह्या एक कवयित्री असून त्या शैक्षणिक क्षेत्रात एक विद्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणून रसिकांना ज्ञात आहेच
या कवितासंग्रहाचे समर्पक आणि बोलके मुखपृष्ठ वाचकाला पाने पालटून कविता वाचायला प्रेरित करते. तसेच गिरणा गौरव प्रतिष्टानचे अध्यक्ष सुरेश पवार यांच्या समर्पक प्रस्तावना तसेच ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भास्कर ढोके यांची पाठराखण यामुळे कवितासंग्रहाचा एकूण आवाका सहज लक्षात येतो. तसेच भारतीय संस्कृती महिलांना देवतासमान मानते पण साहित्याने महिलांना माणूसपण दिले. स्त्री शिक्षण, साहित्य, माणूसपण व अस्मिता जपणाऱ्या सर्व स्त्रीयांना शब्दसुमनांची ही ओंजळ त्यांनी समर्पित केली आहे.
हे सर्व लिहिण्याचे कारण म्हणजे मंगळवार, दि. १७ डिसेंबर, २०२४ रोजी हुतात्मा स्मारक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, नाशिक येथे गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष माणूसमित्र सुरेश पवार यांनी आयोजित केलेल्या ‘पुस्तकावर बोलू काही...’ या सदरात कवयित्री सौ. आशा पाटील यांच्या ‘अस्मिता’ या कवितासंग्रहावर आधारित ऐसपैस गप्पांच्या कार्यक्रमाची मेजवानी नाशिकमधील रसिकवाचक तसेच साहित्यिकांसाठी उपलब्ध झाली आहे. दि. ५ मार्च, २०२४ ते दि.२८ फेब्रुवारी, २०२५ दरम्यान दर मंगळवारी आणि शुक्रवारी हा उपक्रम संपन्न होणार आहे. अशा प्रकारचा बहुधा हा साहित्य क्षेत्रातील पहिलाच अभिनव उपक्रम असावा. यामध्ये नवोदित तसेच प्रस्थापित साहित्यिकांना व्यक्त होण्यासाठी हक्काचं व्यासपीठ उपलब्ध झालं आहे.
याहीपुढे, त्यांची लेखणी अशीच तळपत रहावी. त्यांच्या हातून सर्व प्रकारचे साहित्यिक लिखाण व्हावे, हीच सदिच्छा! सन्मानीय कवयित्री सौ. आशा पाटील मॅडम यांना गिरणा गौरव प्रतिष्ठान आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ या सदरात संपन्न होणाऱ्या व्याख्यानास आभाळभर शुभेच्छा !
पुस्तकाचे नाव :- अस्मिता
कवयित्री :- सौ. आशा विनोद पाटील , संवाद क्र. ९८२२७२१८६३
प्रकाशक :- गिरणादूत प्रकाशन, नाशिक
प्रस्तावना :- माणूसमित्र सुरेश पवार
पाठराखण :- डॉ. भास्कर ढोके
स्वागत मूल्य :- ₹ १२०/- मात्र (सवलतमूल्य, टपाल खर्च आणि अधिक माहितीसाठी कृपया, संबंधितांशी संपर्क साधावा.)
*सोमनाथ आवडाजी पगार* (सॅप)
(महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेत प्रकाशनार्थ अनुदान प्राप्त साहित्यिक)
संपर्क क्र.:- ९२७३३५७१५९, Email:- sahityatirthasp@gmail.com / somnathpagar@yahoo.co.in
गीतकार/ कवी, कथा, पटकथा, संवाद लेखक, युसमीक्षक, ट्युबर, ब्लॉगर, टेक्नोक्रॅट,, इंग्लिश लँग्वेज ट्रेनर, ऑनलाईन डॉक्युमेंट्स ऍडव्हायझर.ट,, इंग्लिश लँग्वेज ट्रेनर, ऑनलाईन डॉक्युमेंट्स ऍडव्हायझर.
मंगळवार, १० डिसेंबर, २०२४
षढाक्षरी- समृद्धी येता ही
आज फेसबुकवर पोस्ट चाळता चाळता सहज एका कवी मित्राची पोस्ट वाचली...
नोकरीनिमित्त दूर देशी, परदेशी पांगलेल्या भावंडांची तसेच त्यांची व त्यांच्या गावी असणाऱ्या आईवडीलांची काही वर्षांनी होणारी सहपरिवार भेट झाल्याची पोस्ट वाचून मी अस्वस्थ झाल्याने कविता लिहून रिता झालो.
बालपणी आईवडिलांच्या छत्रछायेखाली सूखस्वप्नांची चित्रे रंगवत भावंडे कधी मोठी होतात आणि पाखरे उडून जावी तशी वेगवेगळ्या दिशांना भुर्र उडून जाऊन आपल्या जीवनात स्थिरस्थावर होतात. मात्र काळजात जपलेला गाव व रक्ताची नाती दुरावतात, हे सत्य नाकारून चालणार नाही. आणि मग कालांतराने त्यांच्या भेटी गाठी दिवाळी दसऱ्यासारख्या कधीतरी साजरे होणारे दुर्मिळ सोहळे बनून जातात. परंतु हात पाय हलविल्याशिवाय प्रगती नाही. हेच खरं...
शीर्षक: समृद्धी येता ही
समृद्धी येता ही
माणसं पांगली
का सुख पैशाने
मिळाली चांगली? II१ll
बालपणी भरे
घरामध्ये मेळा
हसणे, रुसने
उत्सव सगळा II२ll
पोटापाण्यासाठी
दुरावली नाती
मनामध्ये जळे
जसे दिवा वाती II३II
लाभल्या नात्याशी
असावे सादर
दुराव्याने आज
वाढला आदर lI४II
खेळतं गोकुळ
व्याकुळ भेटीस
प्रगत चक्रानं
धरलं वेठीस II५II
असा कसा ऋतू
आला हा आगळा
भेटण्याचा होई
अनोखा सोहळा II६II
सगेसोयरे ही
गावी होती गोळा
काही क्षणाचाच
सहवास भाळा II७II
मायेचं घरटं
ऊब काळजात
रक्ताच्या नात्याला
देव पंढरीत II८II
पंखामध्ये बळ
आल्यावरी न्यारे
दिगंतरा झेप
पक्षी घेती सारे II९II
*सोमनाथ पगार* (सॅप)
*(महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेत प्रकाशनार्थ अनुदान प्राप्त साहित्यिक)*
सुसंवाद.:- ९२७३३५७१५९, Email:- sahityatirthasp@gmail.com
*गीतकार/ कवी, कथा, पटकथा, संवाद लेखक, युट्युबर, ब्लॉगर, टेक्नोक्रॅट, ऑनलाईन डॉक्युमेंट्स ऍडव्हायझर, इंग्लिश लँग्वेज ट्रेनर.*
सभासद:
१.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
२.स्क्रीन राइटर्स असोसियशन
३.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
४.मराठी साहित्य परिषद
रविवार, १० नोव्हेंबर, २०२४
आपले जगणे
ll आगळा वेगळा उपक्रम ll
दि. ९ नोव्हेंबर २०२४ रोजी पद्मश्री कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालय, नाशिक आयोजित १०१ व्या कविकट्टाच्या निमित्ताने आयोजित 'काव्य लेखन कार्यशाळा' उपक्रमात मार्गदर्शक संवेदनशील साहित्यिक/ कवी विवेक उगलमुगले (Vivek Ugalmugale), प्रमुख अतिथी सुप्रसिद्ध सूत्रसंचालक/ कवी रविंद्र मालुंजकर (Ravindra Mukundrao Malunjkar) तर शेवटी कवी/ अभिनेता राजेंद्र उगले (Rajendra Ugale) यांनी उपस्थितांना काव्यलेखनाबाबत मार्गदर्शन केले. तर कवी बाळासाहेब गिरी (Balasaheb Giri) यांनी सूत्रसंचालन केले.
शेवटी दहा मिनिटात 'जगणे' हा शब्द देऊन चार ओळी लिहायला सांगितले असता मी खालील अभंग लिहला. त्यानंतर काही निवडक कवींना सादरीकरणाची संधी दिली असता मी सदर अभंग सादर केला.
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व पुष्प देऊन माझा सत्कार करण्यात आला.
समन्वयक मा. रविकांत तात्या शार्दूळ (Ravikant Rupaji Shardul), कवी दिगंबर काकड; (Digambar Kakad) तसेच सर्व संयोजन समितीचे मनःपूर्वक धन्यवाद!!! 💐🙏💐💐💐💐💐
*अभंग: आपले जगणे*
चंदन जैसे हो l असावे झिजणे ll
आपले जगणे l तैसे व्हावे ll१ll
ओठावं साखर l जपण्या ही नाती l
दीप आणि ज्योती l एकमेका llधृll
श्वासांचे उखाणे l कुणाच्या कारणे ll
उगा येणे जाणे l नसे जगी ll३ll
अंधाराच्या पोटी l प्रकाश किरणे l
नसावे झुरणे l दुःखातही ll४ll
घाम आणि कर्म l जगण्याचे मर्म ll
मानवता धर्म l जप व्हावा ll५ll
असे जगावे की l सर्वां व्हावे प्रिय l
ठेऊनिया धैर्य l कार्यसिद्धी ll६ll
सोमनाथ सज्ज l घेण्या असा ध्यास ll
जगणे आभास l होऊ नये ll७ll
सोमनाथ पगार, ९२७३३५७१५९
*टीप*:- मूळ रचनेत फक्त पाच चरण होते, त्यात दोन चरण वाढविले असून काही आवश्यक व योग्य बदल करण्यात आले आहेत.
शुक्रवार, ८ नोव्हेंबर, २०२४
चंदनदाह - काव्यात्मक साखरपेरणी
II साहित्य तीर्थ II
चंदनदाह – काव्यात्मक साखरपेरणी
सोमनाथ पगार
संपर्क क्र.:- ९२७३३५७१५९
बालपणी खेडेगावात आम्ही मुले चिंचा, बोरं, आंबे इत्यादी फळे कच्चेच खायचो कारण ती फळे झाडावर योग्य वाढ होऊन पिकेपर्यंत आम्हाला धीर धरला जात नसायचा. त्यामुळे दात आंबायचे, खोकला यायचा. कधी कधी तर या आगाऊपणामुळे आम्हा मुलांना आईवडिलांचा मारसुद्धा खावा लागायचा. परंतु आम्हाला त्याचे काही सोयरेसुतक नसायचे. पुढे काही दिवसानंतर तीच फळे पिकल्यावर गोड व मधुर लागायची. थोडक्यात काय? तर संयम, धीर ठेवणे जीवनात आवश्यक असते. प्रत्येक कार्याची एक निश्चित वेळ असते, हे नक्की. तोच नियम कवितेलासुद्धा तंतोतंत लागू पडतो. सुरवातीच्या काळात कवी सुचेल तसे, जमेल तसे लिहत असतो. अनुभव वाढत जातो, अभ्यास होत जातो, आणि पुढे आपण सुरवातीच्या काळात लिहलेल्या रचना बाळबोध किंवा प्राथमिक स्वरूपाच्या असल्याचा साक्षात्कार झाल्याशिवाय राहत नाही. कालांतराने अनुभव, अभ्यास व सातत्यामुळे लिखाणाची उंची वाढत जाऊन उत्तोउत्तम लिखाण आपल्या लेखणीद्वारे झिरपू लागते.
हे लिहण्याचे कारण म्हणजे नाशिकमधील ज्येष्ठ कवी सोमनाथ साखरे यांचा ‘चंदनदाह’ हा कवितासंग्रह माझ्या हाती पडल्यावर मला आपसूकच कविता वाचल्यावर व्यक्त होण्याचा मोह आवरता आला नाही. ‘प्रसिद्ध होण्यापेक्षा सिद्ध व्हावं’ हेच ध्येय मनात ठेवून त्यांनी विद्यार्थी जीवनापासून कविता लिहणे सुरु ठेवले, मात्र कवितासंग्रह प्रकाशनाची घाई त्यांनी मुळीच केली नाही. कदाचित यामुळेच ते दर्जेदार व अभ्यासपूर्ण लिहलेल्या कविता वाचकांच्या हाती ठेवण्यास यशस्वी झाले असावे, असे मला वाटते.
आजकाल कवी व कवितांचे पीक जोमदार आले असल्याची बाब चोखंदळ वाचकांच्या नजरेतून सुटू शकत नाही. कविता वाचत असतांना नेहमी शालेय तसेच महाविद्यालयीन अभ्यासक्रमात अभ्यासलेल्या कविता कशा असायच्या याची मला आठवण होते. मात्र बर्याचदा तशा कविता बऱ्याच कवितासंग्रहात वाचायला मिळत नसल्याची खंत मनाला बोचत राहते. परंतु इथे सर्वाना अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याने आपला वाचक म्हणून नाइलाज असतो. तरीसुद्धा काय वाचावे? याचा अधिकार वाचकाला असल्याने चांगल्या साहित्याची वाचक निच्छितच दखल घेतल्याशिवाय राहत नाही. तथापि, उत्कृष्ट यमक, रूपक, उत्प्रेक्षा, अनुप्रास, श्लेष, स्वभावोक्ती, अतिशयोक्ती आदी काव्यालंकाराची रेलचेल या 'चंदनदाह' कवितासंग्रहातील कवितांमध्ये आढळते. त्यामुळेच या कवितासंग्रहातील कविता वाचनीय व आशयगर्भ झाल्या आहेत.
पहिलीच रचना पाहू,
अंगणात माझ्या I सुमनांचा सडा I
उभा एक वेडा I पारिजात II
साधेल का ऐसे I पारिजात व्रत II
ध्यास दिनरात I मजलागी II (पारिजात व्रत, पृष्ठ क्र. १७)
उनवारा, पाऊस अंगाखांद्यावर झेलत पारिजात अंगणात झुलत असतो. अंगणात नेमाने सडा पडत असतो. कवीला तो दानशूर हरिश्चंद्र भासतो. या वृक्षाने देण्याचा वसा घेतलेला असून त्याला अहंकार नसतो तर फक्त दातृत्व त्याला ठाव असते. असेच व्रत दिनरात आपल्याला साध्य व्हावं ही कवीची दुर्दम्य इच्छा आहे.
ओळीला ओळी जोडून काहीतरी लिहले म्हणजे झाली कविता, हीच धारणा बऱ्याच कवींची असते. थोडा अभ्यास करून कविता लिहली तर वाचकांनाही वाचायला आवडते. हे वास्तव असूनही कवितांचा पाऊस दिनरात बरसतो आहे. मात्र या कवितासंग्रहातील कविता याला अपवाद आहे. ‘जीवन धूसर’ ही दुसरी कविता वाचल्यावर मी सहज मात्रा मोजून पाहिल्या तर ती कविता पादाकुलक वृताचा एक उत्कृष्ट नमुना असल्याचे माझ्या लक्षात आले. अशाच या कवितासंग्रहातील कविता आशयपूर्ण असून विविध छंदांमध्ये गुंफलेल्या आहेत.
मधुरा भक्ती अनोखे रंग
रंगी रंगले राधा गोविंद
प्रीत फुलोरा न्यारा सुगंध
गंध प्राशुनी समीर धुंध (मधुरा भक्ती, पृष्ठ क्र. ३७)
मधुर भक्तीचे अनोखे चित्रण 'मधुरा भक्ती' कवितेत आढळते. कृष्ण राधेचा मूक संवाद सुरू असून टाळ, चिपळ्या व मृदंगाचे संगीत सुरू आहे. परिणामस्वरूप राधा स्वये श्रीरंग झाली आहे.
एक प्रकारचा ताल, सूर, लय या कवितांमध्ये असल्याने वाचता वाचता वाचक मंत्रमुग्ध झाल्याशिवाय राहत नाही. या कवितासंग्रहातील ‘साखर ओव्या' तर कळस म्हणावा लागेल, खालील ओळी पाहू,
पाठीवरती नागीण काळी
सळसळणारी वेणी गं SSS!
गेली दुरून फुत्कारात ती
उरात कळ जीवघेणी गं SSS! (साखर ओव्या, पृष्ठ क्र. ३८)
किंवा
असा कसा बाई खेळ घरादारात रंगला
कळीकाळाचे तांडव देव झिंगला झिंगला (देव झिंगला, पृष्ठ क्र. ८६)
माणसाचा जन्म झाल्यापासून देव त्याच्या पाचवीलाच पुजलेला असूनही देव कुणाला पावल्याचं काही ऐकिवात नाही. उलट दुष्काळ, पाण्याचे दुर्भिक्ष, त्यामुळे पिकांचे जळून जाणे, परिणामी होणाऱ्या आत्महत्या. कधीकधी तर अख्खं गाव पोटापाण्यासाठी गाव सोडून दूर कुठेतरी स्थलांतरित होतांना कवीने पाहिले असल्याने कवी व्याकुळ आहे.
या संग्रहात चांगल्या गजलही समाविष्ट आहेत. उत्कृष्ट आशय विषय असलेल्या या गजल लगावली, वृत्त, काफिया, रदिफ या सर्वच बाबतीत परिपूर्ण आहेत. 'का बोलतेस आता' या गजलेतील खालील ओळी पाहू,
मौनातल्या नभाशी का बोलतेस आता
हा चंद्र आवसेचा का शोधतेस आता
गोडी सरून गेली केव्हाच साखरेची
गाथा अपूर्णतेची का वाचतेस आता (का बोलतेस आता, पृष्ठ क्र. १५२)
अशा अभिजात व मनन चिंतनातून लिहल्या गेलेल्या या रचना असून कधी गजल, कधी अभंग, कधी विराणी अशा विविध रूपात या रचना झिरपल्या आहेत. या संग्रहात निखळ निसर्गविषयक कवितांबरोबरच निखळ प्रेम कविताही आढळतात. कवीने आपल्या मनोगतात व्यक्त केल्याप्रमाणे कविता म्हणजे गणपतीच्या पायीच्या पैंजनातील लहान लहान घुंगरातून निर्माण होणारा मंजुळ अर्थध्वनी होय, याच व्याख्येला अनुसरून त्यांच्या कविता नादमधुर, छंद आणि शब्दांगसुंदर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.
कवी कविता रचून त्याला आलेल्या अनुभूती इतरांना सांगून त्यांच्या जीवनात ‘काव्यात्मक साखरपेरणी’ करत असतो, कारण साहित्यिक हा आत्मकेंद्री नसून 'जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती' अशीच त्याची धारणा असते.
वृतबद्ध कविता, गजल, अभंग, अष्टाक्षरी (ओवी), मुक्तछंद अशा सर्व प्रकारच्या रचनांचा या कवितासंग्रहात समावेश आहे. खूप दिवसानंतर काहीतरी चांगल वाचायला मिळाल्याने सर्वांना सांगावं वाटलं म्हणून हा सारा प्रपंच... आपणही हा कवितासंग्रह वाचवा, हा आग्रह तसेच सोमनाथ साखरे हे एक उत्तम कवी, लेखक म्हणून प्रसिद्ध असून आजवर त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.
पुस्तकाची मांडणी व बांधणी उत्तम असून साहित्य क्षेत्रातील नावाजलेल्या नाशिक येथील सुभाषित प्रकाशनाने हा कवितासंग्रह प्रकाशित केला असून चंदनाच्या शीतलतेबरोबरच चंदनाचा दाहसुद्धा कवीला जाणवतो याची जाणीव करून देणारे बोलके व समर्पक चित्रकार स्वप्नील नीलकंठ यांनी रेखाटलेले मुखपृष्ठ वाचकांचे लक्ष वेधून घेत आतील कविता वाचायला प्रेरित करण्यास भाग पाडल्याशिवाय राहत नाही. हे या कवितासंग्रहाचे खास आकर्षण म्हणावं लागेल. तसेच प्रा. विजय काचरे सरांची 'आत्ममग्न कवितेला प्रकाशनाची झळाळी' अशा समर्पक शब्दात लाभलेली समर्पक प्रस्थावना यामुळे कवितासंग्रहाचा एकूण आवाका सहज लक्षात येतो. तसेच तीर्थरूप आप्पा आणि त्यांना कवी समजणारा त्यांचा अनुज चंद्रकांत यांच्या स्मृतीस त्यांनी ही साहित्यकृती त्यांनी अर्पण केली आहे.
‘चंदनदाह’ असे अर्थपूर्ण शीर्षक असलेला या कवितासंग्रहाची योग्य अशा शब्दांत पाठराखण करत ज्येष्ठ साहित्यिक तथा चित्रपट गीतकार/ कवी प्रकाश होळकर यांनी कवितासंग्रहातील कवितांचा आशय विषय सहज लक्षात आणून दिला आहे. कवी सोमनाथ साखरे हे एक अभ्यासू व्यक्तिमत्व असून त्यांनी स्वतःच व्याकरणदृष्ट्या संग्रह निर्दोष करण्याचा प्रयत्न केला असल्याचे लक्षात येते.
एकूण ८७ कवितांचा या संग्रहात या समावेश असून ‘चंदनदाह ‘ या कवितासंग्रहातील कविता अतिशय वाचनीय असून वाचकांनी आवर्जून वाचाव्यात, असे मला वाटते.
हे सर्व लिहिण्याचे कारण म्हणजे शुक्रवार, दि. ८ नोव्हेंबर, २०२४ रोजी सायंकाळी सहा वाजता हुतात्मा स्मारक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, नाशिक येथे गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष माणूसमित्र सुरेश पवार यांनी आयोजित केलेल्या ‘पुस्तकावर बोलू काही...’ या कवी सोमनाथ साखरे यांच्या ‘चंदनदाह’’ या कवितासंग्रहावर आधारित ऐसपैस गप्पांच्या कार्यक्रमाची मेजवानी नाशिकमधील रसिकवाचक तसेच साहित्यिकांसाठी उपलब्ध झाली आहे. दि. ५ मार्च, २०२४ ते दि. २८ फेब्रुवारी, २०२५ दरम्यान दर मंगळवारी आणि शुक्रवारी हा उपक्रम संपन्न होणार आहे. अशा प्रकारचा बहुधा हा साहित्य क्षेत्रातील पहिलाच अभिनव उपक्रम असावा. यामध्ये नवोदित तसेच प्रस्थापित साहित्यिकांना व्यक्त होण्यासाठी हक्काचं व्यासपीठ उपलब्ध झालं आहे.
याहीपुढे, त्यांची लेखणी अशीच तळपत रहावी. त्यांच्या हातून सर्व प्रकारचे साहित्यिक लिखाण व्हावे, हीच सदिच्छा! कवी सोमनाथ साखरे सरांना गिरणा गौरव प्रतिष्ठान आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ या सदरात संपन्न होणाऱ्या व्याख्यानास आभाळभर शुभेच्छा!
पुस्तकाचे नाव :- चंदनदाह (कवितासंग्रह)
ISBN : 978-81-967055-3-4
कवी/ लेखक :- सोमनाथ साखरे
प्रकाशक :- सुभाषित प्रकाशन, नाशिक
मुखपृष्ठ :- स्वप्नील नीलकंठ
स्वागत मूल्य :- ₹ १५०/- मात्र (सवलत मूल्य व टपालखर्च यासाठी कृपया, संबंधितांशी संपर्क साधावा)
सोमनाथ पगार (सॅप), नाशिक
(महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेत प्रकाशनार्थ अनुदान प्राप्त साहित्यिक)
संपर्क क्र.:- ९२७३३५७१५९, Email:- somnathpagar@yahoo.co.in
sahityatirthasp@gmail.com
गीतकार/ कवी, कथा, पटकथा, संवाद लेखक, युट्युबर, ब्लॉगर, टेक्नोक्रॅट, ऑनलाईन डॉक्युमेंट्स ऍडव्हायझर, इंग्लिश लँग्वेज ट्रेनर.
#highlightseveryone #marathipoems #followers #pandharpur #highlights @highlight Following Amazon India Following Love Somnath Pagar Somnath Sakhare #Commenters
शुक्रवार, १ नोव्हेंबर, २०२४
प्रकाशाचा सण आला आज आपुला दिवाळी
*सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!💐💐🙏🏻🌷🌷*
हि दीपावली आपणास,आपल्या परिवारास *आनंदी, भरभराटीची, प्रगतीची, आरोग्यदायी* जावो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना
💐💐
*गीत:- प्रकाशाचा सण आला*
*आज आपुला दिवाळी*
प्रकाशाचा सण आला
आज आपुला दिवाळी
आनंदाचे तोरण हे
अन् हर्षाची रांगोळी IlधृII
मनामनातील जाई
सारे मिटुनी अंतर
गळाभेट घेई प्यारे
भाऊ, बहीण, मैतर
घुमे प्रदूषणमुक्त
दिवाळीची हो आरोळी ll१ll
लाडू, करंजी स्नेहाची
उधळण ही सौख्याची
सुखसमृद्धीच्या राशी
न्यारी रंगत नात्याची
सुख लक्ष्मीच्या पावली
मुखी हो शंकरपाळी II२II
पर्व मंगलमय हे
उजळून गेली धरा
धनारोग्य सकलांना
ज्ञानदीप घरा, घरा
परंपरा नि संस्कृती
दिव्य ही मराठमोळी ll३ll
शुभेच्छूक
*सोमनाथ पगार परिवार*, नाशिक
गीतकार/कवी, लेखक, युट्यूबर, ब्लॉगर, टेक्नोक्रॅट
(महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचा अनुदान प्राप्त साहित्यिक) Mb.9273357159
Email-somnathpagar@yahoo.co.in
sahityatirthasp@gmail.com
*Follow/ Subscribe* me on my Blog, Youtube Channel, Facebook, Quora, Whatsapp, X(Twitter), Linked in, Instagram, SoundCloud.
सभासद:
१.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
२.स्क्रीन राइटर्स असोसियशन
३.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
४.मराठी साहित्य परिषद
💐 *Feel free to contact for Promotion on YouTube Channel, Blog, etc.*💐
©® सर्व हक्क सुरक्षित
कृपया, https://youtube.com/c/SahityaTirth
https://youtube.com/user/SomnathPagar
हे युट्युब चॅनल सुरु केल्यावर *Subscribe* हे लाल अक्षरातील नाव प्रेस करून चॅनल *Subscribed* केल्यावर नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा. तसेच https://somnathpagar.blogspot.com
हा Blog *Follow* करून *Subscribe* करण्यास विसरू नका.
💐🙏
*तुमचे एक सब्सक्रिप्शन*
*हेच माझ्यासाठी सेलिब्रेशन*
Somnath Pagar Fan Club♻️
https://t.me/somnathpagarfanclub *हा टेलिग्राम ग्रुप अवश्य जॉईन करा*💐
गुरुवार, ३१ ऑक्टोबर, २०२४
आठवणींची पाने – आठवणींचा धांडोळा
II साहित्य तीर्थ II
*आठवणींची पाने – आठवणींचा धांडोळा*
सोमनाथ पगार
संपर्क क्र.:- ९२७३३५७१५९.
जन्म झाल्यावर कळायला लागल्यापासून जीवनाच्या प्रवासात थांब्याथांब्यावर भेटलेली माणसं व आलेले बरेवाईट अनुभव माणसाला शहाणे करतात, त्यामुळे भविष्याचा वेध घेत अचूक वाटचाल करण्यासठी निच्छितच मदत होते. हे नक्की... हीच शिदोरी पुढे आयुष्यभर पुरते. आणि हो, ज्याप्रमाणे पाण्याची टाकी भरली कि ओव्हरफ्लो हा ठरलेला असतो, त्याचप्रमाणे माणसाच्या मनातील विचारांचे असते. ते साचत राहिले तर माणूस अस्वस्थ होतो. त्यामुळे मनोरंजन हा जरी मुख्य हेतू असला तरीही भावनांना वाट मोकळी करून द्यावी म्हणून कदाचित पूर्वी कथा, कविता सांगितल्या जात असाव्यात. असे वाटते. हीच परंपरा आजतागायत सुरु असावी.
आत्मचरित्र हा त्याचाच एक भाग असावा, असे मला वाटते. भोगाव्या लागलेल्या वेदना, परिस्थितीशी करावे लागलेले दोन हात. यातून घडत गेलेले जीवन. हा सारा अनुभव कुणाला तरी लिखित स्वरुपात सांगितल्याने मन शांत होऊन आनंद मिळतो. कारण प्रत्येकवेळी आपलं ऐकायला हक्काचं कुणी असेलच याची शास्वती नसते. त्यातूनच डॉ. प्रशांत आंबरे यांनी लिहलेल्या ‘आठवणींची पाने’ अशा आत्मचरित्राचे लिखाण झाले आसवे.
वैद्यकीय पेशातील, नाशिक येथील कवी, लेखक असलेले डॉ. प्रशांत आंबरे हे एक ख्यातनाम डॉक्टर असूनही त्यांच्यातील लेखक त्यांना अस्वस्थ केल्याशिवाय राहत नाही. त्यांच्या ‘आठवणींची पाने’ या आत्मचरित्रावर गिरणा गौरव प्रतिष्टान आयोजित पुस्तकावर बोलू काही या उपक्रमात व्याख्यान संपन्न होणार असल्याने रसिक वाचकांशी हितगुज साधण्यासाठी हा प्रपंच.
आईचे श्रद्धास्थान समनापूरचा गणपती, पोहेगावच्या वस्तीवरील दिवस, गणोऱ्यातील दिवस, शेतीवरचे दिवस, गणोऱ्याच्या अंबाबाईची जत्रा, आजोळचे दिवस, ग्रामीण भागातील मुलांच्या अडचणी, गुणे शास्त्री आयुर्वेद कोलेजला प्रवेश, नगर सोडतांना, मुबईत काही दिवस, वयाच्या ५३व्या वर्षी एम,बी.ए. चा विद्यार्थी, वाचलेले पहिले पुस्तक, माजी आमदार, कै. के. बी. देशमुख (दादा), सहकार क्षेत्रात सहकारमहर्षी कै. पंढरीनाथ आंबरे (दादा) याचं योगदान, लोकनेते कै. के. बी. रोहमारे (दादा), माजी मंत्री कै. बी. जे. खताळ पाटील अशा एकूण सोळा प्रकरणामधून त्यांनी या आत्मचरित्रात त्यांचा जीवनपट उलगडून दाखविला आहे.
चित्रकार भूषण बिरारी यांनी अत्यंत सुबक व समर्पक असे मुखपृष्ठ रेखाटलेले असून गृह, तारे सामावलेली विस्तीर्ण आकाशगंगा दिसते आहे, पृथ्वीच्या गोलावर आपल्या अस्तित्वाच्या खुणा टिकवत वृक्षवेलींच्या गराड्यात महत्वाचा भाग असलेला माणूस काहीतरी विचार करतो आहे, सांगू पाहतो आहे. मलपृष्ठावरील उगवता सूर्य हा या भूतलावरील भरारी घेऊ पाहणाऱ्या माणसाचे प्रतिनिधीत्व करत असावा असे क्षणभर वाटल्याशिवाय राहत नाही. तसेच ज्येष्ठ विज्ञान लेखक व निवृत्त प्राचार्य डॉ. किशोर पवार यांची प्रस्तावना या आत्मचरित्राची जमेची बाजू म्हणावी लागेल.
आपले आईवडील मा. श्री. विश्वनाथ लक्ष्मण आंबरे, कै. उर्मिला विश्वनाथ आंबरे, भाऊ कै. प्रदीप विश्वनाथ आंबरे यांच्या चरणी लेखकाने आपले हे आत्मचरित्र अर्पण केले आहे.
आपल्या लेखणीद्वारे समाजाप्रती संवेदना अधोरेखित करणारे वैद्यकीय पेशातील एक संवेदनशील असे हे साहित्यिक असून त्यांच्या लिखाणात गत काळातील आठवांचा दरवळ व्यापलेला आहे. मनात रुंजी घालणाऱ्या अशाच ‘आठवणींचा धांडोळा’ आत्मचरित्र रूपाने आपल्या पुस्तकात लेखकाने वाचकांसाठी मांडलेला आहे.
गाव-खेड्यात शिक्षण घेत लहानाचे मोठे झाल्यावर आजकाल तरुण, तरुणी सर्रास शहरची वाट धरतात, कारण खेड्यापेक्षा शहरात उपलब्ध असलेली सुखसोयीयुक्त आधुनिक जीवनशैली, उत्तम शिक्षण व्यवस्था, दर्जेदार राहणीमान, चविष्ट तसेच उत्तम खानपान, चांगली दळणवळणाची साधने याचसोबत सातत्याने होत असलेला विकास त्यामुळे उपलब्ध रोजगाराच्या संधी, तसेच झपाट्याने होत असलेले औद्योगिकीकरणामुळे सहज रोजीरोटीचा प्रश्न मिटत असल्याने हा बेरोगारांचा लोंढा सहज शहराकडे आकर्षित होतो. याउलट ग्रामीण भागात या सर्व सुविधांचा अभाव असून काबाडकष्ट व संघर्ष हा तेथील जनतेच्या पाचवीला पुजलेला असतो.
अशा परिस्थितीशी दोन हात करत डॉ. प्रशांत आंबरे यांच्या सारखा एखादा ग्रामीण भागातील तरुण उच्चविद्याविभूषित होत शहराकडे धाव घेतो, त्यात नवल काय? लेखकाचे आजोबा सहकारमहर्षी कै. पंढरीनाथ जिजाबा आंबरे दादांनी पुण्यात उभं केलेलं डाळीच्या व्यापाराचं साम्राज्य भीषण आगीत जळून भस्मसात झाल्यावर लेखकाचे आईवडील आपल्या मुळगावी म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील गणोरे गावी परत येतात आणि इथूनच खरा जीवनाचा संघर्ष सुरु होतो. तो पुढे लेखकाने डॉक्टर, वकील, व्यवस्थापन इत्यादी पदव्या घेत जीवनात स्थिरस्थावर होईपर्यंत सुरु राहतो.
लेखकाच्या आईवडिलांचे कष्ट, आपल्या मुलांनी शिक्षण घ्यावं, मोठं व्हावं, यासाठी त्यांची तळमळ, संघर्ष, काबाडकष्ट तसेच लेखकाने अशाही संघर्षातून आपल्या जिद्द व चिकाटीच्या जोरावर आपल्या जीवनात मिळवलेले यश याला तोड नाही. त्यांनी शिक्षणाचा ध्यास सुरूच ठेवला, ते डॉक्टर झाल्यावर वैद्यकीय व्यवसाय सांभाळत पुढे त्यांनी एल.एल.बी. चे शिक्षण घेऊन कायद्याचे ज्ञानही त्यांनी घेतले. एवढ्यावरच ते न थांबता वयाच्या त्रेपान्नाव्या वर्षी त्यांनी एम.बी.ए. ही व्यवस्थापन क्षेत्रातील पद्व्युतर पदवी मिळवली.
जसे कि वर नमूद केले आहे, लेखकाच्या जीवनातील संघर्षाची सुरवात ही आंबरे दादांनी पुण्यात उभं केलेलं डाळीच्या व्यापाराचं साम्राज्य भीषण आगीत जळून खाक होऊन झाली होती. पुस्तक वाचतांना एखादा चलचित्रपट पहावा असे चित्र वाचकाच्या मनपटलावर उमटत जाते. ग्रामीण जीवनातील आठवणींना उजाळा देत गरिबीची, हलाखीची परिस्थिती असल्याने कधीकधी पोटाला अन्नही मिळत नसे. त्यांची आई म्हणजे काकी व वडील म्हणजे काका यांचे कष्ट, त्यांनी गाळलेला घाम, दोन वेलची भ्रांत मिटवण्यासाठी गावोगाव करावं लागलेलं स्थलांतर. यात ओघानेच ग्रामीण जीवनाचे चित्रण आले, जसे कि, तिकीट काढणे शक्य नसल्याने कनातीखालून प्रवेश मिळवत कांताबाई सातारकर यांचा गावात आलेला तमाशा पाहणे, शिक्षण घेण्यासाठी करावी लागलेली पायपीठ, पाट तसेच विहिरीत पोहणे, झालेले अपघात, स्पर्धांमध्ये मिळवलेले बक्षिसे, अंगावर बोंबलाची भाजी सांडून भाजणे, पुढे दहावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावने, संगमनेरच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेणे, गावाकडील सणवार, नाटकामध्ये केलेला अभिनय व मिळालेले पुरस्कार, एसटीवर येणारा जेवणाचा डब्बा, अहमदनगर येथील आयुर्वेदिक महाविद्यालयातील प्रवेश घेवून डॉक्टर होणे, होस्टेलचे जीवन तसेच त्यांच्या वैद्यकीय पेशातील अनेक अनुभव त्यांनी वर्णन केलेले आहेत. अशा लेखकाने मनात जपलेल्या अनेक आठवणी या आत्मचरित्रात वाचकाला वाचायला मिळतात. हे सारे काही आपल्याच जीवनात किंवा सभोवताली घडत आसवे असे क्षणभर वाटून जाते.
आपल्या जीवन प्रवासात अनेक दिग्गज राजकीय व्यक्तीचा सहवास त्यांना लाभला असून त्यात आमदार, खासदार, समाजसेवक तसेच मंत्री यांचा समावेश आहे. या सर्व आठवणी या पुस्तकात तपशीलवार आढळतात. माजी आमदार, कै. के. बी. देशमुख (दादा), सहकार क्षेत्रात सहकारमहर्षी कै. पंढरीनाथ आंबरे (दादा), लोकनेते कै. के. बी. रोहमारे (दादा), माजी मंत्री कै. बी. जे. खताळ पाटील इत्यादी मान्यवरांचा उल्लेख व आठवणी या पुस्तकात आढळतात.
‘आठवणींचे पाने’ असे समर्पक व आगळेवेगळे शीर्षक या आत्मचरित्राला देण्यात आले असून संघर्ष करत स्वत:च्या पायावर उभे राहिलेल्या प्रत्येक वाचकाला स्वतःचं वाटावं असं हे पुस्तक आहे.
डॉ. प्रशांत आंबरे यांना यापूर्वी अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झालेले असून त्यांचे समाजतरंग हा कवितासंग्रह, मातु:श्री हे आईविषयी लिहलेले पुस्तक, मधुमेह हे आरोग्य विषयक पुस्तक व आठवणींचे पाने अशी ग्रंथसंपदा प्रकशित असून लवकरच त्यांचा ‘सत्यधारा’ हा कवितासंग्रह प्रकशित होत आहे.
हे सर्व लिहिण्याचे कारण म्हणजे गुरुवार, दि. ३१ ऑक्टोबर, २०२४ रोजी हुतात्मा स्मारक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, नाशिक येथे गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष माणूसमित्र सुरेश पवार यांनी आयोजित केलेल्या ‘पुस्तकावर बोलू काही...’ या सदरात कवी/ लेखक डॉ. प्रशांत आंबरे यांच्या ‘आठवणींची पाने’ या आत्मचरित्रावर आधारित ऐसपैस गप्पांच्या कार्यक्रमाची मेजवानी नाशिकमधील रसिकवाचक तसेच साहित्यिकांसाठी उपलब्ध झाली आहे. दि. ५ मार्च, २०२४ ते दि.२८ फेब्रुवारी, २०२५ दरम्यान दर मंगळवारी आणि शुक्रवारी हा उपक्रम संपन्न होणार आहे. अशा प्रकारचा बहुधा हा साहित्य क्षेत्रातील पहिलाच अभिनव उपक्रम असावा. यामध्ये नवोदित तसेच प्रस्थापित साहित्यिकांना व्यक्त होण्यासाठी हक्काचं व्यासपीठ उपलब्ध झालं आहे.
याहीपुढे, त्यांची लेखणी अशीच तळपत रहावी. त्यांच्या हातून सर्व प्रकारचे साहित्यिक लिखाण व्हावे, हीच सदिच्छा! डॉ. प्रशांत आंबरे सरांना गिरणा गौरव प्रतिष्ठान आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ या सदरात संपन्न होणाऱ्या व्याख्यानास आभाळभर शुभेच्छा!
पुस्तकाचे नाव :- आठवणींचे पाने
लेखक :- डॉ. प्रशांत आंबरे, संवाद क्र. ९८२३०४९३६६
प्रस्तावना :- प्राचार्य डॉ. किशोर पवार
स्वागत मूल्य :- ₹ २००/- मात्र (सवलतमूल्य, टपाल खर्च आणि अधिक माहितीसाठी कृपया, संबंधितांशी संपर्क साधावा.)
सोमनाथ आवडाजी पगार (सॅप)
(महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेत प्रकाशनार्थ अनुदान प्राप्त साहित्यिक)
संपर्क क्र.:- ९२७३३५७१५९, Email:- somnathpagar@yahoo.co.in
गीतकार/ कवी, कथा, पटकथा, संवाद लेखक, युसमीक्षक, ट्युबर, ब्लॉगर, टेक्नोक्रॅट, ऑनलाईन डॉक्युमेंट्स ऍडव्हायझर, इंग्लिश लँग्वेज ट्रेनर.
@highlight Following Amazon India Following Love Somnath Pagar #highlightseveryone #marathipoems #followers #pandharpur #highlights
मंगळवार, १५ ऑक्टोबर, २०२४
घामाचे संदर्भ:- कामगार जाणिवांचे वास्तव
II साहित्य तीर्थ II
घामाचे संदर्भ – कामगार जाणिवांचे वास्तव
सोमनाथ पगार
संपर्क क्र.:- ९२७३३५७१५९.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे म्हणायचे पृथ्वी ही शेष नागाच्या शिरावर नाही, तर ती कामगाराच्या तळहातावर आहे. ते काही अंशी खरेही आहे. आज हे आठवण्याचे कारण म्हणजे कवी किरण भावसार यांचा ‘घामाचे संदर्भ ‘ हा कवितासंग्रह होय. कामगारांनी घामच गाळला नाही, काम केले नाही तर कारखाने बंद पडतील हे नक्की. मात्र असे असले तरी कामगारांचा घाम हा मातीमोल असतो. त्याने आयुष्यभर कष्ट करून, घाम गाळून सुद्धा त्याची दोन वेळच्या अन्नाची भ्रांत काही केल्या मिटत नाही. कामगार हा आयुष्यभर कामगारच राहतो. त्याला दुसरा काही पर्यायही नसतो.
भूक आणि व्यवस्थेपुढे गुडघे न टेकता कष्ट आणि जोखीम खांद्यावर पेलून परिस्थितीशी झुंजणाऱ्या हरेक कष्टकऱ्यास त्यांनी हा संग्रह अर्पण केला आहे. जर भूक नसती तर कदाचित आज जगाचे रूप वेगळे राहिले असते. कुणीच बसल्या जागेवरून हललं नसतं. कारण संपत्ती कमाविण्याची, तिचा संचय करण्याची गरजच राहिली नसती. या विश्वव्यापी भूकेमुळेच या जगात सारी उलथापालथ होत असते. जीवावर उद्धार होऊन, वेळेप्रसंगी जोखीम पत्करून कष्टकरी कामगार परिस्थितीशी झुंजत असतो.
आपण केलेल्या श्रमाचे चीज व्हावे, प्रतिष्टा मिळावी. सकलांनी आपल्या कामाची दखल घ्यावी. आणि यातून या विश्वात, समाजात मानवतेचे तेज झळकावे. अशी अपेक्षा कष्टकऱ्याची असते,
तुझ्या श्रमास प्रतिष्टा मिळो I सकलांचे लक्ष तुजकडे वळो I
मानवतेचे तेज झळझळो I विश्वामाजी या योगे II
सुरवातीलाच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रमगीतेतील या वरील ओळी वाचकाचे लक्ष वेधून घेतात. त्यामुळे एकूणच हा कवितासंग्रह कष्टकरी, कामगार विश्वाचे अर्थात ‘घामाचे संदर्भ’ घेवून आला असल्याचे समजते.
सिन्नर येथील कवी किरण भावसार हे उद्योग क्षेत्रात कार्यरत असून वाशिम येथील काव्याग्रह प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या त्यांच्या ‘घामाचे संदर्भ’ या कवितासंग्रहाविषयी फार ऐकून होतो. तसेच गिरणा गौरव प्रतिष्टान आयोजित पुस्तकावर बोलू काही या उपक्रमात त्यांचे या कवितासंग्रहावर व्याख्यान संपन्न होणार असल्याने रसिक वाचकांशी हितगुज साधण्यासाठी हा प्रपंच.
या कवितासंग्रहातील रचना या प्रामुख्याने मुक्तछंदातल्या असून असून कामगार विश्वाचे चित्रण यात वाचावयास मिळते. ऐन उमेदीच्या काळात पोटाची खळगी भरण्यासाठी कित्येक कंपन्यांची फाटकं झिजवावी लागणारी कितीतरी कामगार आपल्याला ज्ञात आहेत. आणि यातून मॅनपावरच्या नावाखाली ओव्हरटाईम करत त्यांच्या आयुष्याच्या, सुखस्वप्नांचा घसारा ठरलेला असतो. चकाकणाऱ्या शहरात उजेड शोधता, शोधता त्यांच्या आयुष्याचा गोठा तर होतोच. मात्र कारखान्यात होणारे भीषण स्फोट, त्यात कामगारांचे होणारे मृत्यू पाहून किंवा बंद पडलेली कंपनी, यामुळे कामगारांच्या संसाराची होणारी परवड पाहून मन हेलावून जाते, सुन्न होते. अशा परिस्थितीत जगणं सुसह्य होण्यासाठी कर्जाच्या विळख्याने त्याला जखडलेले असते. वाणगी दाखल ‘सांगा तुकोबा’ या कवितेतील खालील ओळी पाहू,
तरीही हे जग
भडीमार करतंय सारखं
तुम्ही कर्ज घ्या म्हणून
दिवसाला एखादा फोन ठरलेलाच
क्रेडीट कार्डच्या आग्रहाचा
मला रमी खेळण्याचा
जंगली सल्ला देतात
जाहिरातीतून
माझेच आवडते लोकं. (सांगा तुकोबा, पृष्ठ क्र. १७)
या उद्योग जगतात कामगार यांत्रिकी पशुसारखे बनून जातात. घर, संसार यासोबत दैनंदिन गरजा भागवण्यासाठी काढलेले कर्ज यामुळे कामगार कधी यंत्रवत होऊन जातो, हे त्याचे त्याला स्वतःला सुद्धा कळत नाही. ज्याप्रमाणे गायी, म्हशींना इंजेक्शन देवून त्यांनी जन्म दिलेल्या गोऱ्ह्यांना जास्त दुध उत्पादन मिळावं म्हणून भोत बनविले जाते. तशीच गत कामगारांची असते, कारण कवीला पक्कं माहित झालंय कि, यांत्रिक अवजारांच प्रस्थ व वापर वाढला असून बैल आता नाही देवू शकत टक्कर ट्रॅक्टर, जीपशी खापाटल्या पोटी. आपले गाव, मुलुख इतकेच नाही तर स्वतःची ओळख विसरून आलेले बिनचेहऱ्याची माणसं घाण्याच्या बैलासारखी हाडाची काडं होईस्तोर राबत राहतात अहोरात्र.
वास्तव मांडणाऱ्या अशा कथा, कविता वाचतांना वाचक त्यात अडकत जातो, कळतनकळत कवीने, लेखकाने चित्रित केलेल्या पात्रांशी स्वतःशी तुलना करतो, किंवा असे अनुभव स्वतःचेही असू शकतात. याची वाचकाला जाणीव होते. यातून एक वेगळीच अनुभूती मिळते.
एकदा पर्मनंट झाल्यावर त्याच कामगाराला रोजंदारी तत्वावर काम कामगाराला मदत करता येत नाही, मदत करू वाटत नाही किंवा मदत करत नाही, हेही सत्य कवीने मांडले आहे. किंवा साहित्यिक म्हणून कितीही मोठं नाव झालं, तरी कामगार असल्याने नित्य नेमाने कामावर जावं तर लागतंच, ही सलही कवीच्या मनाला बोचते,
कार्ड पंच करतांना
मनाच्या लॉकरमध्ये
गुंडाळून ठेवतो कविता
आठ तासांसाठी (मी औकात विसरत नाही, पृष्ठ क्र. २३)
फर्स्ट, सेकंड, नाईटचं वास्तव स्विकारत, उद्योग जगतातील कार्ड पंचिंगच्या संस्कृतीत आयुष्य तीन शिफ्ट बनून जाते, कवीला याची जहरी सल आहे. रात्रपाळीत रात्रभर साथ देत जगणारा चंद्र सूर्य उगवताच अस्ताला जातो, मात्र उगवणारा सूर्य पहिल्या पाळीसारखा डोळ्यात टाचण्या टोचाव्या तसा टोचू लागतो. रात्रभर जागरण झाल्याने डोळे चुरचुर करतात. असं असलं तरी रिलीव्हर जर आला नाही तर परत फर्स्ट शिफ्टची ड्यूटी कामगारच्या बोकांडी बसतेच.
शोषणकर्ते हे रितसर विसरतात कि, उन्माद करत, स्वार्थासाठी गळे घोटून, सत्ता मिळवून कामगारांचे शोषण केले, कितीही धन, संपत्ती कमवली, सत्ता उपभोगली तरीही पैसा कमवून त्यांचा सुखाचा शोध संपत नाही. हवंस सुख काही केल्या घावत नाही. शेवटी मृत्यू हा प्रत्येकाला अटळ असतो, सरतेशेवटी मृत्यूनंतर आठवडाभरात सर्व कार्यक्रम उरकले जातात. म्हणूनच जीवन क्षणभंगुर असल्याने कामगारंचे शोषण थांबले पाहिजे, हेच खरे.
जीवनाची दशा सुधारण्यासाठी शिक्षण हाच एकमेव जालीम उपाय आहे. अगदी भंगार विकणाऱ्यापासून कष्टकरी, कामगार, असे कुणीही शिकून स्थिरस्थावर होण्याचा प्रयत्न करत यशस्वी होतात. असेच भंगार वेचता, वेचता शिक्षण घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे चित्रण भंगार कवितेत वाचायला मिळते.
गावाकडची हवा, पाणी कितीही ताजे व शुद्ध असले तरी तिथं हाताला काम मिळत नसल्याने पोटापाण्यासाठी शहराचा रस्ता धरणे हे क्रमप्राप्त ठरते,
गावच्या मातीत
रमत नाही त्याचा जीव
रोजी रोटीला महाग
मुलखातलं
उपाशी मारणारं
स्वच्छ निरभ्र आभाळ
काय चाटायचंय...? (मोकळी हवा, निरभ्र आकाश, पृष्ठ क्र. ४६)
पोट भरण्यासाठी हाताला काम नसल्याने गावाकडं कितीही मोकळी शुद्ध हवा असली तरी काय उपयोगाची. असे बेरोजगार शहरात स्थलांतरीत झाल्यावर त्यांना दाटीवाटीने जीव मुठीत धरून उघड्या गटारी, कचराकुंड्या असणाऱ्या ठिकाणी वास्तव्य करावं लागतं. परवडत नसल्याने ते मच्छरांचा, रोगराईचा बंदोबस्त करू शकत नाही. पुढे आपोआप धुरकट, कळकट कोंदट जगणं त्यांच्या अंगवळणी पडते. शहरात उद्योगधंदे वाढल्याने हवा, जल, वायू प्रदूषण होत आहे. हेच कामगार परवडत नसल्याने विमाही काढू शकत नाही. उपचार न मिळाल्याने शेवटी मरण हाच पर्याय त्यांना शिल्लक राहतो. त्याचमुळे कवी, उद्दिग्न होऊन कवी नारायण सुर्वे यांना, ‘माफ करा सुर्वे कामगारांच्या तलवारी बोथट झाल्या आहेत. कारण आज रोजीरोटीचा सवाल उग्र बनला आहे. कारण शेवटी भूक लाचार असते. असे रास्त आकलन या कवीचे आहे.
बरं राबणारे हात फक्त पुरुषांचेच आहेत असेही नाही. तर त्या घरकाम सांभाळून कंपनीत पॅकिंग, कटिंग, स्विपिंग अशी सर्व कामे सकाळी केलेला नट्टापट्टा निथळेपर्यंत करत असतात बिचाऱ्या आपल्या संसाराला हातभार लावावा म्हणून. इतकेच नाही तर शहरातील गायी सुद्धा पाण्यावाचून व्याकूळ असतात. असे असले तरी त्या गायींच्या डोळ्यात पाणी कुठून येत असेल? हा प्रश्न कवीला सतावतो आहे. एक मात्र खरे कि काहीही झालं तरी आपल्या कामाशी प्रामाणिक राहणारा हा कामगार वर्ग असून कामातच राम ते मानतात,
सेकंड नाईट I राबू तिन्ही पाळ्या II
पान्ह्यांच्या चिपळ्या I घेऊ हाती II ...
रोज करू आम्ही I आठ तास वारी I
कामात श्रीहरी I पाहू सदा II (वारी, पृष्ठ क्र.६४)
आपल्या रोजीरोटीचा प्रश्न मिटल्यावर कामगार ‘काम हीच खरी ईश्वर सेवा’ समजून तन व मनाने त्याला नेमून दिलेली कामे करत असतो. तिकडे वारकरी पंढरीच्या वारीला जातो तर इकडे कामगार, कष्टकरी पान्हे हातात घेवून यंत्रांवर राबत असतो. कारखाना हाच त्यांच्यासाठी पंढरी असतो कारण त्यामुळेच त्यांच्या मुखी खास मिळत असतो.
अजून एक ठसठसीत सत्य कवीने मांडले आहे, रोड, रस्तांचे कामे करणारे कामगार उन्हात तळत डांबर, सिमेंटचे कामे करतात. आणि शेवटी टोलनाक्यांची व्यवस्था होते कि ज्या रस्त्यावर ते स्वतःचे वाहन कधीही चालवू शकत नाही कारण ते गरीब असतात त्यामुळे स्वतःचे वाहन कसे खरेदी करणार? आजच्या शोषण करणाऱ्या व्यवस्थेच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी ही रचना आहे.
एकदा नोकरी लागली कि हाच कामगार आपलं गाव, शिवार विसरून, आपले नातेवाईक तसेच आई बापापासून दुरावतो. आपला संसार, मुलं व रोजची ड्युटी, चाकरी या चक्रात गुरफटून घेतो स्वतःला, यात तो रममाण होतो, जसे देव एकदा मंदिरात विराजमान झाले कि त्यांनाही आठवण येत नसावी त्यांना घडविणाऱ्या कारागिरांची, शिल्पकारांची. तशीच गत कामगारांची व कामगारांच्या मायबापाची होत असते.
कवीला भडकलेल्या बॉयलरला कोळसा भरवताना काळवंडलेला कामगार जणू काळा सावळा राम भासतो. तिकडे विठ्ठल कमरेवर हात ठेवून उभा आहे तर इकडे कारखान्यात हा कामगार रात्रंदिन राबतो आहे. असे असले तरी सर्व काळ सारखा नसतो. एकेकाळी दीपस्तंभ वाटणारा कारखाना बंद पडतो आणि कामगार देशोधडीला लागतो. तरीसुद्धा,
हे शहर अजून
माझं झालं नाही
सोडून आलो त्या गावाच्या
नजरेतला परकेपणा
सोसत नाही (मुळांवरची माती, पृष्ठ क्र.८९)
शहरात येऊन कारखान्यात दोन वेळेची भ्रांत मिटली तरी मनातला गाव काही केल्या कामगाराच्या मनातून जात नाही. कामाच्या रगाड्यात चरकाच्या बैलासारखे राबत असतात कामगार. त्यांना तारीख वाराचेही भान नसते. सणासुदीची वा सुट्टीची वाट पाहण्यात त्यांचे आयुष्य झरझर विरून जात असते, कारण त्यांना तेव्हाच मोकळा श्वास घेता येतो. घाम गाळला तर दाम मिळेल. अशी त्यांची गत असते. टीव्ही पाहणे, पिक्चर पाहणे, दारू पिणे, पत्ते खेळणे, वरातीत नाचणे हे क्षण त्यांच्यासाठी मनाजोग जगण्यासाठी असतात. पगार, बोनसची वाट पाहिल्यावर पैसे हातात आले कि, खर्च करतात, उधळपट्टी करतात. खरे तर हाच कामगार शिक्षण घेऊन मोठ्या हुद्यावर काम करू शकतो, मात्र तो तसा प्रयत्न करत नाही. त्याला कार्ल मार्क्स, नारायण मेघाजी लोखंडे माहित नसतात. शिकलेला इतिहास, नागरिकशास्त्र तो भाकरीच्या लढाईत विसरून जातो. ही कामगार मंडळी व्हाट्सएपच्या पोस्ट वाचून फॉरवर्ड करतात. अफवांचे बळी ठरतात. तरीसुद्धा कामगार कृतघ्न नसतात, ते भांबावून गेलेले असतात. त्यांची भाकरीशी लढाई अव्याहतपणे सुरु असल्याने ते शिक्षण किंवा प्रबोधानाकडे वळू शकत नाही. कारण त्यांच्याही वस्तीत सूर्य तर उगवायला हवा...
या कवितासंग्रहात कामगारांचे विश्व विविध रूपे घेवून कवितांमधून पाझरत राहते आणि ओघानेच वाचकांचे ह्रुदयही कधी डोळ्यांतून तर कधी हुंद्क्यांतून पाझरत असते, इतके वास्तव चित्रण या कवीने केले आहे. कामगार, हॉटेलमधील पोऱ्या, यांत्रिक पशु, भंगारवाला, शेतकरी, शेतमजुरांचे लग्न न जमणारे मुले, मालधक्यावर सिमेंटच्या गोण्या उतरविणारे मजूर, शेतीची वाताहत होऊन देशोधडीला लाग्ल्याने कंपनीत गेटवर भरतीचा बोर्ड धुंडाळूणारे तरून, ट्रक ड्रायव्हर, कंत्राटी शिक्षक, कामगार, आपला मुलुख सोडून आलेले भैय्ये, क्लिनर, हमाल, सेन्टरिंग कामगार, रोजंदारीवर राबणाऱ्या बाया, भटकणाऱ्या गायी, बँडवाले, कापड दुकानातील कामगार, गुरखा, ऊसकामगार, पिझ्झा डिलिव्हरी करणारा मुलगा, बांधकाम साईटवर राहणारे वाचमन, शिंपी, फेरीवाले, गारेगार कुल्फ्या विकणारा, मॅनहोलमध्ये काम करणारे मजूर, वायरमन, शोभेची दारू काम करणारे कामगार, विहीर कोदणारे, खाणीत काम करणारे मजूर, विड्या वळणारी बाई असे अनेक पात्रे वाचकांना कवितांमधून वाचता वाचता भेटत राहतात.
‘घामाचे संदर्भ’ असे आगळेवेगळे नाव या कवितासंग्रहाला देण्यात आले असून कामगार विश्वाचे वास्तव चित्रण या कवितांमध्ये आढळते. मुखपृष्टावर कामगार विश्वात हरवलेल्या कामगारांचा समूह वाचकांचे लक्ष वेधून घेतल्याशिवाय राहत नाही.
डॉ. अरुण ठोके यांनी या कवितासंग्रहाची पाठराखण करतांना, महानगरीय जीवनाचे अनेक पैलू काव्यगत वास्तव म्हणून या कवितांत ‘घामाचे संदर्भ’ बनून आलेले आहेत. कामगारांविषयीचा करुणाभाव कवीच्या ठायी असलेल्या प्रबुद्ध प्रतिभेचा प्रत्यय देतो. कष्ट करणारी माणसे व त्यांना साहाय्यभूत ठरणारे प्राणी यांच्याकडे केवळ उपयुक्ततेच्या नजरेने पाहणाऱ्या स्वार्थी वृत्तीच्या दंभस्फोट या कवितेतून करण्यात आलेला आहे. महानगरात पाण्याच्या शोधात फिरणाऱ्या भटक्या गाई व पोटासाठी काम मिळावे म्हणून कंपन्यांच्या दारोदार चकरा घालणारे मजूर या दोघांच्याही तृष्णेशी परात्मता या कवितेचे वेगळेपण नियत करते.
ही कविता कामगारांची विविध रूपे व त्यांच्या दयनीयतेचे भीषण वास्तव आपल्या कवेत घेते. कचरा वेचणाऱ्या स्त्रीया, भंगारवाला, गिरणी कामगार, ड्रायव्हर, ऊसतोड कामगार, कंपन्यात जड काम करणारे कामगार, आदि कामगारांची विविध रूपे या कवितांत अवतरलेली आहेत. यातील काव्यगत कथेने कामगारांच्या कष्टकऱ्यांच्या शोषणाचा इतिहास व वर्तमान वाचकांच्या पुढ्यात ठेवतात. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या ब्रँडयुद्धात छोटे व्यावसायिक व कुशल कारागीर यांच्या धंद्यासकट उद्ध्वस्त होत असल्याची सल, जागतिकीकरणातील अगतिकीकरण दाखविणारी आहे. ही कविता राष्ट्र उभारणीतील कामगारांच्या योगदानाकडे लक्ष वेधून राजकीय भूमिकेचे सुतोवाच करते. कष्टकऱ्यांच्या – कामगारांच्या व्यथा – वेदनांच्या अनेक तऱ्हा या कवितेत अंकुरित होतात. या कवितांतील कष्टकऱ्यांच्या – कामगारांच्या व्यथांचे बहरून येणे, हे घटीत संवेदनशील वाचकाला झिंजाडून सोडते. समकाळाचे नेटके भान, भाषेची लय, मिथकांचे नवसर्जन, प्रादेशिक अस्मितांचा त्याग व स्वाभाविक अभिव्यक्ती या विषेशांमुळे या कवितेने आपल्या अस्तित्वाची गुणवती मोहर उमटवलेली आहे.
मराठी कवितेतून विरळ झालेला कामगार जाणिवांचा अमोघ स्वर या कवितांत पुलकित झालेला आहे. दारिद्र्य, अन्याय, विषमता, हिंसा व शोषण या जीवनसत्याकडे पाहण्याची अभिनव दृष्टी ही कविता देते. असे स्पष्ट शब्दात नमूद केले आहे.
एकूण ४७ आशयगर्भ, अनेक विशेषणे, अलंकार, उपमा, दृष्टांत योजून समृद्ध झालेली कविता वाचकाच्या मनाला अत्यानंद देवून तृप्त करते. ‘घामाचे संदर्भ’ या कवितासंग्रहात अतिशय वाचनीय, आशयगर्भ कविता वाचायला मिळतात. हा संग्रह वाचकांनी आवर्जून वाचावा, असे मला वाटते.
या कवितासंग्रहास चित्रकार प्रदीप खेतमर यांनी रेखाटलेले उत्कृष्ट आणि बोलके मुखपृष्ठ तसेच पुस्तकाची मांडणी वाचकाला पाने पालटून कविता वाचायला प्रेरित करतात. तसेच साहित्यिक व मराठीचे प्राध्यापक प्रा. डॉ. अरुण ठोके यांची समर्पक पाठराखण यामुळे कवितासंग्रहाचा एकूण आवाका सहज लक्षात येतो. आशयगर्भ मुक्तछंद, अभंग रचनांनी हा संग्रह बहरलेला आहे. सर्व प्रकारच्या साहित्यिक लिखाण प्रकारचे लिखाण करणारे हे व्यक्तिमत्त्व आहे. पुन:पुन्हा वाचाव्या अशा त्यांच्या कविता आहेत.
असे असले तरी मला जाणवलेल्या काही अपवादात्मक उणिवा नमूद करणे माझ्यासाठी क्रमप्राप्त ठरते, जसे की काही रचना एका पृष्ठावर सहज मावल्या असत्या, (उदा. पृष्ठ क्र. ९ व १०, ११ व १२, २६ व २७, ५३ व ५४, ८५ व ८६ वगैरे ) त्यामुळे पुस्तक नक्कीच वाचकांना कमी किमतीत उपलब्ध झाले असते. तसेच छंदोबद्ध कविता वाचणाऱ्या वाचकांसाठी हा कवितासंग्रह निश्चितच नाही कारण या कवितासंग्रहात प्रामुख्याने मुक्तछंद रचनांचा समावेश असून अष्टाक्षरी, षढाक्षरी, अभंग (एकमेव रचना वगळता), अंगाई, गझल, लयबद्ध गाणी अशा रचनांचा समावेश नाही.
हे सर्व लिहिण्याचे कारण म्हणजे मंगळवार, दि. १५ ऑक्टोबर, २०२४ रोजी हुतात्मा स्मारक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, नाशिक येथे गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष माणूसमित्र सुरेश पवार यांनी आयोजित केलेल्या ‘पुस्तकावर बोलू काही...’ या सदरात कवी किरण भावसार यांच्या ‘घामाचे संदर्भ’ या कवितासंग्रहावर आधारित ऐसपैस गप्पांच्या कार्यक्रमाची मेजवानी नाशिकमधील रसिकवाचक तसेच साहित्यिकांसाठी उपलब्ध झाली आहे. दि. ५ मार्च, २०२४ ते दि.२८ फेब्रुवारी, २०२५ दरम्यान दर मंगळवारी आणि शुक्रवारी हा उपक्रम संपन्न होणार आहे. अशा प्रकारचा बहुधा हा साहित्य क्षेत्रातील पहिलाच अभिनव उपक्रम असावा. यामध्ये नवोदित तसेच प्रस्थापित साहित्यिकांना व्यक्त होण्यासाठी हक्काचं व्यासपीठ उपलब्ध झालं आहे.
याहीपुढे, त्यांची लेखणी अशीच तळपत रहावी. त्यांच्या हातून सर्व प्रकारचे साहित्यिक लिखाण व्हावे, हीच सदिच्छा! कवी किरण भावसार यांना गिरणा गौरव प्रतिष्ठान आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ या सदरात संपन्न होणाऱ्या व्याख्यानास आभाळभर शुभेच्छा!
पुस्तकाचे नाव :- घामाचे संदर्भ
ISBN :- 978-81-962933-0-7
कवी :- किरण भावसार, संवाद क्र. ७७५७० ३१९३३
प्रकाशक :- काव्याग्रह प्रकाशन, वाशिम
पाठराखण :- प्रा. डॉ. अरुण ठोके
स्वागत मूल्य :- ₹ १६०/- मात्र (सवलतमूल्य, टपाल खर्च आणि अधिक माहितीसाठी कृपया, संबंधितांशी संपर्क साधावा.)
सोमनाथ आवडाजी पगार (सॅप)
(महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेत प्रकाशनार्थ अनुदान प्राप्त साहित्यिक)
संपर्क क्र.:- ९२७३३५७१५९, Email:- somnathpagar@yahoo.co.in
गीतकार/ कवी, कथा, पटकथा, संवाद लेखक, युसमीक्षक, ट्युबर, ब्लॉगर, टेक्नोक्रॅट, ऑनलाईन डॉक्युमेंट्स ऍडव्हायझर, इंग्लिश लँग्वेज ट्रेनर.
शनिवार, १२ ऑक्टोबर, २०२४
दसऱ्याच्या शुभेच्छा!!!
सस्नेह नमस्कार,
☘️ आपणास व आपल्या परिवारास दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !!! 💐🙏💐💐💐💐
मानवता धर्माचाच
नाद घुमो जगभरा
ज्ञान, प्रकाश पेरूनी
करू साजरा दसरा ll१ll
आरोग्याचे सोने व्हावे
मिळो उपचार सर्वां
नाश दुर्गुणांचा होण्या
स्वःह करूया हो गर्वा ll२ll
षंढरीपूवर सत्य
अहिंसेचा जय, जय
भस्म असुरी विचार
दूर जावे चिंता, भय ll३ll
साधे, शुद्ध आचरण
चला संकल्प करूया
नवांकुर संस्कारांना
नवविचार पेरूया ll४ll
वाटू आनंदाचे सोने
नको वृक्षाला (आपट्या) वेदना
मनामनाला चेतवू
पर्यावरणा जपण्या ll५ll
लाभो धन नि संपदा
पूर्ण होवो साऱ्या इच्छा
नभी कीर्तीचे तोरण
दसऱ्याच्या या शुभेच्छा! ll६ll
शुभेच्छुक:-
*सोमनाथ पगार*, नाशिक
संपर्क: ९२७३३५७१५९.
मंगळवार, १ ऑक्टोबर, २०२४
काळजातला लामणदिवा - वैश्विक व वैचारिक साहित्यकृती
ll साहित्य तीर्थ ll
पुस्तक परिचय
काळजातला लामणदिवा – वैश्विक व वैचारिक साहित्यकृतीा
सोमनाथ पगार
संपर्क क्र.:- ९२७३३५७१५९.
पाणी प्रवाही राहिलं तर जीवनदान देतं, जिथं जाईल तिथ समृद्धी बहाल करतं, स्वर्ग निर्माण करतं आणि हेच पाणी जर तुंबलं, साचलं तर ते सडतं, त्याची दुर्गंधी निर्माण होते. त्यामुळे आजूबाजुच्या परिसरात रोगराई पसरून जनारोग्य धोक्यात येते. तशीच गत माणसाची असते. मनातल्या मनात भावनांचा कोंडमारा झाला तर मनाचे आरोग्य बिघडू शकते. म्हणून प्रवाही राहणे कधीही चांगलेच. म्हणूनच मला ऍरिस्टोटलने मांडलेली कथार्सिस ही संकल्पना आवर्जून आठवली.
हे आठवण्याचे कारण म्हणजे सुप्रसिद्ध लेखिका व कवयित्री सौ. सविता दरेकर यांची वाचनात आलेली कादंबरी काळजातला लामणदिवा होय. चित्तवेधक मुखपृष्ठ पाहिल्यावर आपोआपच पाठराखण वाचली आणि आनंदाने मन बहरून गेले कारण चांदवड सारख्या ग्रामीण भागात रुग्णसेवा करणारे माझ्यासह आपले सर्वांचे मार्गदर्शक, सुप्रसिद्ध लेखक डॉ. राजेंद्र मलोसे सरांची पाठराखण म्हणजे या पुस्तकाच्या आत डोकावून अंदाज देणारा आरसा होय.
डॉ. राजेंद्र मलोसे सर लिहतात, तुम्ही जेवढं वैयक्तिक लिहाल तेवढं ते वैश्विक होईल असे मी कुठेतरी वाचलं आहे. हे जे काही आठवणींचा लामणदिवा लिहलं आहे, मला असं वाटतं, हे पण वैयक्तिक आणि वैश्विक दोन्ही आहे. त्याचं कारण असं; सई आणि लेखिका या कधी दोन वाटतात तर कधी एकच वाटतात. ही सईची सय आहे आणि म्हटलं तर दुधावर आलेली साय आहे. सईवर साय येते पण मध्ये दुध खळखळत राहतं, उकळत राहतं. सई आपल्या लहानपणापासूनच्या आठवणी सांगते आणि जसं तिचे वडील तिला सांगतात की, ‘ओढ्यातलं पाणी बघ, दगड, धोंड्यांना टाळून खळखळत पुढे वाहत राहते’ तसेच हे लिखाण आहे.
वडिलांवर खूप प्रेम असणाऱ्या एका सईची ही गोष्ट आहे. असंच लिहित राहावं या लेखिकेने! कुठलाही बंध अनुबंध पाळू नये. आपल्याला जे समोर दिसतं ते लिहित रहावं. म्हणून तर म्हणतो की, जे वैयक्तिक असतं ते वैश्विक असतं. ते अपोआप वैचारिक होतं.
आणि त्यामुळेच हितगुज साधावी म्हणून हा प्रपंच...
आपल्या कुटुंबासोबत हिरव्यागार रानमळ्यात राहणारी, सर्वांच्या लाडात वाढणारी, निखळ जगणारी, बांधावरती कधी पाऊलवाटांवर विहरणारी, सिताफळं, बोरीभोवती मुक्त उधळणारी, नदीच्या झुळझुळ पाण्यासोबत, पक्ष्यांच्या किलबिलाटात उमलत्या कळीची अर्थात सईची ही कथा आहे.
या जगात एखाद्या मुलीचे तिच्या वडिलांशी तिचे सर्वात जवळचे नाते असते. बालवयात वडिलांसाठी त्यांची मुलगी म्हणजे जीव कि प्राण... समजायला लागल्यावर, दुडूदुडू चालायला लागल्यापासून एक आदर्श व्यक्ती म्हणून मुलीसाठी तिचे वडीलच हेच एकमेव आदर्शस्थानी असतात. काळजातला लामणदिवामध्ये आपल्याला पहिल्याच प्रकरणात या कथेची नायिका सई भेटते. शाळेत जाऊ इच्छिणारी म्हणजेच या व्यवहारी जगाचा सामना करायला सईचे वडील तिला हात धरून सुसज्ज करत असल्याचे लक्षात येते. तर “हे बघ सई, हे पाणी कसे वाहते आहे. त्यात दगड-गोटे खडक आहेत. तरीही ते पाणी रस्ता शोधत पुढे पळतंय...” असे बालवयात आपल्या लेकीवर चांगले संस्कार करणारे वडील वसंता वाचकाला भेटतात.
दरम्यान अनेक चांगले वाईट प्रसंग तिच्या वाटेला येतात. वडिलाचे अकाली निधन झाल्यावर तिला भावनिक संघर्षाचा सामना करावा लागतो. फिनिक्स पक्ष्याप्रमाणे प्रत्येक प्रसंगातून ती स्वतःला सावरत भरारी घेते. यासाठी तिच्या वडिलांचे संस्कार तिला लाखमोलाचे ठरतात. सईचं अस्तित्व, ओळख, धडपड, घुसमट याचबरोबर तिच्या अंतर्मनातले हुंदके यावर मात करत मार्ग काढत जाणारी सई नावाची नायिका काळजातला लामणदिवा होऊन जाते. प्रत्येक हळव्या बापाला आणि स्त्रीमनाला स्पर्शून जाणारी अशी ही कथा आहे.
सोप्प, सरळ, साध जीवन जगणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबाची ही कथा असून एका नोकरी करणाऱ्या मात्र शेतकरी कुटुंबातील सई नावाच्या मुलीचं स्त्रीमध्ये होणारं रुपांतर या कथेत उलगडत जातं. सईचे बालपण, तिची शाळा, पाटी, पुस्तक, वाहणारी झुळझुळ नदी, पानफुले, पाखरे हे सारे ओघाने आलेच.
वडिलांनी सईला ‘दिल्या घरी सुखी रहा’ हा दिलेला कानमंत्र म्हणजे अख्या बापवर्गाच्या मानसिकतेचे उदाहरण आहे.
शेवटी सईचे बाबा वसंता, यांचा धगधगत्या ज्वालासह धरतीवरचा प्रवास संपल्याने ती आता पोरकी होते. बाबांचे धरलेले बोट सुटल्याने,आयुष्याची वाट दाखवायला तिला हक्काचे कोणी नसल्याने ती एकाकी झाल्याने वाचकाचे डोळे वाचता वाचता पाणावल्याशिवाय राहत नाही. मात्र आयुष्य थांबत नाही हेच खरे, कारण अजूनही सईची झेप उंचावर जायची बाकी आहे. वडील वसंताचे स्वप्न ‘सई, खूप मोठी हो, नावारूपाला ये.’ असे होते आणि तिचे स्वप्न तिला पूर्ण करायाचे आहे. हा प्रवास न संपणारा, शेवटच्या श्वासापर्यंत नेणारा आहे.आयुष्य न संपणारा अखंड प्रवास आहे. हे वाचकाला उमगत जाते.
या कादंबरीची भाषा तशी सर्वसामान्य कुटुंबात बोलली जाणारी, वाचकाला सहज समजणारी आहे, सर्वसामान्य माणसाचे भावविश्व या कथेत गुंफले असून वडिलांना खूप जीव लावणाऱ्या नायिकेची ही गोष्ट वाचकांना खिळवून ठेवणारी आहे.
या कादंबरीस अरविंद शेलार यांनी रेखाटलेले समर्पक आणि बोलके मुखपृष्ठ वाचकाला पाने पालटून वाचायला प्रेरित करते. तसेच डॉ. राजेंद्र मलोसे यांची समर्पक प्रस्थावना व पाठराखणीमुळे कादंबरीचा एकूण आवाका सहज लक्षात येतो. तसेच आयुष्यात प्रत्येक प्रयत्नात पहिलं पाऊल टाकताना शब्द उर्जेतून पाठींबा देत सत्याच्याच मार्गाने चालायला शिकवले, यश अपयश पचवत ध्येय, चिकाटी, मेहनत यांची साथ करत स्वप्न पाहायला शिकवले... असे त्यांचे वडील कै. आनंदा बाबुराव बच्छाव यांना ही साहित्यकृती लेखिकेने अर्पण केली आहे.
सौ. सविता दरेकर ह्या कवयित्री, लेखिका म्हणून प्रसिद्ध असून छंद, वाचन, लेखन, निसर्ग पर्यटन यात रमणारं हे व्यक्तिमत्व आहे. मालेगाव येथून प्रकशित होणाऱ्या नगारा साप्ताहिकात वर्षभर लिहलेल्या लेखमालेचे फलित म्हणजेच काळजातील लामणदिवा होय. तसेच ‘माझ्या शब्दांच्या गर्भात’ हा त्यांचा काव्यसंग्रहही प्रकाशित झाला असून आजवर त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.
पुस्तकाची मांडणी व बांधणी उत्तम आहे. या कादंबरीचे मुखपृष्ठ अतिशय समर्पक असून चित्रकाराने रेखाटलेला, उगवत्या सूर्याकडे मार्गक्रमण करणारा बाप म्हणजे आपल्या पाल्यासाठी मार्ग दाखविणारा दीपस्तंभ असतो. असे म्हटलं जातं की, जोवर बाप आहे तोवर माहेर आहे. आणि ते खरंही आहे. बालपणापासून बोट धरून शिकविणारा बाप मुलांसाठी प्रिय असणे, यात नवल ते काय?
लेखिका ह्या उत्तम कवयित्री असून या कादंबरीत असलेल्या कविता या कादंबरीचे विशेष आकर्षण म्हणावे लागेल. एकूण तेहतीस प्रकरणांचा यात समावेश असून ‘काळजातला लामणदिवा ‘ ही कादंबरी अतिशय वाचनीय असून वाचकांनी आवर्जून वाचावी, असे मला वाटते.
हे सर्व लिहिण्याचे कारण म्हणजे मंगळवार, दि. १ ऑक्टोबर,, २०२४ रोजी हुतात्मा स्मारक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, नाशिक येथे गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष माणूसमित्र सुरेश पवार यांनी आयोजित केलेल्या ‘पुस्तकावर बोलू काही...’ या सदरात लेखिका सविता दरेकर यांच्या ‘काळजातला लामणदिवा’ या कादंबरीवर आधारित ऐसपैस गप्पांच्या कार्यक्रमाची मेजवानी नाशिकमधील रसिकवाचक तसेच साहित्यिकांसाठी उपलब्ध झाली आहे. दि. ५ मार्च, २०२४ ते दि.२८ फेब्रुवारी, २०२५ दरम्यान दर मंगळवारी आणि शुक्रवारी हा उपक्रम संपन्न होणार आहे. अशा प्रकारचा बहुधा हा साहित्य क्षेत्रातील पहिलाच अभिनव उपक्रम असावा. यामध्ये नवोदित तसेच प्रस्थापित साहित्यिकांना व्यक्त होण्यासाठी हक्काचं व्यासपीठ उपलब्ध झालं आहे.
याहीपुढे, त्यांची लेखणी अशीच तळपत रहावी. त्यांच्या हातून सर्व प्रकारचे साहित्यिक लिखाण व्हावे, हीच सदिच्छा! सन्माननीय सौ. सविता दरेकर मॅडम यांना गिरणा गौरव प्रतिष्ठान आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ या सदरात संपन्न होणाऱ्या व्याख्यानास आभाळभर शुभेच्छा!
पुस्तकाचे नाव :- काळजातला लामणदिवा
ISBN :- 978-93-9178२2-97-9
कवी :- लेखिका सौ. सविता दरेकर, संवाद क्र. ८९५६१८९१९५.
प्रकाशक :- परिस पब्लिकेशन, पुणे
प्रस्तावना :- डॉ. राजेंद्र मलोसे
स्वागत मूल्य :- ₹ ३००/- मात्र (सवलतमूल्य, टपाल खर्च आणि अधिक माहितीसाठी कृपया, संबंधितांशी संपर्क साधावा.)
सोमनाथ आवडाजी पगार (सॅप)
(महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेत प्रकाशनार्थ अनुदान प्राप्त साहित्यिक)
संपर्क क्र.:- ९२७३३५७१५९, Email:- somnathpagar@yahoo.co.in
गीतकार/ कवी, कथा, पटकथा, संवाद लेखक, युसमीक्षक, ट्युबर, ब्लॉगर, टेक्नोक्रॅट,, इंग्लिश लँग्वेज ट्रेनर, ऑनलाईन डॉक्युमेंट्स ऍडव्हायझर.
सोमवार, २३ सप्टेंबर, २०२४
जगण्याची कविता- चिंतनशील आशावादाची कविता
जगण्याची कविता- चिंतनशील आशावादाची कविता
सोमनाथ पगार
संपर्क क्र.:- ९२७३३५७१५९.
कविता असते ‘अनुभवाची शिदोरी, करपलेली भाकरी, परिस्थितीची चाकरी, सुखस्वप्नांची टोकरी’ असे मी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अनुदान प्राप्त तसेच अनघा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या माझ्या ‘वेदनेचे काटे’ या कवितासंग्रहाच्या प्रस्तावनेत नमूद केले असल्याचे शैक्षणिक क्षेत्रातील मोठं नाव शंकरसुत उर्फ प्रा. डॉ यशवंत पाटील सरांच्या ‘जगण्याची कविता’ हा पुणे येथील संवेदना प्रकाशनाने प्रकाशित केलेला कवितासंग्रह हाती पडताच मला आठवले.
असे म्हटले जाते कि, साहित्य हा समाजाचा आरसा असतो. त्यातल्या त्यात कविता हे कमी शब्दात जास्त आशय व्यक्त करण्याचे भावनाशील साधन असून इथे प्रत्येकाला व्यक्त व्हावे असे वाटत असते म्हणूनच तर माणसा-माणसांतील संवाद हा नियमितपणे सुरु असतो. व्यक्त होण्याची माध्यमे वेगळी असू शकतात. एखादा चित्रकार हा आपल्या चित्रांच्या माध्यामतून आपले विचार मांडतो तर साहित्यिक हा शब्दरुपी कुंचल्याद्वारे आपले भावनाविश्व मांडत असतो. कविता ही खळखळून वाहणाऱ्या नदीसमान असते असे म्हटले तरी अतिशयोक्ती ठरणार नाही कारण ज्याप्रमाणे नदी आपल्या आजूबाजूचा परिसर समृद्ध करत आपले मार्गक्रमण करत असते त्याचप्रमाणे कविता ही जनमानसाला आनंद देत समृद्ध करण्याचे काम अव्याहतपणे करत असते.
कविता म्हणजे अभिव्यक्ती... जमेल तसे लिहणे महत्वाचे असून कविता कशी लिहावी, याबाबत कवीला स्वतंत्र्य असते. मुक्तपणे व्यक्त होणे महत्वाचे असते, हेच खरे, कारण कविता ही कवीच्या अंतर्मनातून आलेली साद असते. प्रा. डॉ. यशवंत पाटील सर हे साहित्य तसेच शैक्षणिक क्षेत्रातील एक मोठे नाव असून असंख्य वाचक तसेच विद्यार्थी वर्गासाठी ते मार्गदर्शक तथा श्रद्धास्थानी आहे. सुरवातीलाच नमूद केल्याप्रमाणे कविता अनुभवांची शिदोरी असते. त्यामुळे कविता ठरवून लिहता येत नाही. तशा कवितेत भावनिक ओढ न जाणवता कृतीमता जाणवते. हे या ठिकाणी या कविता वाचून मला प्रकर्षाने नमूद करावेसे वाटले कारण या कवितासंग्रहातील कविता ह्या समृद्ध व चिंतनशील आशावादाची कविता आहेत. ‘जगण्याची कविता’ या शीर्षक कवितेतील काही ओळी पाहू,
विवेकाने जगायचं की अविवेकाने
हे ज्याचे त्याने विचारपूर्वक ठरवावे ...
जगणं एक नव्हे बहु सुरमयी कविता व्हावं
आशय, अर्थ. ताल, सुराने संत्पुत असावे. (पृष्ठ क्र.२०,२१-जगण्याची कविता)
योग्य वेळी शहाणपण येणे गरजेचे असून उशिरा आलेले शहाणपण काही कामाचे नसते. का व कशासाठी जगायचे? एकसुरी, रडत, आदळत इतरांना दु:खी करत यातना देत जगण्यापेक्षा फुलासम होऊन भवताल सुगंधी करण्यासाठी संयमी, विवेकी, आस्वादक, षढरिपू विरहीत न खचता, न थकता मिळालेले आयुष्य हे प्रसाद समजून जीवन सार्थकी लावण्याचा विवेकी प्रयत्न करावा. हे माणसाने वेळीच ठरवले पाहिजे. असा आशावाद या रचनेतून कवीने वाचकांना दिला आहे.
अध्यात्म, चिंतन, निसर्ग, शेती या अशा विविध आशय-विषय असलेल्या कविता या कविता संग्रहात वाचायला मिळतात. एकूणच या कविता अनुभवातून समृद्ध झालेल्या चिंतनशील आहेत. सुखमय जीवनासाठी आशेचे किरण शोधण्याचा प्रयत्न झाला असल्याचे या कवितासंग्रहातून जाणवल्याशिवाय राहत नाही. उच्च विद्या विभूषित, एक विद्यार्थी प्रिय शिक्षक, बहुश्रुत वक्ता याचबरोबर अध्यात्माची जाण असणारे हे व्यक्तिमत्व आहे. माणसाचे जसे आचार विचार असतात तसेच भावविश्व त्या व्यक्तीच्या लेखणीतून झिरपते, हेच खरे. इंद्रधनू या कवितेतील खालील ओळी वानगीदाखल पाहू,
हेक्केखोर हट्टी विचारसरणी नसावी
आचार-विचारात ‘विनयशीलता’ असावी (पृष्ठ क्र.८- इंद्रधनू)
किंवा
क्रोधाने दुर्योधन संपला
संयमाने अर्जुन जिंकला
राग, संयमाने रामायण-महाभारत (पृष्ठ क्र.३८- राग आल्यावर)
समाजात बऱ्याच वाईट घटना केवळ राग अनावर झाल्याने, संयम न राहिल्याने घडल्या असल्याचे आपण पाहतो. थोडं थांबून नमतं घेतलं तर सर्व काही व्यवस्थित होऊ शकते. रागाचे मूळ हे अविचार असल्याचे कवीचे योग्य असे आकलन आहे. आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली कि जगणे असह्य होते. आलेले अनुभव व त्यातूने आलेले शहाणपण, आजूबाजूला घडणाऱ्या घटना यातून व्यक्ती घडत जाते. मनातील प्रश्नांची उत्तरे कवी शोधायचा प्रयत्न करत असतो. त्यासाठी कविता मदतीला धावून येतात, परिणामी जीवन सुकर व्हायला मदतच होते.
सर एक विद्यार्थी प्रिय शिक्षक असल्याने आजचा विद्यार्थी पाहून ते व्यथित होतात. आजच्या या आधुनिक विज्ञान युगातसुद्धा अंधश्रद्धा, कर्मकांड पाहू कवी अस्वस्थ झाल्याशिवाय राहत नाही. अंधश्रद्धा या कवितेतील ओळी हेच तर अधोरेखित करतात,
मठ, मंदिरांची प्रचंड संख्या
शुभ-अशुभाचा हलकल्लोळ
विज्ञान- संशोधन आहे मर्यादित
मुहर्त, विज्ञानाचा काय ताळमेळ ? (पृष्ठ क्र.४२- अंधश्रद्धा)
एकविसाव्या शतकातही जन्मलेला बालकाला टिके लावणे, लिंबू-मिरची बांधणे, बुवा-बाबांना भजने, पूजने, पत्रिका-कुंडल्या पाहणे, लग्न जमविणे. हे सर्व आजच्या आधुनिक विज्ञानवादी युगातही सर्हास चालू असल्याने अंधश्रद्धेच्या आहारी गेलेला समाज पाहून कवीला वाईट वाटते. शकडो पुस्तके वाचूनही जे समजणार नाही ते या बोटावर मोजण्या इतपत ओळी वाचून मनाला भावून जाते. किती गहन अर्थ या ओळींमध्ये दडलेला आहे ?
सत्यम, शिवम, सुंदरम या तत्वाशी बांधिलकीचा जागर या कविता वाचतांना आढळतो. त्यामुळेच जे-जे चांगले आहे ते देण्याचा कवीचा प्रामाणिक प्रयत्न आहे. तथापि, आजकाल खेड्यांतून शहरात युवकांचा वाहणारा लोंढा त्यामुळे अक्राळविक्राळ वाढलेली शहरे, याचबरोबर औद्योगिकीकरणामुळे वाढते जल, वायू, ध्वनी प्रदूषण पाहून कवी आपल्या भावनांना शब्दांच्या माध्यमातून वाट मोकळी करून देत असल्याचे लक्षात येते,
प्रदूषित श्वास कोंडलेली नगरे
अक्राळविक्राळ पसरलेली उपनगरे
वाढते तापमान, नासलेल्या नद्या
दाटीवाटीत उभी घरेदारे (पृष्ठ क्र.९०- दुष्परिणाम)
कोंडवाड्यात जनावरे असतात त्याप्रमाणे दाटीवाटीने जीव मुठीत धरून राहणारी माणसे, दारासमोर वाहणारी गटारे, या जीवघेण्या घाणीच्या विळख्यात आयुष्य घालविणारे नागरिक पाहिल्यावर हा सारा दुष्परिणाम शहरीकरणाचा असून ‘खेड्याकडे चला’ असा मूलमंत्र कवीने वाचकांना दिला आहे.
‘जगण्याची कविता’ असे आगळेवेगळे नाव या कवितासंग्रहाला देण्यात आले आहे. कविता लिहण्याची कला कवीला निसर्गदत्त लाभलेली असते. आपल्या कल्पना शक्तीच्या जोरावर कवी आपल्याला आलेले अनुभव उत्कठपणे मांडत आपल्या मनातील भावविश्व निर्माण करत असतो. पुणे येथील संवेदना प्रकाशनाने हा संग्रह प्रकाशित केला असून सामान्य माणसाला वाचता- वाचता विचार करायला प्रवृत्त करणाऱ्या या कवितासंग्रहातील एकूण १०७ आशयगर्भ कविता वाचकाच्या मनाला आनंदी करतात. ‘जगण्याची कविता’ या कवितासंग्रहात अतिशय वाचनीय, आशयगर्भ कविता असल्याने तसेच वैचारिक अधिष्ठान असलेल्या या कविता वाचकांना अंतर्मुख करायला निश्चितच प्रेरित करतात. त्यामुळे, हा संग्रह वाचकांनी वाचावा, असे मला वाटते.
कविता तसा सर्व प्रकारच्या वाचकांना आवडणारा साहित्य प्रकार असून रोजच्या भाषेपेक्षा वेगळी भाषा कवितेची असते. डॉ. यशवंत पाटील सर हे शैक्षणिक तसेच साहित्यिक क्षेत्रातलं परिचित असलेलं नाव असून आजवर त्यांनी शैक्षणिक, अध्यात्मिक, वैचारिक, प्रौढ, ललित तसेच कविता अशा विविध साहित्य प्रकारात अनेक पुस्तके लिहलेली आहेत. ‘जगण्याची कविता’ हा त्यांचा दुसरा कवितासंग्रह असून यापूर्वी ‘कवितेच्या पारंब्या’ हा त्यांचा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झालेला आहे.
या कवितासंग्रहास चित्रकार सतीश भावसार यांनी रेखाटलेले उत्कृष्ट मुखपृष्ठ वाचकाला पाने पालटून कविता वाचायला प्रेरित करते. तसेच ज्येष्ठ साहित्यिक सतीश सोळांकूरकर यांची समर्पक प्रस्थावना, त्याचप्रमाणे आकाशवाणीमुळे सर्वांच्याच परिचयाचे असे ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कोळगावकर यांची पाठराखण यामुळे या कवितासंग्रहाचा एकूण आवाका सहज लक्षात येतो. ‘लोकशाही संविधानावर, कालसुसंगत जगण्यावर, चिरंतन मानवी मुल्यांवर, निसर्गावर, सुसंस्कारावर, आणि मराठी साहित्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या सर्व रसिक, वाचक, आस्वादकांस सदर कवितासंग्रह त्यांनी सविनय अर्पण केलेला आहे.’
याहीपुढे, डॉ. यशवंत पाटील सरांची लेखणी अशीच तळपत रहावी. त्यांच्या हातून सर्व प्रकारचे साहित्यिक लिखाण होत राहावे, हीच सदिच्छा!
पुस्तकाचे नाव :- जगण्याची कविता
ISBN :- 978-81-19737-30-7
कवी :- शंकरसुत उर्फ प्रा. डॉ. यशवंत पाटील , संवाद क्र. ९८९०६१५६४९
प्रकाशक :- संवेदना प्रकाशन, पुणे
प्रस्तावना :- सतीश सोळांकूरकर
पाठराखण :- उत्तम कोळगावकर
स्वागत मूल्य :- ₹ २५०/- मात्र (सवलतमूल्य, टपाल खर्च आणि अधिक माहितीसाठी कृपया, संबंधितांशी संपर्क साधावा.)
सोमनाथ आवडाजी पगार (सॅप)
(महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेत प्रकाशनार्थ अनुदान प्राप्त साहित्यिक)
संपर्क क्र.:- ९२७३३५७१५९, Email:- somnathpagar@yahoo.co.in
गीतकार/ कवी, कथा, पटकथा, संवाद लेखक, समीक्षक, ट्युबर, ब्लॉगर, टेक्नोक्रॅट,, इंग्लिश लँग्वेज ट्रेनर, ऑनलाईन डॉक्युमेंट्स ऍडव्हायझर.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)