google.com, pub-3412048091495808, DIRECT, f08c47fec0942fa0 Sahitya Tirtha - My Literature, My Creation साहित्य तीर्थ - माझं साहित्य, माझं लिखाण: चंदनदाह - काव्यात्मक साखरपेरणी

शुक्रवार, ८ नोव्हेंबर, २०२४

चंदनदाह - काव्यात्मक साखरपेरणी

II साहित्य तीर्थ II चंदनदाह – काव्यात्मक साखरपेरणी सोमनाथ पगार संपर्क क्र.:- ९२७३३५७१५९ बालपणी खेडेगावात आम्ही मुले चिंचा, बोरं, आंबे इत्यादी फळे कच्चेच खायचो कारण ती फळे झाडावर योग्य वाढ होऊन पिकेपर्यंत आम्हाला धीर धरला जात नसायचा. त्यामुळे दात आंबायचे, खोकला यायचा. कधी कधी तर या आगाऊपणामुळे आम्हा मुलांना आईवडिलांचा मारसुद्धा खावा लागायचा. परंतु आम्हाला त्याचे काही सोयरेसुतक नसायचे. पुढे
काही दिवसानंतर तीच फळे पिकल्यावर गोड व मधुर लागायची. थोडक्यात काय? तर संयम, धीर ठेवणे जीवनात आवश्यक असते. प्रत्येक कार्याची एक निश्चित वेळ असते, हे नक्की. तोच नियम कवितेलासुद्धा तंतोतंत लागू पडतो. सुरवातीच्या काळात कवी सुचेल तसे, जमेल तसे लिहत असतो. अनुभव वाढत जातो, अभ्यास होत जातो, आणि पुढे आपण सुरवातीच्या काळात लिहलेल्या रचना बाळबोध किंवा प्राथमिक स्वरूपाच्या असल्याचा साक्षात्कार झाल्याशिवाय राहत नाही. कालांतराने अनुभव, अभ्यास व सातत्यामुळे लिखाणाची उंची वाढत जाऊन उत्तोउत्तम लिखाण आपल्या लेखणीद्वारे झिरपू लागते. हे लिहण्याचे कारण म्हणजे नाशिकमधील ज्येष्ठ कवी सोमनाथ साखरे यांचा ‘चंदनदाह’ हा कवितासंग्रह माझ्या हाती पडल्यावर मला आपसूकच कविता वाचल्यावर व्यक्त होण्याचा मोह आवरता आला नाही. ‘प्रसिद्ध होण्यापेक्षा सिद्ध व्हावं’ हेच ध्येय मनात ठेवून त्यांनी विद्यार्थी जीवनापासून कविता लिहणे सुरु ठेवले, मात्र कवितासंग्रह प्रकाशनाची घाई त्यांनी मुळीच केली नाही. कदाचित यामुळेच ते दर्जेदार व अभ्यासपूर्ण लिहलेल्या कविता वाचकांच्या हाती ठेवण्यास यशस्वी झाले असावे, असे मला वाटते. आजकाल कवी व कवितांचे पीक जोमदार आले असल्याची बाब चोखंदळ वाचकांच्या नजरेतून सुटू शकत नाही. कविता वाचत असतांना नेहमी शालेय तसेच महाविद्यालयीन अभ्यासक्रमात अभ्यासलेल्या कविता कशा असायच्या याची मला आठवण होते. मात्र बर्‍याचदा तशा कविता बऱ्याच कवितासंग्रहात वाचायला मिळत नसल्याची खंत मनाला बोचत राहते. परंतु इथे सर्वाना अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याने आपला वाचक म्हणून नाइलाज असतो. तरीसुद्धा काय वाचावे? याचा अधिकार वाचकाला असल्याने चांगल्या साहित्याची वाचक निच्छितच दखल घेतल्याशिवाय राहत नाही. तथापि, उत्कृष्ट यमक, रूपक, उत्प्रेक्षा, अनुप्रास, श्लेष, स्वभावोक्ती, अतिशयोक्ती आदी काव्यालंकाराची रेलचेल या 'चंदनदाह' कवितासंग्रहातील कवितांमध्ये आढळते. त्यामुळेच या कवितासंग्रहातील कविता वाचनीय व आशयगर्भ झाल्या आहेत. पहिलीच रचना पाहू, अंगणात माझ्या I सुमनांचा सडा I उभा एक वेडा I पारिजात II साधेल का ऐसे I पारिजात व्रत II ध्यास दिनरात I मजलागी II (पारिजात व्रत, पृष्ठ क्र. १७) उनवारा, पाऊस अंगाखांद्यावर झेलत पारिजात अंगणात झुलत असतो. अंगणात नेमाने सडा पडत असतो. कवीला तो दानशूर हरिश्चंद्र भासतो. या वृक्षाने देण्याचा वसा घेतलेला असून त्याला अहंकार नसतो तर फक्त दातृत्व त्याला ठाव असते. असेच व्रत दिनरात आपल्याला साध्य व्हावं ही कवीची दुर्दम्य इच्छा आहे. ओळीला ओळी जोडून काहीतरी लिहले म्हणजे झाली कविता, हीच धारणा बऱ्याच कवींची असते. थोडा अभ्यास करून कविता लिहली तर वाचकांनाही वाचायला आवडते. हे वास्तव असूनही कवितांचा पाऊस दिनरात बरसतो आहे. मात्र या कवितासंग्रहातील कविता याला अपवाद आहे. ‘जीवन धूसर’ ही दुसरी कविता वाचल्यावर मी सहज मात्रा मोजून पाहिल्या तर ती कविता पादाकुलक वृताचा एक उत्कृष्ट नमुना असल्याचे माझ्या लक्षात आले. अशाच या कवितासंग्रहातील कविता आशयपूर्ण असून विविध छंदांमध्ये गुंफलेल्या आहेत. मधुरा भक्ती अनोखे रंग रंगी रंगले राधा गोविंद प्रीत फुलोरा न्यारा सुगंध गंध प्राशुनी समीर धुंध (मधुरा भक्ती, पृष्ठ क्र. ३७) मधुर भक्तीचे अनोखे चित्रण 'मधुरा भक्ती' कवितेत आढळते. कृष्ण राधेचा मूक संवाद सुरू असून टाळ, चिपळ्या व मृदंगाचे संगीत सुरू आहे. परिणामस्वरूप राधा स्वये श्रीरंग झाली आहे. एक प्रकारचा ताल, सूर, लय या कवितांमध्ये असल्याने वाचता वाचता वाचक मंत्रमुग्ध झाल्याशिवाय राहत नाही. या कवितासंग्रहातील ‘साखर ओव्या' तर कळस म्हणावा लागेल, खालील ओळी पाहू, पाठीवरती नागीण काळी सळसळणारी वेणी गं SSS! गेली दुरून फुत्कारात ती उरात कळ जीवघेणी गं SSS! (साखर ओव्या, पृष्ठ क्र. ३८) किंवा असा कसा बाई खेळ घरादारात रंगला कळीकाळाचे तांडव देव झिंगला झिंगला (देव झिंगला, पृष्ठ क्र. ८६) माणसाचा जन्म झाल्यापासून देव त्याच्या पाचवीलाच पुजलेला असूनही देव कुणाला पावल्याचं काही ऐकिवात नाही. उलट दुष्काळ, पाण्याचे दुर्भिक्ष, त्यामुळे पिकांचे जळून जाणे, परिणामी होणाऱ्या आत्महत्या. कधीकधी तर अख्खं गाव पोटापाण्यासाठी गाव सोडून दूर कुठेतरी स्थलांतरित होतांना कवीने पाहिले असल्याने कवी व्याकुळ आहे. या संग्रहात चांगल्या गजलही समाविष्ट आहेत. उत्कृष्ट आशय विषय असलेल्या या गजल लगावली, वृत्त, काफिया, रदिफ या सर्वच बाबतीत परिपूर्ण आहेत. 'का बोलतेस आता' या गजलेतील खालील ओळी पाहू, मौनातल्या नभाशी का बोलतेस आता हा चंद्र आवसेचा का शोधतेस आता गोडी सरून गेली केव्हाच साखरेची गाथा अपूर्णतेची का वाचतेस आता (का बोलतेस आता, पृष्ठ क्र. १५२) अशा अभिजात व मनन चिंतनातून लिहल्या गेलेल्या या रचना असून कधी गजल, कधी अभंग, कधी विराणी अशा विविध रूपात या रचना झिरपल्या आहेत. या संग्रहात निखळ निसर्गविषयक कवितांबरोबरच निखळ प्रेम कविताही आढळतात. कवीने आपल्या मनोगतात व्यक्त केल्याप्रमाणे कविता म्हणजे गणपतीच्या पायीच्या पैंजनातील लहान लहान घुंगरातून निर्माण होणारा मंजुळ अर्थध्वनी होय, याच व्याख्येला अनुसरून त्यांच्या कविता नादमधुर, छंद आणि शब्दांगसुंदर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. कवी कविता रचून त्याला आलेल्या अनुभूती इतरांना सांगून त्यांच्या जीवनात ‘काव्यात्मक साखरपेरणी’ करत असतो, कारण साहित्यिक हा आत्मकेंद्री नसून 'जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती' अशीच त्याची धारणा असते. वृतबद्ध कविता, गजल, अभंग, अष्टाक्षरी (ओवी), मुक्तछंद अशा सर्व प्रकारच्या रचनांचा या कवितासंग्रहात समावेश आहे. खूप दिवसानंतर काहीतरी चांगल वाचायला मिळाल्याने सर्वांना सांगावं वाटलं म्हणून हा सारा प्रपंच... आपणही हा कवितासंग्रह वाचवा, हा आग्रह तसेच सोमनाथ साखरे हे एक उत्तम कवी, लेखक म्हणून प्रसिद्ध असून आजवर त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. पुस्तकाची मांडणी व बांधणी उत्तम असून साहित्य क्षेत्रातील नावाजलेल्या नाशिक येथील सुभाषित प्रकाशनाने हा कवितासंग्रह प्रकाशित केला असून चंदनाच्या शीतलतेबरोबरच चंदनाचा दाहसुद्धा कवीला जाणवतो याची जाणीव करून देणारे बोलके व समर्पक चित्रकार स्वप्नील नीलकंठ यांनी रेखाटलेले मुखपृष्ठ वाचकांचे लक्ष वेधून घेत आतील कविता वाचायला प्रेरित करण्यास भाग पाडल्याशिवाय राहत नाही. हे या कवितासंग्रहाचे खास आकर्षण म्हणावं लागेल. तसेच प्रा. विजय काचरे सरांची 'आत्ममग्न कवितेला प्रकाशनाची झळाळी' अशा समर्पक शब्दात लाभलेली समर्पक प्रस्थावना यामुळे कवितासंग्रहाचा एकूण आवाका सहज लक्षात येतो. तसेच तीर्थरूप आप्पा आणि त्यांना कवी समजणारा त्यांचा अनुज चंद्रकांत यांच्या स्मृतीस त्यांनी ही साहित्यकृती त्यांनी अर्पण केली आहे. ‘चंदनदाह’ असे अर्थपूर्ण शीर्षक असलेला या कवितासंग्रहाची योग्य अशा शब्दांत पाठराखण करत ज्येष्ठ साहित्यिक तथा चित्रपट गीतकार/ कवी प्रकाश होळकर यांनी कवितासंग्रहातील कवितांचा आशय विषय सहज लक्षात आणून दिला आहे. कवी सोमनाथ साखरे हे एक अभ्यासू व्यक्तिमत्व असून त्यांनी स्वतःच व्याकरणदृष्ट्या संग्रह निर्दोष करण्याचा प्रयत्न केला असल्याचे लक्षात येते. एकूण ८७ कवितांचा या संग्रहात या समावेश असून ‘चंदनदाह ‘ या कवितासंग्रहातील कविता अतिशय वाचनीय असून वाचकांनी आवर्जून वाचाव्यात, असे मला वाटते. हे सर्व लिहिण्याचे कारण म्हणजे शुक्रवार, दि. ८ नोव्हेंबर, २०२४ रोजी सायंकाळी सहा वाजता हुतात्मा स्मारक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, नाशिक येथे गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष माणूसमित्र सुरेश पवार यांनी आयोजित केलेल्या ‘पुस्तकावर बोलू काही...’ या कवी सोमनाथ साखरे यांच्या ‘चंदनदाह’’ या कवितासंग्रहावर आधारित ऐसपैस गप्पांच्या कार्यक्रमाची मेजवानी नाशिकमधील रसिकवाचक तसेच साहित्यिकांसाठी उपलब्ध झाली आहे. दि. ५ मार्च, २०२४ ते दि. २८ फेब्रुवारी, २०२५ दरम्यान दर मंगळवारी आणि शुक्रवारी हा उपक्रम संपन्न होणार आहे. अशा प्रकारचा बहुधा हा साहित्य क्षेत्रातील पहिलाच अभिनव उपक्रम असावा. यामध्ये नवोदित तसेच प्रस्थापित साहित्यिकांना व्यक्त होण्यासाठी हक्काचं व्यासपीठ उपलब्ध झालं आहे. याहीपुढे, त्यांची लेखणी अशीच तळपत रहावी. त्यांच्या हातून सर्व प्रकारचे साहित्यिक लिखाण व्हावे, हीच सदिच्छा! कवी सोमनाथ साखरे सरांना गिरणा गौरव प्रतिष्ठान आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ या सदरात संपन्न होणाऱ्या व्याख्यानास आभाळभर शुभेच्छा! पुस्तकाचे नाव :- चंदनदाह (कवितासंग्रह) ISBN : 978-81-967055-3-4 कवी/ लेखक :- सोमनाथ साखरे प्रकाशक :- सुभाषित प्रकाशन, नाशिक मुखपृष्ठ :- स्वप्नील नीलकंठ स्वागत मूल्य :- ₹ १५०/- मात्र (सवलत मूल्य व टपालखर्च यासाठी कृपया, संबंधितांशी संपर्क साधावा) सोमनाथ पगार (सॅप), नाशिक (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेत प्रकाशनार्थ अनुदान प्राप्त साहित्यिक) संपर्क क्र.:- ९२७३३५७१५९, Email:- somnathpagar@yahoo.co.in sahityatirthasp@gmail.com गीतकार/ कवी, कथा, पटकथा, संवाद लेखक, युट्युबर, ब्लॉगर, टेक्नोक्रॅट, ऑनलाईन डॉक्युमेंट्स ऍडव्हायझर, इंग्लिश लँग्वेज ट्रेनर. #highlightseveryone #marathipoems #followers #pandharpur #highlights @highlight Following Amazon India Following Love Somnath Pagar Somnath Sakhare #Commenters

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: