Its all about my Compositions/ Creation i.e. Poems, Songs, Stories etc.
गुरुवार, ३१ ऑक्टोबर, २०२४
आठवणींची पाने – आठवणींचा धांडोळा
II साहित्य तीर्थ II
*आठवणींची पाने – आठवणींचा धांडोळा*
सोमनाथ पगार
संपर्क क्र.:- ९२७३३५७१५९.
जन्म झाल्यावर कळायला लागल्यापासून जीवनाच्या प्रवासात थांब्याथांब्यावर भेटलेली माणसं व आलेले बरेवाईट अनुभव माणसाला शहाणे करतात, त्यामुळे भविष्याचा वेध घेत अचूक वाटचाल करण्यासठी निच्छितच मदत होते. हे नक्की... हीच शिदोरी पुढे आयुष्यभर पुरते. आणि हो, ज्याप्रमाणे पाण्याची टाकी भरली कि ओव्हरफ्लो हा ठरलेला असतो, त्याचप्रमाणे माणसाच्या मनातील विचारांचे असते. ते साचत राहिले तर माणूस अस्वस्थ होतो. त्यामुळे मनोरंजन हा जरी मुख्य हेतू असला तरीही भावनांना वाट मोकळी करून द्यावी म्हणून कदाचित पूर्वी कथा, कविता सांगितल्या जात असाव्यात. असे वाटते. हीच परंपरा आजतागायत सुरु असावी.
आत्मचरित्र हा त्याचाच एक भाग असावा, असे मला वाटते. भोगाव्या लागलेल्या वेदना, परिस्थितीशी करावे लागलेले दोन हात. यातून घडत गेलेले जीवन. हा सारा अनुभव कुणाला तरी लिखित स्वरुपात सांगितल्याने मन शांत होऊन आनंद मिळतो. कारण प्रत्येकवेळी आपलं ऐकायला हक्काचं कुणी असेलच याची शास्वती नसते. त्यातूनच डॉ. प्रशांत आंबरे यांनी लिहलेल्या ‘आठवणींची पाने’ अशा आत्मचरित्राचे लिखाण झाले आसवे.
वैद्यकीय पेशातील, नाशिक येथील कवी, लेखक असलेले डॉ. प्रशांत आंबरे हे एक ख्यातनाम डॉक्टर असूनही त्यांच्यातील लेखक त्यांना अस्वस्थ केल्याशिवाय राहत नाही. त्यांच्या ‘आठवणींची पाने’ या आत्मचरित्रावर गिरणा गौरव प्रतिष्टान आयोजित पुस्तकावर बोलू काही या उपक्रमात व्याख्यान संपन्न होणार असल्याने रसिक वाचकांशी हितगुज साधण्यासाठी हा प्रपंच.
आईचे श्रद्धास्थान समनापूरचा गणपती, पोहेगावच्या वस्तीवरील दिवस, गणोऱ्यातील दिवस, शेतीवरचे दिवस, गणोऱ्याच्या अंबाबाईची जत्रा, आजोळचे दिवस, ग्रामीण भागातील मुलांच्या अडचणी, गुणे शास्त्री आयुर्वेद कोलेजला प्रवेश, नगर सोडतांना, मुबईत काही दिवस, वयाच्या ५३व्या वर्षी एम,बी.ए. चा विद्यार्थी, वाचलेले पहिले पुस्तक, माजी आमदार, कै. के. बी. देशमुख (दादा), सहकार क्षेत्रात सहकारमहर्षी कै. पंढरीनाथ आंबरे (दादा) याचं योगदान, लोकनेते कै. के. बी. रोहमारे (दादा), माजी मंत्री कै. बी. जे. खताळ पाटील अशा एकूण सोळा प्रकरणामधून त्यांनी या आत्मचरित्रात त्यांचा जीवनपट उलगडून दाखविला आहे.
चित्रकार भूषण बिरारी यांनी अत्यंत सुबक व समर्पक असे मुखपृष्ठ रेखाटलेले असून गृह, तारे सामावलेली विस्तीर्ण आकाशगंगा दिसते आहे, पृथ्वीच्या गोलावर आपल्या अस्तित्वाच्या खुणा टिकवत वृक्षवेलींच्या गराड्यात महत्वाचा भाग असलेला माणूस काहीतरी विचार करतो आहे, सांगू पाहतो आहे. मलपृष्ठावरील उगवता सूर्य हा या भूतलावरील भरारी घेऊ पाहणाऱ्या माणसाचे प्रतिनिधीत्व करत असावा असे क्षणभर वाटल्याशिवाय राहत नाही. तसेच ज्येष्ठ विज्ञान लेखक व निवृत्त प्राचार्य डॉ. किशोर पवार यांची प्रस्तावना या आत्मचरित्राची जमेची बाजू म्हणावी लागेल.
आपले आईवडील मा. श्री. विश्वनाथ लक्ष्मण आंबरे, कै. उर्मिला विश्वनाथ आंबरे, भाऊ कै. प्रदीप विश्वनाथ आंबरे यांच्या चरणी लेखकाने आपले हे आत्मचरित्र अर्पण केले आहे.
आपल्या लेखणीद्वारे समाजाप्रती संवेदना अधोरेखित करणारे वैद्यकीय पेशातील एक संवेदनशील असे हे साहित्यिक असून त्यांच्या लिखाणात गत काळातील आठवांचा दरवळ व्यापलेला आहे. मनात रुंजी घालणाऱ्या अशाच ‘आठवणींचा धांडोळा’ आत्मचरित्र रूपाने आपल्या पुस्तकात लेखकाने वाचकांसाठी मांडलेला आहे.
गाव-खेड्यात शिक्षण घेत लहानाचे मोठे झाल्यावर आजकाल तरुण, तरुणी सर्रास शहरची वाट धरतात, कारण खेड्यापेक्षा शहरात उपलब्ध असलेली सुखसोयीयुक्त आधुनिक जीवनशैली, उत्तम शिक्षण व्यवस्था, दर्जेदार राहणीमान, चविष्ट तसेच उत्तम खानपान, चांगली दळणवळणाची साधने याचसोबत सातत्याने होत असलेला विकास त्यामुळे उपलब्ध रोजगाराच्या संधी, तसेच झपाट्याने होत असलेले औद्योगिकीकरणामुळे सहज रोजीरोटीचा प्रश्न मिटत असल्याने हा बेरोगारांचा लोंढा सहज शहराकडे आकर्षित होतो. याउलट ग्रामीण भागात या सर्व सुविधांचा अभाव असून काबाडकष्ट व संघर्ष हा तेथील जनतेच्या पाचवीला पुजलेला असतो.
अशा परिस्थितीशी दोन हात करत डॉ. प्रशांत आंबरे यांच्या सारखा एखादा ग्रामीण भागातील तरुण उच्चविद्याविभूषित होत शहराकडे धाव घेतो, त्यात नवल काय? लेखकाचे आजोबा सहकारमहर्षी कै. पंढरीनाथ जिजाबा आंबरे दादांनी पुण्यात उभं केलेलं डाळीच्या व्यापाराचं साम्राज्य भीषण आगीत जळून भस्मसात झाल्यावर लेखकाचे आईवडील आपल्या मुळगावी म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील गणोरे गावी परत येतात आणि इथूनच खरा जीवनाचा संघर्ष सुरु होतो. तो पुढे लेखकाने डॉक्टर, वकील, व्यवस्थापन इत्यादी पदव्या घेत जीवनात स्थिरस्थावर होईपर्यंत सुरु राहतो.
लेखकाच्या आईवडिलांचे कष्ट, आपल्या मुलांनी शिक्षण घ्यावं, मोठं व्हावं, यासाठी त्यांची तळमळ, संघर्ष, काबाडकष्ट तसेच लेखकाने अशाही संघर्षातून आपल्या जिद्द व चिकाटीच्या जोरावर आपल्या जीवनात मिळवलेले यश याला तोड नाही. त्यांनी शिक्षणाचा ध्यास सुरूच ठेवला, ते डॉक्टर झाल्यावर वैद्यकीय व्यवसाय सांभाळत पुढे त्यांनी एल.एल.बी. चे शिक्षण घेऊन कायद्याचे ज्ञानही त्यांनी घेतले. एवढ्यावरच ते न थांबता वयाच्या त्रेपान्नाव्या वर्षी त्यांनी एम.बी.ए. ही व्यवस्थापन क्षेत्रातील पद्व्युतर पदवी मिळवली.
जसे कि वर नमूद केले आहे, लेखकाच्या जीवनातील संघर्षाची सुरवात ही आंबरे दादांनी पुण्यात उभं केलेलं डाळीच्या व्यापाराचं साम्राज्य भीषण आगीत जळून खाक होऊन झाली होती. पुस्तक वाचतांना एखादा चलचित्रपट पहावा असे चित्र वाचकाच्या मनपटलावर उमटत जाते. ग्रामीण जीवनातील आठवणींना उजाळा देत गरिबीची, हलाखीची परिस्थिती असल्याने कधीकधी पोटाला अन्नही मिळत नसे. त्यांची आई म्हणजे काकी व वडील म्हणजे काका यांचे कष्ट, त्यांनी गाळलेला घाम, दोन वेलची भ्रांत मिटवण्यासाठी गावोगाव करावं लागलेलं स्थलांतर. यात ओघानेच ग्रामीण जीवनाचे चित्रण आले, जसे कि, तिकीट काढणे शक्य नसल्याने कनातीखालून प्रवेश मिळवत कांताबाई सातारकर यांचा गावात आलेला तमाशा पाहणे, शिक्षण घेण्यासाठी करावी लागलेली पायपीठ, पाट तसेच विहिरीत पोहणे, झालेले अपघात, स्पर्धांमध्ये मिळवलेले बक्षिसे, अंगावर बोंबलाची भाजी सांडून भाजणे, पुढे दहावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावने, संगमनेरच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेणे, गावाकडील सणवार, नाटकामध्ये केलेला अभिनय व मिळालेले पुरस्कार, एसटीवर येणारा जेवणाचा डब्बा, अहमदनगर येथील आयुर्वेदिक महाविद्यालयातील प्रवेश घेवून डॉक्टर होणे, होस्टेलचे जीवन तसेच त्यांच्या वैद्यकीय पेशातील अनेक अनुभव त्यांनी वर्णन केलेले आहेत. अशा लेखकाने मनात जपलेल्या अनेक आठवणी या आत्मचरित्रात वाचकाला वाचायला मिळतात. हे सारे काही आपल्याच जीवनात किंवा सभोवताली घडत आसवे असे क्षणभर वाटून जाते.
आपल्या जीवन प्रवासात अनेक दिग्गज राजकीय व्यक्तीचा सहवास त्यांना लाभला असून त्यात आमदार, खासदार, समाजसेवक तसेच मंत्री यांचा समावेश आहे. या सर्व आठवणी या पुस्तकात तपशीलवार आढळतात. माजी आमदार, कै. के. बी. देशमुख (दादा), सहकार क्षेत्रात सहकारमहर्षी कै. पंढरीनाथ आंबरे (दादा), लोकनेते कै. के. बी. रोहमारे (दादा), माजी मंत्री कै. बी. जे. खताळ पाटील इत्यादी मान्यवरांचा उल्लेख व आठवणी या पुस्तकात आढळतात.
‘आठवणींचे पाने’ असे समर्पक व आगळेवेगळे शीर्षक या आत्मचरित्राला देण्यात आले असून संघर्ष करत स्वत:च्या पायावर उभे राहिलेल्या प्रत्येक वाचकाला स्वतःचं वाटावं असं हे पुस्तक आहे.
डॉ. प्रशांत आंबरे यांना यापूर्वी अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झालेले असून त्यांचे समाजतरंग हा कवितासंग्रह, मातु:श्री हे आईविषयी लिहलेले पुस्तक, मधुमेह हे आरोग्य विषयक पुस्तक व आठवणींचे पाने अशी ग्रंथसंपदा प्रकशित असून लवकरच त्यांचा ‘सत्यधारा’ हा कवितासंग्रह प्रकशित होत आहे.
हे सर्व लिहिण्याचे कारण म्हणजे गुरुवार, दि. ३१ ऑक्टोबर, २०२४ रोजी हुतात्मा स्मारक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, नाशिक येथे गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष माणूसमित्र सुरेश पवार यांनी आयोजित केलेल्या ‘पुस्तकावर बोलू काही...’ या सदरात कवी/ लेखक डॉ. प्रशांत आंबरे यांच्या ‘आठवणींची पाने’ या आत्मचरित्रावर आधारित ऐसपैस गप्पांच्या कार्यक्रमाची मेजवानी नाशिकमधील रसिकवाचक तसेच साहित्यिकांसाठी उपलब्ध झाली आहे. दि. ५ मार्च, २०२४ ते दि.२८ फेब्रुवारी, २०२५ दरम्यान दर मंगळवारी आणि शुक्रवारी हा उपक्रम संपन्न होणार आहे. अशा प्रकारचा बहुधा हा साहित्य क्षेत्रातील पहिलाच अभिनव उपक्रम असावा. यामध्ये नवोदित तसेच प्रस्थापित साहित्यिकांना व्यक्त होण्यासाठी हक्काचं व्यासपीठ उपलब्ध झालं आहे.
याहीपुढे, त्यांची लेखणी अशीच तळपत रहावी. त्यांच्या हातून सर्व प्रकारचे साहित्यिक लिखाण व्हावे, हीच सदिच्छा! डॉ. प्रशांत आंबरे सरांना गिरणा गौरव प्रतिष्ठान आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ या सदरात संपन्न होणाऱ्या व्याख्यानास आभाळभर शुभेच्छा!
पुस्तकाचे नाव :- आठवणींचे पाने
लेखक :- डॉ. प्रशांत आंबरे, संवाद क्र. ९८२३०४९३६६
प्रस्तावना :- प्राचार्य डॉ. किशोर पवार
स्वागत मूल्य :- ₹ २००/- मात्र (सवलतमूल्य, टपाल खर्च आणि अधिक माहितीसाठी कृपया, संबंधितांशी संपर्क साधावा.)
सोमनाथ आवडाजी पगार (सॅप)
(महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेत प्रकाशनार्थ अनुदान प्राप्त साहित्यिक)
संपर्क क्र.:- ९२७३३५७१५९, Email:- somnathpagar@yahoo.co.in
गीतकार/ कवी, कथा, पटकथा, संवाद लेखक, युसमीक्षक, ट्युबर, ब्लॉगर, टेक्नोक्रॅट, ऑनलाईन डॉक्युमेंट्स ऍडव्हायझर, इंग्लिश लँग्वेज ट्रेनर.
@highlight Following Amazon India Following Love Somnath Pagar #highlightseveryone #marathipoems #followers #pandharpur #highlights
मंगळवार, १५ ऑक्टोबर, २०२४
घामाचे संदर्भ:- कामगार जाणिवांचे वास्तव
II साहित्य तीर्थ II
घामाचे संदर्भ – कामगार जाणिवांचे वास्तव
सोमनाथ पगार
संपर्क क्र.:- ९२७३३५७१५९.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे म्हणायचे पृथ्वी ही शेष नागाच्या शिरावर नाही, तर ती कामगाराच्या तळहातावर आहे. ते काही अंशी खरेही आहे. आज हे आठवण्याचे कारण म्हणजे कवी किरण भावसार यांचा ‘घामाचे संदर्भ ‘ हा कवितासंग्रह होय. कामगारांनी घामच गाळला नाही, काम केले नाही तर कारखाने बंद पडतील हे नक्की. मात्र असे असले तरी कामगारांचा घाम हा मातीमोल असतो. त्याने आयुष्यभर कष्ट करून, घाम गाळून सुद्धा त्याची दोन वेळच्या अन्नाची भ्रांत काही केल्या मिटत नाही. कामगार हा आयुष्यभर कामगारच राहतो. त्याला दुसरा काही पर्यायही नसतो.
भूक आणि व्यवस्थेपुढे गुडघे न टेकता कष्ट आणि जोखीम खांद्यावर पेलून परिस्थितीशी झुंजणाऱ्या हरेक कष्टकऱ्यास त्यांनी हा संग्रह अर्पण केला आहे. जर भूक नसती तर कदाचित आज जगाचे रूप वेगळे राहिले असते. कुणीच बसल्या जागेवरून हललं नसतं. कारण संपत्ती कमाविण्याची, तिचा संचय करण्याची गरजच राहिली नसती. या विश्वव्यापी भूकेमुळेच या जगात सारी उलथापालथ होत असते. जीवावर उद्धार होऊन, वेळेप्रसंगी जोखीम पत्करून कष्टकरी कामगार परिस्थितीशी झुंजत असतो.
आपण केलेल्या श्रमाचे चीज व्हावे, प्रतिष्टा मिळावी. सकलांनी आपल्या कामाची दखल घ्यावी. आणि यातून या विश्वात, समाजात मानवतेचे तेज झळकावे. अशी अपेक्षा कष्टकऱ्याची असते,
तुझ्या श्रमास प्रतिष्टा मिळो I सकलांचे लक्ष तुजकडे वळो I
मानवतेचे तेज झळझळो I विश्वामाजी या योगे II
सुरवातीलाच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रमगीतेतील या वरील ओळी वाचकाचे लक्ष वेधून घेतात. त्यामुळे एकूणच हा कवितासंग्रह कष्टकरी, कामगार विश्वाचे अर्थात ‘घामाचे संदर्भ’ घेवून आला असल्याचे समजते.
सिन्नर येथील कवी किरण भावसार हे उद्योग क्षेत्रात कार्यरत असून वाशिम येथील काव्याग्रह प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या त्यांच्या ‘घामाचे संदर्भ’ या कवितासंग्रहाविषयी फार ऐकून होतो. तसेच गिरणा गौरव प्रतिष्टान आयोजित पुस्तकावर बोलू काही या उपक्रमात त्यांचे या कवितासंग्रहावर व्याख्यान संपन्न होणार असल्याने रसिक वाचकांशी हितगुज साधण्यासाठी हा प्रपंच.
या कवितासंग्रहातील रचना या प्रामुख्याने मुक्तछंदातल्या असून असून कामगार विश्वाचे चित्रण यात वाचावयास मिळते. ऐन उमेदीच्या काळात पोटाची खळगी भरण्यासाठी कित्येक कंपन्यांची फाटकं झिजवावी लागणारी कितीतरी कामगार आपल्याला ज्ञात आहेत. आणि यातून मॅनपावरच्या नावाखाली ओव्हरटाईम करत त्यांच्या आयुष्याच्या, सुखस्वप्नांचा घसारा ठरलेला असतो. चकाकणाऱ्या शहरात उजेड शोधता, शोधता त्यांच्या आयुष्याचा गोठा तर होतोच. मात्र कारखान्यात होणारे भीषण स्फोट, त्यात कामगारांचे होणारे मृत्यू पाहून किंवा बंद पडलेली कंपनी, यामुळे कामगारांच्या संसाराची होणारी परवड पाहून मन हेलावून जाते, सुन्न होते. अशा परिस्थितीत जगणं सुसह्य होण्यासाठी कर्जाच्या विळख्याने त्याला जखडलेले असते. वाणगी दाखल ‘सांगा तुकोबा’ या कवितेतील खालील ओळी पाहू,
तरीही हे जग
भडीमार करतंय सारखं
तुम्ही कर्ज घ्या म्हणून
दिवसाला एखादा फोन ठरलेलाच
क्रेडीट कार्डच्या आग्रहाचा
मला रमी खेळण्याचा
जंगली सल्ला देतात
जाहिरातीतून
माझेच आवडते लोकं. (सांगा तुकोबा, पृष्ठ क्र. १७)
या उद्योग जगतात कामगार यांत्रिकी पशुसारखे बनून जातात. घर, संसार यासोबत दैनंदिन गरजा भागवण्यासाठी काढलेले कर्ज यामुळे कामगार कधी यंत्रवत होऊन जातो, हे त्याचे त्याला स्वतःला सुद्धा कळत नाही. ज्याप्रमाणे गायी, म्हशींना इंजेक्शन देवून त्यांनी जन्म दिलेल्या गोऱ्ह्यांना जास्त दुध उत्पादन मिळावं म्हणून भोत बनविले जाते. तशीच गत कामगारांची असते, कारण कवीला पक्कं माहित झालंय कि, यांत्रिक अवजारांच प्रस्थ व वापर वाढला असून बैल आता नाही देवू शकत टक्कर ट्रॅक्टर, जीपशी खापाटल्या पोटी. आपले गाव, मुलुख इतकेच नाही तर स्वतःची ओळख विसरून आलेले बिनचेहऱ्याची माणसं घाण्याच्या बैलासारखी हाडाची काडं होईस्तोर राबत राहतात अहोरात्र.
वास्तव मांडणाऱ्या अशा कथा, कविता वाचतांना वाचक त्यात अडकत जातो, कळतनकळत कवीने, लेखकाने चित्रित केलेल्या पात्रांशी स्वतःशी तुलना करतो, किंवा असे अनुभव स्वतःचेही असू शकतात. याची वाचकाला जाणीव होते. यातून एक वेगळीच अनुभूती मिळते.
एकदा पर्मनंट झाल्यावर त्याच कामगाराला रोजंदारी तत्वावर काम कामगाराला मदत करता येत नाही, मदत करू वाटत नाही किंवा मदत करत नाही, हेही सत्य कवीने मांडले आहे. किंवा साहित्यिक म्हणून कितीही मोठं नाव झालं, तरी कामगार असल्याने नित्य नेमाने कामावर जावं तर लागतंच, ही सलही कवीच्या मनाला बोचते,
कार्ड पंच करतांना
मनाच्या लॉकरमध्ये
गुंडाळून ठेवतो कविता
आठ तासांसाठी (मी औकात विसरत नाही, पृष्ठ क्र. २३)
फर्स्ट, सेकंड, नाईटचं वास्तव स्विकारत, उद्योग जगतातील कार्ड पंचिंगच्या संस्कृतीत आयुष्य तीन शिफ्ट बनून जाते, कवीला याची जहरी सल आहे. रात्रपाळीत रात्रभर साथ देत जगणारा चंद्र सूर्य उगवताच अस्ताला जातो, मात्र उगवणारा सूर्य पहिल्या पाळीसारखा डोळ्यात टाचण्या टोचाव्या तसा टोचू लागतो. रात्रभर जागरण झाल्याने डोळे चुरचुर करतात. असं असलं तरी रिलीव्हर जर आला नाही तर परत फर्स्ट शिफ्टची ड्यूटी कामगारच्या बोकांडी बसतेच.
शोषणकर्ते हे रितसर विसरतात कि, उन्माद करत, स्वार्थासाठी गळे घोटून, सत्ता मिळवून कामगारांचे शोषण केले, कितीही धन, संपत्ती कमवली, सत्ता उपभोगली तरीही पैसा कमवून त्यांचा सुखाचा शोध संपत नाही. हवंस सुख काही केल्या घावत नाही. शेवटी मृत्यू हा प्रत्येकाला अटळ असतो, सरतेशेवटी मृत्यूनंतर आठवडाभरात सर्व कार्यक्रम उरकले जातात. म्हणूनच जीवन क्षणभंगुर असल्याने कामगारंचे शोषण थांबले पाहिजे, हेच खरे.
जीवनाची दशा सुधारण्यासाठी शिक्षण हाच एकमेव जालीम उपाय आहे. अगदी भंगार विकणाऱ्यापासून कष्टकरी, कामगार, असे कुणीही शिकून स्थिरस्थावर होण्याचा प्रयत्न करत यशस्वी होतात. असेच भंगार वेचता, वेचता शिक्षण घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे चित्रण भंगार कवितेत वाचायला मिळते.
गावाकडची हवा, पाणी कितीही ताजे व शुद्ध असले तरी तिथं हाताला काम मिळत नसल्याने पोटापाण्यासाठी शहराचा रस्ता धरणे हे क्रमप्राप्त ठरते,
गावच्या मातीत
रमत नाही त्याचा जीव
रोजी रोटीला महाग
मुलखातलं
उपाशी मारणारं
स्वच्छ निरभ्र आभाळ
काय चाटायचंय...? (मोकळी हवा, निरभ्र आकाश, पृष्ठ क्र. ४६)
पोट भरण्यासाठी हाताला काम नसल्याने गावाकडं कितीही मोकळी शुद्ध हवा असली तरी काय उपयोगाची. असे बेरोजगार शहरात स्थलांतरीत झाल्यावर त्यांना दाटीवाटीने जीव मुठीत धरून उघड्या गटारी, कचराकुंड्या असणाऱ्या ठिकाणी वास्तव्य करावं लागतं. परवडत नसल्याने ते मच्छरांचा, रोगराईचा बंदोबस्त करू शकत नाही. पुढे आपोआप धुरकट, कळकट कोंदट जगणं त्यांच्या अंगवळणी पडते. शहरात उद्योगधंदे वाढल्याने हवा, जल, वायू प्रदूषण होत आहे. हेच कामगार परवडत नसल्याने विमाही काढू शकत नाही. उपचार न मिळाल्याने शेवटी मरण हाच पर्याय त्यांना शिल्लक राहतो. त्याचमुळे कवी, उद्दिग्न होऊन कवी नारायण सुर्वे यांना, ‘माफ करा सुर्वे कामगारांच्या तलवारी बोथट झाल्या आहेत. कारण आज रोजीरोटीचा सवाल उग्र बनला आहे. कारण शेवटी भूक लाचार असते. असे रास्त आकलन या कवीचे आहे.
बरं राबणारे हात फक्त पुरुषांचेच आहेत असेही नाही. तर त्या घरकाम सांभाळून कंपनीत पॅकिंग, कटिंग, स्विपिंग अशी सर्व कामे सकाळी केलेला नट्टापट्टा निथळेपर्यंत करत असतात बिचाऱ्या आपल्या संसाराला हातभार लावावा म्हणून. इतकेच नाही तर शहरातील गायी सुद्धा पाण्यावाचून व्याकूळ असतात. असे असले तरी त्या गायींच्या डोळ्यात पाणी कुठून येत असेल? हा प्रश्न कवीला सतावतो आहे. एक मात्र खरे कि काहीही झालं तरी आपल्या कामाशी प्रामाणिक राहणारा हा कामगार वर्ग असून कामातच राम ते मानतात,
सेकंड नाईट I राबू तिन्ही पाळ्या II
पान्ह्यांच्या चिपळ्या I घेऊ हाती II ...
रोज करू आम्ही I आठ तास वारी I
कामात श्रीहरी I पाहू सदा II (वारी, पृष्ठ क्र.६४)
आपल्या रोजीरोटीचा प्रश्न मिटल्यावर कामगार ‘काम हीच खरी ईश्वर सेवा’ समजून तन व मनाने त्याला नेमून दिलेली कामे करत असतो. तिकडे वारकरी पंढरीच्या वारीला जातो तर इकडे कामगार, कष्टकरी पान्हे हातात घेवून यंत्रांवर राबत असतो. कारखाना हाच त्यांच्यासाठी पंढरी असतो कारण त्यामुळेच त्यांच्या मुखी खास मिळत असतो.
अजून एक ठसठसीत सत्य कवीने मांडले आहे, रोड, रस्तांचे कामे करणारे कामगार उन्हात तळत डांबर, सिमेंटचे कामे करतात. आणि शेवटी टोलनाक्यांची व्यवस्था होते कि ज्या रस्त्यावर ते स्वतःचे वाहन कधीही चालवू शकत नाही कारण ते गरीब असतात त्यामुळे स्वतःचे वाहन कसे खरेदी करणार? आजच्या शोषण करणाऱ्या व्यवस्थेच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी ही रचना आहे.
एकदा नोकरी लागली कि हाच कामगार आपलं गाव, शिवार विसरून, आपले नातेवाईक तसेच आई बापापासून दुरावतो. आपला संसार, मुलं व रोजची ड्युटी, चाकरी या चक्रात गुरफटून घेतो स्वतःला, यात तो रममाण होतो, जसे देव एकदा मंदिरात विराजमान झाले कि त्यांनाही आठवण येत नसावी त्यांना घडविणाऱ्या कारागिरांची, शिल्पकारांची. तशीच गत कामगारांची व कामगारांच्या मायबापाची होत असते.
कवीला भडकलेल्या बॉयलरला कोळसा भरवताना काळवंडलेला कामगार जणू काळा सावळा राम भासतो. तिकडे विठ्ठल कमरेवर हात ठेवून उभा आहे तर इकडे कारखान्यात हा कामगार रात्रंदिन राबतो आहे. असे असले तरी सर्व काळ सारखा नसतो. एकेकाळी दीपस्तंभ वाटणारा कारखाना बंद पडतो आणि कामगार देशोधडीला लागतो. तरीसुद्धा,
हे शहर अजून
माझं झालं नाही
सोडून आलो त्या गावाच्या
नजरेतला परकेपणा
सोसत नाही (मुळांवरची माती, पृष्ठ क्र.८९)
शहरात येऊन कारखान्यात दोन वेळेची भ्रांत मिटली तरी मनातला गाव काही केल्या कामगाराच्या मनातून जात नाही. कामाच्या रगाड्यात चरकाच्या बैलासारखे राबत असतात कामगार. त्यांना तारीख वाराचेही भान नसते. सणासुदीची वा सुट्टीची वाट पाहण्यात त्यांचे आयुष्य झरझर विरून जात असते, कारण त्यांना तेव्हाच मोकळा श्वास घेता येतो. घाम गाळला तर दाम मिळेल. अशी त्यांची गत असते. टीव्ही पाहणे, पिक्चर पाहणे, दारू पिणे, पत्ते खेळणे, वरातीत नाचणे हे क्षण त्यांच्यासाठी मनाजोग जगण्यासाठी असतात. पगार, बोनसची वाट पाहिल्यावर पैसे हातात आले कि, खर्च करतात, उधळपट्टी करतात. खरे तर हाच कामगार शिक्षण घेऊन मोठ्या हुद्यावर काम करू शकतो, मात्र तो तसा प्रयत्न करत नाही. त्याला कार्ल मार्क्स, नारायण मेघाजी लोखंडे माहित नसतात. शिकलेला इतिहास, नागरिकशास्त्र तो भाकरीच्या लढाईत विसरून जातो. ही कामगार मंडळी व्हाट्सएपच्या पोस्ट वाचून फॉरवर्ड करतात. अफवांचे बळी ठरतात. तरीसुद्धा कामगार कृतघ्न नसतात, ते भांबावून गेलेले असतात. त्यांची भाकरीशी लढाई अव्याहतपणे सुरु असल्याने ते शिक्षण किंवा प्रबोधानाकडे वळू शकत नाही. कारण त्यांच्याही वस्तीत सूर्य तर उगवायला हवा...
या कवितासंग्रहात कामगारांचे विश्व विविध रूपे घेवून कवितांमधून पाझरत राहते आणि ओघानेच वाचकांचे ह्रुदयही कधी डोळ्यांतून तर कधी हुंद्क्यांतून पाझरत असते, इतके वास्तव चित्रण या कवीने केले आहे. कामगार, हॉटेलमधील पोऱ्या, यांत्रिक पशु, भंगारवाला, शेतकरी, शेतमजुरांचे लग्न न जमणारे मुले, मालधक्यावर सिमेंटच्या गोण्या उतरविणारे मजूर, शेतीची वाताहत होऊन देशोधडीला लाग्ल्याने कंपनीत गेटवर भरतीचा बोर्ड धुंडाळूणारे तरून, ट्रक ड्रायव्हर, कंत्राटी शिक्षक, कामगार, आपला मुलुख सोडून आलेले भैय्ये, क्लिनर, हमाल, सेन्टरिंग कामगार, रोजंदारीवर राबणाऱ्या बाया, भटकणाऱ्या गायी, बँडवाले, कापड दुकानातील कामगार, गुरखा, ऊसकामगार, पिझ्झा डिलिव्हरी करणारा मुलगा, बांधकाम साईटवर राहणारे वाचमन, शिंपी, फेरीवाले, गारेगार कुल्फ्या विकणारा, मॅनहोलमध्ये काम करणारे मजूर, वायरमन, शोभेची दारू काम करणारे कामगार, विहीर कोदणारे, खाणीत काम करणारे मजूर, विड्या वळणारी बाई असे अनेक पात्रे वाचकांना कवितांमधून वाचता वाचता भेटत राहतात.
‘घामाचे संदर्भ’ असे आगळेवेगळे नाव या कवितासंग्रहाला देण्यात आले असून कामगार विश्वाचे वास्तव चित्रण या कवितांमध्ये आढळते. मुखपृष्टावर कामगार विश्वात हरवलेल्या कामगारांचा समूह वाचकांचे लक्ष वेधून घेतल्याशिवाय राहत नाही.
डॉ. अरुण ठोके यांनी या कवितासंग्रहाची पाठराखण करतांना, महानगरीय जीवनाचे अनेक पैलू काव्यगत वास्तव म्हणून या कवितांत ‘घामाचे संदर्भ’ बनून आलेले आहेत. कामगारांविषयीचा करुणाभाव कवीच्या ठायी असलेल्या प्रबुद्ध प्रतिभेचा प्रत्यय देतो. कष्ट करणारी माणसे व त्यांना साहाय्यभूत ठरणारे प्राणी यांच्याकडे केवळ उपयुक्ततेच्या नजरेने पाहणाऱ्या स्वार्थी वृत्तीच्या दंभस्फोट या कवितेतून करण्यात आलेला आहे. महानगरात पाण्याच्या शोधात फिरणाऱ्या भटक्या गाई व पोटासाठी काम मिळावे म्हणून कंपन्यांच्या दारोदार चकरा घालणारे मजूर या दोघांच्याही तृष्णेशी परात्मता या कवितेचे वेगळेपण नियत करते.
ही कविता कामगारांची विविध रूपे व त्यांच्या दयनीयतेचे भीषण वास्तव आपल्या कवेत घेते. कचरा वेचणाऱ्या स्त्रीया, भंगारवाला, गिरणी कामगार, ड्रायव्हर, ऊसतोड कामगार, कंपन्यात जड काम करणारे कामगार, आदि कामगारांची विविध रूपे या कवितांत अवतरलेली आहेत. यातील काव्यगत कथेने कामगारांच्या कष्टकऱ्यांच्या शोषणाचा इतिहास व वर्तमान वाचकांच्या पुढ्यात ठेवतात. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या ब्रँडयुद्धात छोटे व्यावसायिक व कुशल कारागीर यांच्या धंद्यासकट उद्ध्वस्त होत असल्याची सल, जागतिकीकरणातील अगतिकीकरण दाखविणारी आहे. ही कविता राष्ट्र उभारणीतील कामगारांच्या योगदानाकडे लक्ष वेधून राजकीय भूमिकेचे सुतोवाच करते. कष्टकऱ्यांच्या – कामगारांच्या व्यथा – वेदनांच्या अनेक तऱ्हा या कवितेत अंकुरित होतात. या कवितांतील कष्टकऱ्यांच्या – कामगारांच्या व्यथांचे बहरून येणे, हे घटीत संवेदनशील वाचकाला झिंजाडून सोडते. समकाळाचे नेटके भान, भाषेची लय, मिथकांचे नवसर्जन, प्रादेशिक अस्मितांचा त्याग व स्वाभाविक अभिव्यक्ती या विषेशांमुळे या कवितेने आपल्या अस्तित्वाची गुणवती मोहर उमटवलेली आहे.
मराठी कवितेतून विरळ झालेला कामगार जाणिवांचा अमोघ स्वर या कवितांत पुलकित झालेला आहे. दारिद्र्य, अन्याय, विषमता, हिंसा व शोषण या जीवनसत्याकडे पाहण्याची अभिनव दृष्टी ही कविता देते. असे स्पष्ट शब्दात नमूद केले आहे.
एकूण ४७ आशयगर्भ, अनेक विशेषणे, अलंकार, उपमा, दृष्टांत योजून समृद्ध झालेली कविता वाचकाच्या मनाला अत्यानंद देवून तृप्त करते. ‘घामाचे संदर्भ’ या कवितासंग्रहात अतिशय वाचनीय, आशयगर्भ कविता वाचायला मिळतात. हा संग्रह वाचकांनी आवर्जून वाचावा, असे मला वाटते.
या कवितासंग्रहास चित्रकार प्रदीप खेतमर यांनी रेखाटलेले उत्कृष्ट आणि बोलके मुखपृष्ठ तसेच पुस्तकाची मांडणी वाचकाला पाने पालटून कविता वाचायला प्रेरित करतात. तसेच साहित्यिक व मराठीचे प्राध्यापक प्रा. डॉ. अरुण ठोके यांची समर्पक पाठराखण यामुळे कवितासंग्रहाचा एकूण आवाका सहज लक्षात येतो. आशयगर्भ मुक्तछंद, अभंग रचनांनी हा संग्रह बहरलेला आहे. सर्व प्रकारच्या साहित्यिक लिखाण प्रकारचे लिखाण करणारे हे व्यक्तिमत्त्व आहे. पुन:पुन्हा वाचाव्या अशा त्यांच्या कविता आहेत.
असे असले तरी मला जाणवलेल्या काही अपवादात्मक उणिवा नमूद करणे माझ्यासाठी क्रमप्राप्त ठरते, जसे की काही रचना एका पृष्ठावर सहज मावल्या असत्या, (उदा. पृष्ठ क्र. ९ व १०, ११ व १२, २६ व २७, ५३ व ५४, ८५ व ८६ वगैरे ) त्यामुळे पुस्तक नक्कीच वाचकांना कमी किमतीत उपलब्ध झाले असते. तसेच छंदोबद्ध कविता वाचणाऱ्या वाचकांसाठी हा कवितासंग्रह निश्चितच नाही कारण या कवितासंग्रहात प्रामुख्याने मुक्तछंद रचनांचा समावेश असून अष्टाक्षरी, षढाक्षरी, अभंग (एकमेव रचना वगळता), अंगाई, गझल, लयबद्ध गाणी अशा रचनांचा समावेश नाही.
हे सर्व लिहिण्याचे कारण म्हणजे मंगळवार, दि. १५ ऑक्टोबर, २०२४ रोजी हुतात्मा स्मारक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, नाशिक येथे गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष माणूसमित्र सुरेश पवार यांनी आयोजित केलेल्या ‘पुस्तकावर बोलू काही...’ या सदरात कवी किरण भावसार यांच्या ‘घामाचे संदर्भ’ या कवितासंग्रहावर आधारित ऐसपैस गप्पांच्या कार्यक्रमाची मेजवानी नाशिकमधील रसिकवाचक तसेच साहित्यिकांसाठी उपलब्ध झाली आहे. दि. ५ मार्च, २०२४ ते दि.२८ फेब्रुवारी, २०२५ दरम्यान दर मंगळवारी आणि शुक्रवारी हा उपक्रम संपन्न होणार आहे. अशा प्रकारचा बहुधा हा साहित्य क्षेत्रातील पहिलाच अभिनव उपक्रम असावा. यामध्ये नवोदित तसेच प्रस्थापित साहित्यिकांना व्यक्त होण्यासाठी हक्काचं व्यासपीठ उपलब्ध झालं आहे.
याहीपुढे, त्यांची लेखणी अशीच तळपत रहावी. त्यांच्या हातून सर्व प्रकारचे साहित्यिक लिखाण व्हावे, हीच सदिच्छा! कवी किरण भावसार यांना गिरणा गौरव प्रतिष्ठान आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ या सदरात संपन्न होणाऱ्या व्याख्यानास आभाळभर शुभेच्छा!
पुस्तकाचे नाव :- घामाचे संदर्भ
ISBN :- 978-81-962933-0-7
कवी :- किरण भावसार, संवाद क्र. ७७५७० ३१९३३
प्रकाशक :- काव्याग्रह प्रकाशन, वाशिम
पाठराखण :- प्रा. डॉ. अरुण ठोके
स्वागत मूल्य :- ₹ १६०/- मात्र (सवलतमूल्य, टपाल खर्च आणि अधिक माहितीसाठी कृपया, संबंधितांशी संपर्क साधावा.)
सोमनाथ आवडाजी पगार (सॅप)
(महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेत प्रकाशनार्थ अनुदान प्राप्त साहित्यिक)
संपर्क क्र.:- ९२७३३५७१५९, Email:- somnathpagar@yahoo.co.in
गीतकार/ कवी, कथा, पटकथा, संवाद लेखक, युसमीक्षक, ट्युबर, ब्लॉगर, टेक्नोक्रॅट, ऑनलाईन डॉक्युमेंट्स ऍडव्हायझर, इंग्लिश लँग्वेज ट्रेनर.
शनिवार, १२ ऑक्टोबर, २०२४
दसऱ्याच्या शुभेच्छा!!!
सस्नेह नमस्कार,
☘️ आपणास व आपल्या परिवारास दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !!! 💐🙏💐💐💐💐
मानवता धर्माचाच
नाद घुमो जगभरा
ज्ञान, प्रकाश पेरूनी
करू साजरा दसरा ll१ll
आरोग्याचे सोने व्हावे
मिळो उपचार सर्वां
नाश दुर्गुणांचा होण्या
स्वःह करूया हो गर्वा ll२ll
षंढरीपूवर सत्य
अहिंसेचा जय, जय
भस्म असुरी विचार
दूर जावे चिंता, भय ll३ll
साधे, शुद्ध आचरण
चला संकल्प करूया
नवांकुर संस्कारांना
नवविचार पेरूया ll४ll
वाटू आनंदाचे सोने
नको वृक्षाला (आपट्या) वेदना
मनामनाला चेतवू
पर्यावरणा जपण्या ll५ll
लाभो धन नि संपदा
पूर्ण होवो साऱ्या इच्छा
नभी कीर्तीचे तोरण
दसऱ्याच्या या शुभेच्छा! ll६ll
शुभेच्छुक:-
*सोमनाथ पगार*, नाशिक
संपर्क: ९२७३३५७१५९.
मंगळवार, १ ऑक्टोबर, २०२४
काळजातला लामणदिवा - वैश्विक व वैचारिक साहित्यकृती
ll साहित्य तीर्थ ll
पुस्तक परिचय
काळजातला लामणदिवा – वैश्विक व वैचारिक साहित्यकृतीा
सोमनाथ पगार
संपर्क क्र.:- ९२७३३५७१५९.
पाणी प्रवाही राहिलं तर जीवनदान देतं, जिथं जाईल तिथ समृद्धी बहाल करतं, स्वर्ग निर्माण करतं आणि हेच पाणी जर तुंबलं, साचलं तर ते सडतं, त्याची दुर्गंधी निर्माण होते. त्यामुळे आजूबाजुच्या परिसरात रोगराई पसरून जनारोग्य धोक्यात येते. तशीच गत माणसाची असते. मनातल्या मनात भावनांचा कोंडमारा झाला तर मनाचे आरोग्य बिघडू शकते. म्हणून प्रवाही राहणे कधीही चांगलेच. म्हणूनच मला ऍरिस्टोटलने मांडलेली कथार्सिस ही संकल्पना आवर्जून आठवली.
हे आठवण्याचे कारण म्हणजे सुप्रसिद्ध लेखिका व कवयित्री सौ. सविता दरेकर यांची वाचनात आलेली कादंबरी काळजातला लामणदिवा होय. चित्तवेधक मुखपृष्ठ पाहिल्यावर आपोआपच पाठराखण वाचली आणि आनंदाने मन बहरून गेले कारण चांदवड सारख्या ग्रामीण भागात रुग्णसेवा करणारे माझ्यासह आपले सर्वांचे मार्गदर्शक, सुप्रसिद्ध लेखक डॉ. राजेंद्र मलोसे सरांची पाठराखण म्हणजे या पुस्तकाच्या आत डोकावून अंदाज देणारा आरसा होय.
डॉ. राजेंद्र मलोसे सर लिहतात, तुम्ही जेवढं वैयक्तिक लिहाल तेवढं ते वैश्विक होईल असे मी कुठेतरी वाचलं आहे. हे जे काही आठवणींचा लामणदिवा लिहलं आहे, मला असं वाटतं, हे पण वैयक्तिक आणि वैश्विक दोन्ही आहे. त्याचं कारण असं; सई आणि लेखिका या कधी दोन वाटतात तर कधी एकच वाटतात. ही सईची सय आहे आणि म्हटलं तर दुधावर आलेली साय आहे. सईवर साय येते पण मध्ये दुध खळखळत राहतं, उकळत राहतं. सई आपल्या लहानपणापासूनच्या आठवणी सांगते आणि जसं तिचे वडील तिला सांगतात की, ‘ओढ्यातलं पाणी बघ, दगड, धोंड्यांना टाळून खळखळत पुढे वाहत राहते’ तसेच हे लिखाण आहे.
वडिलांवर खूप प्रेम असणाऱ्या एका सईची ही गोष्ट आहे. असंच लिहित राहावं या लेखिकेने! कुठलाही बंध अनुबंध पाळू नये. आपल्याला जे समोर दिसतं ते लिहित रहावं. म्हणून तर म्हणतो की, जे वैयक्तिक असतं ते वैश्विक असतं. ते अपोआप वैचारिक होतं.
आणि त्यामुळेच हितगुज साधावी म्हणून हा प्रपंच...
आपल्या कुटुंबासोबत हिरव्यागार रानमळ्यात राहणारी, सर्वांच्या लाडात वाढणारी, निखळ जगणारी, बांधावरती कधी पाऊलवाटांवर विहरणारी, सिताफळं, बोरीभोवती मुक्त उधळणारी, नदीच्या झुळझुळ पाण्यासोबत, पक्ष्यांच्या किलबिलाटात उमलत्या कळीची अर्थात सईची ही कथा आहे.
या जगात एखाद्या मुलीचे तिच्या वडिलांशी तिचे सर्वात जवळचे नाते असते. बालवयात वडिलांसाठी त्यांची मुलगी म्हणजे जीव कि प्राण... समजायला लागल्यावर, दुडूदुडू चालायला लागल्यापासून एक आदर्श व्यक्ती म्हणून मुलीसाठी तिचे वडीलच हेच एकमेव आदर्शस्थानी असतात. काळजातला लामणदिवामध्ये आपल्याला पहिल्याच प्रकरणात या कथेची नायिका सई भेटते. शाळेत जाऊ इच्छिणारी म्हणजेच या व्यवहारी जगाचा सामना करायला सईचे वडील तिला हात धरून सुसज्ज करत असल्याचे लक्षात येते. तर “हे बघ सई, हे पाणी कसे वाहते आहे. त्यात दगड-गोटे खडक आहेत. तरीही ते पाणी रस्ता शोधत पुढे पळतंय...” असे बालवयात आपल्या लेकीवर चांगले संस्कार करणारे वडील वसंता वाचकाला भेटतात.
दरम्यान अनेक चांगले वाईट प्रसंग तिच्या वाटेला येतात. वडिलाचे अकाली निधन झाल्यावर तिला भावनिक संघर्षाचा सामना करावा लागतो. फिनिक्स पक्ष्याप्रमाणे प्रत्येक प्रसंगातून ती स्वतःला सावरत भरारी घेते. यासाठी तिच्या वडिलांचे संस्कार तिला लाखमोलाचे ठरतात. सईचं अस्तित्व, ओळख, धडपड, घुसमट याचबरोबर तिच्या अंतर्मनातले हुंदके यावर मात करत मार्ग काढत जाणारी सई नावाची नायिका काळजातला लामणदिवा होऊन जाते. प्रत्येक हळव्या बापाला आणि स्त्रीमनाला स्पर्शून जाणारी अशी ही कथा आहे.
सोप्प, सरळ, साध जीवन जगणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबाची ही कथा असून एका नोकरी करणाऱ्या मात्र शेतकरी कुटुंबातील सई नावाच्या मुलीचं स्त्रीमध्ये होणारं रुपांतर या कथेत उलगडत जातं. सईचे बालपण, तिची शाळा, पाटी, पुस्तक, वाहणारी झुळझुळ नदी, पानफुले, पाखरे हे सारे ओघाने आलेच.
वडिलांनी सईला ‘दिल्या घरी सुखी रहा’ हा दिलेला कानमंत्र म्हणजे अख्या बापवर्गाच्या मानसिकतेचे उदाहरण आहे.
शेवटी सईचे बाबा वसंता, यांचा धगधगत्या ज्वालासह धरतीवरचा प्रवास संपल्याने ती आता पोरकी होते. बाबांचे धरलेले बोट सुटल्याने,आयुष्याची वाट दाखवायला तिला हक्काचे कोणी नसल्याने ती एकाकी झाल्याने वाचकाचे डोळे वाचता वाचता पाणावल्याशिवाय राहत नाही. मात्र आयुष्य थांबत नाही हेच खरे, कारण अजूनही सईची झेप उंचावर जायची बाकी आहे. वडील वसंताचे स्वप्न ‘सई, खूप मोठी हो, नावारूपाला ये.’ असे होते आणि तिचे स्वप्न तिला पूर्ण करायाचे आहे. हा प्रवास न संपणारा, शेवटच्या श्वासापर्यंत नेणारा आहे.आयुष्य न संपणारा अखंड प्रवास आहे. हे वाचकाला उमगत जाते.
या कादंबरीची भाषा तशी सर्वसामान्य कुटुंबात बोलली जाणारी, वाचकाला सहज समजणारी आहे, सर्वसामान्य माणसाचे भावविश्व या कथेत गुंफले असून वडिलांना खूप जीव लावणाऱ्या नायिकेची ही गोष्ट वाचकांना खिळवून ठेवणारी आहे.
या कादंबरीस अरविंद शेलार यांनी रेखाटलेले समर्पक आणि बोलके मुखपृष्ठ वाचकाला पाने पालटून वाचायला प्रेरित करते. तसेच डॉ. राजेंद्र मलोसे यांची समर्पक प्रस्थावना व पाठराखणीमुळे कादंबरीचा एकूण आवाका सहज लक्षात येतो. तसेच आयुष्यात प्रत्येक प्रयत्नात पहिलं पाऊल टाकताना शब्द उर्जेतून पाठींबा देत सत्याच्याच मार्गाने चालायला शिकवले, यश अपयश पचवत ध्येय, चिकाटी, मेहनत यांची साथ करत स्वप्न पाहायला शिकवले... असे त्यांचे वडील कै. आनंदा बाबुराव बच्छाव यांना ही साहित्यकृती लेखिकेने अर्पण केली आहे.
सौ. सविता दरेकर ह्या कवयित्री, लेखिका म्हणून प्रसिद्ध असून छंद, वाचन, लेखन, निसर्ग पर्यटन यात रमणारं हे व्यक्तिमत्व आहे. मालेगाव येथून प्रकशित होणाऱ्या नगारा साप्ताहिकात वर्षभर लिहलेल्या लेखमालेचे फलित म्हणजेच काळजातील लामणदिवा होय. तसेच ‘माझ्या शब्दांच्या गर्भात’ हा त्यांचा काव्यसंग्रहही प्रकाशित झाला असून आजवर त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.
पुस्तकाची मांडणी व बांधणी उत्तम आहे. या कादंबरीचे मुखपृष्ठ अतिशय समर्पक असून चित्रकाराने रेखाटलेला, उगवत्या सूर्याकडे मार्गक्रमण करणारा बाप म्हणजे आपल्या पाल्यासाठी मार्ग दाखविणारा दीपस्तंभ असतो. असे म्हटलं जातं की, जोवर बाप आहे तोवर माहेर आहे. आणि ते खरंही आहे. बालपणापासून बोट धरून शिकविणारा बाप मुलांसाठी प्रिय असणे, यात नवल ते काय?
लेखिका ह्या उत्तम कवयित्री असून या कादंबरीत असलेल्या कविता या कादंबरीचे विशेष आकर्षण म्हणावे लागेल. एकूण तेहतीस प्रकरणांचा यात समावेश असून ‘काळजातला लामणदिवा ‘ ही कादंबरी अतिशय वाचनीय असून वाचकांनी आवर्जून वाचावी, असे मला वाटते.
हे सर्व लिहिण्याचे कारण म्हणजे मंगळवार, दि. १ ऑक्टोबर,, २०२४ रोजी हुतात्मा स्मारक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, नाशिक येथे गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष माणूसमित्र सुरेश पवार यांनी आयोजित केलेल्या ‘पुस्तकावर बोलू काही...’ या सदरात लेखिका सविता दरेकर यांच्या ‘काळजातला लामणदिवा’ या कादंबरीवर आधारित ऐसपैस गप्पांच्या कार्यक्रमाची मेजवानी नाशिकमधील रसिकवाचक तसेच साहित्यिकांसाठी उपलब्ध झाली आहे. दि. ५ मार्च, २०२४ ते दि.२८ फेब्रुवारी, २०२५ दरम्यान दर मंगळवारी आणि शुक्रवारी हा उपक्रम संपन्न होणार आहे. अशा प्रकारचा बहुधा हा साहित्य क्षेत्रातील पहिलाच अभिनव उपक्रम असावा. यामध्ये नवोदित तसेच प्रस्थापित साहित्यिकांना व्यक्त होण्यासाठी हक्काचं व्यासपीठ उपलब्ध झालं आहे.
याहीपुढे, त्यांची लेखणी अशीच तळपत रहावी. त्यांच्या हातून सर्व प्रकारचे साहित्यिक लिखाण व्हावे, हीच सदिच्छा! सन्माननीय सौ. सविता दरेकर मॅडम यांना गिरणा गौरव प्रतिष्ठान आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ या सदरात संपन्न होणाऱ्या व्याख्यानास आभाळभर शुभेच्छा!
पुस्तकाचे नाव :- काळजातला लामणदिवा
ISBN :- 978-93-9178२2-97-9
कवी :- लेखिका सौ. सविता दरेकर, संवाद क्र. ८९५६१८९१९५.
प्रकाशक :- परिस पब्लिकेशन, पुणे
प्रस्तावना :- डॉ. राजेंद्र मलोसे
स्वागत मूल्य :- ₹ ३००/- मात्र (सवलतमूल्य, टपाल खर्च आणि अधिक माहितीसाठी कृपया, संबंधितांशी संपर्क साधावा.)
सोमनाथ आवडाजी पगार (सॅप)
(महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेत प्रकाशनार्थ अनुदान प्राप्त साहित्यिक)
संपर्क क्र.:- ९२७३३५७१५९, Email:- somnathpagar@yahoo.co.in
गीतकार/ कवी, कथा, पटकथा, संवाद लेखक, युसमीक्षक, ट्युबर, ब्लॉगर, टेक्नोक्रॅट,, इंग्लिश लँग्वेज ट्रेनर, ऑनलाईन डॉक्युमेंट्स ऍडव्हायझर.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)