google.com, pub-3412048091495808, DIRECT, f08c47fec0942fa0 Sahitya Tirtha - My Literature, My Creation साहित्य तीर्थ - माझं साहित्य, माझं लिखाण: कुणब्याची कविता- कुणब्याच्या व्यथा, वेदनांचा सात-बारा

शुक्रवार, २४ मे, २०२४

कुणब्याची कविता- कुणब्याच्या व्यथा, वेदनांचा सात-बारा

*साहित्य तीर्थ* पुस्तक परिचय *कुणब्याची कविता – कुणब्याच्या व्यथा, वेदनांचा सातबारा* *सोमनाथ पगार* संपर्क क्र.:- ९२७३३५७१५९. *खरं तर आपण सारेच तलाठ्याच्या सौजन्यानं* *बापाचं बोट सोडून उतरत जातो सात-बारा’च्या अज्ञात बेटावर* *बापाचा वारस म्हणून* *आणि न्याहळू लागतो आपल्या पूर्वजांच्या अस्तित्वाच्या खुणा* *‘सहा-ड’च्या मसणवटीत थडग्यांच्या ओळीत ... क्रमाक्रमानं* (सात-बाराची नोंद) या ओळी आहेत *जेष्ठ कवी, प्राचार्य लक्ष्मण महाडिक* यांच्या *‘कुणब्याची कविता’* या कवितासंग्रहातील सात-बाराची नोंद या कवितेतील. या कवितासंग्रहाचं गारुड साहित्य क्षेत्रात रसिक वाचकांच्या मनावर गेल्या दोन दशकांपासून विराजमान असल्याचं आपणास ठाव आहे. काही कथा, कविता वाचल्या किंवा ऐकल्यावर आपल्याला स्वर्गीय आनंद मिळतो. याचे कारण त्यांचा आशय-विषय, त्यांच्यातील भावना अंत:करणाला भिडणाऱ्या असतात. कदाचित अशा रचनांची चाल मधुर असते किंवा त्या वाचकाच्या भावविश्वाशी, आयुष्याशी निगडीत असतात. चमत्कृतीपूर्ण कल्पना, मांडलेले विचार प्रभावी असतील. साध्यासोप्या परतू अर्थपूर्ण रचना असूनही शब्दाला नादमाधुर्य असेल, भाषा सहज सोपी विषयाला साजेशी असेल. आवडता खाद्यपदार्थ खाल्यावर मिळणारी तृप्ती, अशा वाचनातून वाचकांना निश्चितच मिळते. आणि हेच काम ‘कुणब्याची कविता’ या कवितासंग्रहातील कविता करत असल्याचे अभिमानाने मला नमूद करतांना विशेष आनंद होतो आहे. मातीत राबराबून कुणबी अन्नधान्याचे पीक घेतो खरा, मात्र योग्य तो भाव त्याच्या पिकाला कधीच मिळत नाही. घाम गाळणारा शेतकरी आपल्या पिकाचा भाव मात्र स्वतः ठरवू शकत नाही ; त्याच्या मालाचा भाव व्यापारी ठरवतो, तोही कवडीमोल. शेती करून कुणबी सुखी झाल्याचे आजवर तरी ऐकिवात नाही. महागाई, दारिद्र्य, हालअपेष्टा, काबाडकष्ट हे हरळ, गाजर गवतासारखं त्याच्या आयुष्याच्या बांधामेराला, पाचवीला पुजलेले असतात. हे असं असलं तरीही मायमातीशी आपली नाळ तो कधीच तोडू शकत नाही, कारण याच शेतीने आपल्या कित्येक पिढ्यांना पोसले असल्याची त्याला जाणीव आहे. आज ना उद्या आपल्या कुळाला चांगले दिवस येवून समृद्धी प्राप्त होईल, ही भाबडी इच्छा त्याच्या मनात घर करून असते. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हा वारसा युगेयुगे चालत आलेला आहे. आपल्या बापजाद्यांनी भोगलेल्या कळा सात-बारावरील नोंदीप्रमाणे वारसाहक्काने वाट्याला येतात. हेच या ओळींमधून अधोरेखित होत आहे. खालील ओळी पाहू, *आणेवारीत शेतसारा भरता भरता* *सात-बारा वरच्या विहिरी कोरड्या पडतात* *आणि चारातागाई मिळवता मिळवता* *देहू आळंदीच्या वाऱ्या घडतात* (घोषणांच्या बेमोसमी पावसात) किंवा *जन्माआधी पोसे माता पुढे जन्मभर माती* *एक नाळ तुटताच श्वास गुंफतात नाती* *उंच उडावे आकाशी ठेवा मातीवर पाय* *जन्मणाऱ्या प्रत्येकाची तीच बाप तीच माय* (माती) बरं, सरकार मायबाप म्हणावं तर तेही कुणब्याच्या हिताच्या योजना राबवत नाही, योजना राबविल्याच तर त्यात त्याची ससेहोलपट ठरलेली असते. आणि शेवटी कुणब्याच्या हाती शून्य ठरलेला. घोषणांचा बेमोसमी पाऊस बरसत राहतो. सोबतीला शासनाचे कर भरता भरता त्याच्या नाकीनऊ येते. चारातगाई सारख्या योजनांचा लाभ घ्यायचा तर देहू आळंदीच्या वाऱ्यांसारख्या शासकीय कार्यालयांमध्ये चिरीमिरी वाटता वाटता खेट्या घालूनही हाताला काहीच घावत नाही. अशा या बिकट परिस्थितीने गांजल्याने खेड्यापाड्यातील तरूण माणसं शहरात परागंदा झाल्याने खेडी वांझ झाल्याची सल कवीला बोचते आहे. शेवटी माथी योजनांचा चिखल शिल्लक राहतो तो सरकारी अधिकार्यांच्या कर्तबगारीने आणि यामुळे कुणब्याची दारिद्र्य रेषा काही केल्या पुसली जात नाही. असं असलं तरी इथल्या मायमातीशी नाळ घट्ट असून जन्मभर माती उपाशी राहू न देता कुणब्याला पोसत असते. याची त्याला पक्की जाणीव असल्याने उंच आकाशी झेप घेत असतांना मातीवर पाय घट्ट असावेत कारण ही मातीच माय आणि बाप दोन्ही आहे. हे त्याला पक्के ठाव आहे. हे लिहण्याचे कारण म्हणजे नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव येथील ज्येष्ठ कवी तसेच विद्यार्थीप्रिय शिक्षक, माजी प्राचार्य, कवी लक्ष्मण महाडिक यांचा साहित्यजगतातील प्रसिध्द शब्दालय प्रकाशनाने प्रकाशित केलेला ‘कुणब्याची कविता’ हा कवितासंग्रह नुकताच माझ्या वाचण्यात आला. कवितेची जान आल्यापासून या कवितासंग्रहाबद्द्ल ऐकून होतो, पुस्तकांची आई आदरणीय भीमाबाई जोंधळे यांच्या ‘पुस्तकाचे हॉटेल’ येथे हा कवितासंग्रह विक्रीस असल्याचे कळताच वेळ न दवडता जावून खरेदी केला. त्यामुळे आता हा कवितासंग्रह हाती पडल्याने वाचू शकलो. आणि एकेक कविता वाचत कवितासंग्रह पूर्ण वाचूनच पुस्तक हातातून खाली ठेवले. वीस एकवीस वर्षाचा काळ लोटला तरीही या कविता वर्तमानाशी नाळ जोडलेल्या आहेत. जागतिकीकरणाच्या आक्रमणात बदलणारी ग्रामसंस्कृती, कृषिसंस्कृती तसेच बदलणाऱ्या गावाचे दर्शन या कवितांमधून होते. कदाचित यामुळेच या कविता वैश्विक वाटू लागतात. शिक्षणाचा वसा नसलेल्या अडाणी शेतकरी पण वारकरी कुटुंबात जन्मलेल्या या कवीच्या कविता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या आंतरभारती या दहावीच्या अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकात तसेच विविध नियतकालिके, समीक्षा ग्रंथातून, मासिकांमधून लिहल्या तर गेलेल्या आहेच त्याचबरोबर महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांमध्ये या कवितासंग्रहातील कवितांचा समावेश पदवी व पदव्युत्तर अभास्क्रमांमध्ये केला गेला. अनेक मानाच्या नामवंत पुरस्कारांसह महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे दिल्या जाणारा बहिणाबाई चौधरी यांच्या नावाने दिला जाणारा प्रथम प्रकाशन सदरातील पुरस्कार या कवितासंग्रहाला प्राप्त झालेला आहे. यातच या कवीचे व कवितासंग्रहाचे मोठेपण आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही. ‘उत्कृष्ट व उत्स्फूर्त रचना म्हणजे काव्य’ असे वर्डस्वर्थने म्हटले आहेच. 'कुणब्याची कविता' या कवितासंग्रहातील कविता वाचतांना हे सहजच आठवून गेलं कारण सर्वच कविता अप्रतिम, उत्कृष्ट आहेत. प्राचार्य लक्ष्मण महाडिक हे एक ज्येष्ठ कवी असून साहित्यिक क्षेत्रातलं एक उत्तम कवी तसेच शैक्षणिक क्षेत्रात एक विद्यार्थीप्रिय शिक्षक तसेच प्राचार्य म्हणून परिचित असलेलं नाव. हा त्यांचा हा पहिलावहिला कवितासंग्रह. त्यांनी साहित्य क्षेत्रात कवी म्हणून नावलौकिक मिळवलेला आहे. अशा या साहित्यिकाच्या या कवितासंग्रहाचे वाचकांनी त्याचे भरभरून स्वागत केले आहे. प्रतिभासंपन्न अशा या कवीने आजवर अनेक कविसंमेलनं तसेच काव्यस्पर्धा गाजवल्याचे तसेच अनेक लिह्त्या हातांना बळ देवून लिहते केले आहे, हे रसिकांना ज्ञात आहेच. याचबरोबर अनेक शाळा, महाविद्यालयांमध्ये आपली कविता घेवून फिरत असल्याने ते एक उत्तम वक्ता व कवी म्हणून सर्वश्रुत आहे. कवी कविता लिहतो, याचे कारण मनाची अस्वस्थता. सामाजिक वास्तवाच्या व्यथा, वेदनांनी मनातील धग वाढत जाते. मनातील घुसमट कमी करण्याचे साधन कविता बनून जाते. जेव्हा कवितेच्या रुपात संवेदना, मनातील भावनांचा निचरा होतो तेव्हा मनातील वेदनांची ठसठस कमी होऊन जीवन सुसह्य होऊ लागते. आपल्या अवतीभवतीच्या सामाजिक जाणीवा घेऊन कविता आत काळजात वाढत, मनावर परिणाम करत असते. यातून सामाजिक वास्तवाकडे बघता बघता शादांतून व्यक्त होत कविता भोवतालच वास्तव हाच विषय होऊन झिरपत असते काळजातून. खालील ओळी पाहू, *कुणब्याच्या दुखाची* *लिहलेली गाथा* *मरणाची व्यथा* *शब्दबद्ध* (गाथा) कुणब्याच्या पोटी जन्माला आलो हे आपलं संचित असून कुणब्याचं जीवन म्हणजे स्वतःच स्वतःचं सरण रचण्यासारखं आहे. आयुष्यभर वारकरी बनून देवधर्म करूनही सुखाची वाट पाहत मी माझ्या दारी स्तब्ध उभा आहे. अशा आपल्या व्यथा, वेदनांचा सात-बारा कवी वाचत कवी वाचकांना अंतर्मुख होण्य्यास भाग पाडत आहे. हेच या कवितासंग्रहातील कवितांचे यश आहे. कुणब्याचं अर्थात शेतकऱ्याच जगणं म्हणजे फरफट, दु:ख, असं असलं तरी त्याचा बागलबुवा करतांना तो सहसा दिसत नाही, वेदनांना कुरवाळत बसत नाही. वेळेवर न पडणारा पाऊस एकतर पडत नाही, पडलाच तर पिकांची राखरांगोळी करून सोडतो. लोकसंखेच्या भरमसाठ वाढीमुळे गाव सोडणारी पिढी, गावपण उरत जपण्यासाठी धडपडते आहे. खालील ओळी वाचल्यावर आपल्या हे सहज लक्षात येईल, *पोटासाठी शहराकडे* *वाहू लागला इथला वारा* *दारिद्र्याच्या पानगळीत नष्ट झाला सात-बारा* (आठवणीतलं गाव) साध्यासोप्या शब्दात वाचकाला आत्मपरीक्षण करायला लावणाऱ्या या ओळी आहेत. कुणी कितीही मोठा झाला तरी आपलं गावपण काही मनातून आटत नाही. असं असलं तरीही पोटापाण्यासाठी शहराकडे धाव सुरु झाल्याने जमीनी विकल्या जावून सात-बारावरील त्यांच्या नोंदी कोऱ्या होतांना दिसत असल्याने कवी दु:खी होतो आहे. आजही कवीला गावगाडा, वाडा, विहीर, मोट, चाक-कणा, नाडा रहाट, काळीमाती, लाकूड फाटा वगैरे साद घालत आहेत. अशाही परिस्थितीत कवी आपल्या आई बापाला विसरू शकत नाही. मायच्या जन्माची चित्तरकथा वर्णन करतांना, *उभा जन्म सांधताना दिल्या गाठीवर गाठी* *वाढे बाळसं धरून दु:ख तिच्या ओठी पोटी* तर बापाचं महत्व व बापपण, *काल परवा बाप वैकुंठवासी झाला* *माझ्या आयुष्याचा नाडा सैल झाला* या शब्दात बापाच्या गेल्याने निर्माण झालेली पोकळी, दु:ख, उणीव कवीला छळते आहे. तसेच पंढरीच्या वाऱ्या करूनही विठ्ठू काही पावला नाही कारण, स्वतः विठ्ठल म्हणतो कि, *द्यावी सोडून पंढरी जावं एकांतात दूर* *हल्ली फार झाले म्हणे माझ्या पंढरीत चोर* स्वतः विठ्ठलच जर दुखी, कष्टी आहे. तर मग तो भक्तांना कसा पावणार? केवळ पाटी, पुस्तक, पेन्सिल अर्थात शिक्षणच माणसाला प्रगतशिल व सुखी बनवू शकते, हे कवीला पक्के ठाव आहे. त्यामुळे सुख स्वप्नांची पहाट उजाडावी, म्हणून कवी म्हणतो कि, *माझ्या आईनं माती खाल्ली* *म्हणून मी मातीती रुजलो* *अन रुजतोय* *पुढे मी तिला सांगेन* *तू फक्त पुस्तक खा ... पेन्सिल खा*. *तू फक्त पुस्तक खा ... पेन्सिल खा*. (राख, माती आणि पेन्सिल) तर गावातील मातीसुद्धा विकासाच्या भस्मासुरामुळे सुरक्षित नसल्याने कवी नाराज आहे, *आता तर दिवसेंदिवस याचा वाढतोय वावर सर्वत्रच* *गल्लीबोळापासून ते माळरानापर्यंत* *हा बेलाशक कुणाच्याही कुपाटीला खेटतो, उभ्या पिकात शिरतो* *फुलाऱ्यातल्या ज्वारी-बाजरीची लुसलुसीत* *हिरवी पिवळी कोवळी कणसं चाखतो* *तर कधी नुसतीच नासधूस* (हा कोण ...?) मातीची ओढ कवीला स्वस्थ बसू देत नाही. गावाकडची माती, कृमी-कीटकं, जंगल, पाखरं, शेळी, बैल. कुत्रे, औत, मोट, व्यापारी, आधुनिकतेची साक्ष देणारे ट्रक्टर, ट्रोली, पी.व्ही.सी, रोटोव्हेटर, पेरणी/ मळणी यंत्र तसेच तलाठी वैगरे सारं काही कवीने काळजात जपलेलं आहे. असं असलं तरी दुष्काळाने सत्वपरीक्षा घ्यायचं सोडलेलं नाही. आमराई सुकून गेली, सीताफळांची झाडे शिल्लक राहिली नाही. दुष्काळामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी गंगथडीला जावून कशीबशी गुजराण करावी लागते आहे. याचबरोबर गावाकडची गुरं ढोरं मात्र चारा, पाण्यावाचून हातपाय खोडून मेल्याची सल कवीला सलते आहे. या कवितासंग्रहातील एकेक कविता म्हणजे कुणब्याची भळभळती जखम आहे. एक मात्र इथे नमूद करावे वाटते कि, कवी नोकरीनिमित्ताने गावापासून दूर गेला असला तरी आपला गाव, भाऊबंद, शेती, वाडी हे वैभव काळजात जपून आहे. या कवितासंग्रहास चित्रकार धनंजय गोवर्धने (प्रथम आवृत्ती) चित्रकार विष्णू थोरे (द्वितीय आवृत्ती) यांनी रेखाटलेले समर्पक आणि बोलके मुखपृष्ठ वाचकाला पाने पालटून कविता वाचायला प्रेरित करते. तसेच रानकवी ना. धो. महानोर व प्रा. डॉ. मनोज तायडे (दुसऱ्या आवृतीस) यांच्या समर्पक प्रस्थावनेमुळे कवितासंग्रहाचा एकूण आवाका सहज लक्षात येतो. तसेच आपले ‘तीर्थरूप ‘त्यासोबतच ‘देशातील शेती व शेतमालाच्या प्रश्नासंदर्भात संघर्ष करतांना हुतात्मा झालेल्या तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या स्मृतीला हा कवितासंग्रह अर्पण केलेला आहे. अष्टाक्षरी, लयबद्ध गाणी, अभंग, मुक्तछंद अशा विविध प्रकारच्या रचनांनी हा संग्रह बहरलेला आहे. कवितेशी विशेष जिव्हाळा असलेले हे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या कवितांमधून त्याचं भावविश्व अर्थात त्यांचं गाव, माती, पाऊस, गुरं ढोरं, झाडे, आईवडील, पक्षी-निसर्ग अशी विविधता आणि संपन्नता आढळते. पुन:पुन्हा वाचाव्या अशा त्यांच्या कविता आहेत. एकूण ६२ वाचनीय आणि आशयगर्भ कवितांचा या कवितासंग्रहात समावेश असून ‘कुणब्याची कविता’ या कवितासंग्रहात अतिशय वाचनीय, आशयगर्भ कविता वाचायला मिळतात. हा संग्रह वाचकांनी आवर्जून वाचावा, असे मला वाटते. हे सर्व लिहिण्याचे कारण म्हणजे शुक्रवार, दि. २४ मे, २०२४ रोजी हुतात्मा स्मारक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, नाशिक येथे गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष माणूसमित्र सुरेश पवार यांनी आयोजित केलेल्या ‘पुस्तकावर बोलू काही...’ या सदरात कवी प्राचार्य लक्ष्मण महाडिक यांच्या ‘कुणब्याची कविता' या कवितासंग्रहावर आधारित ऐसपैस गप्पांच्या कार्यक्रमाची मेजवानी नाशिकमधील रसिकवाचक तसेच साहित्यिकांसाठी उपलब्ध झाली आहे. दि. ५ मार्च, २०२४ ते दि.२८ फेब्रुवारी, २०२५ दरम्यान दर मंगळवारी आणि शुक्रवारी हा उपक्रम संपन्न होणार आहे. अशा प्रकारचा बहुधा हा साहित्य क्षेत्रातील पहिलाच अभिनव उपक्रम असावा. यामध्ये नवोदित तसेच प्रस्थापित साहित्यिकांना व्यक्त होण्यासाठी हक्काचं व्यासपीठ उपलब्ध झालं आहे. याहीपुढे, त्यांची लेखणी अशीच तळपत रहावी. त्यांच्या हातून सर्व प्रकारचे साहित्यिक लिखाण व्हावे, हीच सदिच्छा! आदरणीय प्राचार्य, कवी लक्ष्मण महाडिक यांना गिरणा गौरव प्रतिष्ठान आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ या सदरात संपन्न होणाऱ्या व्याख्यानास आभाळभर शुभेच्छा! पुस्तकाचे नाव :- कुणब्याची कविता लेखक :- लक्ष्मण महाडिक, संवाद क्र. ९४२२७५७५४२३ प्रकाशक :- शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर पाठराखण :- ना.धो महानोर प्रस्थावना :- ना.धो महानोर, प्रा. डॉ. मनोज तायडे स्वागत मूल्य :- ₹ १३०/- मात्र (सवलतमूल्य, टपाल खर्च आणि अधिक माहितीसाठी कृपया, संबंधितांशी संपर्क साधावा.) आस्वादक: *सोमनाथ आवडाजी पगार* (सॅप) (*महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेत प्रकाशनार्थ अनुदान प्राप्त साहित्यिक*) संपर्क क्र.:- ९२७३३५७१५९, Email:- somnathpagar@yahoo.co.in गीतकार/ कवी, कथा, पटकथा, संवाद लेखक, युसमीक्षक, ट्युबर, ब्लॉगर, टेक्नोक्रॅट, ऑनलाईन डॉक्युमेंट्स ऍडव्हायझर, इंग्लिश लँग्वेज ट्रेनर.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: