Its all about my Compositions/ Creation i.e. Poems, Songs, Stories etc.
शुक्रवार, २७ डिसेंबर, २०२४
माझा दुसरा कवितासंग्रह - 'कारुण्यबोध' आपल्या भेटीला...
माझा दुसरा कवितासंग्रह - 'कारुण्यबोध' आपल्या भेटीला...
१) वैश्विक महामारी कोरोना काळातील भयावह परिस्थितीचा साहित्यिक दस्तऐवज ठरावा असा कवितासंग्रह...
२) या संग्रहात नांदी, वृत्तबद्ध कविता (पादाकूलक वृत्त, अक्रूर वृत्त), मुक्तछंद, अभंग (मोठा व लहान), अष्टाक्षरी, षडाक्षरी, समाक्षरी, गीत (जुन्या लोकप्रिय गीताच्या चालीवर लिहलेल्या गीतासह) तसेच गझल अशा विविध प्रकारच्या रचनांचा समावेश
असून
प्रत्येक रचनेच्या शीर्षकाखाली रचनेच प्रकार, वृत्त, मात्रा व लगावली नमूद केलेले आहेत.
३) नवीन किंवा प्रथमच कवितासंग्रह, कथासंग्रह वगैरे प्रकाशित करू इच्छिणाऱ्या कवी/ लेखकांसाठी मार्गदर्शक अशी कवितांची तसेच पुस्तकाची मांडणी केली असल्याने हा संग्रह आवर्जून संग्रही ठेवावा असा आहे.
४) कोरोना काळ अनुभवलेल्या प्रत्येकाच्याच तसेच या महामारीमुळे हकनाक बळी ठरलेल्या आपल्या प्रिय व्यक्तीच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा संग्रह आपल्या संग्रही असायलाच हवा.
तसेच
आपल्या प्रिय व्यक्तीच्या स्मृतिदिनानिमित्त किंवा स्मृतिप्रीत्यर्थ या संग्रहाच्या प्रती आपले आप्तेष्ट, सगेसोयरे, मित्रमंडळी यांना वाटप करू शकतात.
५) ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक डॉ. अेकनाथ पगार सरांची 'कोरोना काळाचा कारुण्यबोध' अशी समर्पक प्रस्तावना/ पाठराखण या संग्रहाला लाभली आहे.
६) जेष्ठ साहित्यिक अर्जुन वेलजाळी सर, कवी, व्याख्याते, प्राचार्य राजेश्वर शेळके सर, ज्येष्ठ साहित्यिक सोमनाथ साखरे सर, ज्येष्ठ साहित्यिक सुनिल गायकवाड सर या मान्यवरांचा मुद्रित शोधनासाठी मोलाचा हातभार, ही या संग्रहाची जमेची बाजू.
७) प्रसिद्ध चित्रकार संजय पाडवी सरांचे उत्कृष्ट व विषयाला अनुरूप असे अप्रतिम मुखपृष्ठ.
८) २५ वर्षाची परंपरा असलेल्या नामांकित पायगुण प्रकाशनाची दर्जेदार निर्मिती.
९) महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेत प्रकाशनार्थ अनुदान प्राप्त होऊन यापूर्वी मी लिहलेल्या माझ्या इतर कवितांचा माझा 'वेदनेचे काटे' हा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला असल्याने त्यानंतर लिहलेल्या व आता प्रकाशित होत असलेल्या 'कारुण्यबोध' या कवितासंग्रहात चांगल्या आशयपूर्ण तसेच वाचनीय कविता आहेत, याची हमी.
१०) 'कारुण्यबोध' या कवितासंग्रहाची मूळ किंमत ₹. २५१/- असून सवलत मूल्य ₹. १५१/- मध्ये टपाल खर्चासह हा संग्रह घरपोहच पाठवला जाईल.
तसेच
'वेदनेचे काटे' या कवितासंग्रहाची किंमत रोखीने फक्त ₹ ४८/- असून हा संग्रह टपाल खर्चासह फक्त ₹. ९१/- मध्ये घरपोच पाठवला जाईल.
तथापि,
दोन्ही संग्रह हवे असल्यास फक्त ₹. २०१/- मध्ये रोखीने किंवा टपाल खर्चासह घरपोहच पाठविले जातील.
तरी कृपया,
🍃 *9226196298* या नंबर वर *फोन पे* ने किंवा 💳 *9226196298@kotak* या *UPI Id* वर रक्कम send करून स्क्रीनशॉट व पत्ता पाठवावा, ही विनंती💐🙏💐
आपला नम्र
*सोमनाथ पगार* (सॅप)
*(महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेत प्रकाशनार्थ अनुदान प्राप्त साहित्यिक)*
सुसंवाद.:- ९२७३३५७१५९,
Email:- sahityatirthasp@gmail.com
*गीतकार/ कवी, कथा, पटकथा, संवाद लेखक, युट्युबर, ब्लॉगर, टेक्नोक्रॅट, ऑनलाईन डॉक्युमेंट्स ऍडव्हायझर, इंग्लिश लँग्वेज ट्रेनर.*
सभासद:
१.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
२.स्क्रीन राइटर्स असोसियशन
३.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
४.मराठी साहित्य परिषद
५.विश्व मराठी परिषद
*मार्गदर्शक साहित्यिक/ वाचक/ आप्तेष्ट/ शुभचिंतक/ मित्रांचे मनःपुर्वक आभार* 💐🙏💐
मंगळवार, २४ डिसेंबर, २०२४
शाब्बास गुरुजी - सरकारी शाळांचे श्रेष्ठत्व अधोरेखित करणारा लेखाजोखा
ll साहित्य तीर्थ ll
पुस्तक परिचय
शाब्बास गुरुजी – सरकारी शाळांचे श्रेष्ठत्व अधोरेखित करणारा लेखाजोखा
*आस्वादक:- सोमनाथ पगार,*
संपर्क क्र.:- ९२७३३५७१५९.
बालकांच्या बालमनावर आईवडिलांनतर खरे संस्कार आपल्या शिक्षकांकडून शाळेत पहिले पाउल टाकल्यावर होतात. आईवडील चिखलाला आकार द्यावा तसे आपल्या मुलांना घडवतात तर शिक्षक आपल्या कौशल्याच्या बळावर ज्ञानदानाच्या माध्यमातून त्यांच्यात जीव भरतात. खरे तर शाळेत प्रवेश झाल्यावर विद्यार्थ्याला/ बालकाला लाभणारे शिक्षक यावर त्याच्या भावी आयुष्याची दिशा ठरावी इतके महत्व शिक्षकांचे विद्यार्थ्यांच्या जीवनात असते. एखादी इमारत बांधतांना जर इमारतीचा पाया भक्कम असेल तरच त्यावर उभी असणारी इमारत पुढे वादळवाऱ्यात भक्कमपणे सर्व संकटांना समर्थपणे तोंड देत उभी राहू शकते, तीच गत विद्यार्थ्यांनी असते. ज्ञानदान व संस्कार करून विद्यार्थ्यांच्या जीवनाचा भक्कम पाया केवळ शिक्षकच उभारतात, यात तिळमात्र शंका नाही. त्यामुळेच शिक्षक हा चांगल्या शिक्षण व्यवस्थेचा पाया असतो.
आपल्या विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी शिक्षक सतत झटत असतात, ज्ञानार्जन प्रभावी होण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करत असतात. काहीची दाखल घेतली जाते तर काहींचे कार्य अंधारातच राहत असल्याने सर्वसामन्यांना त्याची पुसटशी कल्पनाही नसते. अशाच काही प्रयोगशील तसेच आपल्या विद्यार्थ्यांना घडविण्याचा वसा घेतलेल्या शिक्षकांच्या कार्याचा अर्थात ‘सरकारी शाळांचे श्रेष्ठत्व अधोरेखित करणारा लेखाजोखा’ ‘शाब्बास गुरुजी’ या प्रेरक साहित्यिक लिखाणातून विद्यार्थीप्रिय तसेच उपक्रमशील शिक्षक साहित्यिक राजेंद्र केवळबाई प्रल्हाद दिघे यांनी मांडला आहे.
चांगल्या शिक्षकांमुळेच शास्त्रज्ञ, राजकारणी, अभियंता, डॉक्टर, लेखक किंवा कलाकार घडतात. जेव्हा आपण शिकण्याच्या प्रक्रियेत शिक्षकाच्या भूमिकेबद्दल बोलतो ; हे केवळ शैक्षणिक किंवा खेळातच नाही तर जीवनाच्या शाळेतही आहे. शिक्षक हा केवळ धडे आणि विषय शिकवणारा नसतो. शिक्षक विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा शोध घेण्यासाठी आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करतात. शिक्षक ही अशी व्यक्ती असते जी विद्यार्थ्यांना ज्ञान, संस्कार देवून विद्यार्थ्यांना नैतिक व चारित्र्यसंपन्न बनवून वडीलधारी मंडळी, आपला देश तसेच कला, खेळ वगैरेंप्रती श्रद्धा निर्माण करून जगण्याची पद्धत शिकवते. म्हणूनच शिक्षक हा विद्यार्थ्याचा एक मार्गदर्शक, तत्त्वज्ञ आणि मित्र असतो.
शिक्षणाची दिशा आणि दशा बदलणारे सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, सर्वपल्ली राधाकृष्णन, साने गुरुजी, हेरंब कुलकर्णी, वारे गुरुजी, रणजीतसिंह डिसले अशा अनेक विद्यार्थीप्रिय शिक्षकांचा आपल्या महाराष्ट्राला वारसा लाभला आहे.
सुजाण नागरिक घडवण्याचे परम कर्तव्य बजावणारे प्रयोगशील शिक्षक, शिक्षिकांच्या कार्याची तसेच नवसर्जनाच्या वाटेवर आलेल्या शाळांची माहिती समाजाला ’दैनिक सकाळ’ मधून ‘शाब्बास गुरुजी’ या सदरात लेखक राजेंद्र दिघे यांनी करून दिली आहे. शिक्षण क्षेत्राचे महत्व विशद करणाऱ्या या कर्तबगार शिक्षकांच्या व त्यांच्या आभाळाएवढ्या कार्याची ओळख या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध झालेली आहे.
घटणारी विद्यार्थी संख्या, इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे पालकांचा वाढलेला कल, अशी बदलती परिस्थिती, काही शिक्षकांना ‘शिक्षण सेवक’ या पदावर करावी लागणारी दमछाक अशा अनेक आवाहनांमुळे खरं तर शासकीय मराठी माध्यमांच्या शाळांची परिस्थिती चिंतनीय आहे. अशा आवाहनांना तोंड देत शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागते.
पहिल्याच लेखात वर्षभर चालणाऱ्या जिल्हा परिषेदेच्या ‘हिवाळी’ येथील शाळेतील अवलिया असे सर्जनशील शिक्षक केशव गावित भेटतात. गावाशी एकरूप होत ‘हेच माझे घर, हीच माझी शाळा’ म्हणत टेक्नोसॅव्ही होत नवोपक्रमशीलतेचा ध्यास घेवून अतिदुर्गम आदिवाशी भागात वाट नसलेल्या गावात शिक्षणाची गंगा प्रवाही करून विद्यार्थ्यांचे जगणं समृद्ध करत आहे. त्यांच्या अद्भुत कामगिरीमुळे ३६५ दिवस सतत १२ तास ही शाळा सुरु असते. इतकेच नव्हे तर विद्यार्थ्यांचा सक्रीय सहभाग तसेच ‘गिव्ह’चं पालकत्व हेसुद्धा औत्सुक्याचे विषय आहेत.
‘हिरावाडी’ येथील पाचटाच्या कोपीतील शाळा सलग तीन वर्षांपासून ‘अ’ श्रेणीत तर येतेच त्याचबरोबर जिल्हा गुणवत्ता समृद्धी चाचणीत ‘फाईव्ह स्टार’ मानंकात पटकावते. अशा शाळेतील अडाणी पालकांच्या लेकरांना पंख देणारे शिक्षक शशिकांत शिंदे तर फारच प्रयोगशील... गावात जायला कच्चा व चिखल तुडवावा लागणारा रस्ता, आदिवाशी, सालगडी, अडाणी शेतमजुरांची लेकरं कोटी, अब्ज, खर्व, निखर्व अशा संख्या सहज वाचतात. शिंदे गुरुजीमुळे ही शाळा आज सुसज्ज इमारत, सुंदर बगीचा, आणि सुंदर फुलझाडांसह समृद्ध वनराईने नटली आहे.
स्पर्धेच्या युगात झोपडपट्टीतील विद्यार्थीसुद्धा सरस होऊन जीवनात यशस्वी होण्यासाठी सुसंस्कृत व्हावा म्हणून नाविन्य व लोकसहभागातून आपल्या शाळेचा कायापालट घडवून आणणाऱ्या, ज्यांच्या उपक्रमशीलतेची दखल केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने घेतली आहे. विद्यार्थी गरीब असले तरी ज्ञानाने श्रीमंत करण्याचे ध्येय बाळगणाऱ्या शिक्षिका कुंदा बच्छाव यांची प्रयोगशीलता तसेच नवोप्रक्रमांमुळे मनपाच्या ‘आनंदवल्ली’ शाळेने कात टाकली आहे.
देवळा तालुक्यातील ‘खामखेडा’ गावच्या ‘फागंदर’ आदिवाशी वस्तीवर शिक्षणाचे नंदनवन फुलवणारे उपक्रमशील शिक्षक खंडू मोरे यांचे कार्य तर अचंबित करणारे आहे. निमशिक्षक असलेल्या गुरुजींनी पदरमोड करत गोरगरीब वंचित आदिवासींची लेकरं शिक्षणाच्या प्रवाहात आणली. आदिवाशी वस्तीतील विद्यार्थ्यांना त्यांनी चक्क विमानातून मुंबईची सफर घडवून आणली. आज जरी चांगल्या इमारतीत शिक्षणाच्या वाटेवरील डीजीटल अशी आनंदवन म्हणून ही शाळा भरत असली तरी सुरवातीला पाचटाच्या झोपडीतच नव्हे तर झाडाखालीही त्यांनी प्रसंगी शाळा भरवली.
जागतिक महामारी कोरोना काळात ऑनलाईन, ऑफलाईन शक्य त्या पद्धतीने शिक्षणाचा ज्ञानयज्ञ सुरु ठेवला गेला तसेच ‘घर तेथे शाळा’ उपक्रमामुळे सुपरिचित झालेली ‘भवानीनगर’ येथील शाळा आयएसओ मानांकन मिळवत जिल्ह्यात द्वितीय वस्ती शाळा म्हणून उपक्रमशील दिव्यांग शिक्षक संदीप महाले यांच्या धडपडीमुळे नावारूपाला आली आहे.
चांदवडमधील दीडशे वर्षांपूर्वी १८४५ मध्ये अहिल्याबाई होळकर यांच्या वाड्यात म्हणजेच रंगमहालात भरणारी आजची दगडी शाळा जी एकेकाळी प्रतिष्टा असणारी शाळा होती, आज काळाच्या ओघात ‘जुने लोप पावावे’ तशी मोडकळीस आली होती. त्याच शाळेचे माजी विद्यार्थी असलेल्या संदीप महाले गुर्जींनी लोकसहभागातून तसेच माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने त्या शाळेला गतवैभव प्राप्त करून दिले.
गुजरात राज्याच्या सीमेवर निसर्गरम्य परिसरात तीनशे लोकवस्ती असलेल्या ‘मांगलीदर’ या गावात ग्रामपंचायत, आई प्रतिष्टान, मालेगाव त्याचबरोबर राजधानी गारमेंट्स यांच्या सहकार्यामुळे तसेच कृतीशील शिक्षक राजू देवरे यांचे प्रयत्न फळाला आल्याने अवघी चार पटसंख्या असल्याने बंद पडणार असणारी बिनभिंतीची मांगलीदर शाळा बदलली आहे.
नाविन्यपूर्ण उपक्रमांतून शिकणं सुलभ करणारे प्रयोगशील शिक्षक प्रवीण शिंदे यांची गाव अन् शाळेची घट्ट नाळ जपणारी ‘दापुरे शाळा’, गुणवत्तेसह इंग्रजीत अव्वल ठरणारी, तंत्रस्नेही शिक्षिका लीनाली फटकाळे यांची ‘शिवाजीनगर’ येथील आदर्शवत शाळा, टी.व्ही. पॅटर्नमुळे राज्यात प्रसिद्ध, अतिदुर्गम भागातील ‘धामकीवाडी’ येथील ज्ञानधारा रुजविणारे शिक्षक प्रमोद परदेशी यांची शाळा, आदर्श शाळेचे स्वप्न साकारणारे शिक्षक काशिनाथ सोनवणे यांची आदिवासी समाज मनावर ठसा बिंबवणारी’शेपुपाडा’ शाळा, उपक्रमशील शिक्षक निलेश भामरेंकडून तंत्रज्ञानाला लोकसहभागाची जोड मिळवत अवघ्या वर्षभरात कायापालट झालेली ‘इन्शी’ शाळा, उपक्रमशील शिक्षक निवृत्ती आहेर यांच्या जिद्दीने शाळेचा चेहरा मोहरा बदललेली विभागातील एकमेव ओजस’ अशी ‘भोयेगाव’ची आंतरराष्ट्रीय शाळा, उपक्रमशील शिक्षक विलास सोनवने यांच्या डिजिटल फ्लेक्सने चर्चेत असलेली ‘जनकाकर’ वस्तीशाळा, प्रयोगशील शिक्षक गोकुळ वाघ यांच्या उपयुक्त उपाययोजनांमुळे शिक्षणवारीत राज्यस्तरीय यश मिळवणारी ‘अंगणगाव’ शाळा, गणिताचे पर्यावरणप्रेमी शिक्षक योगेश महाजन यांचे कोंदण लाभलेली भौतिक सुविधांयुक्त ‘सावरगाव’ येथील कृतीशील शाळा, तंत्रस्नेही शिक्षिका माधुरी पवार यांची इंग्लिश गार्डनसोबत सफर घडवणारी ‘अजमिर सौंदाणे’ची शाळा, स्मार्ट टीचर राम तळपे यांच्या उपक्रमांचे कोंदण लाभलेली शिक्षकांच्या एकजुटीमुळे अग्रेसर ठरलेली ‘पाथर्डी’ येथील मुलींची शाळा, प्रयोगशील शिक्षक प्रकाश परदेशी यांची किमया असणारी दुर्गम ‘हरणशिकार’ शाळा, शिक्षक पंकज सोनवणे यांच्या उपक्रमशीलतेने बदललेली अवघड वाट असूनही गुणवत्तेच्या पटलावर असलेली ‘कुसुंबीनाला’ येथील शाळा, शिक्षिका नयना वाघ यांच्या पूरक प्रयत्नामुळे त्यांच्या उपक्रमांतून सर्वांगीण विकास साधणारी ‘खर्डे’ शाळा, संवेदनशील शिक्षिका आशा सोनवणे यांची प्रेरकता तसेच उपक्रमांचे कोंदण असलेली ‘चंदनपुरी’ शाळा तसेच,
प्रयोगशील शिक्षक गोकुळ निकम यांच्यामुळे गुणवत्तेचा ध्यास घेतलेली ‘हाटकरवस्ती’ शाळा, हुरहुन्नरी अभिनयशील शिक्षक देवेंद्र वाघ यांची शिक्षणाची गंगा घरोघरी नेणारी ‘देवीची माथा’ शाळा, तंत्रस्नेही शिक्षक जयदीप गायकवाड यांची बालमित्रच्या माध्यमातून गुणवत्तेला बळ देणारी नवोपक्रमशील ‘वाघाड’ शाळा, प्रयोगशील विज्ञान शिक्षक चंद्रशेखर दंडगव्हाळ यांची विज्ञान उपक्रमांद्वारे बलशाही भारताचे स्वप्न बघणारी ‘पिंपळगाव जलाल’ शाळा, प्रयोगशील दिव्यांग शिक्षक सोपान खैरनार जिल्ह्यातील शिक्षकांना प्रेरणादायी, गरुड भरारी घेणारी ‘मोरे नगर’ शाळा, प्रयोगशील शिक्षक संजय बेडसेंचा ध्यास, सातत्याने उपक्रमयुक्त गुणवंत ‘निमगुले लहान’ शाळा. शिक्षक भरत पाटील यांच्या तंत्रस्नेहाचे कोंदण राज्यात अव्वल ‘माळीनगर’ शाळा, तंत्रस्नेही इंग्रजी शिक्षक दत्तात्रय उगले यांची गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे अद्यावत विद्या मंदिर ‘पांगरी बुद्रुक’ शाळा, प्रयोगशील शिक्षिका वैशाली सूर्यवंशी यांची पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घेणारी ‘खालप फाट्याची’ शाळा, शिक्षिका नीलिमा पगार यांची नाविन्याचा ध्यास असणारी डिजिटल ‘दहीवड’ शाळा, तंत्रस्नेही शिक्षिका वैशाली भामरे यांची सर्वांगसुंदर उपक्रमांची परिपूर्ण ‘मानके’ शाळा, प्रयोगशील शिक्षक हेमंत बधान यांची गुणवत्तापूर्ण स्कूल ‘खेलदरी’, उपक्रमशील शिक्षिका योगिता गायकवाड यांची आदिवासीबहुल भागातील आगळीवेगळी ‘पिंपळपाडा’ शाळा, उपक्रमशील शिक्षिका शालिनी जाधव यांचे प्रेरक नेतृत्वामुळे शिक्षिकांच्या पुढाकाराने गुणवत्तेच्या पटलावर असणारी ‘भाटगाव’ शाळा, व्हाट्सॲपद्वारे कायापालट झालेली उपक्रमशील शिक्षक सुनील कापडणीस यांची ‘अंबासन’ शाळा, याचबरोबर,
समाजप्रिय उपक्रमशील शिक्षक नानासाहेब कुऱ्हाडे यांची सर्वांगीण विकासमय ‘नेऊरगाव’ शाळा, उपक्रमशील शिक्षक किरण अहिरे यांच्या धडाडी उपक्रमशीलतेने पटात वाढ झालेली ‘ढवळीविहीर’ शाळा, शिक्षक दादाजी देवरे यांच्या नेतृत्वात अग्रेसर, राज्यातील अव्वल सेमी ‘कळवणची’ मुलींची शाळा क्रमांक एक, तंत्रस्नेही शिक्षिका नूतन चौधरी यांची उपक्रमशील झेडपीची सेमी इंग्रजीचे धडे देणारी ‘टेहरे’ शाळा, प्रयोगशील शिक्षक प्रेमानंद घरटे यांची पॉवर नसल्याने मोबाईलवर धडे गिरवणारी ‘पवारवस्ती’ शाळा, तंत्रस्नेही शिक्षिका चचित्रा देवरे नाविन्यतेचा वसा घेतलेली सर्वांगीण विकासाठी आदर्शवत ‘अभोणा. मुले शाळा, बदलाचे शिल्पकार उपक्रमशील शिक्षक तुषार महाजन यांची स्वच्छतेतून समृद्धीकडे नेणारी ‘खालप’ शाळा, उपक्रमशील शिक्षक सुरेश लिलके यांची व्यापक समाज संपर्कातून प्रकाशमान ‘शेणीत’ शाळा, प्रयोगशील शिक्षक अनिल सावंत बदलाचे शिल्पकार ठरलेली गुणवत्तेत अग्रेसर ‘भावडे’ शाळा, आंतरराष्ट्रीय शाळेसाठी धडपडणारे शिक्षक वैजिनाथ भारती यांची तंत्रज्ञानाने बदलणारी ‘एरंडगाव’ शाळा, मिशन नवोदय सक्सेस करणारे स्मार्ट प्रयोगशील शिक्षक सतीश इंगळे यांची ‘उंबरठाण’ शाळा, उपक्रमशील शिक्षिका सविता भामरे यांची सांघिक प्रयत्नांनी शैक्षणिक पटलावर आलेली ‘उसवाड’ शाळा, विद्यार्थीप्रिय शिक्षक सुमित बच्छाव यांची शिक्षणासह जीवनमूल्ये रुजवणारी ‘गणेशनगर’ शाळा, शिक्षक सुनील पवार यांची लोकसहभागातून नावारूपाला आलेली ‘पिंपळगाव’ शाळा, उपक्रमशील शिक्षक सोपान बोरसे- सोनवणे जोडगळींची ज्ञानरचनावादी उपक्रमांची ‘पन्हाळे’ शाळा, प्रयोगशील शिक्षक दिनेश सोनवणे यांची गुणवत्तेचे कृतीयुक्त धडे देणारी ‘भिलवाडी’ची शाळा, शिक्षक प्रकाश बंजारा यांची विकासाच्या पायऱ्या चढणारी ‘दिघवद’ शाळा, मुख्याध्यापक सुरेश बच्छाव यांचे प्रेरक नेतृत्व व लोकसहभागातून बदललेली ‘देवघट’ शाळा... अशा अनेक शाळांमध्ये ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत आपली शाळा व विद्यार्थ्यांच्या जीवनाचा कायापालट करणारे शिक्षक या प्रेरक लेखांमधून पानोपानी वाचकांच्या भेटीला आले आहेत. एक वेगळा दर्जा असणारा हा दस्तऐवज म्हणायला हरकत नाही.
समाजात आदर्श असे स्थान आजही शिक्षकांना आहे. शिकवण्याची आवड आणि वचनबद्धतेसाठी हे महान शिक्षक जगभरातील इतर हजारो शिक्षकांपेक्षा वेगळे आहेत. त्यांचे जीवन विद्यार्थ्याच्या जीवनातील शिक्षकांच्या अनेक भूमिका आपल्याला दाखवतात. या शिक्षकांनी शिकवणे वर्गाच्या चार भिंतींपर्यंत मर्यादित ठेवले नाही. त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना संधीचे जग दाखवले.
मध्यंतरी खडू आणि फळा जाऊन ऑनलाईन शिक्षण प्रणाली ज्ञानदानाचे माध्यम बनते की काय ? अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचे वातावरण निर्माण झालेही असल्याचे आपण अनुभवले देखील आहे. परंतु या शिक्षकांचच्या कार्याबद्दल वाचून मन भारावून तर जातेच परंतु दर्जेदार शिक्षणासाठी खडू आणि फळा ही परंपरागत माध्यमे नेहमीच उपयुक्त राहतील, हे नक्की.
सर्वच प्रेरक लेखांची भाषा ओघवती, संक्षेपी व वाचकांना सहज समजणारी आहे. मोजक्या व प्रभावी शब्दात त्यांनी आपले लेख वाचकांना उपलब्ध करून दिलेले आहेत.
लेखक राजेंद्र दिघे हे एक विद्यार्थीप्रिय शिक्षक असून आई प्रतिष्टान, मालेगावचे ते संस्थापक अध्यक्ष, म.रा. प्राथमिक शिक्षक भारती, नाशिक विभागाचे अध्यक्ष तसेच ते अनेक संस्थाच्या कार्यात सक्रीय आहे. पुस्तक हातात पडताच पुस्तकाची मांडणी भावली, एखादं क्लासिक बुक अशीच मांडणी या पुस्तकाची केलेली आहे. त्यासाठी प्रकाशकाचे विशेष अभिनंदन. तसेही चपराक प्रकाशनाने अल्पावधीत आपला नावलौकिक आपल्या दर्जेदार कार्यशैलीमुळे मिळवला आहेच.
या लेखसंग्रहास संतोष घोंगडे यांनी रेखाटलेले मुखप्रुष्ठ अतिशय समर्पक आणि बोलके असून वाचकाला पाने पालटून लेख वाचायला प्रेरित करणारे आहे. मुखपृष्ठावरील मांडणीमुळे या पुस्तकात आत काय दडले आहे याचा सहज अंदाज येतो. तसेच विधान परिषद सदस्य मा. कपिलजी पाटील यांची प्रस्तावना तसेच माननीय मंत्री, दादाजी भुसे यांची अतिशय थोडक्यात पण समर्पक पाठराखण या पुस्तकाला लाभली असून यामुळे पुस्तकाचा एकूण आवाका सहज लक्षात येतो. माजी मंत्री आमदार छगनजी भुजबळ यांच्या शुभेच्छा ! हे या पुस्तकाचे खास आकर्षण म्हणावे लागेल.
बालपणात संवेदनाचे धडे गिरवून घेणाऱ्या मायमाऊली स्व. आईस... आयुष्यात कष्ट सोसत प्रामाणिकपणे जगलेल्या आप्पांना... सतत उर्जास्त्रोत ठरलेल्या माझ्या आयुष्यातील तमाम गुरुजन, मार्गदर्शक व मित्र-मैत्रीणींना... ज्या लेकरांमुळे इथवर प्रवास सुखकर झाला त्या आजपर्यंतच्या सर्व माझ्या विद्यार्थ्यांना... असे नमूद करत त्यांनी हा लेखसंग्रह अर्पण केलेला आहे.
हा उहापोह करण्याचे कारण म्हणजे मंगळवार, दि २४ डिसेंबर २०२४ रोजी हुतात्मा स्मारकात, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, नाशिक येथे गिरणा गौरव प्रतिष्टान आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ या सदरात ‘शाब्बास गुरुजी’ या लेखक राजेंद्र दिघे लेखसंग्रहावर/पुस्तकावर ऐसपैस गप्पांच्या कार्यक्रमाची मेजवानी नाशिकमधील रसिक वाचक तसेच साहित्यिकांसाठी उपलब्ध झाली आहे. दि. ५ मार्च २०२४ ते दि. २८ फेब्रुवारी २०२५ दरम्यान दर मंगळवारी व दर शुक्रवारी हा उपक्रम संपन्न होणार आहे. अशा प्रकारचा बहुधा हा साहित्य क्षेत्रातील पहिलाच अभिनव उपक्रम असावा. यामध्ये नवोदित तसेच प्रस्थापित साहित्यिकांना व्यक्त होण्यासठी हक्काचं व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
यापुढे, त्यांची लेखणी अशीच तळपत राहवी. साहित्याची सेवा घडावी. काव्य, कादंबरी, कथा, आत्मकथन, नाटके इ. वाचकांना वाचायला मिळावेत. हिच सदिच्छा ! सन्माननीय राजेंद्र दिघे सरांना गिरणा गौरव प्रतिष्टान आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ या सदरात संपन्न होणाऱ्या व्याख्यानास आभाळभर शुभेच्छा!!!
पुस्तकाचे नाव :- शाब्बास गुरुजी
लेखक :- राजेंद्र दिघे, संवाद क्र. ९४२१६००७११/ ८१६९५००७००.
प्रकाशक :- चपराक प्रकाशन, पुणे
ISBN :- 9789391239299
प्रस्तावना : कपिलजी पाटील
पाठराखण :- मा. मंत्री दादाजी भुसे
शुभेच्छा :- मा. आ. छगनजी भुजबळ
स्वागत मूल्य :- ₹ २५०/- मात्र (सवलतमूल्य, टपाल खर्च आणि अधिक माहितीसाठी कृपया, संबंधितांशी संपर्क साधावा.)
आस्वादक: *सोमनाथ आवडाजी पगार* (सॅप)
(महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेत प्रकाशनार्थ अनुदान प्राप्त साहित्यिक)
संपर्क क्र.:- ९२७३३५७१५९, Email:- sahityatirthasp@gmail.com
गीतकार/ कवी, कथा, पटकथा, संवाद लेखक, युट्युबर, ब्लॉगर, टेक्नोक्रॅट, ऑनलाईन डॉक्युमेंट्स ऍडव्हायझर, इंग्लिश लँग्वेज ट्रेनर.
मंगळवार, १७ डिसेंबर, २०२४
अस्मिता- सकारात्मकतेचे पंख देणारी कविता
ll साहित्य तीर्थ ll
पुस्तक परिचय
*अस्मिता – सकारात्मकतेचे पंख देणारी कविता*
सोमनाथ पगार
संपर्क क्र.:- ९२७३३५७१५९.
महात्मा ज्योतिबा फुले व त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी १८४८ मध्ये पुण्यात मुलींसाठी शाळा सुरु करून स्त्री शिक्षणाची मुहर्तमेढ रोवली त्यामुळे स्त्रियांसाठी शिक्षणाची कवाडे खुली झाल्याने ‘स्त्री म्हणजे चूल आणि मुल’ अशी असलेली ओळख पुसली जाऊन आज स्त्रियांनी विविध क्षेत्रे आपल्या कार्य व कर्तुत्वाच्या बळावर पादाक्रांत केलेली आहेत. साहित्य क्षेत्रही त्याला अपवाद नाही. आपल्या साहित्यातून वेगळेपणाची प्रकर्षाने जाणीव व्यक्त करत व तसेच स्वत्वाचा शोध घेऊ पाहणारे साहित्य अर्थात कथा, कविता सहज वाचायला मिळतात. साहित्य क्षेत्रातील असेच एक नाव महत्वाचे नाव म्हणजे शिक्षिका, कवयित्री सौ. आशा विनोद पाटील होय.
त्यांचा ‘अस्मिता’ कवितासंग्रह वाचण्यात आल्याने हितगुज साधावी म्हणून हा प्रपंच...
मुलींसाठी काढून पहिली शाळा
विद्या दानाने फुलवला मळा...
मर्म जाणिले स्त्री स्वातंत्र्याचे
माणूस म्हणून घडविले आम्हाला
ज्या काळी स्त्रीयांना शिक्षण घेण्यास बंदी होती, त्याकाळची परिस्थितीची कल्पना न केलेली बरी. अशावेळी समाजाचा विरोध झुगारून प्रयत्नांची पराकाष्टा करत प्रसंगी हाल अपेष्टा सहन करून महात्मा ज्योतिबा फुले व त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाची ज्ञानगंगा प्रवाहित करून दिली. शिक्षणाचा कानमंत्र मिळाल्यामुळेच आज महिला सक्षम होऊ शकल्या. हे सत्य कुणीही नाकारू शकत नाही. त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे ऋण कधीही फेडले जाऊ शकत नाही.
खरं तर गृहिणी ते शक्षिका असा सावित्रीबाई यांचा समाजव्यवस्था प्रतिकूल असतानाही खडतर प्रवास होता, तोच सावित्रीचा वसा आजकालच्या स्त्री शिक्षिका आपल्या खांद्यावर घेऊन पुढे नेत आहेत, असे म्हणायला हरकत नाही. कारण आजकालची स्त्री घरातील सर्व जबाबदाऱ्या उत्तमरीत्या सांभाळून आपली व्यावसायिक कारकीर्द यशस्वी पणे सांभाळताना आपण पाहतो. काळाच्या भाळावर आपल्या कार्तुत्वाच्गा ठसा स्पष्टपणे उमटवत आहे. असं आपण म्हणू शकतो.
नारी तू नारायणी
कर्तुत्व, मातृत्व हिरकणी
झेप उतुंग घे गगनी
साप्त्सुरातील तूच बंदिनी
आपली समाजव्यवस्था स्त्रीला दुय्यम स्थान देत असल्याचे बोलले जाते, तशा पाऊलखुणा जाणवतातही. जर स्त्रीच या भूतलावर नसती तर ? कल्पना तशी भयावह आहे. स्त्री शिवाय माणूस अपूर्ण आहे, स्त्रीच्या उदरातून जन्म घेवून, आईच्या दुधावर पालनपोषण होऊन मग माणूस पराक्रम करायला सज्ज होतो. असे असले तरी समाजात स्त्रियांवर होणारे अन्याय, अत्याचार थांबत नाही. अशा या नारीचा, स्त्रीचा नेहमी सन्मान झाला पाहिजे.
‘मैत्री’ या कवितेत कवयित्रीने मैत्रीचे सहज साध्या शब्दात महत्व अधोरेखित केल्याचे जाणवते. मैत्री दोन अक्षरं असलेला शब्द असला तरी मैत्रीच्या नात्यामुळे माणसाचा जीवन प्रवास सुखकर होतो, हे नक्की. कुणीतरी स्नेहाचे, आपुलकीचे, हक्काचे आपल्या सुखदु:खात आधार असे मैत्रीच्या अंगणात हवे असते. ज्यात आपुलकी, माया असते क्षणभर मन मोकळं करण्यासाठी.
मैत्री, पहाटेच्या दवासारखी
थंडगार स्पर्श करणारी
मैत्री असते सुर्योद्यासारखी
मनाला चैतन्य देणारी
कृष्ण, सुदामाच्या मैत्रीसारखी मैत्रीची पखरण करत शब्दांचे शब्ददीप प्रज्वलित होत, विचारधारांची ही काव्यरुपी दीपमाळ मनात आनंदाचे तरंग निर्माण करते.
वलयांकित शब्दात माणूस वाचते मी, प्रकाशद्विपात अंधार मालवते मी, भविष्यात प्रकाशाचे स्वप्न विणते मी, अज्ञानाच्या प्रज्वलून ज्योती,, आसमंतात जुळून नाती, शब्दात शोधते मी, माणसात दरवळते मी, सुगंधात गुलाब गंध शोधते मी... अशा आशयाच्या सकारात्मक भाव पेरणाऱ्या रचना या कवितासंग्रहात भेटतात.
आता मी पुस्तके कमी
माणसे अधिक वाचू लागली
मुखवट्या मागचा चेहरा
चेहऱ्या मागचा मुखवटा बघू लागली
आयुष्याच्या या प्रवासात बरेवाईट अनुभव येत राहतात, माणूस त्यातून आपले मार्गक्रमण करत असतो. सत्य परेशानच नाही तर पराजित झालेलं पाहून कवयित्री व्यथित होते. आणि त्यामुळेच कदाचित चेहऱ्या मागचे मुखवटे वाचून सावधपणे वागलं पाहिजे हा मौलिक सल्ला वाचकांना मिळतो. मीच माझी हिम्मत म्हणून डगमगून न जाता जीवनप्रवास सुरु ठेवला पाहिजे असा सडेतोड सल्ला महत्वाचा ठरतो.
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी असे म्हटले जाते, आणि ते खरेही आहे. आईचे स्मरण होताच मन माहेरी घुटमळू लागते. भर उन्हात सुखद गारवा देणाऱ्या सावलीसारखी आई सुखदुखात साथ देत असते. अंधारात काजव्याने प्रकाशून वाट दाखवावी तशीच महत्वाची व्यक्ती ही प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात आईच असते. पण हीच आई कितीही अश्रूंची लाखोली वाहिली तरी पुन्हा नेत्रास दिसत नाही. त्यामुळे जग दाखवणाऱ्या आईवडीलांना आपण जपलं पाहिजे. हे सत्य असे वास्तव आई या कवितेत अधोरेखित झाले आहे.
बाप... कुटुंबाचा आधार
मायेचा सागर
प्रकाशाचा जागर
कष्टाचा पाझर
प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात आईवडील हेच पहिला आधार व गुरु असतात. बाप प्रेरणा देणारा, अस्मिता जपणारा, विचार पेरणारा आधारवड असतो. बाप दीपस्तंभ असतो खरं तर मुलांसाठी. अनुभवाचं पाहिलं विद्यापीठ बापच असतो. कुटुंबाची ढाल असतो. असा हा वादळातील खंबीर बेट बाप आपल्या लाडाच्या लेकीचं कन्यादान करून आपलं धन परक्याच्या हवाली करतो. तोच बाप आपल्या लाडाच्या लेकीला पुढे आयुष्यभर मोरपिसासारखा काळजात जपत असतो.
जीवनाला वेदनेची किनार असली तरीही सुखद रेशमी तलम वस्त्रासारखी हवीहवीशी कविता जीवनात आल्यावर कळतनकळतपणे शब्दांचा उत्सव कधी बनून जाते. कारण शब्दात सौंदर्य असते. शब्दच मशाल होऊन वाट दाखवतात. अशाच कवितेच्या माध्यमातून किल्ल्याविषयी वर्णन करताना कवयित्रीच्या शब्दांतून किल्ला बोलू लागतो की, ‘रात्रीच्या गर्भात उष:काल, मी नव्हे किल्ला’ केवळ, मी प्रेरणास्थान, मी स्फूर्तीस्थान...’
संकटे तर मानवाच्या पाचवीलाच पुजलेली असतात. त्यातच कोरोना महामारीने जगभर धुमाकूळ घातला होता, अशा वेळी गुरु करोना, मास्क अशा रचनांमधून कवयित्रीने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली असल्याचे लक्षात येते.
सावित्री, मातृत्व, मैत्री, पुस्तक, विद्यार्थी, आई, जिद्द, महामानव, शिक्षक, संधी अशा विविध ४२ कविता या संग्रहात वाचकांना वाचायला भेटतात. ‘उत्कृष्ट व उत्स्फूर्त रचना म्हणजे काव्य’ असे वर्डस्वर्थने म्हटले आहे. असे असले तरी या संग्रहात काही उणीवा जरूर आहेत. त्यांचा स्वतंत्रपणे उहापोह करता येईल. कवयित्री सौ. आशा पाटील ह्या एक कवयित्री असून त्या शैक्षणिक क्षेत्रात एक विद्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणून रसिकांना ज्ञात आहेच
या कवितासंग्रहाचे समर्पक आणि बोलके मुखपृष्ठ वाचकाला पाने पालटून कविता वाचायला प्रेरित करते. तसेच गिरणा गौरव प्रतिष्टानचे अध्यक्ष सुरेश पवार यांच्या समर्पक प्रस्तावना तसेच ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भास्कर ढोके यांची पाठराखण यामुळे कवितासंग्रहाचा एकूण आवाका सहज लक्षात येतो. तसेच भारतीय संस्कृती महिलांना देवतासमान मानते पण साहित्याने महिलांना माणूसपण दिले. स्त्री शिक्षण, साहित्य, माणूसपण व अस्मिता जपणाऱ्या सर्व स्त्रीयांना शब्दसुमनांची ही ओंजळ त्यांनी समर्पित केली आहे.
हे सर्व लिहिण्याचे कारण म्हणजे मंगळवार, दि. १७ डिसेंबर, २०२४ रोजी हुतात्मा स्मारक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, नाशिक येथे गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष माणूसमित्र सुरेश पवार यांनी आयोजित केलेल्या ‘पुस्तकावर बोलू काही...’ या सदरात कवयित्री सौ. आशा पाटील यांच्या ‘अस्मिता’ या कवितासंग्रहावर आधारित ऐसपैस गप्पांच्या कार्यक्रमाची मेजवानी नाशिकमधील रसिकवाचक तसेच साहित्यिकांसाठी उपलब्ध झाली आहे. दि. ५ मार्च, २०२४ ते दि.२८ फेब्रुवारी, २०२५ दरम्यान दर मंगळवारी आणि शुक्रवारी हा उपक्रम संपन्न होणार आहे. अशा प्रकारचा बहुधा हा साहित्य क्षेत्रातील पहिलाच अभिनव उपक्रम असावा. यामध्ये नवोदित तसेच प्रस्थापित साहित्यिकांना व्यक्त होण्यासाठी हक्काचं व्यासपीठ उपलब्ध झालं आहे.
याहीपुढे, त्यांची लेखणी अशीच तळपत रहावी. त्यांच्या हातून सर्व प्रकारचे साहित्यिक लिखाण व्हावे, हीच सदिच्छा! सन्मानीय कवयित्री सौ. आशा पाटील मॅडम यांना गिरणा गौरव प्रतिष्ठान आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ या सदरात संपन्न होणाऱ्या व्याख्यानास आभाळभर शुभेच्छा !
पुस्तकाचे नाव :- अस्मिता
कवयित्री :- सौ. आशा विनोद पाटील , संवाद क्र. ९८२२७२१८६३
प्रकाशक :- गिरणादूत प्रकाशन, नाशिक
प्रस्तावना :- माणूसमित्र सुरेश पवार
पाठराखण :- डॉ. भास्कर ढोके
स्वागत मूल्य :- ₹ १२०/- मात्र (सवलतमूल्य, टपाल खर्च आणि अधिक माहितीसाठी कृपया, संबंधितांशी संपर्क साधावा.)
*सोमनाथ आवडाजी पगार* (सॅप)
(महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेत प्रकाशनार्थ अनुदान प्राप्त साहित्यिक)
संपर्क क्र.:- ९२७३३५७१५९, Email:- sahityatirthasp@gmail.com / somnathpagar@yahoo.co.in
गीतकार/ कवी, कथा, पटकथा, संवाद लेखक, युसमीक्षक, ट्युबर, ब्लॉगर, टेक्नोक्रॅट,, इंग्लिश लँग्वेज ट्रेनर, ऑनलाईन डॉक्युमेंट्स ऍडव्हायझर.ट,, इंग्लिश लँग्वेज ट्रेनर, ऑनलाईन डॉक्युमेंट्स ऍडव्हायझर.
मंगळवार, १० डिसेंबर, २०२४
षढाक्षरी- समृद्धी येता ही
आज फेसबुकवर पोस्ट चाळता चाळता सहज एका कवी मित्राची पोस्ट वाचली...
नोकरीनिमित्त दूर देशी, परदेशी पांगलेल्या भावंडांची तसेच त्यांची व त्यांच्या गावी असणाऱ्या आईवडीलांची काही वर्षांनी होणारी सहपरिवार भेट झाल्याची पोस्ट वाचून मी अस्वस्थ झाल्याने कविता लिहून रिता झालो.
बालपणी आईवडिलांच्या छत्रछायेखाली सूखस्वप्नांची चित्रे रंगवत भावंडे कधी मोठी होतात आणि पाखरे उडून जावी तशी वेगवेगळ्या दिशांना भुर्र उडून जाऊन आपल्या जीवनात स्थिरस्थावर होतात. मात्र काळजात जपलेला गाव व रक्ताची नाती दुरावतात, हे सत्य नाकारून चालणार नाही. आणि मग कालांतराने त्यांच्या भेटी गाठी दिवाळी दसऱ्यासारख्या कधीतरी साजरे होणारे दुर्मिळ सोहळे बनून जातात. परंतु हात पाय हलविल्याशिवाय प्रगती नाही. हेच खरं...
शीर्षक: समृद्धी येता ही
समृद्धी येता ही
माणसं पांगली
का सुख पैशाने
मिळाली चांगली? II१ll
बालपणी भरे
घरामध्ये मेळा
हसणे, रुसने
उत्सव सगळा II२ll
पोटापाण्यासाठी
दुरावली नाती
मनामध्ये जळे
जसे दिवा वाती II३II
लाभल्या नात्याशी
असावे सादर
दुराव्याने आज
वाढला आदर lI४II
खेळतं गोकुळ
व्याकुळ भेटीस
प्रगत चक्रानं
धरलं वेठीस II५II
असा कसा ऋतू
आला हा आगळा
भेटण्याचा होई
अनोखा सोहळा II६II
सगेसोयरे ही
गावी होती गोळा
काही क्षणाचाच
सहवास भाळा II७II
मायेचं घरटं
ऊब काळजात
रक्ताच्या नात्याला
देव पंढरीत II८II
पंखामध्ये बळ
आल्यावरी न्यारे
दिगंतरा झेप
पक्षी घेती सारे II९II
*सोमनाथ पगार* (सॅप)
*(महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेत प्रकाशनार्थ अनुदान प्राप्त साहित्यिक)*
सुसंवाद.:- ९२७३३५७१५९, Email:- sahityatirthasp@gmail.com
*गीतकार/ कवी, कथा, पटकथा, संवाद लेखक, युट्युबर, ब्लॉगर, टेक्नोक्रॅट, ऑनलाईन डॉक्युमेंट्स ऍडव्हायझर, इंग्लिश लँग्वेज ट्रेनर.*
सभासद:
१.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
२.स्क्रीन राइटर्स असोसियशन
३.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
४.मराठी साहित्य परिषद
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)